मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

 

जय श्रीराम !


मानस - एकादशी (भाग २)

राजस पुरुषोत्तम रेगे

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जमीनीवर आपटला नाही. पडता पडता अलगद तो पायांवर उभा होता. जाणीवा शुद्धीवर येऊ लागल्या तसे त्याला जाणीव होत गेली.. कि त्याची उंची आता कमी झाली आहे. शरीर उभ्यापेक्षा आडवे होते आहे. तोंडाचा आकार पुढे निमुळता होत आहे.आणि आता त्याला प्रथमच जाणीव झाली की त्याला चार पाय आहेत. अरे बापरे.. त्याचे रूपांतर श्वानात झाले होते. आता हळूहळू आजूबाजूच्या परिस्थितीचे तो अवलोकन करू लागला.
पक्क्या सिमेंटच्या इमारतींचे कच्च्या मातीच्या कौलारू घरांमध्ये रूपांतर झाले होते. आजूबाजूला असंख्य गायी उभ्या होत्या.. म्हणजे तो गोशाळेत होता तर!
खूप मोठा परिसर.. एका बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये चारा साठवलेला होता. दुसरीकडे काही स्त्रिया गवऱ्या थापत होत्या. पुरुष गोठ्यातील शेण फावड्याने ओढून एका ठिकाणी ढीग लावत होते.  
एक सुगंधाचा जोरदार झोत त्याच्या अंगावरून गेला. "गंगी परत दावे सोडून पळाली होती, होय रे नागप्पा? "  कानावर आवाज पडला. त्याबरोबर दचकून त्याने धपापत्या उराने आवाजाच्या दिशेने पाहिले.  एक मध्यमवयीन, गौरवर्ण कांती, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर, दंडावर आणि पोटावर भस्माचे पट्टे,खांद्यावर उपरणे, कंबरेला पांढरे शुभ्र धोतर, पाणीदार डोळ्यात करुणा, असे एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व गायींच्या गराड्यात उभे होते... जणू कोणी सत्पुरुषच. त्यांच्याकडूनच तो सुगंधाचा झोत त्याच्या अंगावर येत होता. "श्रीराम श्रीराम" असे म्हणत ते गंगीच्या पाठीवरून हात फिरवत उभे होते. आणि इतर गायी जणू या महात्म्याने आपल्याही पाठीवरून हात फिरवावा म्हणून पुढे येण्यास झटत होत्या. हम्माँ हम्मा करून त्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.  
"माय, असे आपल्या लेकरांना टाकून , दावे तोडून पळू नये.., मी येणारच होतो ना ईथे. ' असं तो संतमहात्मा त्या गायीला प्रेमाने म्हणत होता. ती गाय ही जणू तिला त्यांचे बोलणे समजते आहे अशा रीतीने मान डोलवत होती. मधेच झुकून त्यांच्या पायावर नाक घासत होती. तिच्या गळ्यापाशी खाजवत ते सत्पुरुष तिचे लाड करत होते.
 सगळ्या गायीच्या पाठीवरून हात फिरवून ते सत्पुरुष निघाले तसा तो ही त्यांच्या मागोमाग निघाला. आता ते सत्पुरुष गावातून फिरत होते. समस्त गावकरी त्यांना 'महाराज, महाराज'  म्हणत मान तुकवत होते . कोणी पांथस्थ त्या धूळमातीच्या रस्त्यावरच लोटांगण घालत होता. तर कोणी चरणस्पर्श करत होते. आता ते सत्पुरुष गावाबाहेरील एका शेतात आले. तिथे काही तरुण मंडळी विहीर खोदत होती. पण पाणी लागले नव्हते. महाराज दिसताच सगळे त्यांच्याभोवती जमा झाले आणि म्हणाले, " म्हाराज आपण एकडाव श्रीराम जय राम जय जय राम म्हना, आमी कुदळ मारतो. पानी लागेल बगा ". हो नाही करता करता. महाराजांनी स्वतःच कुदळ हातात घेतली आणि 'श्रीराम जय राम जय जय राम ' म्हणत एक दणका  मारला ..  कि पाण्याचा फवारा आकाशात दूरपर्यंत उडाला. सगळी मंडळी आनंदली.
महाराजांनी त्यांच्यासाठी आणलेले आमटी, भाकर, चुरमुऱ्याचा चिवडा त्यांना स्वहस्ते खाऊ घातला. एक तुकडा या श्वान झालेल्या राजसच्याही वाट्याला आला.
आता तो महाराजांच्या मागे मागे जाऊ लागला.
नंतर महाराज राम मंदिरामागच्या ओढ्यावर गेले. तिथे दोन स्त्रियांचे भांडण सुरु होते. दोघी स्त्रिया चांगल्याच पेटल्या होत्या.. एकमकींना अद्वातद्वा बोलत होत्या.
तिथे पोचल्यावर महाराजांनीही त्याच भाषेत दोघींना बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर तिथे उभे असलेले एक गृहस्थ ... भाऊसाहेब त्यांचे नाव असावे, काहीतरी उदाहरण दाखवले, त्याबरोबर एकदम शांत होत महाराज त्यांच्याकडे वळून गळ्याकडे तर्जनी करत म्हणाले, 'भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे हो. "
याला काही एक कळत नव्हतं. संतापाने लालबुंद झालेला माणूस अचानक शांत कसा काय होऊ शकतो, हे त्याच्या कल्पनेपलीकडे होते.

नंतर महाराज राममंदिरात त्यांच्या निवासस्थानी परतले. हा हि त्यांच्यामागोमाग परतला. राममंदिराच्या पायरीवर डोके टेकवून तो बसून राहिला.
महाराज रोज त्याला भाकर तुकडा टाकत. ते खाऊन तो निवांत रहात असे.
राममंदिरात श्रीमहाराजांचा सत्संग चाले, कीर्तन होई. भेटायला येणाऱ्या लोकांसोबत चर्चा होई. हे सगळं कानावर पडत असे, पण त्याच्या बुद्धीला आकलन होत नसे.
हा , महाराज ! सारखे 'श्रीराम जय राम जय जय राम' असे लोकांकडून म्हणवून घेतात, सतत 'जानकी जीवन स्मरण जय जय राम ' म्हणतात हे त्याला नित्य कानी पडून समजायला लागले होते. अगदी आता ते कोचावरून उठतांना केव्हा जानकी जीवन स्मरण म्हणतात आणि कोणत्या क्षणी श्रीराम जय राम... म्हणतील हे हि त्याला अंदाजावरून कळायला लागले होते. दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीला श्रीमहाराजांचा उपास असतो आणि रामाला भगर- आमटीचा प्रसाद असतो हे ही त्याला कळू लागले होते. महाराजांना आवडते म्हणून तो ही त्या दिवशी इतरत्र काही खात नसे. फक्त रामाचा प्रसाद ग्रहण करी. आणि अश्या वेळी महाराज जास्त आनंदित होतात आपल्या अंगावरून हात फिरवतात हे त्याने अनुभवले होते. त्यांच्या प्रेमास पात्र व्हावे म्हणून तो आता शक्य ते त्यांच्या आवडीचे करत होता.
हळूहळू सगळ्या गावकऱ्यात हे पसरू लागले. लोकही कौतुकाने सकाळी त्याला खायला घालायचे. पुढे पुढे असे होऊ लागले कि तो ज्या दिवशी जेवला नाही तेव्हा लोक एकादशी असावी असे समजू लागले होते. त्यांचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला होता.
आणि स्वतः श्रीमहाराजांनीही याविषयी सर्व लोकात त्याचे कौतुक केले होते. अशी अनेक वर्ष निघून गेली.
आणि ते १९१३ साल उजाडले. श्रीमहाराज आता थकलेले दिसू लागले होते. दम्याचा जोर येई, तेव्हा शेजघरातून येणारा त्यांचा खोकल्याचा आवाज त्याच्या कानावर पडत असे. आणि तो काळाकुट्ट दिवस उजाडला.
२२ डिसेंबर, १९१३
गोंदवल्याचा सूर्योदय होत असताना श्रीमहाराज निजधामास निघाले होते. सगळीकडे सुन्न वातावरण होते. लोकांनी आकांत मांडला होता. गोंदवले गाव दुःखात बुडून गेले होते. गावोगावी निरोप गेले होते. अंगणात उभे राहून त्याला परिस्थितीचा अंदाज आला होता. काहीतरी अघटित घडले आणि आपला त्राता, आपले लाडके महाराज आपल्याला सोडून गेले हे त्याला समजले, अन त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. आतून खूप मोठ्याने ओरडून रडावे असे त्याला वाटू लागले होते पण लोक हाकलून देतील कि काय या भीतीने त्याने महत्प्रयासाने आपले रडू आवरून धरले होते. .

थोड्याच वेळात, श्रीमहाराजांचा निष्प्राण देह शेजघरातून आणून रामासमोर ठेवण्यात आला. याला काय वाटले कुणास ठाऊक! आजवर कधीही राममंदिरात त्याने पाऊल टाकले नव्हते. पण आज राहवले गेले नाही.. आत शिरून त्याने महाराजांच्या देहाभोवती एक प्रदक्षिणा घातली. आणि विषण्ण मानाने तो बाहेर आला. आता आपल्याला वाली कोणी उरला नाही हे त्याने ओळखले आणि वाट फुटेल तिकडे चालत राहिला.

पुढे काही दिवसांनी कित्येक मैलाचा प्रवास करून तो पंढरपुरात पोहचला. रस्त्यात मिळेल ते खात होता. कोणी खाऊ घालत होते, कोणी हाकलून लावत होते.
इंद्रायणी काठी आल्यावर त्याला अगदी उचंबळून आले. तहानलेला, भुकेला तो, अगदी चालण्याइतके हि त्राण नव्हते.  पाणी पिण्यासाठी नदीवर खाली वाकला आणि अचानक धडपडून पाण्याच्या धारेला लागला. तिथेच एका खोल खोल डोहात गिरक्या घेता घेता त्याला जलसमाधी मिळणार तेवढ्यात हातापायांच्या धडपडीने गळ्यातील  कालपांथस्थ यंत्राची कुठलीशी कळ अचानक दाबली गेली.. आणि..

आज एका अनोळखी भक्ताने, नाव गुप्त ठेवण्याच्या बोलीवर २० तांदुळाची पोती पाठवली होती. त्याचा टेम्पो प्रल्हाद इमारतीच्या खाली उभा होता.
राजस नेमका आपटला तो त्या पोत्यांवर. थोडेफार खरच्टण्यापलीकडे त्याला काही दुखापत झाली नव्हती.
अन् विशेष म्हणजे तो तिथे पडून अवघी वीस मिनिटे झाली होती. पण काळाच्या पलीकडे गेला होता तेव्हा त्यात कित्येक वर्ष उलटून गेली होती. कालगतीच न्यारी आहे. एव्हाना तो तिथे पडला हे सुदैवाने कोणाच्याही लक्षात आले नव्हते. वर पत्नी व मुलगा झोपेत होते. त्यांना पत्ताही नव्हता.. एवढ्या वेळात काय घडून गेले ते!

भानावर आल्यावर तो सगळं आठवू लागला. अरेच्चा... पूर्वजन्मात घडलेल्या या कारणांनी आपल्याला  एकादशीला उपास घडतोय तर!!  तसेच अंग झटकून तो पटापट पायऱ्या चढून रूम मध्ये आला. समोर भिंतीवरच्या  महाराजांच्या फोटोकडे लक्ष गेलं. अन तो भयानक दचकला.. मागच्या जन्मात गेल्यावर बघितलेले सत्पुरुष हेच याची खात्री पटल्यावर आता मात्र त्याचा हुंदका फुटला. डोळे भरून वाहायला लागले. याच सत्पुरुषांच्या सहवासाने आणि कृपेने  त्याला या जन्मात मानव देह मिळाला होता हे त्याला कळून चुकले होते. रेवतीला ना उठवता.. आता तो समाधी मंदिराच्या दिशेने धावत सुटला.  
 आज कोणालाही तो आवरता येणार नव्हता.
समाधी मंदिरात जाऊन त्याने अंग झोकून दिले. रडत लोटांगण घालू लागला.. " महाराज महाराज " असा टाहो फोडत मंदिराच्या उंबऱ्यावर वारंवार नमस्कार घालू लागला. आजवर जो काय अभिमान, मुजोरी अंगी होता तो सगळा अश्रुधारातून वाहून चालला होता.  

समाधी मंदिरात श्रीमहाराज मंद मंद स्मित करत होते. त्यांचा उद्देश सफल झाला होता. बाजूच्या ब्रम्हानंद मंडपात कीर्तनकारांनी निरूपणासाठी घेतलेल्या अभंगाच्या ओळी ऐकू येत होत्या,
" जरी नाही मशी घडली काही सेवा । जरी नाठविले तव नावा|
जरी संतांची केली नाही पर्वा । आचरीला मार्ग न बरवा ।।
.. ...
पांडुरंग सद्गुरुमाये, कळवळुनी झडकरी यावे, लेकरा उसंगी घ्यावे ।...

***
अश्विन शु पौर्णिमा.. अर्थात कोजागिरी पौर्णिमा!
स्थळ: आइन्स्टाइन हॉल, इस्रो  

राजसने ब्लेझरच्या वरच्या खिशात ठेवलेल्या श्रीमहाराजांच्या फोटोचे डबडबल्या डोळ्यांनी दर्शन घेत, छातीला हात लावीत, त्या भव्य हॉलमध्ये स्टेजवर प्रवेश केला. अन...  .... Welcome to our brilliant scientist Mr Rajas Rege for successfully launching of Time Machine-  Ipoch Voyager! Heartiest Congratulations to Rajas Rege and Team ISRO   ". हि वाक्य समोरच्या पडद्यावर झळकली आणि पाठोपाठ माइकवरून इस्रो चेअरमन एस. सोमनाथ यांचा जोशपूर्ण आवाज आला. पुढची वाक्ये Soon Mr Rege  will be receiving the Most prestigious "Hall of fame " award,  " संपूर्ण हॉलमधल्या  टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेली.  

(उत्तरार्ध )

जय श्रीराम
श्रीमहाराज कन्या नयना

 


जय श्रीराम !


मानस - एकादशी (भाग १)

राजस पुरुषोत्तम रेगे

एक तडफदार, बुद्धिवान, कर्तृत्ववान, बहुआयामी व्यक्तिमत्व! उच्चशिक्षित, कलासक्त, आणि खेळातही पुढे. लहानपण जरी कष्टात गेले होते तरी आता बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता होती, हातात पैसा खेळत होता. स्वकर्तृत्वावर सगळं मिळवल्याने परिणामी अंगात गर्विष्ठपणा ,माजोरडेपणा, अभिमान पुरेपूर भरलेला. सगळी सुखे पायाशी लोळत असूनही एकच खंत त्याच्या आयुष्यात होती. तो स्वतः एवढा बुद्धिमान असूनही, मुलगा मात्र मंदबुद्धी जन्माला आला होता. त्याच्या भविष्याची चिंता होतीच. या कारणाने बोलण्यात अरेरावी, हेकेखोरपणा, कडवटपणा हि होताच. जरुरीपेक्षा जास्त झालेल्या पैशाला अनेक वाटा फुटतात, तसा प्रकार झाला होता. लेट नाईट पार्ट्या, कॅसिनो, मद्यपान, हे मित्रांच्या संगतीमुळे त्याच्या आयुष्यात डोकावू लागले होते.  यावरून पत्नीशी फोनवर सतत वाद हि होत होते.

बंगलोर इथे एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत तो उच्च पदावर होता. मूळ पिंड क्वांटम फिजिक्सचा असल्याने तिकडे त्याचा ओढा जास्त. त्यातच भारतातील नावाजलेल्या इस्रो हेड्क्वाटर्सला एका सिक्रेट प्रोजेक्ट्साठी बोलावणे आल्याने चार महिन्यापूर्वीच तिथे जॉईन झाला होता. हा सिक्रेट प्रोजेक्ट म्हणजे भारतातले पहिले टाइम मशीन बनवणे. २०१७ मध्ये कॅनडा येथील, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ  Ben Tippet  यांनी मॅथ्स आणि फिजिक्स वापरून एक फॉर्मुला तयार केला होता आणि तेव्हापासून इस्रोचे शास्त्रज्ञ त्यावर काम करत होते. आता ते काम अंतिम टप्प्यात आले असले तरी काही महत्वाच्या कामासाठी त्यांना या क्षेत्रातल्या हुशार व्यक्तींची गरज लागणार होती.
राजसचे आवडते क्षेत्र असल्याने त्याने सगळं मागचे विसरून जीवतोड, दिवसरात्र मेहनत घेऊन ,  मूळ मशिनरी जरी अवाढव्य असली तरी ओंजळीत मावेल असे टाइम मशीन टूल कधीच बनवले होते. ज्याला हाता घेऊन मनुष्य भूतकाळात फिरून येऊ शकत असे. त्याच्या काही ट्रायल ही घेऊन झाल्या. उदा. १० वर्ष मागे भूतकाळात जाणे , २० वर्ष मग ४० वर्ष , मग ६० आणि आता सगळ्यात मोठं सक्सेस म्हणजे १२० वर्ष मागे भूतकाळात जाऊन येणे. हि शेवटची ट्रायल राहिली होती. आणि त्यावर त्याचे काम सुरु होते. ते मशीन तो सतत सोबत ठेवत असे. स्वतःपुरते त्याने त्या मशीनचे नाव Ipoch Voyager उर्फ ' ' काळपांथस्थ '  उर्फ त्रिकालजयी असेही ठेवले होते.
रेवती राजस रेगे.. त्याची पत्नी, मानसिकरित्या विकलांग रितिकला घेऊन साताऱ्यात आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. ती सातार्यात बँकेत ऑफिसर.
राजस रेगे मूळचा पंढरपूरचा. गरिबीत शिक्षण झाले. आई  गृहिणी, वडील प्राथमिक शिक्षक. पगार कमी. घरच्या दोन गाई. आई वडील दोघेही एकादशी व्रत करायचे. त्यामुळे अर्थातच लहानग्या राजसला दर एकादशीला नकळत उपास घडे. आई वरई भात, शेंगदाण्याची आमटी दुपारी करत असे. आणि रात्री सगळे दूध पिऊन झोपत असत. त्यामुळे राजस नाराज असे. जसजसा मोठा होत गेला तसतशी नाराजीची जागा चिडण्याने घेतली.
आता गोम अशी होती. काहीही असो. यथावकाश, शिक्षण ... लग्न झाले, तरीही त्याला या दर १५ दिवसांनी येणाऱ्या एकादशीला कळत नकळत उपास घडत असे. बंगलोर मध्ये होता तेव्हाही. कामाला वाहून घेतल्याने.. दुपारी जेवणाचे लक्षात राहत नसे. तेव्हाही उपास घडे. आणि संध्याकाळी रूमवर आल्यावर मानसिक थकव्याने कुठे बाहेर जाणे टाळत असे.. मग रात्री दूध, केळे , इतर फळे खाऊन झोपण्याचा प्रयत्न करी.  खूप प्रयत्न करूनही त्याला हे टाळता येत नव्हते अन त्यामुळे होणारी चिडचिड ही काही नवी नव्हती त्याला.

असो, तर रेवतीने तिची गाडी नेमकी गोंदवल्यात कशी बंद पडली आणि त्यानंतर काय काय घडले, मग तिने समाधी मंदिरात जाऊन अनुग्रह कसा घेतला. हे त्याला फोनवर रंगवून रंगवून सांगितले होतेच.
अर्थात त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हताच. आता सगळे स्वकर्तृत्वावर मिळवायचे .. परमार्थ ही वय झाल्यावर करण्याची गोष्ट आहे, यावर त्याचा दृढ विश्वास होता.  झाले असे कि अचानक चार दिवस सुट्टी मिळून तो आता बायको मुलाला भेटायला साताऱ्याला आला होता.... ते चार दिवस त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर रिझॉर्ट ला राहून एंजॉय करायचे हे मनसुबे घेऊनच! पण आल्या आल्या तिच्या हातात जपमाळ बघून त्याला ते खटकले होतेच.

इकडे रेवतीने वेगळाच प्लॅन केला होता. चार  दिवस नवर्याला घेऊन गोंदवले, शिखर शिंगणापूर दर्शन करवून घ्यावे असे तिच्या मनात होते. तिने हे त्याच्या कानावर घातल्यावर प्रथम तर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. दोघांचे भरपूर वाद- प्रतिवाद झाल्यावर दोन दिवस गोंदवले आणि दोन दिवस नंतर पुण्याजवळील एक रिझॉर्ट या बोलीवर मांडवली झाली. रेवती आनंदली. रेवतीने वर्णन केल्यावरून छानशी सर्व सुखसोयींनी युक्त रूम घेऊन तो आराम करणार, समाधी मंदिरात दर्शनाला येणार नाही, तिथले कोणतेच कार्यक्रम अटेंड करणार नाही. चहा/ नाश्ता /भोजन प्रसादासाठीच फक्त बाहेर निघेल हे त्याने रेवतीकडून कबुल करवून घेतले होते.  त्याने गोंदवले जाण्यासाठी निवडलेला दिवस नेमका एकादशीचा होता. अन गम्मत म्हणजे हे त्याच्या गावीही नव्हते.
*
दुसर्याच दिवशी सकाळी ११च्या सुमारास त्याची गोल्डन कलरची Tata Harrier गोंदवले समाधी मंदिराच्या आवारात शिरत होती. सकाळी आठ वाजताच रेवतीने दोघांनाही भरपेट साबुदाणा खिचडी , दही खाऊ घातले होते. त्यामुळे नाश्त्याचा प्रश्न नव्हताच. रेवती साबुदाणा खिचडी अप्रतिम करत असे.  
गाडी व्यवस्थित पार्क करून , स्वागत कक्षातून रूमची चावी घेऊन तिघे निघाले. प्रल्हाद बिल्डिंग, चौथा मजला, ४२७ नंबरची रूम! जुनी बिल्डिंग बघताच, त्याच्या कपाळात आठी निर्माण झाली. स्वागत कक्षातच त्याला पहिला धडा मिळाला होता. तुम्ही कितीही श्रीमंत असा.. श्रीमहाराजांची सत्ता गोंदवल्यात चालते.
जिन्याने सामान वर नेता नेता त्याची फारच दमछाक झाली. आपले ओझे आपणच उचलायचे असते हा दुसरा धडा.

जुनी इमारत, रूम ही जुन्या. .. उद्या पहाटे गरम पाण्याची बादली बाहेरून भरून न्यावी लागणार हे त्याने ओळखले. गेल्या गेल्या रेवतीने पदर खोचून आधी रूम स्वच्छ झाडून घेतली.  तेवढ्यात दुपारच्या नैवेद्यआरतीची वेळ झाली. रेवती, रितिकला कसेबसे सावरत घेऊन दर्शनाला गेली अन आरती करूनच परत आली.
आज भाद्रपद शु. एकादशी, अर्थात परिवर्तिनी एकादशी ! महाराजांना उपवास. त्यामुळे आज प्रसादाला उपासाचेच पदार्थ मिळणार होते. तिघेही आता महाराजांच्या अन्नपूर्णेत गेले. मऊसूत वरईचा भात, सोबत दाण्याची आमटी, बटाटयाची उपासाची भाजी, सोबत लिंबाचे उपासाचे लोणचे आणि ताक असा भरगच्चं प्रसाद घेऊन तिघे परत रूमवर आले.

एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. रेवतीची इच्छा होती कि ब्रम्हानंद मंडपात थोडा जप करावा. पण रितिकने नवऱ्याला काही त्रास देऊ नये हा विचार करून तिघेही रूमवर परत आले. तिघेही आता आराम करत होते.
तेवढ्यात राजसच्या मोबाईलची रिंग विशिष्ट पद्धतीने वाजली. आणि आता रीतसर सुट्टी घेऊन आला तरीही आराम करू देत नाही, हे आठवून चिडून, पण मनातल्या शिव्या ओठावर येऊ न देता ,धडपडत उठला.
आधी टेबलवर ठेवलेल ते epoch voyager हे व्यवस्थित आहे ना हे त्याने चेक केला नंतर फोन. इस्रो चीफचा फोटो मोबाईल स्क्रीन वर झळकला आणि त्याची झोप कुठल्या कुठे पळाली. एका हातात टाइम मशीन घेऊन एका हाताने मोबाईल कानाला लावत तो झर्रकन दरवाजा उघडून बाहेर आला. काहीतरी तसेच महत्वाचे होते म्हणूनच चीफने त्याला फोन केला होता. यूएस मधील युनीव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट येथील आंतराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ रोनाल्ड मॅलेट आणि टीम येत्या महिनाभरात इस्रोला भेट देणार होती. यांचा time travel , quantum cosmology आणि सापेक्षता सिद्धांत यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती, कि भारतातील बोटावर मोजण्यासारख्या लोकांनाच याबद्दल माहिती असणार होती. या लोकांच्या भेटीची तयारीच्या दृष्टीने केला गेलेला हा फोन होता.
कॉरिडॉर मध्ये फिरतांना बोलता बोलता राजसने हातातील मशीन कट्ट्यावर ठेवले होते. आणि ते अघटित घडले...  काहीतरी बोलताना हातवारे करण्याचे निमित्त झाले. आणि त्याचा हात त्या 'त्रिकालजयीला लागला... त्याबरोबर ते खाली पडू लागले.. एका हातात मोबाईल आणि एका हाताने त्रिकालजयी सावरता सावरता..  
त्याचा तोल गेला..  बाल्कनीतून खाली पडता पडता घाबरून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते. .. आणि त्यात हातातल्या मशीनची ... 'त्रिकालजयी'ची कुठली तरी कळ दाबली गेली.
(पूर्वार्ध)


जय श्रीराम
श्रीमहाराज कन्या नयना

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

 


जय श्रीराम!

मानस - योगायोग कि पूर्वनियोजित

वेगात असलेल्या तिच्या I-10 कारने एक झोकदार वळण घेतले आणि त्या गावात शिरली. आणि अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवताना तिची गडबड उडाली. ब्रेकवरचा पाय टिकत नाहीये अशी तिला जाणीव झाली. आणि स्पीड मध्ये असलेल्या कारला अचानक ब्रेक लावला तर जे व्ह्ययचे तेच झाले. एका पूजा साहित्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या  लोखंडी ड्रमला धडकून  ती कार मोठ्या मुश्किलीने कर्रर्रर्र कच आवाज करीत गर्र्र्कन फिरून पुन्हा उलट दिशेकडे तोंड करून उभी राहिली. पुन्हा दोन -तीनदा तिने गाडीला स्टार्ट मारण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. हे असं मोजून चवथ्यांदा  झाले होते बरे का.. मागच्या १-२ दोन महिन्यापासून.
ऍक्सल तुटला वाटतं असे मनाशी पुटपुटत , कपाळावरचा घाम पुसत ती खाली उतरली. फोनाफोनी करून मेकॅनिकला  बोलवेपर्यन्त अर्धा तास निघून गेला. मॅकेनिक बाजूच्या गावी गेला होता. त्याला यायला रात्र होणार होती. म्हणजे आजची रात्र तिला कुठेतरी काढणे भाग होते.  एव्हाना संध्याकाळचे चार वाजून गेले होते.  कडकडीत उन्हाळा असला तरी वळवाचे ढग दाटून आले होते. साताऱ्याच्या माण तालुक्यातील ते एक छोटेसे गाव.
ती एक उच्चशिक्षित बी कॉम , एम बी ए फायनान्स असलेली तरुणी, बँकेत नोकरीला. वय ३८च्या आसपास. राहायला सातारा शहरात. तिचे कुटुंब छोटेखानी. नवरा हि उच्चशिक्षित आय टी इंजिनियर.. सध्या बंगलोरमध्ये पोस्टिंग असल्याने ती सातार्यात तिच्या मुलासह रहात होती. २४व्या वर्षी शिक्षण आटोपून लग्न झाले. वर्षभरात मुलगा हि झाला. सगळ छान चालले होते. सुखवस्तू, मुबलक पैसा, सासू सासरे मनमिळावू, नवरा प्रेमळ, गोंडस बाळ.. प्रपंचातला गोडवा दोघांनीपण टिकून ठेवला होता. पण काही वर्षातच कळून चुकले कि तिचा मुलगा मानसिक दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, ज्यावर अजून उपायच नाही निघाला. यात व्यक्ती आयुष्यभर अंथरुणाला खिळून असते. नुसता श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणायचं. मेंदूचा सगळ्या अवयवांवरचां कंट्रोलच गेलेला. त्यामुळे मुलगा आज १३ वर्षाचा झाला तरी त्याचे सगळेच तिला आवरावे लागे. मदतनीस बाई कोणी टिकत नव्हत्या.
साताऱ्यातच नोकरी आणि मुलाकडे लक्ष द्यायला आईवडील त्याच भागात राहत असल्याने तिला तेवढा आधार होता.
आठवड्यातून एकदा तिला बँकेच्या कामासाठी म्हसवड गावी जावे लागे. आणि दर वेळी तिला त्या विशिष्ट गावात शिरताना शनिवार रविवार , पौर्णिमा असली की गर्दी लागत असे. त्यामुळे त्या गावाच्या सुरवातीलाच गर्दी पाहून तिच्या कपाळावरच्या आठ्या वाढू लागत. रोडवरच्या गर्दीतून गाडी काढणे मुश्किल होई. कुठल्या तरी संतांचे हे गाव आहे एवढंच तिला माहित होते. तशी ती अगदीच नास्तिक नसली तरी धार्मिक कर्मकांडांचा तिला प्रचंड तिटकारा होता. हा, एक दोनदा म्हसवडहून पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊन आली होती! पण ते भोज्याला शिवण्यासारख.

आज मात्र रोडवर शुकशुकाट दिसत होता. तिने त्या टीचभर गावात आजची रात्र काढण्यासाठी हॉटेल आहे का अशी विचारणा सुरु केली. अन माहिती मिळाली कि हॉटेल कुठेही उपलब्ध नाही. त्या मंदिरामध्ये वास्तव्य होऊ शकते. थोड्याश्या नाराजीनेच तिने प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केला. समोरच स्वागतकक्ष होता. तिथे माहिती मिळाली की मुक्कामाची सोय होऊ शकते, त्याचबरोबर प्रसादाची ही सोय आहे.  आता तिला जरा दिलासा मिळाला. पावणे आठला आरती सुरु होणार होती आणि नंतर प्रसाद मिळेल असे समजताच.. तिने आता परिसरात फेरफटका मारण्याचे ठरवले.
रामानंद भक्तनिवास...दुसरा मजला, २१७ नंबरची रूम.. एक सेपरेट रूम मिळाल्यावर ती खुश झाली. रूम ताब्यात घेतल्या घेतल्या.. सामान नीट लावल्याची खात्री करून तिने मस्त वॉश घेतला. उन्हाची वाढलेली तलखी, दिवसभर आंबलेले शरीर, आणि आता भरून आलेले आभाळ...स्नान करताच तिलाही जरा तरतरी आली. रूमला लॉक करून, भराभर जिना उतरून खाली आली.
बाजूला गोशाळा, समोर फुलझाडांची ताटवा, त्याला वळसा घालून  जाताना मागच्या सांडव्यावरचा छोटासा पूल ओलांडून ती कधी साधना मंदिराजवळ पोहचली कळलेही नाही. ग्रंथालय उघडे असल्यास काही पुस्तके चाळावी हा विचार करून तिची पावले तिकडे वळाली खरी. पण पाहते तो ग्रंथालय बंद.
एव्हाना आकाशात काळ्या ढगांची गर्दी सुरु झाली होती. चार दोन मोठाले पावसाचे थेंब ही सुरु झाले होते. वारा सुटला होता. गारेगार वातावरण झाले होते.
घाईघाईने ती साधना मंदिरात घुसली खरी.. पण तिने पाऊल आत टाकायची आणि लाईट जायची एकच वेळ झाली. अंधारात खुर्चीवर बसलेले लोक अंधुकसे दिसत होते. कशीबशी चाचपडत डाव्या बाजूच्या खुर्च्यांमधून जातांना तरी एका मावशींना धक्का लागलाच. त्यांना सॉरी.. सॉरी असे पुटपुटत  साधना मंदिरात रिकाम्या दिसणाऱ्या एका खुर्चीवर तिने अक्षरश: अंग झोकून दिले. आजूबाजूला अंधारात मोजके काही स्त्रीपुरुष  खुर्चीवर तर काही खाली सतरंजीवर बसलेले तिला दिसत होते.
समोर अंधारात एक मोठा फोटो. त्याच्या दोन्ही बाजूला तिला छोट्या खोल्या.. त्यात तुळशी वृंदावनसारख्या आकाराचे काहीतरी तिला दिसले. त्या दोन्ही छोट्या खोल्यांमध्ये अंधुकश्या तेलाच्या समया लावलेल्या. तेवढाच काय तो मिणमिणता प्रकाश.
सर्वत्र निर्लेप, नितळ शांतता होती. नाही म्हणायला बाहेर पावसाच्या सरींचा बारीक एकसलग आवाज येत होता. झाडांवरील पक्षीही चिडीचूप होऊन घरट्यात बसले होते.
 एव्हाना बाहेर पावसाचा आणि तिच्या मनात भावनांचा धुमाकूळ सुरु झाला होता. नाही म्हटले तरी, नवरा दूर असल्याने एकटीने संसाराचा गाडा ओढायची तिला दगदग होत होतीच. त्यात मुलगा हा असा म्हंटल्यावर होणारी खंत. आणि हे सगळं मलाच का? मी काय कुणाचे वाकडे केले नाही. वै वै. प्रश्न मनात धुमाकूळ घालायचे. कधीकधी असह्य झाले कि बाथरुममधे ती रडून घ्यायची.
आताही असेच झाले.  या जीवघेण्या शांततेत मनात विचार उसळ्या मारत होते. बाहेर पावसाच्या संथपणे सरी कोसळत होत्या. आणि तिच्या डोळ्यातूनही. .. का माझ्याच वाटेला हा वनवास?  का मी एकटीनेच सगळ्या जगाशी लढायचे... ते ही हाताशी पुरेशी सामग्री नसतांना. मुलगा विकलांग.. नवरा इथे नाही. वर्षानुवर्षे हेच चालत राहणार का? लोकांची आयुष्य किती छान आनंदी असतात.. आटोपशीर संसार असतो. शनिवार रविवार फिरायला जातात, सिनेमाला जातात. एन्जॉय करतात. या मुलामुळे मी अडकून पडले. असे असंख्य विचार मनात घोटाळू लागले.असह्य होऊन दोन्ही हातांनी डोकं गच्चं दाबून ठेवत ती मनातल्या मनात ओरडली," का? माझ्याच वाट्याला हे सगळं का?"
आणि त्याच क्षणी समोरच्या अंधारात उजव्या कोपर्यात प्रचंड आगीचा लोळ कोसळावा असा आवाज निर्माण झाला. अन त्यात दशसहस्त्र सूर्य फिके पडतील एवढा प्रकाश दिसू लागला. . . "नाही बाळ.... " असा एक धीरगंभीर , खर्जातला आवाज तिला ऐकू आला. तिने डोळे किलकिले करून पाहिले तर डोळे दिपून जातील असे तेज:पुंज व्यक्तिमत्व त्यातून हळूहळू बाहेर येत होता. . डोळ्यांना तो प्रकाश सहन होईना.. म्हणून तिने उजव्या हाताचा पंजा डोळ्यांवर धरला होता. आणि एका हाताने डोळे चोळत ती बघत होती.
आता तिचे डोळे त्या प्रकाशाला सरावले. साधारण मध्यम उंचीची, पीतवर्ण, केशरी कफनी घातलेली, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर त्रिपुंड, डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना मुद्रिका, तरतरीत नाक, तंतोतंत कारुण्य भाव भरलेले, समोरच्याच्या मनाचा ठाव घेतील असे डोळे, उजव्या काखेत कुबडी आणि हातात जपाची माळ घेतलेले एक तेजस्वी व्यक्तित्व तिला दिसले.

" बाळ.... " परत त्या कोपऱ्यातून आवाज आला. पुन्हा आवाजात तोच गोडवा.
"इथे पृथ्वीवर प्रत्येक जण आपल्या कर्माची फळे मग ती चांगली कि वाईट असोत, ती भोगण्यासाठीच येतो. त्यातून सुटका नाहीच."
" म्हणजे? " तिने हतबल होऊन विचारले.
आपल्या पूर्वकर्मानुसारच तुम्हाला जन्म मिळत असतो. पूर्वजन्मामध्ये केलेली कुठली तरी पाप- पुण्याची कर्मे या जन्मात फळाला येतात त्याला तुम्ही प्रारब्ध म्हणतात. संचित म्हणजे याच कर्मांचे गाठोडे. क्रियमाण कर्म म्हणजे आता या जन्मात तुम्ही जे बरे वाईट कर्मे करत आहात ते. हि सगळी संचितात जमा होत रहातात. आणि हि तुम्हाला भोगुनच संपवावी लागतात.. त्याला इलाज नाही. तुमचा कंट्रोल फक्त या जन्मातल्या कर्मांवर आहे. नवीन कर्म तयार होऊ न देणे हे फक्त तुमच्या हातात आहे.
"तुम्ही लोक माझ्यासमोर आले की तुमचे मागचे पुढचे सगळे जन्म दिसत असतात. उदा. हा तुझा मुलगा, मागच्या जन्मात एक गरीब श्वान होता. गल्लीत सगळे त्याला दगडे मारायचे . पण त्यातल्या त्यात तू त्याला जास्त सतावायचीस . कधी त्याच्या शेपटीला फटाके लावून उडवायचे, तर कधी दगडे मारून... त्याला गल्लीभर पळवून. इतके झाले कि अंगभर जखमा होऊन त्यात गोचीड, अळ्या पडल्यामुळे त्यामुळे तो पिसाळला. अन त्यातच त्याचा अंत झाला. अन आता तोच मुलगा होऊन तुझ्या पोटी आला.
ती आपादमस्तक हादरली. हमसून हमसून रडत तिच्या तोंडून एवढेच शब्द फुटले, " महाSSSराज! "  इतकी क्रूर होते मी महाराज?
ती व्यक्ती म्हणाली, " होय. परपीडेसारखे महाभयंकर पाप नाही."  

"या सर्वातून सुटका कशी महाराज?"  तिने अभावितपणे विचारले.
" सुटका नाहीच! " फक्त एक करू शकतो.. तुमचे जर सद्गुरू असतील तर ते तुमचा हा प्रपंचाचा दाह कमी करू शकतात.
'ते कसे काय?" तिने सावरून विचारले. तुमचा गुरु तुमच्या अनेक जन्मांपासून सोबत असतो. तुम्हाला तो दिसत नसला तरी पृथ्वीवर पहिली जीवयोनी निर्माण झाली तेव्हापासून तो तुमच्या सोबत असतो. हे जे. परमात्मस्वरूप झालेले... पोहचलेले जीव असतात त्यांना साक्षात परब्रम्हानेच हे कार्य वाटून दिलेले असते. प्रत्येक जीवाला मोक्षप्राप्तीपर्यंत न्यायचे त्यांचे ध्येय असते. मोठे कार्य आहे ते. त्या जीवाला जाणीव करून देऊन, त्याची साधना करणे, प्रसंगी त्याची प्रपंचातील कर्मे करून, त्याचे आजार स्वतःवर घेऊन त्यांना हे करावे लागते. खरे तर काहीच गरज नाही त्यांना हे विकतचे दुखणे हाती घेण्याची! पण प्रत्येक जीवाला पोचवण्याची त्यांची तळमळ, कारुण्य इतके असते कि हे सगळे अभावितपणे त्यांच्या हातून होत असते. प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो. तो वेळ आली कि प्रकट होतोच.
आणि तुला म्हणून सांगतो.. सद्गुरू तुमचे एकेक आधार सोडवत असतात.. तुम्हाला पैश्याचा आधार वाटतो, नवऱ्याचा वाटतो, मुलांचा वाटतो,.. ते सगळे तुमच्यापासून हळूहळू दूर केले जातात. अन् जेव्हा तुम्ही निराधार होता, जेव्हा तुम्हाला प्रपंचाचा उबग येतो...हे सगळ व्यर्थ वाटू लागते तेव्हा सद्गुरू तुमच्या आयुष्यात प्रकट होतात.
 
" जर गुरु जन्मोजन्मी सोबत असतो तर आमच्या कठीण काळात किंवा विकार अनावर होतात तेव्हा का नाही येत समोर, महाराज? आम्हाला का नाही पापकर्म करण्यापासून आवरत ते? " तिने डोळ्यात पाणी आणून विचारले.
गुरु दूर उभे राहून तुमची वाट पाहत असतात बाळ. ज्याची त्यालाच हि जाणीव व्हायला हवी असते. तुम्ही प्रपंचात इतके गुंतलेले असतात की आमची हाक तुम्हाला ऐकू येत नसते. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षिदार गुरु असतो.. नव्हे नव्हे... तोच तुम्हाला शिकवण्यासाठी या घटना घडवून आणत असतो. पण तुमचा 'मी करते/करतो, माझ्यामुळे झाले हे'  हा सूक्ष्म अहंभाव इतका वाढलेला असतो कि आपसुक त्या कर्माची फळे तुमच्या संचितात जमा होत राहतात. अन् त्यानुसार तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेत राहता.
ती कर्मे जर रोजच्या रोज तुम्ही श्रीकृष्णार्पणमस्तु करून टाकली तर ती तुम्हाला बाधत नाहीत.

याही उपर, गुरु तुमचे भोग सुसह्य करू शकतात.. किंबहुना ते तुम्हाला त्या भोगांची जाणीव होऊ न देता.. अलगद सुखरूप त्यातून बाहेर काढतात. या कारणासाठीच सदैव तुमच्या सोबत असतात. तुमची शरणागती हवी मात्र. तुम्ही आमच्यावर सोपवायला हवे. परनिंदा, परपीडा टाळायला हवी. विकारांनी आपल्यावर स्वामित्व गाजवायला नको हे पाहावे.

"असं असेल तर आमच्या हातात काहीच नाही का महाराज?आम्ही असे हातावर हात धरून बसायचे? " ती कळवळून विचारते.
" नाहीच काही! तुमचा श्वाससुद्धा तुमचा नाहीये . अग हे झाडाचे पान देखील हलते ते आमच्या इच्छेने. तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहेत. पण त्याचे फळ काय हे ठरवण्याचा अधिकार नियतीचा आहे.
 तुझ्याकडे रग्गड पैसा आहे.. तू परदेशात जाऊन मुलावर उपचार करू शकतेस. औषधे जरी मानवनिर्मित असली तरी त्या औषधात औषधी तत्व घालतो परमेश्वर. म्हणूनच डॉक्टर लोक म्हणतात, " आय ट्रीट, ही क्युअर्स."
" पण महाराज, आम्हा दोघांचा मुलगा आहे ना, मीच का भोगते आहे हे? माझा नवरा  तिकडे आरामात आहे! अन् मी एकटीच इकडे मुलाची उठबस करतेय" ती उसासून म्हणाली!

"नाही, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे , भोग वेगळे. त्याचे तिकडे दुसरे भोग आहेत. तुम्ही या आयुष्यात नवरा-बायको एकत्र असले तरी काही दुःख एकेकट्याने भोगायची असतात.. जसे काही शारीरिक, मानसिक दुःख! ती तुमची तुम्हालाच भोगावी लागतात. ही फक्त तुझ्या कर्माची फळे आहेत म्हणून तुझ्या नवऱ्याला तिकडे दूर पाठवण्यात आले."
तुला उदाहरण देतो बघ.
आता असं बघ, कि तुम्ही या जीवनाच्या आगगाडीत बसलेले आहात. त्या डब्यात तुमच्या सोबत येणारे लोक हे तुमच्या कर्माने आलेले असतात. त्यात तुझे आई वडील, नवरा, सासरचे नातेवाईक, मुले बाळे , अगदी मधल्या स्टेशनवर अधे मध्ये चढणारे विक्रेते, हे भिकारी, शेजारी बसलेले अनोळखी लोक.. हे सगळं पूर्वनियोजित असते. ज्याचे स्टेशन आले तो उतरला. सद्गुरू हे तुमचे रेल्वेचे ड्राइवर. मागे गार्ड म्हणजे तुमचे हे साधन. आणि अजून एक मुख्य स्टेशनवर तुमच्या गाडीची पटरी बदलणारी व्यक्ती बसलेली असते .. ती म्हणजे, नियती.
ती तुमच्या कर्मफळाप्रमाणे वेगवेगळ्या ट्रॅकवर तुमची गाडी टाकत असते. त्यात कधी तुमचे प्लॅन कधी सक्सेस होतात.. कधी फसतात.. आणि ती नियती तिकडे खदाखदा हसत असते. तीच माया.. तीच तुम्हाला खेळवत असते.
तुम्ही फक्त एकच करायचं. गाडी धरून ठेवायची. सद्गुरूंनी दिलेले साधन घट्ट धरून ठेवायचे. म्हणजे सतत नाम घ्यायचे. त्यांचा हात सोडायचा नाही. त्यांनी धरलेलाच असतो. आपण सोडून इकडे तिकडे पळतो, स्टेशनवरच्या क्षुद्र वस्तूंकडे आकर्षित होतो. ही अखंड सावधानता हवी मात्र!  डोळ्यात तेल घालून आपले कुठे चुकते का ते चेक करत राहायचे. मग चांगला जीव असेल तर सद्गुरू नियतीवर सुद्धा कंट्रोल करू शकतात. तसा त्यांना प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. पण त्याही पलीकडे जाऊन ते हा धोका पत्करतात.

"काय विलक्षण योगायोग आहे, आजच आपली गाडी इथे बंद पडावी आणि हे सगळ अनुभवायला मिळावे.. असे शब्द तिच्या मनात येऊन गेले!"
त्यावर स्मितहास्य करत समोरचा तेजस्वी पुरुष उत्तरला," या जगात योगायोग नसतोच बाळ, सगळ पूर्वनियोजित असतं!
तुला इथे आणणे हेही आधीच ठरलेलं आहे.
ती चमकली.. आता तिला उमगु लागले.. आज चवठ्यांदा तिची गाडी या गावात... या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बंद पडली होती. हा योगायोग नाही, आपल्याला इथे आणण्यासाठी हे घडवून आणले गेले होते तर..!  
" महाराज, महाराज..मी शरण आहे! मला आपले म्हणून स्वीकारावे महाराज! .. अस म्हणत तीने त्या व्यक्तीच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला.
"आशीर्वाद" असे पुटपुटत त्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर अलगद हात ठेवला. अन् ती अंतर्बाह्य शहारली. एक शिरशिरी तिच्या मस्तकापासून पायापर्यंत येऊन गेली.. अंग थरारले. भारावून जाऊन ती तिकडे पाहून वारंवार नमस्कार करू लागली! कानावर आवाज आला," भोजनप्रसाद तयार आहे बाळ, तो घेऊन जावे! "  
भानावर येऊन डोळे उघडुन पाहते तो कोपऱ्यातला प्रकाश हळूहळू लुप्त होत होता.

आता तो तेजस्वी सत्पुरुष कोण होता हे सुज्ञास सांगणे न लगे!
अहो आपली सर्वांची माऊली .. आपले महाराजच!
बरं महाराज यावेळी काय करत होते, माहितेय?
ते समाधानाने हसत आपल्या हातातल्या लिस्टवर टिक करत होते.
रेवती राजस रेगे ✔️
आज अजून एक शिष्य त्यांच्या लिस्टमध्ये add झाला होता. अजून एकाला ते पार लावणार होते.

तुम्हाला काय वाटतं, पुढचा नंबर कोण बरं?
राजस पुरुषोत्तम रेगे! (रेवतीचा नवरा)
(कारण महाराज एखाद्याला नामाला लावतात तर त्याचे संपूर्ण घरच नामाला लावतात :)  )
आता राजस रेगे हे प्रकरण जरा अवघड आहे खरं! (कारण तो कट्टर नास्तिक आहे)
पण आपल्या महाराजांना काय अवघड आहे? भिंतीतून ही बोलतात की ते.

~ जय श्रीराम
महाराज कन्या नयना



 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...