मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

 


जय श्रीराम !


मानस - एकादशी (भाग १)

राजस पुरुषोत्तम रेगे

एक तडफदार, बुद्धिवान, कर्तृत्ववान, बहुआयामी व्यक्तिमत्व! उच्चशिक्षित, कलासक्त, आणि खेळातही पुढे. लहानपण जरी कष्टात गेले होते तरी आता बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता होती, हातात पैसा खेळत होता. स्वकर्तृत्वावर सगळं मिळवल्याने परिणामी अंगात गर्विष्ठपणा ,माजोरडेपणा, अभिमान पुरेपूर भरलेला. सगळी सुखे पायाशी लोळत असूनही एकच खंत त्याच्या आयुष्यात होती. तो स्वतः एवढा बुद्धिमान असूनही, मुलगा मात्र मंदबुद्धी जन्माला आला होता. त्याच्या भविष्याची चिंता होतीच. या कारणाने बोलण्यात अरेरावी, हेकेखोरपणा, कडवटपणा हि होताच. जरुरीपेक्षा जास्त झालेल्या पैशाला अनेक वाटा फुटतात, तसा प्रकार झाला होता. लेट नाईट पार्ट्या, कॅसिनो, मद्यपान, हे मित्रांच्या संगतीमुळे त्याच्या आयुष्यात डोकावू लागले होते.  यावरून पत्नीशी फोनवर सतत वाद हि होत होते.

बंगलोर इथे एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत तो उच्च पदावर होता. मूळ पिंड क्वांटम फिजिक्सचा असल्याने तिकडे त्याचा ओढा जास्त. त्यातच भारतातील नावाजलेल्या इस्रो हेड्क्वाटर्सला एका सिक्रेट प्रोजेक्ट्साठी बोलावणे आल्याने चार महिन्यापूर्वीच तिथे जॉईन झाला होता. हा सिक्रेट प्रोजेक्ट म्हणजे भारतातले पहिले टाइम मशीन बनवणे. २०१७ मध्ये कॅनडा येथील, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ  Ben Tippet  यांनी मॅथ्स आणि फिजिक्स वापरून एक फॉर्मुला तयार केला होता आणि तेव्हापासून इस्रोचे शास्त्रज्ञ त्यावर काम करत होते. आता ते काम अंतिम टप्प्यात आले असले तरी काही महत्वाच्या कामासाठी त्यांना या क्षेत्रातल्या हुशार व्यक्तींची गरज लागणार होती.
राजसचे आवडते क्षेत्र असल्याने त्याने सगळं मागचे विसरून जीवतोड, दिवसरात्र मेहनत घेऊन ,  मूळ मशिनरी जरी अवाढव्य असली तरी ओंजळीत मावेल असे टाइम मशीन टूल कधीच बनवले होते. ज्याला हाता घेऊन मनुष्य भूतकाळात फिरून येऊ शकत असे. त्याच्या काही ट्रायल ही घेऊन झाल्या. उदा. १० वर्ष मागे भूतकाळात जाणे , २० वर्ष मग ४० वर्ष , मग ६० आणि आता सगळ्यात मोठं सक्सेस म्हणजे १२० वर्ष मागे भूतकाळात जाऊन येणे. हि शेवटची ट्रायल राहिली होती. आणि त्यावर त्याचे काम सुरु होते. ते मशीन तो सतत सोबत ठेवत असे. स्वतःपुरते त्याने त्या मशीनचे नाव Ipoch Voyager उर्फ ' ' काळपांथस्थ '  उर्फ त्रिकालजयी असेही ठेवले होते.
रेवती राजस रेगे.. त्याची पत्नी, मानसिकरित्या विकलांग रितिकला घेऊन साताऱ्यात आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. ती सातार्यात बँकेत ऑफिसर.
राजस रेगे मूळचा पंढरपूरचा. गरिबीत शिक्षण झाले. आई  गृहिणी, वडील प्राथमिक शिक्षक. पगार कमी. घरच्या दोन गाई. आई वडील दोघेही एकादशी व्रत करायचे. त्यामुळे अर्थातच लहानग्या राजसला दर एकादशीला नकळत उपास घडे. आई वरई भात, शेंगदाण्याची आमटी दुपारी करत असे. आणि रात्री सगळे दूध पिऊन झोपत असत. त्यामुळे राजस नाराज असे. जसजसा मोठा होत गेला तसतशी नाराजीची जागा चिडण्याने घेतली.
आता गोम अशी होती. काहीही असो. यथावकाश, शिक्षण ... लग्न झाले, तरीही त्याला या दर १५ दिवसांनी येणाऱ्या एकादशीला कळत नकळत उपास घडत असे. बंगलोर मध्ये होता तेव्हाही. कामाला वाहून घेतल्याने.. दुपारी जेवणाचे लक्षात राहत नसे. तेव्हाही उपास घडे. आणि संध्याकाळी रूमवर आल्यावर मानसिक थकव्याने कुठे बाहेर जाणे टाळत असे.. मग रात्री दूध, केळे , इतर फळे खाऊन झोपण्याचा प्रयत्न करी.  खूप प्रयत्न करूनही त्याला हे टाळता येत नव्हते अन त्यामुळे होणारी चिडचिड ही काही नवी नव्हती त्याला.

असो, तर रेवतीने तिची गाडी नेमकी गोंदवल्यात कशी बंद पडली आणि त्यानंतर काय काय घडले, मग तिने समाधी मंदिरात जाऊन अनुग्रह कसा घेतला. हे त्याला फोनवर रंगवून रंगवून सांगितले होतेच.
अर्थात त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हताच. आता सगळे स्वकर्तृत्वावर मिळवायचे .. परमार्थ ही वय झाल्यावर करण्याची गोष्ट आहे, यावर त्याचा दृढ विश्वास होता.  झाले असे कि अचानक चार दिवस सुट्टी मिळून तो आता बायको मुलाला भेटायला साताऱ्याला आला होता.... ते चार दिवस त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर रिझॉर्ट ला राहून एंजॉय करायचे हे मनसुबे घेऊनच! पण आल्या आल्या तिच्या हातात जपमाळ बघून त्याला ते खटकले होतेच.

इकडे रेवतीने वेगळाच प्लॅन केला होता. चार  दिवस नवर्याला घेऊन गोंदवले, शिखर शिंगणापूर दर्शन करवून घ्यावे असे तिच्या मनात होते. तिने हे त्याच्या कानावर घातल्यावर प्रथम तर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. दोघांचे भरपूर वाद- प्रतिवाद झाल्यावर दोन दिवस गोंदवले आणि दोन दिवस नंतर पुण्याजवळील एक रिझॉर्ट या बोलीवर मांडवली झाली. रेवती आनंदली. रेवतीने वर्णन केल्यावरून छानशी सर्व सुखसोयींनी युक्त रूम घेऊन तो आराम करणार, समाधी मंदिरात दर्शनाला येणार नाही, तिथले कोणतेच कार्यक्रम अटेंड करणार नाही. चहा/ नाश्ता /भोजन प्रसादासाठीच फक्त बाहेर निघेल हे त्याने रेवतीकडून कबुल करवून घेतले होते.  त्याने गोंदवले जाण्यासाठी निवडलेला दिवस नेमका एकादशीचा होता. अन गम्मत म्हणजे हे त्याच्या गावीही नव्हते.
*
दुसर्याच दिवशी सकाळी ११च्या सुमारास त्याची गोल्डन कलरची Tata Harrier गोंदवले समाधी मंदिराच्या आवारात शिरत होती. सकाळी आठ वाजताच रेवतीने दोघांनाही भरपेट साबुदाणा खिचडी , दही खाऊ घातले होते. त्यामुळे नाश्त्याचा प्रश्न नव्हताच. रेवती साबुदाणा खिचडी अप्रतिम करत असे.  
गाडी व्यवस्थित पार्क करून , स्वागत कक्षातून रूमची चावी घेऊन तिघे निघाले. प्रल्हाद बिल्डिंग, चौथा मजला, ४२७ नंबरची रूम! जुनी बिल्डिंग बघताच, त्याच्या कपाळात आठी निर्माण झाली. स्वागत कक्षातच त्याला पहिला धडा मिळाला होता. तुम्ही कितीही श्रीमंत असा.. श्रीमहाराजांची सत्ता गोंदवल्यात चालते.
जिन्याने सामान वर नेता नेता त्याची फारच दमछाक झाली. आपले ओझे आपणच उचलायचे असते हा दुसरा धडा.

जुनी इमारत, रूम ही जुन्या. .. उद्या पहाटे गरम पाण्याची बादली बाहेरून भरून न्यावी लागणार हे त्याने ओळखले. गेल्या गेल्या रेवतीने पदर खोचून आधी रूम स्वच्छ झाडून घेतली.  तेवढ्यात दुपारच्या नैवेद्यआरतीची वेळ झाली. रेवती, रितिकला कसेबसे सावरत घेऊन दर्शनाला गेली अन आरती करूनच परत आली.
आज भाद्रपद शु. एकादशी, अर्थात परिवर्तिनी एकादशी ! महाराजांना उपवास. त्यामुळे आज प्रसादाला उपासाचेच पदार्थ मिळणार होते. तिघेही आता महाराजांच्या अन्नपूर्णेत गेले. मऊसूत वरईचा भात, सोबत दाण्याची आमटी, बटाटयाची उपासाची भाजी, सोबत लिंबाचे उपासाचे लोणचे आणि ताक असा भरगच्चं प्रसाद घेऊन तिघे परत रूमवर आले.

एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. रेवतीची इच्छा होती कि ब्रम्हानंद मंडपात थोडा जप करावा. पण रितिकने नवऱ्याला काही त्रास देऊ नये हा विचार करून तिघेही रूमवर परत आले. तिघेही आता आराम करत होते.
तेवढ्यात राजसच्या मोबाईलची रिंग विशिष्ट पद्धतीने वाजली. आणि आता रीतसर सुट्टी घेऊन आला तरीही आराम करू देत नाही, हे आठवून चिडून, पण मनातल्या शिव्या ओठावर येऊ न देता ,धडपडत उठला.
आधी टेबलवर ठेवलेल ते epoch voyager हे व्यवस्थित आहे ना हे त्याने चेक केला नंतर फोन. इस्रो चीफचा फोटो मोबाईल स्क्रीन वर झळकला आणि त्याची झोप कुठल्या कुठे पळाली. एका हातात टाइम मशीन घेऊन एका हाताने मोबाईल कानाला लावत तो झर्रकन दरवाजा उघडून बाहेर आला. काहीतरी तसेच महत्वाचे होते म्हणूनच चीफने त्याला फोन केला होता. यूएस मधील युनीव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट येथील आंतराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ रोनाल्ड मॅलेट आणि टीम येत्या महिनाभरात इस्रोला भेट देणार होती. यांचा time travel , quantum cosmology आणि सापेक्षता सिद्धांत यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती, कि भारतातील बोटावर मोजण्यासारख्या लोकांनाच याबद्दल माहिती असणार होती. या लोकांच्या भेटीची तयारीच्या दृष्टीने केला गेलेला हा फोन होता.
कॉरिडॉर मध्ये फिरतांना बोलता बोलता राजसने हातातील मशीन कट्ट्यावर ठेवले होते. आणि ते अघटित घडले...  काहीतरी बोलताना हातवारे करण्याचे निमित्त झाले. आणि त्याचा हात त्या 'त्रिकालजयीला लागला... त्याबरोबर ते खाली पडू लागले.. एका हातात मोबाईल आणि एका हाताने त्रिकालजयी सावरता सावरता..  
त्याचा तोल गेला..  बाल्कनीतून खाली पडता पडता घाबरून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते. .. आणि त्यात हातातल्या मशीनची ... 'त्रिकालजयी'ची कुठली तरी कळ दाबली गेली.
(पूर्वार्ध)


जय श्रीराम
श्रीमहाराज कन्या नयना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...