रविवार, १ सप्टेंबर, २०२४

 


जय श्रीराम!

मानस - योगायोग कि पूर्वनियोजित

वेगात असलेल्या तिच्या I-10 कारने एक झोकदार वळण घेतले आणि त्या गावात शिरली. आणि अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवताना तिची गडबड उडाली. ब्रेकवरचा पाय टिकत नाहीये अशी तिला जाणीव झाली. आणि स्पीड मध्ये असलेल्या कारला अचानक ब्रेक लावला तर जे व्ह्ययचे तेच झाले. एका पूजा साहित्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या  लोखंडी ड्रमला धडकून  ती कार मोठ्या मुश्किलीने कर्रर्रर्र कच आवाज करीत गर्र्र्कन फिरून पुन्हा उलट दिशेकडे तोंड करून उभी राहिली. पुन्हा दोन -तीनदा तिने गाडीला स्टार्ट मारण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. हे असं मोजून चवथ्यांदा  झाले होते बरे का.. मागच्या १-२ दोन महिन्यापासून.
ऍक्सल तुटला वाटतं असे मनाशी पुटपुटत , कपाळावरचा घाम पुसत ती खाली उतरली. फोनाफोनी करून मेकॅनिकला  बोलवेपर्यन्त अर्धा तास निघून गेला. मॅकेनिक बाजूच्या गावी गेला होता. त्याला यायला रात्र होणार होती. म्हणजे आजची रात्र तिला कुठेतरी काढणे भाग होते.  एव्हाना संध्याकाळचे चार वाजून गेले होते.  कडकडीत उन्हाळा असला तरी वळवाचे ढग दाटून आले होते. साताऱ्याच्या माण तालुक्यातील ते एक छोटेसे गाव.
ती एक उच्चशिक्षित बी कॉम , एम बी ए फायनान्स असलेली तरुणी, बँकेत नोकरीला. वय ३८च्या आसपास. राहायला सातारा शहरात. तिचे कुटुंब छोटेखानी. नवरा हि उच्चशिक्षित आय टी इंजिनियर.. सध्या बंगलोरमध्ये पोस्टिंग असल्याने ती सातार्यात तिच्या मुलासह रहात होती. २४व्या वर्षी शिक्षण आटोपून लग्न झाले. वर्षभरात मुलगा हि झाला. सगळ छान चालले होते. सुखवस्तू, मुबलक पैसा, सासू सासरे मनमिळावू, नवरा प्रेमळ, गोंडस बाळ.. प्रपंचातला गोडवा दोघांनीपण टिकून ठेवला होता. पण काही वर्षातच कळून चुकले कि तिचा मुलगा मानसिक दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, ज्यावर अजून उपायच नाही निघाला. यात व्यक्ती आयुष्यभर अंथरुणाला खिळून असते. नुसता श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणायचं. मेंदूचा सगळ्या अवयवांवरचां कंट्रोलच गेलेला. त्यामुळे मुलगा आज १३ वर्षाचा झाला तरी त्याचे सगळेच तिला आवरावे लागे. मदतनीस बाई कोणी टिकत नव्हत्या.
साताऱ्यातच नोकरी आणि मुलाकडे लक्ष द्यायला आईवडील त्याच भागात राहत असल्याने तिला तेवढा आधार होता.
आठवड्यातून एकदा तिला बँकेच्या कामासाठी म्हसवड गावी जावे लागे. आणि दर वेळी तिला त्या विशिष्ट गावात शिरताना शनिवार रविवार , पौर्णिमा असली की गर्दी लागत असे. त्यामुळे त्या गावाच्या सुरवातीलाच गर्दी पाहून तिच्या कपाळावरच्या आठ्या वाढू लागत. रोडवरच्या गर्दीतून गाडी काढणे मुश्किल होई. कुठल्या तरी संतांचे हे गाव आहे एवढंच तिला माहित होते. तशी ती अगदीच नास्तिक नसली तरी धार्मिक कर्मकांडांचा तिला प्रचंड तिटकारा होता. हा, एक दोनदा म्हसवडहून पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊन आली होती! पण ते भोज्याला शिवण्यासारख.

आज मात्र रोडवर शुकशुकाट दिसत होता. तिने त्या टीचभर गावात आजची रात्र काढण्यासाठी हॉटेल आहे का अशी विचारणा सुरु केली. अन माहिती मिळाली कि हॉटेल कुठेही उपलब्ध नाही. त्या मंदिरामध्ये वास्तव्य होऊ शकते. थोड्याश्या नाराजीनेच तिने प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केला. समोरच स्वागतकक्ष होता. तिथे माहिती मिळाली की मुक्कामाची सोय होऊ शकते, त्याचबरोबर प्रसादाची ही सोय आहे.  आता तिला जरा दिलासा मिळाला. पावणे आठला आरती सुरु होणार होती आणि नंतर प्रसाद मिळेल असे समजताच.. तिने आता परिसरात फेरफटका मारण्याचे ठरवले.
रामानंद भक्तनिवास...दुसरा मजला, २१७ नंबरची रूम.. एक सेपरेट रूम मिळाल्यावर ती खुश झाली. रूम ताब्यात घेतल्या घेतल्या.. सामान नीट लावल्याची खात्री करून तिने मस्त वॉश घेतला. उन्हाची वाढलेली तलखी, दिवसभर आंबलेले शरीर, आणि आता भरून आलेले आभाळ...स्नान करताच तिलाही जरा तरतरी आली. रूमला लॉक करून, भराभर जिना उतरून खाली आली.
बाजूला गोशाळा, समोर फुलझाडांची ताटवा, त्याला वळसा घालून  जाताना मागच्या सांडव्यावरचा छोटासा पूल ओलांडून ती कधी साधना मंदिराजवळ पोहचली कळलेही नाही. ग्रंथालय उघडे असल्यास काही पुस्तके चाळावी हा विचार करून तिची पावले तिकडे वळाली खरी. पण पाहते तो ग्रंथालय बंद.
एव्हाना आकाशात काळ्या ढगांची गर्दी सुरु झाली होती. चार दोन मोठाले पावसाचे थेंब ही सुरु झाले होते. वारा सुटला होता. गारेगार वातावरण झाले होते.
घाईघाईने ती साधना मंदिरात घुसली खरी.. पण तिने पाऊल आत टाकायची आणि लाईट जायची एकच वेळ झाली. अंधारात खुर्चीवर बसलेले लोक अंधुकसे दिसत होते. कशीबशी चाचपडत डाव्या बाजूच्या खुर्च्यांमधून जातांना तरी एका मावशींना धक्का लागलाच. त्यांना सॉरी.. सॉरी असे पुटपुटत  साधना मंदिरात रिकाम्या दिसणाऱ्या एका खुर्चीवर तिने अक्षरश: अंग झोकून दिले. आजूबाजूला अंधारात मोजके काही स्त्रीपुरुष  खुर्चीवर तर काही खाली सतरंजीवर बसलेले तिला दिसत होते.
समोर अंधारात एक मोठा फोटो. त्याच्या दोन्ही बाजूला तिला छोट्या खोल्या.. त्यात तुळशी वृंदावनसारख्या आकाराचे काहीतरी तिला दिसले. त्या दोन्ही छोट्या खोल्यांमध्ये अंधुकश्या तेलाच्या समया लावलेल्या. तेवढाच काय तो मिणमिणता प्रकाश.
सर्वत्र निर्लेप, नितळ शांतता होती. नाही म्हणायला बाहेर पावसाच्या सरींचा बारीक एकसलग आवाज येत होता. झाडांवरील पक्षीही चिडीचूप होऊन घरट्यात बसले होते.
 एव्हाना बाहेर पावसाचा आणि तिच्या मनात भावनांचा धुमाकूळ सुरु झाला होता. नाही म्हटले तरी, नवरा दूर असल्याने एकटीने संसाराचा गाडा ओढायची तिला दगदग होत होतीच. त्यात मुलगा हा असा म्हंटल्यावर होणारी खंत. आणि हे सगळं मलाच का? मी काय कुणाचे वाकडे केले नाही. वै वै. प्रश्न मनात धुमाकूळ घालायचे. कधीकधी असह्य झाले कि बाथरुममधे ती रडून घ्यायची.
आताही असेच झाले.  या जीवघेण्या शांततेत मनात विचार उसळ्या मारत होते. बाहेर पावसाच्या संथपणे सरी कोसळत होत्या. आणि तिच्या डोळ्यातूनही. .. का माझ्याच वाटेला हा वनवास?  का मी एकटीनेच सगळ्या जगाशी लढायचे... ते ही हाताशी पुरेशी सामग्री नसतांना. मुलगा विकलांग.. नवरा इथे नाही. वर्षानुवर्षे हेच चालत राहणार का? लोकांची आयुष्य किती छान आनंदी असतात.. आटोपशीर संसार असतो. शनिवार रविवार फिरायला जातात, सिनेमाला जातात. एन्जॉय करतात. या मुलामुळे मी अडकून पडले. असे असंख्य विचार मनात घोटाळू लागले.असह्य होऊन दोन्ही हातांनी डोकं गच्चं दाबून ठेवत ती मनातल्या मनात ओरडली," का? माझ्याच वाट्याला हे सगळं का?"
आणि त्याच क्षणी समोरच्या अंधारात उजव्या कोपर्यात प्रचंड आगीचा लोळ कोसळावा असा आवाज निर्माण झाला. अन त्यात दशसहस्त्र सूर्य फिके पडतील एवढा प्रकाश दिसू लागला. . . "नाही बाळ.... " असा एक धीरगंभीर , खर्जातला आवाज तिला ऐकू आला. तिने डोळे किलकिले करून पाहिले तर डोळे दिपून जातील असे तेज:पुंज व्यक्तिमत्व त्यातून हळूहळू बाहेर येत होता. . डोळ्यांना तो प्रकाश सहन होईना.. म्हणून तिने उजव्या हाताचा पंजा डोळ्यांवर धरला होता. आणि एका हाताने डोळे चोळत ती बघत होती.
आता तिचे डोळे त्या प्रकाशाला सरावले. साधारण मध्यम उंचीची, पीतवर्ण, केशरी कफनी घातलेली, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर त्रिपुंड, डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना मुद्रिका, तरतरीत नाक, तंतोतंत कारुण्य भाव भरलेले, समोरच्याच्या मनाचा ठाव घेतील असे डोळे, उजव्या काखेत कुबडी आणि हातात जपाची माळ घेतलेले एक तेजस्वी व्यक्तित्व तिला दिसले.

" बाळ.... " परत त्या कोपऱ्यातून आवाज आला. पुन्हा आवाजात तोच गोडवा.
"इथे पृथ्वीवर प्रत्येक जण आपल्या कर्माची फळे मग ती चांगली कि वाईट असोत, ती भोगण्यासाठीच येतो. त्यातून सुटका नाहीच."
" म्हणजे? " तिने हतबल होऊन विचारले.
आपल्या पूर्वकर्मानुसारच तुम्हाला जन्म मिळत असतो. पूर्वजन्मामध्ये केलेली कुठली तरी पाप- पुण्याची कर्मे या जन्मात फळाला येतात त्याला तुम्ही प्रारब्ध म्हणतात. संचित म्हणजे याच कर्मांचे गाठोडे. क्रियमाण कर्म म्हणजे आता या जन्मात तुम्ही जे बरे वाईट कर्मे करत आहात ते. हि सगळी संचितात जमा होत रहातात. आणि हि तुम्हाला भोगुनच संपवावी लागतात.. त्याला इलाज नाही. तुमचा कंट्रोल फक्त या जन्मातल्या कर्मांवर आहे. नवीन कर्म तयार होऊ न देणे हे फक्त तुमच्या हातात आहे.
"तुम्ही लोक माझ्यासमोर आले की तुमचे मागचे पुढचे सगळे जन्म दिसत असतात. उदा. हा तुझा मुलगा, मागच्या जन्मात एक गरीब श्वान होता. गल्लीत सगळे त्याला दगडे मारायचे . पण त्यातल्या त्यात तू त्याला जास्त सतावायचीस . कधी त्याच्या शेपटीला फटाके लावून उडवायचे, तर कधी दगडे मारून... त्याला गल्लीभर पळवून. इतके झाले कि अंगभर जखमा होऊन त्यात गोचीड, अळ्या पडल्यामुळे त्यामुळे तो पिसाळला. अन त्यातच त्याचा अंत झाला. अन आता तोच मुलगा होऊन तुझ्या पोटी आला.
ती आपादमस्तक हादरली. हमसून हमसून रडत तिच्या तोंडून एवढेच शब्द फुटले, " महाSSSराज! "  इतकी क्रूर होते मी महाराज?
ती व्यक्ती म्हणाली, " होय. परपीडेसारखे महाभयंकर पाप नाही."  

"या सर्वातून सुटका कशी महाराज?"  तिने अभावितपणे विचारले.
" सुटका नाहीच! " फक्त एक करू शकतो.. तुमचे जर सद्गुरू असतील तर ते तुमचा हा प्रपंचाचा दाह कमी करू शकतात.
'ते कसे काय?" तिने सावरून विचारले. तुमचा गुरु तुमच्या अनेक जन्मांपासून सोबत असतो. तुम्हाला तो दिसत नसला तरी पृथ्वीवर पहिली जीवयोनी निर्माण झाली तेव्हापासून तो तुमच्या सोबत असतो. हे जे. परमात्मस्वरूप झालेले... पोहचलेले जीव असतात त्यांना साक्षात परब्रम्हानेच हे कार्य वाटून दिलेले असते. प्रत्येक जीवाला मोक्षप्राप्तीपर्यंत न्यायचे त्यांचे ध्येय असते. मोठे कार्य आहे ते. त्या जीवाला जाणीव करून देऊन, त्याची साधना करणे, प्रसंगी त्याची प्रपंचातील कर्मे करून, त्याचे आजार स्वतःवर घेऊन त्यांना हे करावे लागते. खरे तर काहीच गरज नाही त्यांना हे विकतचे दुखणे हाती घेण्याची! पण प्रत्येक जीवाला पोचवण्याची त्यांची तळमळ, कारुण्य इतके असते कि हे सगळे अभावितपणे त्यांच्या हातून होत असते. प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो. तो वेळ आली कि प्रकट होतोच.
आणि तुला म्हणून सांगतो.. सद्गुरू तुमचे एकेक आधार सोडवत असतात.. तुम्हाला पैश्याचा आधार वाटतो, नवऱ्याचा वाटतो, मुलांचा वाटतो,.. ते सगळे तुमच्यापासून हळूहळू दूर केले जातात. अन् जेव्हा तुम्ही निराधार होता, जेव्हा तुम्हाला प्रपंचाचा उबग येतो...हे सगळ व्यर्थ वाटू लागते तेव्हा सद्गुरू तुमच्या आयुष्यात प्रकट होतात.
 
" जर गुरु जन्मोजन्मी सोबत असतो तर आमच्या कठीण काळात किंवा विकार अनावर होतात तेव्हा का नाही येत समोर, महाराज? आम्हाला का नाही पापकर्म करण्यापासून आवरत ते? " तिने डोळ्यात पाणी आणून विचारले.
गुरु दूर उभे राहून तुमची वाट पाहत असतात बाळ. ज्याची त्यालाच हि जाणीव व्हायला हवी असते. तुम्ही प्रपंचात इतके गुंतलेले असतात की आमची हाक तुम्हाला ऐकू येत नसते. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षिदार गुरु असतो.. नव्हे नव्हे... तोच तुम्हाला शिकवण्यासाठी या घटना घडवून आणत असतो. पण तुमचा 'मी करते/करतो, माझ्यामुळे झाले हे'  हा सूक्ष्म अहंभाव इतका वाढलेला असतो कि आपसुक त्या कर्माची फळे तुमच्या संचितात जमा होत राहतात. अन् त्यानुसार तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेत राहता.
ती कर्मे जर रोजच्या रोज तुम्ही श्रीकृष्णार्पणमस्तु करून टाकली तर ती तुम्हाला बाधत नाहीत.

याही उपर, गुरु तुमचे भोग सुसह्य करू शकतात.. किंबहुना ते तुम्हाला त्या भोगांची जाणीव होऊ न देता.. अलगद सुखरूप त्यातून बाहेर काढतात. या कारणासाठीच सदैव तुमच्या सोबत असतात. तुमची शरणागती हवी मात्र. तुम्ही आमच्यावर सोपवायला हवे. परनिंदा, परपीडा टाळायला हवी. विकारांनी आपल्यावर स्वामित्व गाजवायला नको हे पाहावे.

"असं असेल तर आमच्या हातात काहीच नाही का महाराज?आम्ही असे हातावर हात धरून बसायचे? " ती कळवळून विचारते.
" नाहीच काही! तुमचा श्वाससुद्धा तुमचा नाहीये . अग हे झाडाचे पान देखील हलते ते आमच्या इच्छेने. तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहेत. पण त्याचे फळ काय हे ठरवण्याचा अधिकार नियतीचा आहे.
 तुझ्याकडे रग्गड पैसा आहे.. तू परदेशात जाऊन मुलावर उपचार करू शकतेस. औषधे जरी मानवनिर्मित असली तरी त्या औषधात औषधी तत्व घालतो परमेश्वर. म्हणूनच डॉक्टर लोक म्हणतात, " आय ट्रीट, ही क्युअर्स."
" पण महाराज, आम्हा दोघांचा मुलगा आहे ना, मीच का भोगते आहे हे? माझा नवरा  तिकडे आरामात आहे! अन् मी एकटीच इकडे मुलाची उठबस करतेय" ती उसासून म्हणाली!

"नाही, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे , भोग वेगळे. त्याचे तिकडे दुसरे भोग आहेत. तुम्ही या आयुष्यात नवरा-बायको एकत्र असले तरी काही दुःख एकेकट्याने भोगायची असतात.. जसे काही शारीरिक, मानसिक दुःख! ती तुमची तुम्हालाच भोगावी लागतात. ही फक्त तुझ्या कर्माची फळे आहेत म्हणून तुझ्या नवऱ्याला तिकडे दूर पाठवण्यात आले."
तुला उदाहरण देतो बघ.
आता असं बघ, कि तुम्ही या जीवनाच्या आगगाडीत बसलेले आहात. त्या डब्यात तुमच्या सोबत येणारे लोक हे तुमच्या कर्माने आलेले असतात. त्यात तुझे आई वडील, नवरा, सासरचे नातेवाईक, मुले बाळे , अगदी मधल्या स्टेशनवर अधे मध्ये चढणारे विक्रेते, हे भिकारी, शेजारी बसलेले अनोळखी लोक.. हे सगळं पूर्वनियोजित असते. ज्याचे स्टेशन आले तो उतरला. सद्गुरू हे तुमचे रेल्वेचे ड्राइवर. मागे गार्ड म्हणजे तुमचे हे साधन. आणि अजून एक मुख्य स्टेशनवर तुमच्या गाडीची पटरी बदलणारी व्यक्ती बसलेली असते .. ती म्हणजे, नियती.
ती तुमच्या कर्मफळाप्रमाणे वेगवेगळ्या ट्रॅकवर तुमची गाडी टाकत असते. त्यात कधी तुमचे प्लॅन कधी सक्सेस होतात.. कधी फसतात.. आणि ती नियती तिकडे खदाखदा हसत असते. तीच माया.. तीच तुम्हाला खेळवत असते.
तुम्ही फक्त एकच करायचं. गाडी धरून ठेवायची. सद्गुरूंनी दिलेले साधन घट्ट धरून ठेवायचे. म्हणजे सतत नाम घ्यायचे. त्यांचा हात सोडायचा नाही. त्यांनी धरलेलाच असतो. आपण सोडून इकडे तिकडे पळतो, स्टेशनवरच्या क्षुद्र वस्तूंकडे आकर्षित होतो. ही अखंड सावधानता हवी मात्र!  डोळ्यात तेल घालून आपले कुठे चुकते का ते चेक करत राहायचे. मग चांगला जीव असेल तर सद्गुरू नियतीवर सुद्धा कंट्रोल करू शकतात. तसा त्यांना प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. पण त्याही पलीकडे जाऊन ते हा धोका पत्करतात.

"काय विलक्षण योगायोग आहे, आजच आपली गाडी इथे बंद पडावी आणि हे सगळ अनुभवायला मिळावे.. असे शब्द तिच्या मनात येऊन गेले!"
त्यावर स्मितहास्य करत समोरचा तेजस्वी पुरुष उत्तरला," या जगात योगायोग नसतोच बाळ, सगळ पूर्वनियोजित असतं!
तुला इथे आणणे हेही आधीच ठरलेलं आहे.
ती चमकली.. आता तिला उमगु लागले.. आज चवठ्यांदा तिची गाडी या गावात... या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बंद पडली होती. हा योगायोग नाही, आपल्याला इथे आणण्यासाठी हे घडवून आणले गेले होते तर..!  
" महाराज, महाराज..मी शरण आहे! मला आपले म्हणून स्वीकारावे महाराज! .. अस म्हणत तीने त्या व्यक्तीच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला.
"आशीर्वाद" असे पुटपुटत त्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर अलगद हात ठेवला. अन् ती अंतर्बाह्य शहारली. एक शिरशिरी तिच्या मस्तकापासून पायापर्यंत येऊन गेली.. अंग थरारले. भारावून जाऊन ती तिकडे पाहून वारंवार नमस्कार करू लागली! कानावर आवाज आला," भोजनप्रसाद तयार आहे बाळ, तो घेऊन जावे! "  
भानावर येऊन डोळे उघडुन पाहते तो कोपऱ्यातला प्रकाश हळूहळू लुप्त होत होता.

आता तो तेजस्वी सत्पुरुष कोण होता हे सुज्ञास सांगणे न लगे!
अहो आपली सर्वांची माऊली .. आपले महाराजच!
बरं महाराज यावेळी काय करत होते, माहितेय?
ते समाधानाने हसत आपल्या हातातल्या लिस्टवर टिक करत होते.
रेवती राजस रेगे ✔️
आज अजून एक शिष्य त्यांच्या लिस्टमध्ये add झाला होता. अजून एकाला ते पार लावणार होते.

तुम्हाला काय वाटतं, पुढचा नंबर कोण बरं?
राजस पुरुषोत्तम रेगे! (रेवतीचा नवरा)
(कारण महाराज एखाद्याला नामाला लावतात तर त्याचे संपूर्ण घरच नामाला लावतात :)  )
आता राजस रेगे हे प्रकरण जरा अवघड आहे खरं! (कारण तो कट्टर नास्तिक आहे)
पण आपल्या महाराजांना काय अवघड आहे? भिंतीतून ही बोलतात की ते.

~ जय श्रीराम
महाराज कन्या नयना



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...