बुधवार, २९ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥

"बहुमंदिरे स्थापियेली" या शृंखले अंतर्गत पुढची मंदिरे खालीलप्रमाणे

मांडव कर आणि गिरवीकरांबद्दल श्रीमहाराजांना विशेष प्रेम होते. 

९. मांडवे राममंदिर, मांडवे ( १९०१ )
श्रीराममंदिर, मौजे - मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३१०९, महाराष्ट्र

मांडवे येथील राममंदिर - विष्णुकाकांनी बांधले व स्वत: चालविले.

 

 

मांडवे येथे श्रीमहाराज

मांडवे येथे रामराया

राम मंदिर, मांडवे

मांडवे येथील दत्तमूर्ती

गिरवी राम मंदिर

१०. गिरवी राममंदिर, गिरवी (१९०१ ) -
मु.पो. गिरवी, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३१११, महाराष्ट्र
हे राममंदिर येसूकाकांनी बांधून दिले.
गिरवी येथील श्रींच्या काही आठवणी पाहुया.

श्री. यशवंत नरहर कुलकर्णी उर्फ येसुकाका यांनी आपल्या बारा वर्षाच्या नातवाला पंढरपूरला शिक्षणासाठी ठेवले होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मनावर झाला आणि तो परागंदा झाला. येसूकाका श्रीमहाराजांचेकडे गेले व त्यांनी सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीमहाराज म्हणाले, 'काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचा नातू लवकरच सापडेल.' नातू माहुली येथे सापडला. येसुकाकांनी नातवाला लगेच श्रीमहाराजांकडे आणले. मुलाला पाहताच श्रीमहाराज म्हणाले, 'माझा नातू आला; पुरण पोळी करा.'

 

 


गिरवी येथील श्रींच्या पादुका

श्रीमहाराजांना नमस्कार करताच त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून त्याला उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या व अनुग्रह दिला, आणि येसुकाकांकडे वळून ते म्हणाले, 'त्याचेकडे तुमचे घरातील कारभाराची किल्ली द्या; आता तो कोठे जाणार नाही.'
हा पळून जाणारा नातू म्हणजे कै. काशीनाथ नरहर कुलकर्णी उर्फ सरदार गिरवीकर. हे पुढे गोंदवले संस्थानचे पंच होते.
🌿 ~ चैतन्य - स्मरण १९८८ मधील  पंढरीनाथ काशिनाथ कुलकर्णी यांच्या लेखातून
**
श्रीमहाराजांच्या चरित्रातील एक गोष्ट

श्रीमहाराराज गिरवीस असतां सरदार पोतनीस आपले नवे जांवई अण्णासाहेब आंबेगांवकर यांना घेऊन दर्शनास आले. अण्णासाहेब पंचवीस वर्षाचे तरूण व पुष्कळ इंग्रजी शिकलेले असल्यानें,  देवावर जरी त्यांची श्रद्धा होती तरी साधुसंतांच्यावर नव्हती. म्हणून आरंभापासूनच ते श्रीमहाराजांच्याकडे साशंक द्दष्टीनें पहात होते. दर्शन व स्नान झाल्यानंतर जेवणासाठीं पानें वगैरे मांडण्याची तयारी सुरू झाली. तेव्हां श्रीमहाराजांनीं स्वतः पानें मांडण्यास आरंभ केला. त्यांची प्रत्येक हालचाल अण्णासाहेब अगदीं बारीक नजरेनें बघत होते.

गिरवी येथील राम मूर्ती 

 

श्रीमहाराज पानें मांडून लागल्यावर ते मनांत म्हणाले, 'अरे, हें काय? हे एवढें मोठे साधु आहेत, आणि असलीं हळकुंडे कामें करतात!  हा कसला साधुपणा बुवा! ' जेवणें आटोपल्यावर सर्व मंडळींनीं विश्रांति घेतली. दुपारीं चार वाजून गेल्यावर पोतनीसांनीं श्रीमहाराजांना आपल्याकडे चहा-फराळासाठीं बोलवून आणलें . सर्व मंडळी बसली असतां "नवे जावई" म्हणून त्यांच्या सासऱ्यानें अण्णासाहेबांना आणून मुद्दाम श्रीमहाराजांच्या शेजारीं बसविलें. आपल्याकडे कोणाचें विशेष लक्ष नाहीं,  असें पाहून श्रीमहाराज हलक्या आवाजानें अण्णासाहेबांच्या कानांत बोलले, 'जेवणाची पानें मांडणें,  झाडून काढणें,  ही हलकीं कामें  मी करीत असतों'. 

गिरवी येथे श्रीमहाराज

ज्या शब्दांत त्याच्या मनांत तो विचार आला होता तेच शब्द श्रीमहाराज त्यांच्या कानांत बोलले, तेव्हां अण्णासाहेब फार चकित झाले, आणि श्रीमहाराजांच्याकडे पहाण्याची त्यांची द्दष्टीच एकदम बदलली.
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र
*

गिरवी मारुती

 ***

 ११. यावंगल राममंदिर, ( १९०१ )
पो. यावंगल, ता. रोण, जि. गदग, ५२८१०१, कर्नाटक
दत्तमंदिर - यावंगल १९०१
पो. यावंगल, ता. रोण, जि. गदग, ५२८१०१, कर्नाटक

यावंगल श्रीराम मंदिर    
या मंदिराबद्दल पु. ब्रम्हानंद बुवांच्या चरित्रात कथा आली आहे ती अशी.
  श्रीमहाराज गोंदवलेहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर, विजापूर यामार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तेथें आगाऊ तयार ठेवण्यांत आलेल्या बैलगाडीतून यावलगलला गेले. यावगल गांवी शिवदीक्षित या नावाचे एक सुखवस्तु, घरंदाज, श्रीमंत गृहस्थ रहात होते. यांच्या घरांत, पूर्वीपासून पिशाच्चबाधा होती. त्याच्या निवारणार्थ त्यांनी बरेंच उपाय करून पाहिले, परंतु त्रास कांहीं कमी होत नव्हता. त्याची व श्रीब्रह्मानंदबुवांची गांठ पडल्यापासून त्यांच्यावर त्याची विशेष भक्ति जडली होती. पु बुवा  वरचेवर त्यांच्याकडे जात असत. एका खेपेस शिवदीक्षितांनी श्रीब्रम्हानंदांस  पिशाच्च बाधेचे निवारण करण्याची विनंति केली. श्रीब्रम्हानंदांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीमहाराजांस शरण जाण्यास सुचविले व एका खेपेस स्वतः गोंदवल्यास जातेवेळी शिवदीक्षितांस बरोबर नेऊन श्रीमहाराजांच्या पायांवर घातलें.
    

यावंगल शिवमंदिर

 

श्रीमहाराजांनीं शांतपणे त्यांची सर्व हकीगत ऐकून घेतली व त्यांना श्रीदत्तगुरूंची व श्रीरामरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने त्यांची सेवा करा, म्हणजे सर्व बाधांचे निवारण होईल, असें सांगितले. लागलीच त्या भाविकाने, "आपणच तेथपर्यंत येऊन आपल्या हातानें प्रतिष्ठापना करावी", अशीं तळमळीने विनंति केली. तेंव्हा श्रीमहाराजांनीं, "आधीं देऊळ तयार करा, पुढें मला तिकडे यावयाचे आहे. तेंव्हा तुमच्या इच्छेप्रमाणें करूं", असें म्हणून अभय दिले. शिवदीक्षित संतुष्ट झाले व श्रीमहाराजांची आज्ञा घेऊन गांवी गेले.
     

 

 

 

 

यावंगल महाराजांच्या पादुका

शिवदीक्षितांनी आपल्या घराजवळच्या स्वतःच्या जागेतच श्रीब्रम्हानंदांच्या सल्ल्याप्रमाणे सुंदर मंदीर बांधले. श्रीदत्तदिगंबराची मूर्ति व श्रीपट्टाभिरामाची मूर्ति अशा दोन्हीं मूर्ति आणवून ठेवल्या. याच शिवदीक्षितांस पु बुवांनी श्रीमहाराजांस बोलावण्यास पाठविल्यानें जातांना मूर्तींच्या प्रतिष्ठापनेची सर्व सिद्धता करूनच ते गेले होते.
     म्हणूनच तर, श्रीमहाराज यावगलला येतांच शिवदीक्षितांच्या घरीं गेले. तेथें दोन दिवस मुक्काम करून, प्रतिष्ठापना कार्य संपवून त्यांनी त्यांचे मनोरथ पूर्ण केले.

संदर्भ: पू ब्रम्हानंद बुवांचे चरित्र

यावंगल महाराजांच्या पादुका

यावंगल पट्टाभिराम मूर्ती


यावंगल दत्त मूर्ती 



जय श्रीराम!
संकलन - श्रीमहाराज कन्या




 

 

 

 

 

 

 

 

 

 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...