गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

जय श्रीराम!

आजपासून आपण अभ्यासणार  आहोत,
श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे

१.     हरदासी राममंदिर, सांगली १९१२-१३
गावभाव, मारुतीमंदिराजवळ, सांगली, ४१६४१६, महाराष्ट्र

श्री हरिपंत हरिदासी यांनी हे मंदिर बांधले असावे असे म्हणतात. हरिपंत पंच होते. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात त्यांचे गुलालांपूर्वी श्रींच्या गोष्टी सांगून श्रींच्या कार्याविषयी तळमळीने मार्गदर्शन करीत. उत्सवात हरिपंत कीर्तन करत आणि लळीत वाचनाचा कार्यक्रम हि करत असत. यांना श्रीब्रंम्हानंद महाराज व गणपतराव दामले यांनी गोंदवल्यास राहून दैनंदिन व्यवहार, कोठी, वगैरे पाहाण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी काही वर्षे सेवा केली. त्याकाळात समाधीची पुजा, गोरक्षण, आल्यागेल्याची व्यवस्था, वगैरे सर्व प्रकारची कामे त्यांना करावी लागली. ते कमींतकमी विश्रांती घेऊन वीस-वीस तास जप करीत. शेवटी जप करुन त्यांची बोटे सुजली होती.

या हरिपंत मास्तरांच्या काही गोष्टी श्रींच्या चरित्रात आल्या आहेत. त्या एकेक करून पाहुयात.

  सन १९४७ साली श्रीमहाराजांची काही जुनी मंडळी मालाड येथे जपासाठी येऊन राहिली होती. त्यांच्यामध्ये सांगलीचे श्री हरिपंत हरदास उर्फ हरिपंत मास्तर होते. ते स्वतः कीर्तन करीत. त्यांच्यापाशी एक जुनी जीर्ण झालेली वही होती. त्या वहीमध्ये किर्तनाला उपयोगी अशी मराठी व हिंदी पदे आणि मराठी व संस्कृत श्लोक लिहिलेले होते. मी ती वाचायला आणली. तिच्यात लिहिलेल्या पदांचे व श्लोकांचे मला महत्त्व वाटले नाही. पण सन १९०५ साली गोंदवल्यास गुरुपौर्णिमा झाली.  त्यादिवशी श्रीमहाराजांचे जे प्रवचन झाले त्याचा सविस्तर सारांश आढळला. तो तेवढा मी लिहून ठेवला होता. माझे आता वय झाले म्हणून तो हातावेगळा करावा या हेतूने चरित्राच्या नव्या आवृत्तीमध्ये घातला आहे. - प.पु. बाबासाहेब बेलसरे.
             ( हरिपंत मास्तर म्हणाले - "महाराज जे बोलले ते बहुतेक जसेच्या तसेच मी उतरून घेतले. काही शब्द व वाक्ये सुटली. कूर्तकोटी यांना विचारून ते शब्द व ती वाक्ये लिहून घेतली")

एकदा कर्नाटकांतील आठदहा माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली होती.पंधरा दिवस त्यांना ठेऊन घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली.म्हणून श्री महाराज पहाटे उठले व त्यांच्यासाठी पिठले भात करायला  त्यांनी सांगितलं.
इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण झाडण्यासाठी काढले.चादर काढून त्यांनी धुण्यास टाकली.गादी झाडून गुंडाळून ठेवली.नंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली.पलंग पुसून काढला.आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली.दरम्यान श्री महाराज आले,हातपाय धुऊन श्री रामाच्या पाया पडले.आणि सिंहासनावर येऊन बसले.जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले.व श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले.त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंत मास्तरांना सांगितले,"मास्तर,माझ्या गादीखाली मघाशी मी रुपये ठेवले आहेत तेवढे घेऊन या बरे!.यावर मास्तर म्हणाले,"महाराज,गादीखाली काही नाही.आता इतक्यातच मी सर्व अंथरूण झाडून घातले आहे".तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले,"मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे.ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल?मी सांगतो त्यावर तर्क काढू नये.जा आणि गादीखाली सापडेल ते आणा.हरिपंत मुकाट्याने गेले.आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिले.तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले.ते चकितच झाले.श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला एकेक रुपया, आणि प्रत्येक बाईला एकेक खण देऊन सर्वाना निरोप दिला.

हरिपंत मास्तर गोंदवल्यास एकटेच राहात. एकदा ते जवळच्या गावी काही कामानिमित्त गेले होते. तिथे उशीर झाला. परिचितांच्या घरी संध्याकाळी खाणं झालं मग ते जायला निघाले. बाहेर काळोख पडला होता सर्वांनी आग्रह केला की आज इथंच राहा. मास्तर म्हणाले, "नाही मला जायलाच हवं." त्यावर एकजण म्हणाला," जाऊन करणार काय? नाहीतरी कोण आहे तिथं तुमची वाट पाहणारं?" तरीही मास्तर निघाले. सगळा पायीच प्रवास! चालताना त्यांना मित्राचं बोलणं आठवलं आणि मन हेलावलं. वाटलं... खरंच कोण आहे जो आपली चिंता करीत असेल... आपली वाट पाहात असेल?... गोंदवल्याची वेस जवळ आली आणि त्यांनी पाहिलं श्रीमहाराज तिथं बसून आहेत! मास्तरांना पाहाताच महाराज म्हणाले,"किती उशीर केलात मास्तर, मी कधीपासून तुमची वाट पाहात इथं बसून आहे!" मास्तरांना काय बोलावं सुचेना... त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या..

श्रीमहाराजांनी देह ठेवल्यावर हरिपंत मास्तरांनीं श्रीमहाराज व श्रीआनंदसागर या गुरुशिष्यांच्या अस्थि बरोबरच नेऊन प्रयागच्या त्रिवेणीसंगमांत विसर्जन केल्या होत्या.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥


२.     लिक्ते राममंदिर, पुणे १९१४
७१५, लक्ष्मी रोड, पुणे, ४११००२, महाराष्ट्र

पुण्याच्या पार्वतीबाई लिकते (माहेरच्या तिळवणकर) श्रीमहाराजांच्या भक्त होत्या. त्यांना पुत्रसंतान नसल्याने श्रींनी त्यांना श्रीरामालाच पुत्र मानून त्याची सेवा करायला सांगितले होते. श्रीमहाराजांनी असा बरेच जणांना सल्ला देऊन राम मंदिर बांधून घेतले आहे. भर लक्ष्मी रोडवरील या मंदिराची जागा स्वतः श्रीमहाराजांनी ठरवून, भूमिपूजन केले आहे. महाराजांनी प्रतिष्ठापनेची तिथीसुद्धा काढून दिली होती. आणि त्यावेळी महाराज लाल रंगाची कफनी घालून आले होते असे समजते. त्यावेळी महाराजांनी त्यांच्या पादुका पार्वतीबाईंना दिल्या होत्या. परंतु या मंदिराचे बांधकाम श्रींच्या हयातीत पूर्ण झाले नाही. श्रींच्या निर्याणानंतर पूर्ण झाले. आणि इ.स. १९९४ मध्ये महाराजांनी सांगितलेल्या मुहूर्तावर राम स्थापनेसाठी स्वतः श्री ब्रम्हानंद बुवा इथे आले होते.
या मंदिराबद्दल एक गोष्ट अशी सांगण्यात येते की, महाराजांनी दूरदृष्टीने आता आहे ती जागा ठरवली होती. पण काही कारणाने इतर लोक थोडी पुढची जागा ठरवत होते, जी रोडच्या अगदी कडेला येत होती. शेवटी श्रींच्या म्हणण्याला आधार मानून आता आहे ती जागा ठरवण्यात आली. आणि ते हिताचेच झाले. पुढे लक्ष्मी रोडच्या रुंदीकरणात काही जागा गेली. आणि मंदिर सुखरूप राहिले












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...