बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

जय श्रीराम!

आपण पाहत आहोत,
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे

५.  जोगळेकर राममंदिर, धारवाड १९१५
माळमड्डी, एम्मीकेरी, स्टेशनरोड, धारवाड, जि. हुबळी - ५८०००१, कर्नाटक

वनवासी राम मंदिर ( जोगळेकर राम मंदिर)
कृष्णशास्त्री उप्पिनबेटिगिरी नावाचे कर्नाटकातील अतिशय विद्वान संस्कृत पंडित, श्रीमहाराजांचे शिष्य होते . मैसूर दरबारनें त्यांना 'विद्वानन्मुकुटमणि' ही पदवी दिली होती. 'वेदान्तावर संस्कृत भाषेत लिहिलेला कोणतहि ग्रंथ मी अभ्यासलेला नाही असे नाही.'असे ते सांगत.
वनवासी राम

श्रीब्रम्हानंद महाराज दक्षिणेंत गेल्या नंतर त्यांनी शक्य तितके श्रीमहाराजांचे नांव सांगून लोकांना त्यांचे अनुयायी केले. त्याच्यामुळेंच श्री.कृष्णशास्त्री श्रीमहाराजांकडे गेले व त्यांनी त्यांचेकडून उपदेश ग्रहण केला श्रीमहाराजांची व त्यांची पहिली भेट बेलधडी येथे झाली तेव्हां त्या दोघांचा सुमारे ३ तास संवाद झाला संवादाचे शेवटी शास्त्रीबोवांनी श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला व पुनः त्यांचेबरोबर कधीही वाद घातला नाहीं. त्यानंतर 'श्रीमहाराज बोलूं लागले म्हणजे साक्षात वेद बोलत आहेत असे वाटतें' असे ते म्हणत असत. श्रीमहाराजांचे त्यांचेवर अतिशय प्रेम होते व ते त्यांना फार सन्मानपूर्वक वागवीत.
 श्रींनी दोन रुपये प्रसाद म्हणून देऊन धारवाडमध्ये दोन राम मंदिरे बांधायला सांगितली होती. त्यानुसार त्यांच्या हस्ते  दोन राममंदिराची स्थापना झाली. एक लाईनबझारमध्ये, त्यांच्या नात्यातल्या गंगाबाई यांनी बांधलेले; आणि दुसरे माळमड्डीवर, त्यांचे स्नेही निवृत्त न्यायाधीश श्री वासुदेवराव जोगळेकर यांच्या जागेवर बांधलेले. या मंदिरात वनवासी रामाच्या मूर्ती आहेत.

या कृष्णशास्त्रींची गोष्ट अशी की हे श्रींनी दिलेले दोन रुपये त्यांच्या पूजेत असत. एकदा त्यांनी दारावर नेहमी येणाऱ्या एका बाईकडून दोन रुपयांचे धान्य घेतले, व त्यावेळी जवळ पैसे नसल्याने दुसऱ्या दिवशीचा वायदा केला. दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत रकमेची व्यवस्था होऊ शकली नाही. वायदा पुरा न केला तर आपली अब्रू जाणार अशी वेळ येऊन ठेपली, तेव्हा निरुपाय होऊन पूजेतले रुपये देण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शास्त्रीबुवांनी ते उचलले. एवढ्यात पोस्टमन येऊन त्याने पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेतर्फे परीक्षक म्हणून केलेल्या कामाचे मानधनाची मनीऑर्डर दिली ती नेमकी दोन रुपयांची! श्रीगुरुमाउलीची ही कृपा पाहून शास्त्रीबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले! आजही ते दोन रुपये त्यांचे चिरंजीव भालचंद्रशास्त्री यांच्या पूजेत आहेत.

                गोंदवल्यास असतांना श्रीमहाराज एका शेतकर्याला परमात्मा सर्व कर्ता कसा आहे हे समजावून सांगत होते. जवळच कृष्णशास्त्री होते. ते विवेचन चालू असतां शास्त्रीबुवांच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्रीमहाराज तीच शंका काढून तिचे उत्तर देत. असे बराच वेळ चालले. शेवटी श्रीमहाराज म्हणाले, ' हे बघ ! शंकांना अंत नाही. तेंव्हा विद्वानासारख्या शंका न घेतां तू नाम घेत जा .' हे शब्द ऐकून शास्त्रीबुवा उमजले आणि , ' त्वमेव शरणं मम् ' असे म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला.

                 श्रीमहाराज काशीमध्यें असतांना शास्त्रीबुवा बरोबर होते. त्यांचा व पं. मदनमोहन मालवीय यांचा फार स्नेह होता. पं मालवीय एक मोठे संस्कृत कौलेज काढण्याच्या खटपटीत होते. कृष्णशास्त्रींनी तेथे प्रधानाध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती., परंतु श्रीमहाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही.

                काशीमध्यें संस्कृत पंडितांची सभा होती. शास्त्रीबुवा अध्यक्ष होते. चार वाजतां उघडे , खांद्यावर पंचा टाकलेले व लांडे धोतर नेसलेले शास्त्रीबुवा सभेला पायीं निघाले. श्रीमहाराज म्हणाले, ' छे , आपण अध्यक्ष शोभलों पाहिजे ना ! ' श्रीमहाराजांनी भरजरी शाल शास्त्रीबुवांना  पांघरली, दोन चतुर माणसें बरोबर दिली , आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठविले. स्वतः पं मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले.
केडगांवच्या साधूंनी एकदा शास्त्रीबुवांना एक भारी शाल दिली. ती त्यांनी तेथेच एका गरीबाला देवून टाकली , व ही गोष्ट श्रीमहाराजांच्या कानावर घातली. तेंव्हा श्रीमहाराज म्हणाले , ' आपले चुकले शास्त्रीबुवा ! प्रारब्धाने आलेले नको म्हणणे हे सुद्धा वैराग्याला बाधक असते ! ' शास्त्रीबुवा म्हणाले , ' हे सत्पुरुष कुठे आणि कसे बरोबर पकडतील याचा नेम नाही. '
काशीहून धारवाडला आल्यावर एकदोन वर्षांतच कृष्णशास्त्रींना अर्धांगाचा झटका आला. पुढे ते गोंदवल्यास आले. श्रीमहाराज रोज त्यांच्या समाचारास जात. शास्त्रीबुवा श्रीमहाराजांच्या दर्शनास आले म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत. पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री श्रीमहाराजांशी बोलतांना मात्र , ' जी महाराज, होय महाराज ' , असे लीनतेने बोलत. या महापुरुषाचा अंत १९२० साली झाला.
वरील ( आजाराचे ) प्रसंगी श्रीमहाराजांनी एकदां भागवतपुराण काढून बोलायला सुरवात केली.त्यांत धर्मस्थापनेचा प्रश्न आला.शास्त्रीबुवा फार धर्माभिमानी होते.त्यांनी त्या वेळच्या कांही धटनांचा उल्लेख करुन अधर्म फार वाढत असल्याचें म्हटले.त्यावर श्रीमहाराज एकदम उठून उभे राहिले व समोरच्या भिंतीवर पडलेले सुर्याचे किरण दाखवून म्हणाले ," आपण काळजी करुं नये पुनः धर्मस्थापना होऊन धर्माची घडी बसेलच बसेल." शास्त्रीबुवांनी ती केव्हा बसणार हे एक दोन वेळा खाजगी भेट घेऊन विचारुन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी दुसरा मुद्दा काढून व त्यांना त्यांत गुंतवून त्यांना त्यांचा मुद्दा काढण्यास वेळच दिला नाही.
     एकदा श्रीमहाराज त्यांची नेहमी हजामत करणाऱ्या चिलया नावाच्या नापिताच्या घरी गेले. शास्त्रीबुवा त्यांचे बरोबर होते. त्यांच्या घरांत एक चिमणी लावलेली होती. ती चिमणी दाखवून श्रीमहाराज शास्त्रीबुवांना म्हणाले, " हे काय आहे? " त्यावर ते म्हणाले ,"महाराज ती चिमणी जळते आहे." श्रीमहाराजांनी " ती कशी काय जळते हो ?" असे विचारले तेव्हा या विचारण्यांत कांहीतरी हेतु आहे असे वाटून शास्त्रीबुवा म्हणाले," महाराज ते मला कळत नाही.
तेव्हा महाराज म्हणाले," हे मला फार आवडते ". सदगुरु हा ज्ञानी पुरुष असतो. त्याचे जवळ कसे बोलावे व वागावे हे या वरुन शिकण्यासारखे आहे.
     एकदा गोंदावले येथे शास्त्रीबुवा, श्रीब्रम्हानंद व डाॕ.कूर्तकोटि असे हजर होते. तेव्हा कांहीतरी उद्योग पाहिजे म्हणून श्रीमहाराजांनी पोथी काढावयास सांगितली व सर्वांना थोडा थोडा वेळ कांहीतरी सांगावयास सांगितले. श्रीब्रम्हानंद तेथून निघून गेले. डाॕ.कूर्तकोटिंनी तास भर सांगितले. दरम्यान श्रीमहाराज बाहेर गेले होते ते परत आल्यावर काय सांगितले असे विचारले मग शास्त्रीबुवांना " तुम्ही कांहीतरी सांगा " असे श्रीमहाराज म्हणाले . तेव्हा शास्त्रीबुवा उगेच राहिले तोंडातूंन शब्द फूटे ना आणि रडूच लागले. तेव्हा " काय झाले शास्त्रीबुवा ?" असें श्रींनी विचारल्यावर म्हणाले ' आपल्या समोर मी काय सांगू ?'
     डाॕ.अॕनी बेझंट बाईंनी बनारसला सुरु केलेल्या संस्कृत पाठशाळेंत मुख्याध्यापक म्हणून मदनमोहन मालवीयांनी शास्त्रीबुवांना बोलाविलें होते. त्यांनी श्रीमहाराजांना विचारल्यावर "जाऊ नका " असे सांगितले . ते फार मोठे पंडित होते परंतु त्यांना व्यवस्थापनाचे काम (Administration ) जमले नसते.
एकदां शास्त्रीबुवा श्रीमहाराजांबरोबर अयोघ्येला गेले होते. तेथील जंगलांत 'हनुमानगढी' म्हणून एक स्थान आहे. तेथे गेलें असतां साक्षात मारुतिरायांचे दर्शन होतें असे त्यांनी ऐकले होते. म्हणून एक दिवस नित्याप्रमाणे संघ्यावंदनादि आन्हिक उरकून एकटेच ते त्या स्थानाच्या दिशेनें निघाले. कांहीं अंतर गेल्यावर एकाड भाग लागला. इतक्यांत समोरुन श्रीमहाराज येतांना त्यांना दिसले. नमस्कार वगैरे झाल्यावर श्रींनी 'फिरायला निघालां का ? 'असे विचारले. तेव्हा शास्त्रीबुवांनी आपला बाहेर पडण्याचा उद्देश सांगितला. त्यावर श्रीमहाराज म्हणाले," चांगलें आहे. जाऊन आल्यावर पुनः भेटूं, परंतु एक गोष्ट सांगतो कीं मनांत जरा सुध्दा शंका असेल तर मारुतिराय समोर येऊनही उमगणार नाहींत" त्यावर 'माझे मनांत कांहीहि शंका नाही" असे शास्त्रीबुवा म्हणाले. तेव्हां श्रीमहाराजांनीं पुनः तेंच सांगितले व 'जाऊन यावे मग भेटूं" असे म्हटले. मग शास्त्रीबोवा बरेच पुढे जंगलाजवळ गेले तेव्हा त्यांना समोरुन एक काळाकभिन्न,धिप्पाड असा एक कातकऱ्यासारखा मनुष्य येतांना दिसला. त्याच्या दृष्टीनें तो अर्थातच स्पर्शयोग्य नसल्यामुळें तो येत असलेल्या रस्त्याच्या विरुध्द बाजूनें ते जाऊं लागले. तरीहि तो मनुष्य आपली बाजू सोडून त्यांचेजवळ आला व त्यांना एक जरासा घक्का देऊन पुढे गेला. मारुतीरायाच्या दर्शनाऐवजीं हे वाट्याला आल्यामुळें त्यांना वाईट वाटले व स्पर्शदोषाचा परिहार करण्याकरतां जवळच असलेल्या शरयूनदीच्या तीरावर आले. तेथे हातपाय घुऊन मार्जन वगैरे करतात इतक्यांतच त्यांना श्रीमहाराज तेथे दिसले. "दर्शन झाले का ?" असें त्यांनी विचारले तेव्हा शास्त्रीबुवांनी झालेली हकिकत सांगितली . तेव्हां श्रीमहाराज म्हणाले ," मी आपणास अगोदरच सांगितले होते की कणभरही शंका असेल तर मारुतीराय समोर येऊनही उमगणार नाहींत.ते साक्षात मारुतीरायच होते." सामान्य मनुष्य आपल्या सारख्याला स्पर्श होऊं नये याबद्दल काळजी घेतो.हा मनुष्य वाट सोडून आपल्याला स्पर्श करतो यावरुनच आपल्याला लक्षांत यावयास पाहिजे होते " हे ऐकून शास्त्रीबुवांना फार वाईट वाटले.तेव्हा श्रीमहाराज स्वतः त्यांना घेऊन त्या स्थानांत गेले.शास्त्रीबुवांना उभे राहण्यास सांगितले व स्वतः क्षणभर डोळे मिटून उभे राहिले. तत्काळ शास्त्रीबुवांना आपल्या समोर मारुतिराय तेजोरुपांत उभे असलेले दिसले. पण ते तेज सहन न होऊन ते भोवळ येऊंन पडले.तरी पण त्या वेळी " आपले हें रुप त्यांना सहन होणार नाही तरी आपण सौम्य रुप घारण करावे." असे श्रींचे शब्द त्यांना ऐकू आले.मग श्रीमहाराजांनी त्यांना उठवले तेव्हां मारुतिराय त्यांना सौम्यरुपांत दिसले. मुक्कामी आल्यावर शास्त्रीबुवांनी ही हकिकत (कै) गं.भा.गंगूताई आठवले यांना सांगितली .
शास्त्रीबुवांचे चिरंजीव पंडित नागेश शास्त्री वडिलांनप्रमाणे प्रकांड पंडित होते.एकदां त्यांना प्लेग झाला काही केल्या उतार पडेना.डोळे मिटण्याची किंवा तोंडात कांही घातले तर गिळण्याची शक्ति राहिली नव्हती.श्री.कृष्णाशास्त्री त्यावेळी गोंदवल्यास होते तेथे त्यांना पत्र गेले.पत्र पाहून श्रीमहाराज म्हणाले , " आपण गेले पाहिजे ना ?" शास्त्रीबुवा त्यांना म्हणाले , ' मी सर्व आपले स्वाधीन केले आहे.आपणास योग्य वाटेल ते करावे.' श्रींम्हणाले "ठीक आहे रामकृपेने त्यांना बरे वाटेल." आणि त्याच वेळेपासुन नागेश शास्त्र्यांना धारवाड येथे बरें वाटू लागले.आणि ते पूर्ण बरे झाले.

पु. बाबा बेलसरेंनी एका प्रवचनात पंडित भालचंद्रशास्त्री उप्पीनबेटीगिरी  ( कृष्णशास्त्रीचें नातू ) यांच्याबद्दल उल्लेख केला होता.
(श्री भालचंद्रशास्त्री उप्पीनबेटगिरी पूज्य बाबा बेलसरे यांच्यासमवेत )

धारवाडला भालचंद्रशास्त्री म्हणून आहेत. कृष्णशास्त्रींचे हे नातू आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी मी वेंकटापूरला गेलो होतो. तेंव्हा ते बंगलोरहून आले तर कृश झालेले दिसले, म्हणून म्हटले, 'शास्त्री बुवा, आपण अशक्त दिसता!' तर ते म्हणाले 'मी कृश झालेलो आहे-अशक्त नाही'.  कारण काय? तर म्हणाले 'आठ दिवस बनारसला conference होती. त्यात राजेशशास्री प्रमूख होते. राजेशशास्री म्हणजे प्रचड विद्वता. तेंव्हा भालचंद्रशास्त्री म्हणाले 'आठ दिवस राजेशशास्त्री दूधाशिवाय कांही पीत नव्हते. मी ही तसाच राहिलो. कारण काय? तर म्हणाले, बूद्धि तीक्ष्ण रहाते'. बुद्धीला सूक्ष्मता यायला खाणे असे बेताचेच पाहिजे. एकादशीला पोट हलके ठेऊन जर नामस्मरण केले तर नामाची तार अशी लागते की बोलायची सोय नाही.
***
६.  लाईन बझार राममंदिर, धारवाड १९१५
उप्पीनबेटीगिरी, लाईनबझार, धारवाड - ५८०००१, कर्नाटक


श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेटगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड लाइन बाजार भागात दुसरे राम मंदिर स्थापन करण्यात आले आहे.
श्रीमती गंगाबाई उप्पिनबेटगिरी यांच्या जागेत हे मंदिर असून मंदिराचा बांधकामाचा खर्च गंगाबाईंनीच केला. मंदिराच्या स्थापनेसाठी श्री नारायण महाराज केडगावकर आले होते. पूर्वी रामभट्ट पुरोहित पूजा करीत असत. सध्या गंगाधरपंत कुलकर्णी पूजा करतात. दर मंगळवारी महिला भजन करतात. श्रींची स्वतंत्र उपासना येथे चालत नाही.

संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २०००
जय श्रीराम




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...