जय श्रीराम!
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.
७. गजेन्द्रगड राममंदिर, १९१६
पत्तार गल्ली, पो. गजेंद्रगड, ता. रोण, जि. गदग ५८२११४, कर्नाटक
गजेंद्रगड येथे गोविंद दीक्षित या नांवाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण रहात असत. श्रीब्रम्हानंद महाराजांवर त्यांची अत्यंत भक्ति व विश्वास असल्याने ते त्यांच्या दर्शनाकरिता वरचेवर बेलधडीस व वेंकटपुरास जात असत. ब्रम्हानंद बुवांचही त्यांच्यावर तसेंच प्रेम असल्याने, त्यांनी त्यांस गोंदवलेस नेऊन श्रीमहाराजांच्याकडून अनुग्रह देवविला होता.
शके १८३५ मध्यें ब्रम्हानंदांच्या आज्ञेप्रमाणें श्री दीक्षित अग्निहोत्री श्रीमहाराजांच्या दर्शनास गोंदवलेस गेले असतां त्यांस श्रीमहाराजांनीं आदरपूर्वक चार दिवस ठेऊन घेतले होते. एकेदिवशी श्रीमहाराजांनीं "इतक्या लांबवर कां येणें केलें होते ?" असा त्यांस प्रश्न विचारला. त्यांनी अत्यंत नम्रतेने "केवळ आपल्या दर्शनासाठी" असें उत्तर दिले. तेंव्हा श्रीमहाराजांनीं मंदहास्य करीत "ब्रह्मानंद हा माझा केवळ प्राण आहे. तुम्हां लोकांकरिताच मी त्यांस तिकडे पाठविले आहे" असें सांगितले व "तुमच्या घरांत अग्निहोत्र आहें. आपल्या वयस्कर मातापित्यांची शुश्रूषा पण तुम्ही चालविता. यावरून तुम्हीं कृतार्थ आहांतच. तरीपण घरीं श्रीरामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा" असें म्हटले. त्यावर आपल्या आज्ञेप्रमाणें सिद्धता करतो. आपल्या अमृतहस्तानेच प्रतिष्ठापना करणेची कृपा व्हावी" अशी त्यांनी प्रार्थना केली.
श्रीमहाराजांनीं आपल्या हातानें एक पत्र लिहून तें ब्रह्मानंदबुवांसाठी दिलें व त्यांना "समक्षांत मी येण्याचा योग दिसत नाहीं. थोड्याच दिवसांत मी नैमिषारण्याला जाणार आहे. ब्रह्मानंदबुवांकडून तुमच्या मनासारखे काम होईल" म्हणून सांगून आशीर्वाद देऊन पाठविलें. पुढें थोड्याच काळांत श्रीमहाराज समाधिस्थ झाले.
गोविंद दीक्षितांनी गांवी जाऊन श्रीब्रह्मनंदबुवांची भेट घेऊन, पत्र देऊन निरोप कळविला. आणि श्रींच्या आज्ञेप्रमाणें घरांतच मंदीर बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. मंदीर तयार होतांच त्यांनी मूर्तीहि आणविल्या. शके १८३८ च्या रामनवमी उत्सवास जाऊन, दीक्षितांनी मंदिराची सर्व हकीगत निवेदन करून "माझा उद्धार करावा" अशी पु. बुवांना प्रार्थना केली.
ब्रम्हानंद बुवांनी "वैशाख वद्य सप्तमी हा मुहूर्त बरा आहे. श्रीराम सिंहासनावर बसण्यास शुभ दिन आहे. त्याच दिवशी प्रतिष्ठापना करा" असें त्यांस सांगून पाठविलें.
गोविंद दीक्षित नाराज झाले. वेंकटपुरास जाऊन, त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून "तेथवर येऊन मला कृतार्थ करा" असें त्यांनी मागून घेतलें. त्यावेळीं ब्रम्हानंदबुवांना थंडीताप आला होता. घोंगडे पांघरून थडथडत ते अंथरुणावर झोपले होते. दीक्षितांची विनंति ऐकून, "थंडीने मी मरायला लागलो आहें, तापाने फणफत आहे. असल्यात मला ये म्हणतोस. दररोज येणाऱ्या थंडीने मी अशक्त झालों आहें. मला येतां येणार नाहीं. एखादेवेळी वाटेतच आटोपेन. माझ्यावर विसंबून राहूं नकोस. तूंच उरकून घे." असें सांगताच," तुमच्याशिवाय तें होणार नाहीं, तसेंच राहून जाईल." असें दीक्षितांनी सांगितले. त्यावर "हट्ट धरूं नकोस. थंडी कमी झाल्यास मी येतोच. नच आल्यास, अशा प्रकारे उरक" असें म्हणून त्यांनी त्यांस सर्व विधि समजावून सांगितला.
गोविंद दीक्षित ब्रम्हानंदांची आज्ञा प्रमाण मानून, पण खिन्न अंतःकरणाने गांवी गेले. दयानिधी ब्रम्हानंदांनी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी वेंकटापूर सोडले व ते गदगला आले व दोन शिष्यांना बरोबर घेऊन भाड्याचा झटका करून गजेंद्रगडला जाण्यास रात्रीं निघाले. श्री बुवांची जाण्यासारखी परिस्थिति नसतांना देखील, श्रीमहाराजांचें आज्ञापत्र असल्याने, ते देहाची पर्वा न करता निघाले. ब्रम्हानंद बुवांना श्रीसद्गुरू आज्ञेपेक्षा या जगांत जास्त श्रेष्ठ कांहीं दिसत नव्हते हें जसें खरें, तसेंच श्रीमहाराजांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीहि गोष्ट करीत नसत हेंहि तितकेच खरें !( याचे प्रत्यंतर म्हणजे, तोपीनकट्टीच्या भक्ताने श्रीरामरायाच्या मूर्ति आणवून त्यानें श्रीगुरूंस प्रतिष्ठापनेसाठी असंख्य वेळां पाचारण करूनही श्रीमहाराजांची आज्ञा नसल्याने, श्रीगुरू प्रतिष्ठापनेस बिलकूल गेले नाहींत हें होय. श्रीब्रह्मानंदगुरूंच्या समाधि कालानंतर मग ती प्रतिष्ठापना उरकली गेली.)
गदगहून निघून ब्रम्हानंद बुवांनी नरेगलला मुक्काम केला व तेथून पहाटे निघून अरुणोदयापूर्वी दीक्षितांच्या दरवाज्यांत येऊन उभे राहिले. आदले रात्रीं १० वाजेपर्यंत दीक्षितांनी बुवांची वाट पाहिली. ते न आल्यानें खिन्न होऊन, दीक्षित अंथरुणावर पडले. पण त्यांस झोप आली नाहीं. अकस्मात बुवांचे आगमन झालेलें पाहून दीक्षित आश्चर्यचकित झाले. तसेंच त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाहीं. फक्त वाद्यघोषांत श्रीब्रम्हानंदाना गांवात मिरवत आणण्याची इच्छा फलद्रूप झाली नाहीं म्हणून त्यांस विषाद मात्र वाटल्याखेरीज राहिला नाहीं.
प्रिय सज्जन हो ! श्रीगुरूंनी दीक्षितांस चाळविण्या कां दाखविल्या ? खरोखर त्यांच्या मनांतून जावयाचे नव्हतें कां? तें कसें शक्य आहें ? मग अकस्मात दत्त म्हणून उभें राहण्यातील हेतू काय असावा, असें तुम्हांस वाटतें ? असें करण्यांत श्रीगुरूंचा एकमेव हेतू जर कोणता असेल तर तो हाच कीं, त्यांना स्वतःचे अवडंबर माजविलेले खपत नव्हतें व कोणत्याहि गोष्टीचा अवास्तव गाजावाजा करण्याच्या ते विरुद्ध होते.
प्रतिष्ठापनेबाबतचे होमहवन संपवून श्रीब्रम्हानंदांनी स्वतः श्रीरामरायाला अलंकारांनी सजविले. राजोपचारांनी पूजा करून, महानैवेद्य, मंगलारती केली. त्यादिवशीं त्यांच्या आज्ञेप्रमाणें मुक्तद्वार अन्नसंतर्पण झालें.
दुसरे दिवशी सकाळीं स्नानसंध्या उरकून, श्रीरामरायाच्या पायावर तुळशी चढवून, अग्निहोत्र्यांच्या होमशालेतील अग्निनारायणासमोर श्रीबुवांनी १०० रुपये दक्षिणा ठेवली, तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. दीक्षितांच्या मुलांना "दरवर्षी रामनवमी उत्सव भिक्षा मागून कां होईना, पण न चुकतां करा. वर्षातून एकदा तुलसीदलानी व बिल्वदलानी पूजा झालीच पाहिजे. कसल्याही प्रसंगीं धर्म, नीति, श्रीराम यांवरील विश्वास ढळू देऊं नका. यथाशक्ति अन्नदान करा. सदा नामस्मरण करीत जा. म्हणजे श्रीरामराय तुमचें कल्याण करील", असा उपदेश करून ते जाण्यास सिद्ध झाले. तेंव्हा गांवातील अनेकांनी श्रीबुवांना आपापल्या घरीं बोलावून नेवून, पूजा करून त्यांचा अनुग्रह घेतला. यांतच दिवस गेल्यामुळे बुवांचा त्यादिवशी तेथें मुक्काम झाल्यानें लोकांना फार आनंद झाला. दुसरें दिवशीं सर्व भाविकांना आशीर्वाद देऊन, श्रीरामरायाचा उत्सव तुम्हीं सर्वांनी मिळून न चुकतां केला पाहिजे, असें सर्वांस बजावून श्रीब्रम्हानंद बुवा वेंकटपुरास आले.
फोटो स्रोत: फेसबुक
**

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा