गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम

श्रीमहाराज चरित्रात उल्लेख आलेल्या काही व्यक्तींविषयी आपण पाहत आहोत.

पाऊलखुणा - २

१) श्री काळबोवा - (सुमारे इ.स.१८२० ते १९१८)


 मूळचे पंढरपूरचे असणारे श्री विष्णुबुवा नारायण शेंबेकर- मूळ नाव असलेले हे सत्पुरुष. उदासीन वृत्तीचे. सदासर्वकाळ  मुखाने, काळ सर्वांचा बाप आहे असे म्हणत. म्हणूनच कदाचित नाव 'काळबुवा ' असे पडले. यांच्याविषयी एक कथा अशी सांगतात की एका ब्राह्मणाच्या मुलाचे पायावर त्यांनी दगड मारला तेव्हा त्यांचेवर फिर्याद होऊन सोलापूरात विष्णू परशुराम रानडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी यांचेमार्फत खटला दाखल झाला चौकशीअंती ते वेडे ठरले व त्यांना पुण्याच्या येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले ते सदैव "काळ आला रक्त खातो काळाची.....काळ आला आला" असे म्हणत सर्वत्र एखाद्या वेड्यासारखे फिरत असत या आधी पण ते सदैव काळ सर्वांचा बाप आहे असे म्हणत असत म्हणून त्यांना लोक काळबुवा म्हणून ओळखत त्यांनी त्यांच्या चौकशीतही न्यायमूर्तीपुढे "काळ बाप सर्वांना ग्रासतो रांडेचा रक्त पितो दगड खातो ओकतो काळ ! काळ !" अशी बडबड त्यांनी केली म्हणून ते वेडे ठरवून त्यांना पुण्यास येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात ठेवले एके दिवशी काळबुवा श्री.सदाशिव गोवंडे ह्या त्यांच्या शिष्याच्या स्वप्नात आले "मी येरवड्याच्या वेड्यांच्या इस्पितळात आहे" असे सांगितले यावरून काळबुवा हे महान साक्षात्कारी पुरूष होते याची साक्ष पटते पण ते पिशाच्चवृत्तीने सदासर्वदा राहत कारण त्यांना जनउपद्रव टाळायचा होता ते वेड्यांच्या इस्पितळात असताना स्वप्नदृष्टांनानुसार श्री सदाशिव गोवंडे व वामनबुवा (बडोदेकर) वैद्य श्री (गुरूलीलामृत ग्रंथ रचियते) फिरत फिरत या दवाखान्यापाशी आले त्यांनी बुवांचे वरील शब्द काळ आला....काळ आला ऐकले त्यांचे हे बोल वामनरावांना कळले कारण वामनबुवा त्यांची योग्यता जाणून होते हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य आहेत ते वेडे नाहीत याची त्यांना खात्री पटली उलट हे आध्यात्मातील अधिकारी असावेत असा त्यांचा ग्रह झाला वामनबुवांनी त्यांना "तुमचे गुरू कोण ही अशी पिशाच्चवृत्ती का धारण केली" असे विचारताच काळबुवा म्हणाले तुम्हाकडे ब्राह्मण पाठविला होता पण तुम्ही त्याची थट्टा केली त्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आम्ही सेवक आहोत लोकांची उपाधी न व्हावी म्हणून आम्ही अशी पिशाच्चवृत्ती धारण केली आहे."
*
श्रीमहाराजांच्या चरित्रात श्री काळ बोवांचा उल्लेख येतो तो असा:
" हा तर रामदास हनुमान " !  :
           
   श्री काळबोवा नांवाचे एक मोठे सत्पुरुष पुण्यात ओंकारेश्वरला रहात असत. देशपांडे नांवाचे श्रीमहाराजांचे एक शिष्य नुकतेच गोंदवल्याहून पुण्यास परत आले होते. ते श्री  काळबोवांच्या दर्शनास गेले असता श्री काळबोवा गोंदवल्याचे तपशीलवार सर्व वर्णन करून म्हणाले , " श्रीरामरायाच्या डाव्या बाजूच्या खोलीतील पलंगावर केवढे माकड बसले आहे ! " असे बोलून त्यांनी नमस्कार केला व पुढे बोलण्याचे थांबले. श्री काळबोवांचे एक शिष्य पुण्यामध्ये होते. त्यांना देशपांडे यांनी फोटो दाखवला असता ते एकदम म्हणाले , " हा तर रामदास हनुमान ! त्यांना सोडू नका. त्यांत तुमचे कल्याण आहे ! "
श्री काळ बोवांची समाधी ओंकारेश्वर पुणे येथे नदीकाठी आहे.


 

२) हनुमंतराव लंकूडी : हणमंतराव कुलकर्णी  :  


श्रीब्रह्मचैतन्यांचे एक अधिकारी शिष्य : लकुंडी हणमंतराव यांना महाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिला होता.
 ते ब्रह्मचारी होते.  लकुंडी गाव आहे. तिकडे त्यांची समाधी वगैरे आहे. त्यांनी नामाला योगाची जोड दिली. महाराज म्हणाले गुरुच्या प्रेमाची जोड द्यावी. एकसारख्या संथ वेगाने 'श्रीराम जयराम जृयजयराम' असा त्यांचा जप चालू असे. अखंड व एका तालबद्ध लयीत हणमंतरावांचा जप सतत तीनतीन चारचार तासपर्यंत चालायचा. त्यावेळी ते अगदी शांत आणि प्रसन्न मुखानें बसलेले असत. नामाचें साधन माणसाला सिद्ध कसे बनवतें याबद्दल ते सांगत की 'आपण झोपलो तरी आपला श्वास चालतो. प्राणवायु तो चालवतो. नाभीच्या ठिकाणी असणाऱ्या परावाणीशी या वायूचा संबंध असतो. म्हणून श्वासाबरोबर शरीरामधें एक अव्याहत शब्द देखील उत्पन्न होत असतो. या शब्दाला अजपा अथवा सोSहं म्हणतात. या अजपाजपाशी समरस झाले,तादात्म्य पावलें की ध्यानयोग साधतो. गुरुनें दिलेल्या नामाचा अखंड जप केला म्हणजे त्याचें अजपाशी एकरूपत्व होतें. या एकरूप होण्यास मोठी चिकाटी लागते. पण असें नाम चाललें म्हणजे त्यास श्वासांतील नामस्मरण असे म्हणतात.'

श्रीहणमंतराव अंथरुणावर पडले तरी सतत मौनजप चालू असे. ते फक्त डोळे मिटून पडून राहात. त्यांना एकदां एकानें विचारले, 'आपला अनुभव सांगाल कां ?' त्यावर ते म्हणाले,' हल्ली मी ध्यानात शीघ्र व गाढ एकाग्र होत असतो. झोप ही अवस्था जवळ जवळ मला नसतेच. अखंड नामस्मरण मला साधलें आहे. मला श्रीरामदर्शन झाले आहे. एकदां असें दिसून आलें की सर्वत्र आकाशभर मागें पुढें व हृदयांत सर्वत्र तेजोमय अशी सीतारामाची जोडी भरून राहिली आहे. स्वत;चा देहसुद्धा स्वतंत्र अस्थित्वात राहिलेला नसून सर्वत्र आंत व बाहेरही आकाशभरही जिकडे पहावें तिकडे सर्वत्र सीताराम सीताराम या जोडीनें वातावरण भरून गेलें आहे.'

तर ते संध्याकाळी फिरायला जायचे. बी. ए. झाले होते मॕथेमॕटिक्सचे डेक्कन काॕलेज मधून, आणि सरकारी नोकरीत होते. टेक्सस्टाईल इंजीनीयर वैगरे काही होते, तेंव्हा फिरायला जातांना ते काय म्हणाले' अरे मला अखंड नाम साधलाय!' नामाचा विषय निघाला असतांना त्यांनी ते सांगितले. तर ते कसे काय साधले? तर 'तुम्ही रात्री या' म्हणाले. हे रात्री गेले. '  मच्छरदाणी लावलेली आणि त्यांनी साडेआठला मोठ्याने नाम घ्यायला सुरवात केली. तर ते पहाटे चार वाजे पर्यंत नामस्मरण करीत होते. बाकीचे झोपले. तेंव्हा ते काय म्हणाले 'अरे तुम्हाला हे बाहेरचे नाम सहन होत नाही- आंत तर अखंड नाम चालू आहे, ते कसे सहन कराल?' श्रीमहाराजांचे एक जेष्ठ भक्त
वैद्य कासेगावकर यांना अनुग्रह हणमंतराव यांनी दिला होता.

🌿 संदर्भः ती बाबा बेलसरे यांचे  ६-१-१९९४ चे प्रवचन व त्यांचेच साधकांसाठी संतकथा हे पुस्तक
*
हे एक मोठे ज्ञानी व योगी पुरुष होऊन गेले. सन १८७५ च्या सुमारास कर्नाटकांतील लकुंडी या गांवीं यांचा जन्म झाला. हे वयाच्या सातव्या वर्षीं एकदां आपल्या मामाच्या गांवीं गेले असतां, श्रीमहाराज तेथें होते. त्यांनीं याला पाहून हांक मारली व विचारलें, 'बाळ, स्नान झालें का ?' तो म्हणाला, 'नाहीं.' श्रीमहाराजांनीं सांगितलें, 'बरें, मग घरीं जा, स्नान कर, आणि आईजवळून एक नारळ घेऊन माझ्याकडे ये.'
थोड्या वेळानें हा मुलगा आपल्या आईला घेऊन आला. श्रीमहाराजांनीं दोघांनाहि अनुग्रह दिला, आणि आईला सांगितले, 'माय ! हा मुलगा पुढें मोठा योगी होईल.' त्या वेळेला श्रीमहाराजांनीं हणमंताला श्वासावर नाम घेण्यास सांगितलें, आणि त्या वयांत तें त्याला कळलें हें विशेष आहे.

संदर्भ: श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङमय: पृष्ठ क्रमांक ३८२ व ३८३

जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...