रविवार, ५ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
पाऊलखुणा - ७
आज पाहुया,  कर्नाटकातील कुर्तकोटी जिल्हा धारवाड येथील श्रींच्या पादूका, श्रींचे तैलचित्र आणि पंडित महाभागवत कुर्तकोटी यांच्याविषयी.
*
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गदग तालुक्यातील, गदग पासून ११ मैलावर असलेले कुर्तकोटी हे गाव. इथे मार्तंडगौड पाटील ( १८५८- १९०३) हे गावातील मोठे प्रस्थ होऊन गेले. त्यांच्याकडे जवळजवळ १६०० एकर जमिनीची वतनदारी होती. अतिशय सज्जन आणि धार्मिक व्यक्ती.
त्यांच्या पत्नी काशीबाई उर्फ कासक्कम्मा ( १८७६- १९६६). यांचे माहेर, हेब्बळी!  धारवाडपासून पूर्व दिशेला नवलगुंदच्या रस्त्यावर चौदा किमी अंतरावर असलेले हेब्बळी हे गाव. तेथे श्री. वेंकटगौडा नाडगीर हे श्री महाराजांचे शिष्य होते. ते कुर्तकोटी येथे पोलीस पाटील होते. त्यांची कन्या या काशीबाई.

 श्री नाडगीर यांची एक गोष्ट अशी की, १८९४ पासून श्रीमहाराज कर्नाटकात अनेक ठिकाणी जात होते. ते पुर्वी कुर्तकोटीला गेले असतांना एक प्रसंग घडला. तेथील बाजारात कसायाला गाई विकल्या जात होत्या हे श्रींच्या नजरेस पडताच त्यांनी श्री. नाडगीर यांना बोलविले. 'कसायाला गाई देऊ नका' असे श्रींनी नाडगीर यांना सांगितले. श्री. नाडगीर यांनी ते ऐकले. तेव्हापासून त्यांची श्रीमहाराजांचेवर श्रद्धा बसली. गोंदवल्यास श्रींच्या सहवासात ते बरेच दिवस होते.
तर या काशीबाई अतिशय धार्मिक आणि दानशूर.
त्या श्रीमहाराजांच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांना तीन मुले, एक मुलगी. काशीबाईंच्या वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांचे पती मार्तंडगौडा यांचे १९०३ मधे निधन झाले. पाठोपाठ ज्येष्ठ पुत्राचा ही अंत त्यांना पहावा लागला. तेव्हा रायनगौडा, मैलारगौडा, आणि मुलगी कृष्णव्वा यांचे शिक्षण मोठ्या हिमतीने केले. त्यांनी मदतीसाठी म्हणून हेब्बळीहून आपल्या भावाला.. एकनाथगौडा यांना बोलावून घेतले. त्यांच्या घराण्याचे गौरीशंकर मंदिराचां जीर्णोद्धार केला.
 

१९०८ मधे श्रीमहाभागवत यांच्या आमंत्रणनुसार श्री महाराज कुर्तकोटी येथे आले होते तेव्हा काशीबाईंच्या याच

गौरीशंकर मंदिरात चातुर्मासाचे चार महिने राहिले होते. त्यावेळी या मंदिरात श्रींनी स्वहस्ते राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची स्थापना केली होती.तेव्हापासून हे राम मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. 




 

 

येथे काशीबाईंनी श्रीमहाराजांच्या पुढेच एस आर हरपनहल्ली यांच्याकडून महाराजांचे तैलचित्र काढून घेतले. ते भावचित्र पाहून श्रीमहाराज संतुष्ट झाले आणि त्या चित्राचे मुद्रण व वाटप ह्याचे हक्क रायन गौडा यांचेकडे सोपवले. त्यावेळी रायनगौडा लहान होते म्हणून काशीबाईंनी जर्मनीहून रंग मागवून त्या चित्राच्या त्या काळात लोणावळा येथून दहा हजार प्रती मुद्रित केल्या. या सर्व प्रती गोंदवले इथे आणि इतर भक्तांना विनामूल्य वाटल्या. १०० वर्षापर्यंत त्याच्या मूळ प्रती रायनगौडा यांचेकडून वितरीत होत होत्या. त्या चित्राच्या मूळ प्रतीवर एस. आर. हरपनहल्ली व ५-९-०८ अशी नोंद आहे. शिवाय प्रकाशकाचे नाव published by Raoji Martand Patil, Kurtakoti, Dist: Dharwar असे डाव्या बाजूला आणि All rights reserved, Ravivarma press,Karla, Lonavala असे उजवीकडे लिहिले आहे. ( संदर्भ: "कर्नाटकात श्री ब्रम्ह चैतन्य महाराज" , हे मूळ कन्नड  लेखक डॉ. बी. बी. राजपुरोहित, यांचे पुस्तक. मराठी अनुवाद सौ. सविता अलुर)
 

याचवेळी श्री मानप्पा कंप्लिने एक मारुतीची मूर्ती तयार करून महाराजांना अर्पण केली, तिचीही स्थापना त्या

गौरीशंकर मंदिरात करण्यात आली.
मानप्पा कंप्लीनेच महाराजांच्या तीन शिलापादुका तयार करून महाराजांना अर्पण केल्या.

पहिल्या पादुका: या शिळापादुकांवर उभे राहून श्रींची पाद्यपूजा करण्याचा मानस महाभागवत कुर्तकोटी यांनी व्यक्त केला होता. श्रीमहाराजांनी हर्षभराने परवानगी दिली.
१९०९ मधे श्रीमहाराज बिदरहळ्ळीला  नाम जप यज्ञाच्या सांगतेसाठी आले होते. तेथील कार्यक्रम संपवून ते रामनवमी उत्सवासाठी ते हुबळीला आले. हुबळी येथील रामनवमी व दशमीचा पारणा संपवून श्रीमहाराज एकादशीच्या दिवशी हेबळ्ळीला आले.
       कुसुगल स्टेशनवर उतरल्यावर हेब्बळ्ळीकरांनी श्रींचे अपूर्व स्वागत केले. श्रींच्या बरोबर खूप मोठा लवाजमा होता. त्यासाठी श्री. नाडगीर यांनी शंभरावर बैलगाड्या पाठविल्या होत्या. श्रींचा मुक्काम श्री. नाडगीर यांचे वाड्यात होता. त्यादिवशी एकादशी असल्याने श्री. नाडगीर यांचे वाड्यात अहोरात्र नामघोष झाला. दुसरे दिवशी द्वादशीस श्रीमहाराजांना उच्चासनावर बसवून श्री. वेंकनगौडा नाडगीर यांनी आधीच तयार करून आणलेल्या शिलापादुका त्यांच्या पायाखाली ठेवून श्रीमहाराजांची यथाविधी पाद्यपूजा केली. नंतर त्या शिलापादुका विधिपूर्वक वाड्याच्या परसात एका छोट्या राऊळात श्रींच्या उपस्थितीत स्थापन झाल्या. तारीख होती २-४-१९०९ . त्यावेळी श्री. एकनाथगौडा व त्यांच्या पत्नी सौ. कमलाबाई यांनी पुण्याहवाचन केले. त्या दिवशी खूप अन्नदानही झाले. हेब्बळ्ळीचा आनंदमय सोहळा संपवून श्रीमहाराज त्रयोदशीस बेलधडीकडे रवाना झाले.

वेंकनगौडाच्या निधनानंतर त्यांचा मुलगा एकनाथगौडा व नानू राघण्णा हे त्या मंदिराचे व्यवस्थापन बघत होते.
हेब्बळ्ळीचे हे स्थिरपादुकामंदिर श्री. नाडगीर यांचे खाजगी मंदिर होते. पुढे १९८४ साली एप्रिल महिन्यात या मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव झाला. हा महोत्सव चार दिवस चालू होता. या महोत्सवापासून या मंदिराचे विश्वस्त संस्थेत रूपांतर झाले. नाडगीर कुटुंबाने त्यासाठी आपली जागा मंदिरासकट दिली. या मंदिराची किर्ती, उत्कर्ष, व वाढ वेगाने होऊ लागली. या छोट्या राउळाचे रूपांतर एका भव्य व सुंदर वास्तूत झाले आहे. गाभारा, सभामंडप, स्वतंत्र मोठा हाॕल, कोठी, स्वयपाकघर, इतर खोल्या, चोवीस तास पाणी, अशा सुविधा झाल्या आहेत.

दुसऱ्या पादुका:
गोंदवले येथे समाधी मंदिरात स्थापन केलेल्या याच पादुका, पूर्वी १९०९ मधे कुर्तकोटी येथे महाराजांनी आपल्या चरण स्पर्शाने पुनीत केल्या होत्या आणि " प्रतिष्ठापनेचे पुढे पाहू तोपर्यंत पादुकांची पूजा करीत जावी ' असे सांगूनही ठेवले होते. त्याच पादुका नंतर श्रीमहाराजांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पू ब्रम्हानंद बुवा यांनी शके १८३६ मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ( डिसेंबर १९१४) या शुभ दिवशी स्वहस्ते गोंदवले समाधी मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना केली. त्यावेळी भक्तजनांना उद्देशून ते म्हणाले," या पादुकांच्या प्रतिष्ठापनेने श्रीब्रम्हचैतन्यांचा अजर, अमर, असा जन्म झाला आहे असे समजा. सद्गुरू आपल्याला सोडून गेले या भावनेने उदास होऊ नका.आता निर्गुण स्वरूपात राहून, संपूर्ण जग व्यापून, भक्तांच्या हृदयातच ते निरंतर वास करीत आहेत आणि पुढेही करणार आहेत."

तिसऱ्या पादुका : कुर्तकोटी राम मंदिरातच होत्या. त्या पादुका श्रींच्या आज्ञेनुसार नंतर स्थापाव्या असे काशी बाईंनी सांगितले होते. २०११ मधे डॉ. नीलकंठ पाटील यांनी त्याच मंदिरात छोटे देऊळ बांधून त्या पादुकांची स्थापना केली.

पंडित महाभागवत कुर्तकोटी:

श्री मार्तंडगौडा यांच्याच भाऊबंदकीतील एका सधन घराण्यातील श्री मेलगिरीगौडा यांचे अत्यंत बुद्धिमान पुत्र लिंगनगौडा, हेच पुढे 'श्रीमहाभागवत ' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म २०-५- १८७९ साली झाला..
संस्कृत, मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेवरील असामान्य प्रभुत्, उत्कृष्ट वक्तृत्व, सखोल चिंतन, यामुळे त्यांची किर्ती सार्वत्रिक पसरली. यांचे घर कुर्तकोटी मार्तंडगौडा यांचे शेजारीच आहे.
१९१७ सालीं त्यांनीं चतुर्थाश्रम घेतला. पुढे तें करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य झाले. श्रीमहाराजांचा विषय निघाला कीं त्यांना फार गहिंवरून यायचें. इतका तर्कप्रविण पुरूष खरा, पण श्रीमहाराजांच्या प्रेमांत अगदी विरघळून जाई. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी नाशिक येथे पंचवटीत मठ स्थापून तेथे वास्तव्य केले. दिनांक २९/१०/१९६७ ला [आश्विन कृष्ण एकादशी, शके १८८९] वयाच्या ८८ व्या वर्षी ते नाशिक येथे समाधिस्त झाले.

संदर्भ: चैतन्यहृदय ग्रंथ, "कर्नाटकात श्री  ब्रम्ह चैतन्य महाराज" हे कन्नड मूळ लेखक डॉ. बी बी. राजपुरोहित लिखित आणि सौ सविता सुरेश आलुर यांनी मराठी अनुवादित केलेले पुस्तक, आणि फेसबुकच्या काही पोस्ट यावरून साभार!
फोटो: २०१८ मधे स्वतः काढलेले आहेत. त्यात गौरीशंकर मंदिर, आतील राममूर्ती, मारुती, पादुका मंदिर, जवळच असलेले पं.महाभागवत कुर्तकोटी यांचे कुर्तकोटी येथील जन्मस्थान, त्यावर त्यांच्या एका खोलीचे बांधकाम त्यावेळी सुरू होते त्याचे फोटो.
जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या





         
 


           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...