गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
पाऊलखुणा - ६ या लेखात आपण पाहूया, श्रीमहाराजांनी हुबळी मुक्कामात केलेली लीला आणि त्यांचे दयासिंधुत्व.  
**

बिदरहल्ली जपयज्ञाच्या सांगतेला बोलावण्यासाठी ब्रम्हानंद बुवांनी हुबळीचे एक भक्त श्री दत्तोपंत तबीब यांना पाठवले होते. त्याप्रमाणे त्यांनी श्रीमहाराजांना आमंत्रण दिले. श्रींनी सहर्ष संमती दिली खरी पण दर वेळी काही ना काही कारणाने महाराजांचे प्रयाण लांबत गेले. शेवटी एकदाचे श्रीमहाराज निघाले.
या खेपेस त्यांचेबरोबर सुमारें ३०० लोक होते. याखेपेस श्रीमहाराजांची प्रकृति असावी तशी चांगली नव्हती. ते दम्याच्या विकाराने फार अशक्त झाले होते. त्यावेळीं त्यांनी बापूसाहेब साठे नांवाच्या आपल्या एका शिष्यास लिहिलेल्या पत्रांतील उल्लेखावरून वरील विधानाची सत्यता पटतें. पत्रांतील संबंधित मजकूर खालीं लिहिल्याप्रमाणें : ----
     "विशेष लिहिण्याचे कारण कीं, मी ब्रह्मानंदबुवांकडे प्राणाच्या कराराबरोबर आलों आहें. दररोज ताप चार डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाहीं. जिना चढून जाण्याची शक्ति उरली नाही, असें झाले आहे. परंतु भागवतांनी व ब्रह्मानंदबुवानी तेरा कोटी जप केला आहे. या शिवाय दोन ठिकाणीं श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत. एवढ्याकरिता देह गेला तरी हरकत नाही, असें समजून मी आलों आहें. माझ्याबरोबर सुमारें तीनशे लोक आहेत."
                

एवढ्या मोठ्या परिवारासह श्रीमहाराज प्रथम हुबळीस आले. हुबळीत दत्तोपंत तबीब व चिदंबर नायक करी हे भाविक रहात होते. ते ब्रह्मानंद गुरूंचे विशेष भक्त असल्यानें त्यांच्यावर श्रीमहाराजांचा अनुग्रह होऊन, ते त्यांच्या कृपेस पात्र व्हावे, या इच्छेने त्यांनी त्यांना पूर्वीच आपल्याबरोबर गोंदवल्यास नेऊन श्रीमहाराजांच्या पायावर घालून, त्यांच्याकडून त्यांस अनुग्रह देवविला होता. त्याचवेळीं श्रीमहाराजांनी त्यांस हुबळीमध्ये श्रीराम स्थापना करण्याची आज्ञा केली होती.
    अनुग्रह घेऊन परत हुबळीस आल्यानंतर श्रीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्तोपंत तबीबानी, आपल्या घराजवळ मंदीर बांधावे, असा विचार करून तो श्रीब्रम्हानंदांना बोलून दाखविला. तें ऐकून श्रीब्रम्हानंदांनी त्यांना, "दुसरें मंदीर बांधण्याच्या भानगडीत पडू नकोस, तुझ्या घराजवळ असलेल्या ईश्वरमंदिराच्या एका भागांत श्रीरामप्रभूंसाठी एक सिंहासन तयार करवून मूर्ति आणून ठेव. आमचे महाराज हरिहरात भेद मानीत नाहींत, हें पटण्यासाठी बहुशः सगळीकडे त्यांनी श्रीरामाचे देवळांत शिवलिंगाची व शिवमंदिरात श्रीरामाची स्थापना केली आहे. त्याकरिता तूहि तसेंच करावे" असें सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार त्या भाविकाने त्याप्रमाणें सर्व सिद्धता केली. अमृतशीलेच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व श्रीमारुती यांच्या सुंदर मूर्ति आणवून ठेवल्या व श्रीबुवांना कळविले.

याच ठिकाणी श्रीमहाराजांनी एक गंमत केली होती. हि आम्ही तिथे गेलो तेव्हा ऐकलेली माहिती आहे. महाराज हुबळीमध्ये तीन दिवस श्री तबीब यांच्याकडे मुक्कामी राहिले. (श्री तबीब हे २३-१०- १९३५ ते १२-९- १९३९ पर्यंत गोंदवल्याचे पंच होते.) हुबळीमध्ये त्यांचा मोठा वाडा आहे. आधीच उल्लेख आल्याप्रमाणे, श्रीमहाराजांना अंगात खूप ताप होता. भेटायला येणारी माणसे खूप. रात्री ११- साडे अकरापर्यंत भेटीगाठी व्हायच्या. महाराजांना प्रत्येकाशी बोलतांना खूप त्रास होत असे. श्री तबीब यांना ते पाहवले गेले नाही . एकदा रात्री ११ वाजता श्री तबीब यांनी महाराजांना काहीतरी बहाण्याने गुपचूप वरच्या मजल्यावर जिथे त्यांना रूम दिली होती तिथे आराम करण्यासाठी पाठवले. बरोबर सेवेला एक माणूस दिला होता. खाली लोक ताटकळत होते. महाराज वर खोलीत जाऊन जरा पडले खरे, पण त्यांना काही राहवेना. रॉकेलची चिमणी जवळ लावलेली होती. सेवेकऱ्याचे लक्ष नसतांना श्रींनी हळूच तिला फुंकर मारून विझवले आणि सेवेकऱ्याला ती पेटवण्यासाठी काडेपेटी आण म्हणून खाली पिटाळले. 


तो खाली गेल्याबरोबर तिथे जवळ असलेल्या दुसऱ्या चोर जिन्याने खाली येऊन लोकांच्या समस्या निराकरण करू लागले. असे हे श्रींचे दयासिंधुत्व. आपल्याला होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता सर्वांमध्ये 'राम ' पाहणारे महाराज लोकांसाठी धावून गेले.


महाराज ज्या खोलीत राहिले होते त्या खोलीचे फोटो . त्या जिन्याचेही फोटो आहेत.
जिथे श्रींचा कॉट होता त्या ठिकाणी आता श्रींचा, श्रीरामाचा फोटो ठेवला आहे, ज्याची नित्य पूजा होते. 


 ज्या ईश्वरमंदिरात/ शंकराच्या मंदिरात  पु. बुवांनी त्यांना श्रीरामप्रभूसाठी एक सिंहासन तयार करून मूर्ती स्थापण्याची आज्ञा केली होती. त्या मंदिराचा फोटो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...