मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
 

पाऊलखुणा :
श्रीमहाराज स्थापित मंदिरे या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत.

७. तिळवणकर राममंदिर, वाराणसी (इ.स. १८९७-९८)
डी, १०/१५ विश्वनाथ गल्ली, वाराणसी - २२१००१, उत्तरप्रदेश

तिळवणकर राममंदिर, वाराणसी


तिळवणकर राममंदिर, वाराणसी

तिळवणकर राममंदिर, वाराणसी
श्री हरी नारायण तिळवणकर यांनी बांधलेले मंदिर. या मंदिराबद्दलची विशेष माहिती उपलब्ध नाही. कोणास काही माहित असल्यास जरूर कळवावी. श्रींच्या चरित्रात ही याचा उल्लेख नाही. तिळवणकर घराण्याशी संबंधित व्यक्तीला कॉल केला होता. त्यांनाही ही फार काही माहिती नाही. त्यांचे पुतणे , काकू ते मंदिर सांभाळतात असे कळले. परंतु ते ही तिथे जाऊन  येऊन असतात. त्यामुळे बहुतांशी मंदिर बंदच असते. या मंदिराचे फोटो गुगल वर मिळाले आहेत ते देत आहे.
*****
८. पट्टाभीराम राममंदिर, हरदा (इ.स. १९००)
गणेश चौक, पो. हरदा, जि. हरदा - ४६१३३१, मध्यप्रदेश
मध्यप्रदेश मधील नर्मदेकाठी हरदा या गावी श्री काशिनाथभैय्या सावकार यांनी श्रींच्या आज्ञेने राम मंदिर बांधले. नक्षीदार रंगीबेरंगी खांब, आणि एखाद्या वेड्यासारखी बांधणी असणारे हे मंदिर अल्पावधीत श्रींचे विश्रांतीस्थान झाले. इथल्या राम मूर्ती अतिशय सुंदर आहेत. श्रीरामाच्या डाव्या मांडीवर सीतामाई स्थानापन्न आहेत तर मागे तिघी भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, समोर हात जोडून खाली बसलेला मारुतीराया , आणि बाजूला वसिष्ठ मुनी असे हे दुर्मिळ रामपंचायतन अतिशय देखणे आहे.  श्रीमहाराज इथे रामाच्या स्थापनेसाठी स्वतः उपस्थित होते. श्रीमहाराज नैमिषारण्यात जायचे त्या वाटेवर हर्दा गाव असल्याने श्रींचा मुक्काम तिथे असे. प्लेगच्या काळातही ३-४ महिने महाराज इथे होते. एकदा तर दीड वर्ष महाराज इथे वास्तव्यास राहिले होते श्रीमहाराजांच्या अनेक लीला इथे घडल्या. त्या चरित्रात आहेतच. त्यापैकी काही इथं देते.
सध्याचे पुजारी श्री गोडबोले यांची तिसरी पिढी येथे सेवा करत आहे. सर्वप्रथम श्री गोडबोले यांचे आजोबा यांना श्री महाराजांनीच स्वतः हरदा येथे आणून पूजेच्या कामास ठेवले होते. गोडबोले यांचे आजोबा श्रीमहाराजांच्या मागे लागले की मला तुमच्या सोबत घेऊन चला असे असताना श्रीमहाराज त्यांना त्याला घेऊन आले आणि इथेच रामाची सेवा करा असे सांगितले. श्री गोडबोले यांची चौथी पिढी म्हणजे, त्यांचा मुलगा दुबई येथे काम करतो तो सुद्धा लवकरच राम मंदिरात आणि प्रभू रामरायाच्या सेवेमध्ये परत येण्यास उत्सुक आहे.

अगदी अलीकडे म्हणजे १९९४ साली मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना प्रभू रामरायाचे विग्रह जिथे ठेवलेले आहेत त्याच्या मागची भिंत खणत असताना जमिनीच्या पायांमध्ये श्री महाविष्णूची एक मूर्ती प्राप्त झाली त्या मूर्तीमध्ये महाविष्णु यांच्या पायावर लक्ष्मी विराजमान आहेत आणि ते दोघेही गरुडावर बसलेले आहेत अशी ही मूर्ती होती.मात्र खंडित असलेली मूर्ती प्रतिष्ठापना करता येत नाही म्हणून पुनश्च नर्मदेला अर्पण करण्यात आली,तथापि श्री महाराजांसारख्या द्रष्ट्या पुरुषाला या गोष्टीची जाणीव असावी म्हणूनच या मंदिराची निर्मिती करत असताना, साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीच श्री महाराजांनी येथील मूर्ती किंवा विग्रह स्थापन करत असताना श्री महाविष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामराया यांच्या मांडीवर विराजित असलेल्या त्यांच्या पट्टराणीच्या मूर्ती स्थापन केल्या.

  १) हर्दा येथें एक सात्विक भटजी रहात होते. त्यांना महाराज म्हणाले, "जो साडेतीन कोटी जप करील, त्याला रामाच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही." भटजींनी जप सुरूं केला. पण देवदर्शन झालें नाहीं. महाराज दररोज, देवाचे दर्शन म्हणजे काय? प्रेमाचा अनुभव कसा असतो, जप किती, कसा करावा, वगैरेवर विवरण करीत. एक दिवस हे बुवा, हट्टाला पेटले. त्यांची झोप उडाली होती. उन्माद होऊं पहात होता. ते म्हणाले, "मला आज देव दाखवा. नाहींतर मी जेवणार नाहीं. विहिरीत जीव देईन." असें म्हणून ते विहिरीच्या काठावर जाऊन बसले. महाराज तेथें आले. त्यांना सांगून पाहिले. कांही परिणाम होईना. एकच हट्ट - 'देव दाखवा.' शेवटी महाराजांनी पायातील खडावा काढली आणि त्यांच्या डोक्यावर सटासट मारली. हें झाल्यावर भटजी ओरडू लागले, "रामा, धाव रे धाव." महाराज म्हणाले, "माझ्या रामाचे नांव कां घेतोस?" आणखी मारले. भटजींच्या डोळ्यांतून खूप अश्रू आले. आणि ते मोकळे झाले. त्यांना प्रेमाने पोटाशी धरून महाराज म्हणाले, "आज यांच्या डोळ्यातून पाणी आलें नसते, तर हा वेडा झाला असता. उन्माद वायू डोक्यात शिरत होता. माझा नाइलाज झाला." आणि पुढे म्हणाले, "भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले, तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता, नुसताच त्यांचा हट्ट व कष्ट तेवढे पाहतो. परमार्थ आपोआप वाढावा. त्याला ताण देऊन वाढवू नये."

२) हर्दा गावामध्ये प्लेगची साथ फैलावली म्हणून तेथील मंदिराचे विश्वस्त काशिनाथ भैय्या यांच्या शेतामध्ये सर्वांनी झोपड्या बांधल्या आणि सर्व मंडळी व श्री ब्रम्हचैतन्य महाराज तेथे राहायला गेले. बाहेरगावच्या लोकांची श्रींच्या दर्शनास येत होते. रामभाऊ मोने हे ग्रहस्थ जयराम माळी आणि दामू अण्णा यांना घेऊन श्रींच्या दर्शनास आले. शेतामध्ये राहत असताना श्रींनी बरोबर असणाऱ्या उपवर वधू व वरांचे अशी पाच सहा लग्न ठरवली. यामुळे लग्नाचे जेवणे सुरू झाली. एके दिवशी सकाळी स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या महिला श्रीं पाशी आल्या व म्हणाल्या महाराज आज नैवेद्याला भाजी नाही. श्री खोटा आव आणुन म्हणाले "तुम्ही बायका असाच का संसार करता. आता आठ वाजले आणि यावेळी मी भाजी कुठून आणून देऊ." असे म्हणून त्यांनी मळ्यात जाऊन काम करणाऱ्या माळ्याला बोलावले. त्याला विचारता तो म्हणाला "जी महाराज मळ्यात कोणतीही भाजी नाही. वांगी लावली आहेत पण फक्त फुल धरले आहे. फळ लागले नाही. यावर श्री बोलले "असे कसे होईल? फुले आहेत तर तेथे फळे असलीच पाहिजेत. कारण फुलांचेच फळ होते ना." असे बोलून स्वतः मळ्याकडे जाण्यास निघाले व बरोबर जयराम मळी पोते घेऊन गेला. मळ्यात वांग्याच्या रोपा मध्ये येऊन श्री उभे राहिले. एकेका रोपाकडे पाहून श्री म्हणत "अरे ते पहा पानाखाली काय आहे?"जयरामने पाने बाजूला करून बघावे की तेथे त्याला चांगले मोठे वांगे दिसावे. अशा रीतीने अर्ध्या तासात पोते भरून वांगी जमा झाली.जयराम स्वतः माळीच असल्याने हा प्रकार पाहून तो थक्क झाला.

३) १९०७ च्या सुमारास एकदा हरद्यास श्रींचा मुक्काम होता. हर्दा मुक्काम सुमारे दीड वर्ष होता. एकदा एक वैदू तेथे आला, त्याचे जवळ बरीच झाडपाल्याची औषधे होती. श्रींनी काही औषधे घेतली व त्यात सापाचे आकाराची एक मुळी व काळा मणी घेऊन ते श्री भाऊसाहेबांकडे ठेवण्यास दिले. गावात प्लेगची साथ असल्यामुळे भाऊसाहेब सहकुटुंब गावाबाहेरील शेतात झोपडीत राहावयास गेल्यानंतर चि. सुंदराबाईस रात्री झोपल्यावर काहीतरी चावले. ती ऊठली, काय चावले ते कळेना. औषध पाणी चालू होते त्यात श्रीमहाराज गोंदवल्यास गेलेले. इतक्या श्रींनी दिलेल्या मुळीची व मण्याची आठवण झाली. मुळी उगाळून पोटात दिली व तो मणी जेथे चावले होते त्या जागेवर चिकटवला. दुसरे औषध पाणी करण्यासारखे काहीच नव्हते. सर्व मंडळी काळजीत होती थोड्यावेळाने तो मणी चिकटवलेला होता तो सुटला व दुधात टाकल्यावर दूध काळे झाले. हळूहळू तिच्या वेदना कमी होऊन ती चांगली झाली. अशा गोष्टी पावलागणिक होत होत्या पण श्रीनीं त्यांना मुळीच महत्त्व दिले नाही. असले चमत्कार घडल्यावर श्रीनीं त्याबद्दल कधीच काही बोलू नये व गोष्टी निघालीस तर ते राम कृपेने झाले असे म्हणत.

४)  हरदा येथे श्रींचा मुक्काम असताना अधिक मास आला. अधिक मासात एखादे दान संतांना केले तर सहस्र भोजन घालण्याचे पुण्य लागते असे एका भाविकांच्या वाचनात आले. त्यास अनुसरून एका भक्ताने चांदीची एक जाड बुडाची वाटी श्रीमहाराजांना अर्पण केली. श्रीमहाराज म्हणाले मला गोसावड्याला या वाटीचा काय उपयोग? पण त्या भक़्ताने फार आग्रह केला म्हणून त्यांचे मन दुखावले न जावे म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि तेथल्याच कोनाड्यात ठेवून दिली. योगायोग असा की दुसऱ्याच दिवशी श्मश्रु करण्यास नेहमीचा नापित आला. त्याने सवयीप्रमाणे घोंगडीतली पितळी वाटी पाण्यासाठी काढली.  श्रीमहाराज त्याला म्हणाले, 'अरे, आज ती वाटी नको, ती कोनाड्यात आहे ती वाटी घे.' नापिताने ती वाटी घेतली आणि ती आपल्या उजव्या म्हणजे समोर बसलेल्या श्रीमहाराजांच्या डाव्या हाताशी ठेवून आपले काम सुरू केले. त्या बिचाऱ्याला चांदीची वाटी ही एक अपुर्व अलभ्य अशीच गोष्ट होती आणि यांचे मन स्वाभाविकच त्या वस्तूवर गेले. ही गोष्ट सर्वज्ञानी श्रीमहाराजांच्या लक्षात आली. श्मश्रूकर्म आटोपल्यावर आपल्या डाव्याच हाताशी असलेली ती वाटी नापिताला डाव्या हाताने देत ते म्हणाले, 'अरे, घेऊन जा ही तुला.'
 तेथे एक पाठक शास्त्री होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि डाव्या हाताचे दिलेले दान अशास्त्रीय आहे ही गोष्ट त्यांनी श्रींच्या नजरेस आणून दिली तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, 'ही गोष्ट अशास्त्रीय असेल हे मी मान्य करतो, पण ती करण्याचे कारण असे की ती वाटी डाव्या हातातून उजव्या हातात घेण्याच्या अत्यल्प अवधीतसुद्धा देण्याची सुबुद्धी पालटून जाणे शक्य असते, तो संभव टाळण्यासाठी मी असे केले.'
               **
संदर्भ: श्री पट्टाभिराम मंदिर हरदा, स्मरणिका १९९४ मधील श्री ल.ग.मराठे, पुणे यांचा लेख, पान २०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

५) श्रीमहाराज वडिलांचे श्राद्ध करीत. हरद्यास असतांना श्राद्धतिथी आल्याने श्रींनी तेथेच ते केले. त्यावेळी कोणी चांदीचे तांब्याभांडे त्यांना दिले. सर्व आटोपून मंडळी जेवायला बसली असताना एक बैरागी आला. श्रींनी प्रथम त्याला जेवायला घातले. जेवण झाल्यावर 'मला काहीतरी द्या' म्हणून तो श्रींच्या मागे लागला. वस्त्र किंवा पैसा काही तो घेईना. तेव्हा अडचण पडली. इतक्यात श्रीमहाराजांनी सकाळी त्यांना अर्पण केलेला चांदीचा तांब्या हळूच उचलला. तो आपल्या कफनीमध्ये लपविला. इकडे त्या बैराग्याला खुण करून झोपडीपासून जरा पलीकडे नेला. तेथे तो तांब्या त्यांच्या झोळीमध्ये टाकून त्याला लवकर निघून जाण्यास सांगितले. थोड्या वेळाने ही गोष्ट लोकांना कळली. तेव्हां श्री म्हणाले, 'मी तरी काय करू? आपल्याजवळ असलेली वस्तु आज आपल्याला नको असली तरी दुसरा मागत असताना त्याला न देणे हा खरा व्यवहार आहे. पण मला ते पाहावत नाही. हाच माझा दोष आहे. या दोषापायी एका लंगोटीशिवाय माझ्यापाशी काही राहिले नाही. तरी राम दाता असल्यामुळे काही कमी पडत नाही. म्हणून माझ्यापाशी काही नसल्याचे मला वाईट वाटत नाही.'  
संदर्भ: श्री पट्टाभिराम मंदिर हरदा स्मरणिका १९९४ मधील 'श्रीमहाराज हरद्यास असताना घडलेल्या घटना' या मधील राजाभाऊ मनोहर यांच्या लेखातून पान १०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

६) हर्द्याला असताना श्रीमहाराजांनी  पु.श्रीभाऊसाहेब केतकरांचा मुलगा बापूकाका याचे मनूताईशी लग्न ठरवले आणि झाले. मनुताईचे वडील महारोगी होते. श्रीक्रुपेने ते बरे झाले होते. ह्या पार्श्वभुमीवर श्रीबेलसरे यांनी  भाऊसाहेबांना विचारलं "मुलीचे वडील महारोगी, तुमच्या मनात नाही का आलं ?".  पहिल्यांदा त्यांना कळलंच नाही . दोन तीन वेळा विचारल्यानंतर ते गांभीर्याने म्हणाले," पण श्रीमहाराज चुकतील कसे ?" ही निष्ठा. हे ज्ञान समर्पणातून येतं. ते कसं व्यक्त होतं. स: तु सर्वद्ऩ्य सर्वशक्तिसमन्वित: . ते चुकतील कसे. मनुताईंना रोगाचा लवलेश नाही. प्रपंचाचा खेळ हा. श्री भाऊसाहेबांच्या पत्नी सौ. बाई यांचं उदाहरण अप्रतिम.  हरदाला बापुकाकांच लग्न होतं. त्याचवेळी ग्वाल्हेरहुन तार आली की त्यांची मोठी मुलगी गेली. श्रीमहाराज म्हणाले, बाई, तुमच्या मनात येणार नसेल तर बसा". ग्रहमख, देवदेवक वगैरे सुरू होणार होतं. सौ. बाई क्षणभर थांबल्या व श्री. भाऊसाहेबांना म्हणाल्या," श्रीमहाराज काय म्हणतात?". माझ्या मनातला विचार श्रीमहाराजांना कळला.supreme value( सर्वोत्तम मूल्य) श्रीमहाराजांना, मुलीला नाही. अस होण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. म्हणजे श्रीमहाराजांच्या मनाचं प्रतिबिंब त्यांत बरोबर पडेल.
संदर्भ: ~  सत्संग
******
९. सोरटी राममंदिर (उज्जैन) (इ.स. १९०१)
७, अमरसिंह मार्ग, फ्री गंज, उज्जैन, ४५६००१, मध्यप्रदेश
याबद्दलचीही फारशी माहिती उपलब्ध नाही. अमृतघुटीका हा ग्रंथ श्रीमहाराजांनी क्षिप्रा नदीकाठी रचला आहे. फोटो महत्प्रयासाने गुगलवर मिळाले आहेत.

****
जय श्रीराम! 
श्रीमहाराजकन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...