मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

 जय श्रीराम!

आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे

२. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९
वेंकटापूर, पो. सोरटूर, ता. शिरहट्टी, जि. गदग - ५८२१०१, कर्नाटक

🍁वेंकटापूर, एक विशेष स्थान🌹

*हे स्थान धारवाड जिल्ह्यात गदग जवळ आहे. सेवेकरी मंडळीखेरीज अन्य वस्ती नाही. जवळची खेडी देखील तीनचार किलोमीटर अंतरावर आहेत. पण या स्थानाचे माहाम्य अपूर्व आहे.

सोरटूर या छोट्या गांवचे देसाई हे श्री वेंकटेशाचे परमभक्त होते. ते प्रतिवर्षी नेमाने श्रीतिरुपति बालाजीची वारी करीत. त्यांच्या वृद्धापकाळांत त्यांना स्वप्नांत देवाने दर्शन देऊन सांगितले की मी तुझ्याजवळच आलो आहे, तू यापुढे तिरुपतीऐवजी येथेच येत जा. त्याप्रमाणे शोध घेता  एका टेकडीचे पायथ्याशी हे स्थान सापडले. देसाई यानी तेथे एक देवळी बांधून पूजे-अर्चेची व्यवस्था केली. पुढे शिरहट्टीच्या सखूबाई जोगळेकर यांनी तेथे एक खोली बांधली, आणि केवळ आपल्या मुलीसह त्या निर्जन ठिकाणी त्या राहिल्या. त्यांनी भव्य महाद्वार बांधले.

श्री अनंतशास्त्री (श्रीब्रह्मानंदमहाराज) तेथे गेले त्या वेळी ती देवळी व खोलीही जीर्ण झालेली होती. भोवताली रान माजले होते. त्यांनी ती जागा साफ करून तपश्चर्येला प्रारंभ केला. कालांतराने श्रीवेंकटेशाच्या आदेशानुसार ते उत्तरेकडे गुरुशोधार्थ गेले, व श्री गोंदवलेकर महाराजांचे चरणीं स्थिर झाले. इ.स. १९०९ साली श्री गोंदवलेकर महाराज कर्नाटकात गेले असतां ,  सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी गेले, त्यात कै.पू.श्री.तात्यासाहेब केतकर हेही होते. त्यांनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे :
 "त्यावेळी देऊळ अगदी लहान, म्हणजे एक घुमटीच होती. वाकून आत जावे लागे. अंधार होता. श्री देवळात बसले. हातात मेणबत्ती होती, तिचे उजेडाने श्री व्यंकोबाची मूर्ति दाखवीत होते. त्यावेळी मूर्तीवर डोळे, नाक, तोंड वगैरे नुसत्या रेषा होत्या. आज पाहिले तर पूर्वी पाहिलेली हीच मूर्ति होती काय अशी शंका येईल. आज सर्व मूर्ति ठळकपणे दिसत आहे. श्रींचे आज्ञेवरून श्रीब्रह्मानंदमहाराजांनी काही लाख रुपये खर्च करून आजचे टोलेजंग मंदिर बांधले आहे."

 मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार वर सांगितल्याप्रमाणे सखूबाई जोगळेकर यांनी बांधलेले आहे. आत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूस उंच देवड्या आहेत.
उजव्या बाजूच्या कट्ट्यावर श्रीवराहाची मूर्ति आहे. डाव्या बाजूच्या कट्ट्यावर शिवलिंग असून त्याचे खाली तळघर आहे. त्यास प्रवेशद्वार अगदी लहान आहे. आत भिंतीतल्या मोठ्याशा कोनाड्यात श्रीब्रह्मानंद महाराज साधनेला बसत. वरच्या शिवलिंगरूपाने सद्गुरूच तेथे आहेत असे ते म्हणत. तळघराचे फरशीवर तुळशीवृंदावनासारखा चौकोनी कट्टा असून तो बांधण्यापूर्वी त्याचेखाली त्यांनी आपली कुबडी, भागवताची पोथी, वगैरे वस्तु ठेवल्या आहेत असे समजते. या देवड्यांपलीकडील जागेत दोन्ही बाजूस व्हरांडेवजा दालनें आहेत. तेथील दरवाज्यातून मंदिराच्या पटांगणात प्रवेश होतो. समोर थोड्याच अंतरावर सभामंडप, तीर्थमंडप व गाभारा आहे. सभोवार दगडी फरशी केलेली असून तीन बाजूंनी उंच कट्ट्याच्या दगडी ओवऱ्या आहेत.

श्रीवेंकटेशाची मूर्ति एका काहीशा ओबडधोबड शिळेवर रेघांनी कोरल्यासारखी आहे. मूर्ति चतुर्भुज असून लहानमोठे अलंकार, आयुधे, वगैरे स्पष्ट दिसून येतात. ही शिळा जमिनीतून उभी वर आलेली, सुमारे १२५ सें.मी. उंच व २०-२५ सें.मी. जाड आहे. तिच्या डाव्या बाजूस एक लहान शिलाखंड अशाच तऱ्हेचा आहे, तीवर श्रीलक्ष्मी मातेची मूर्ति अर्ध्या उंचीपर्यंत व्यक्त दिसते. हीही हळूहळू दृग्गोचर होत आहे. अशा तऱ्हेने या दोन्ही मूर्ति स्वयंभू आहेत.*

संग्राहक :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , पुणे .
***
वेंकटापुर देवालयाचा जीर्णोद्धार - पु. ब्रम्हानंद बुवा चरित्रात आलेले काही भाग खाली देत आहे.

विजयादशमीच्या सुमुहूर्तावर श्री ब्रम्हानंद बुवांनी  श्रीवेंकटपतीचे गर्भालयाचे बांधकामास सुरुवात केली होती. श्रीबुवांनी येथेंच घोर तप करून श्रीवेंकटेशास प्रसन्न करून घेतले. त्याच्याच कृपाप्रसादाने ब्रम्हानंद बुवांस सद्गुरूंचा लाभ झाला. त्यांस सद्गतीचा मार्ग सापडला. अर्थांत श्रीवेंकटेशाच्या ऋणातून अल्प स्वल्प कां होईना मुक्त व्हावे, या इच्छेने श्रीवेंकटपतीच्या जीर्णोद्धाराकडे त्यांनी स्वतःला संपूर्णपणे वाहून घेतले. शिवाय सदरहू जीर्णोद्धारासंबंधी श्रीमहाराजांची श्रीबुवांस आज्ञा झाली असल्यानें तें महत्कार्य लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे, अशा आंतरिक ओढीने पूज्य बुवांनी त्याकामीं जोरकस खटपट सुरूं केली.    
      या पवित्र क्षेत्राच्या उपपत्तीचा पूर्वेतिहास पूर्वीच येऊन गेला आहे. तसेंच पूर्वी शिरहट्टीची जोगळेकर सखूबाई येथें सेवेस राहिली होती. तिचे मनांत या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचें फार होते. तिनें सुरुवातही केली होती. तिच्या प्रयत्नाने फक्त महाद्वार तयार झाले व काम थांबले. कदाचित पैशांची कमतरता, कदाचित बाईमाणूस असल्याने तिची असहाय्यता, कदाचित पुढे तिचे निर्वाण यांपैकीं कुठल्यातरी कारणानें तें काम थांबले असावे. 'भगवदिच्छा बलीयसी' या न्यायानें श्रीपतीच्या मनांतून ती कामगिरी श्रीब्रह्मानंदगुरूंच्या हातूनच पुरी करून घ्यावयाची असेल.
   
ब्रम्हानंद बुवांच्या मनांतून साध्वी सखूबाईचें महाद्वार उखडून टाकून त्याहिपेक्षा भव्य व सुंदर महाद्वार बांधावे असें होतें. पण भगवंताच्या संकेताने, त्यांनी तो विचार रद्द केला असा एक प्रवाद क्वचित ऐकूं येतो. परंतु एका भक्ताने भक्तिभावाने बांधलेले महाद्वार उखडून टाकण्याचा दुष्ट विचार, सुष्ट श्रीबुवांच्या मनांत कालत्रयीही येणें शक्य नाहीं. श्रीबुवांनी आपण होऊनच पूर्ण विचारांती तें राखले असलें पाहिजे.
 
     प्रथम श्रीब्रम्हानंद बुवांनी श्रीवेंकटपतीचें गर्भालय व त्याच्यापुढील तीर्थमंडप याची दगडी सुंदर इमारत तसल्या डोंगराळ प्रदेशांत महत्प्रयासपूर्वक मजबूत अशी बांधविली. त्यानंतर त्याच्याभोवती पोवळी बांधणेस सुरुवात केली.
श्रीवेंकटेशाच्या गाभाऱ्याच्या मागें असलेल्या कमानीच्या दगडी ओवऱ्याप्रमाणें सभोंवार तसल्याच नमुन्याची पोवळी बांधणेचा विचार कायम करून, प्रथम उजव्या अंगाची पोवळी बांधणेस त्यांनी सुरुवात केली. अर्धे अधिक बांधकाम झाले आणि जोराच्या पावसाने सर्व बांधकाम जमीनदोस्त झाले. वित्तहानी झाली असती तर पूज्य बुवा डगमगले नसते, पण प्राणहानी झाल्यानें त्यांचे मन कच खाऊं लागले. वास्तविक कितीही अडीअडचणी आल्या तरी, हातीं घेतलेले काम हर प्रयत्नाने शेवटास न्यावयाचे हा मोठ्या व्यक्तींचा विशेष असतो. 'न निश्चितार्थाद्विरमन्ति धीरा : ll' असें वचन आहें. ब्रम्हानंद बुवा कच खात आहेत, हें महाराजांच्या कानांवर  जातांच त्यांनी बुवांस "श्रेयांसि बहु विघ्नानि - चांगल्या कामास हजारों विघ्ने येणें साहजिक आहे. तरीं आरंभिलेले जीर्णोद्धाराचे काम अर्धवट सोडणें बरें नव्हे. पुन्हां पोवळी बांधा." असें सांगून पाठविल्यानें बुवा तें कार्य अधिक तत्परतेने करूं लागले.

 ब्रम्हानंद बुवांच्या मनाने पोवळीचे काम बदामीहून तांबडा दगड आणून पुरें करण्याचें होतें. पण तें त्रासाचे आहें या भीतीने, कपत डोंगरांत सांपडणाऱ्या काळ्या दगडांनी ओवऱ्या बांधण्याचा विचार केला. परंतु तो विचार श्रीवेकटपतीस न रुचल्याने बांधकाम ढासळले. एकदां नव्हेतर, दोनदा असें झालें. मग मात्र श्री बुवांनी स्वतः बदामीस जाऊन मोठमोठे दगडी खांब, तुळ्या, माळ्यावरील फरशी सर्व तेथेंच तयार करवून घेऊन ते पाठवू लागले. ते पाठविणे तसें सोपें नव्हते. महिना महिना वाट पाहूनदेखील वाघिणी मिळत नव्हत्या. तशातून हरप्रयत्नाने वाघिणी मिळवून, ते दगड रवाना करीत असत. ते दगड गदगला येत असत. पण तेथून १५ मैलांवर श्रीवेंकटपुरास नेणें, हें फार कष्टाचे काम होते. ते दगडी खांब काय किंवा तुळया काय, सर्वसाधारण चौकोनी असत. ६, ७ हात लांबीचे, एक हात रुंदीचे व एक हात जाडीचे ते दगड असत. त्यांची वाहतूक करून नेणें, अतिशय दुर्धर कार्य होते.
     आसपासच्या कोणत्याही बाजूने वेंकटपुरास जाण्यास वाट नाहीं, अशा डोंगराळ भागात तें असल्याने प्रथम ब्रम्हानंद बुवांना त्यासाठी गदग-कळसापूर-नागावी-बेलधडी ते कबलायतकट्टी असा गाडीमार्ग तयार करावा लागला. त्यालाच हजारों रुपये खर्च आला. वडारी लोक बैल व रेडे जुंपून आपल्या गाड्यातून युक्ति प्रयुक्तीने सावकाशपणे दगड आणीत असत. १५ मैल अंतर तोडून मालाची एक खेप करणेस त्यांना दोन दिवस, तर क्वचितप्रसंगी तीन दिवसही लागत. अशा तऱ्हेने अतिप्रयासाने त्यांनी ती कामगिरी पुरी केली. त्याकडे नजर टाकली असता असल्या अरण्यांत एवढ्या प्रचंड शिला, बुवांनी कशा आणविल्या असतील, या विचारांनी कल्पनातीत आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीं.

     श्रीवेंकटापूरचें देवालय फार भव्य आहें. तें निसर्ग सौन्दर्याने नटलेले आहें. शिखर फार मनोहर आहें. पवळीचा प्रकार फार सुंदर आहे. देवस्थानच्या समोर ज्या कांही पवळ्या आहेत, त्या वेगवेगळ्या भक्त लोकांनी बांधलेल्या आहेंत. उत्तर भागाची पवळी मलीकवाडच्या देशपांड्यांनी बांधविली असून, दक्षिण भागाची पवळी होम्बळचे बसनगौडा यांनी बांधलेली होती. येथें देवस्थानचे पटांगणात एक मोठा अश्वत्थवृक्ष होता. इमारतीचे कामास जेंव्हा सुरुवात झाली तेंव्हा, त्या वृक्षापासून होऊं लागल्यामुळे श्रीब्रह्मानंद गुरूंनी तो तोडविला. त्या अश्वत्थवृक्षाच्या बुंध्यात एक गणपतीची मूर्ति सांपडली होती. ती देवालयात ठेवण्यांत आली असून, अद्यापही ती तेथें आहे. पुढच्या बाजूला गोविंदराजाचे देऊळ आहे. तें पुर्वाभिमुखी आहे. या देवळाजवळच गोशाला व सूपशाला आहे. त्यालगतच उत्सवकाळांत गरज भासल्यास ब्राह्मण भोजनासाठी विस्तृत पटांगण आहें. तेथें मांडव उभारण्याची सोय आहे. श्रीवेंकटेशाचें स्थान खरोखरच इतकें रमणीय आहें कीं, पाहतांक्षणीच प्रत्येक भाविक माणसाचे मनांत भक्तिभाव उचंबळून आल्याशिवाय रहात. तसेंच येथें राहून साधन करावें असेंहि वाटल्याशिवाय राहवत नाहीं ; कारण साधन करणेस हें स्थान रम्य, अतिशय शांत आणि जगाच्या गजबजाटापसून दूर असल्याने अत्यंत पोषक असें आहें.
 देवास पृथक् असें मनोहर शय्यागृह, पुष्करणीचे वाटेवर दीपमाळ असून देवाच्या मागील पोवळीत श्रीदत्तगुरूंच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. वास्तविक जीर्णोद्धाराचे वर्णन येथें संपलें असलें तरीं, त्या देवस्थानांतील स्वयंभू मूर्तीबद्दल यथासांग वर्णन येथें करणें अनुचित होणार नाहीं, या आत्मविश्वासाने तें येथें करीत आहे.
     पूर्वी शेणाच्या व कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली श्रीवेंकटरमणाची ताज्या फुलांचा हार घातलेली, रेखांकित मूर्ति खणतांना मिळाल्याचे वर्णन येऊन गेलेच आहें. त्यावेळीं श्रीलक्ष्मीदेवीची स्वयंभुमूर्ति जवळ नव्हती. गाभाऱ्याचे बांधकामाचेवेळी वेंकटपतीच्या डावेबाजूस जमिनीच्या थोडा वर आलेला एक काळा दगड वाईट दिसतो म्हणून तो फोडून जमीन सारखी करण्याचें ठरविलें होतें. हें श्रीबुवांस समजताच, त्याच दगडातून पुढे श्रीलक्ष्मीदेवीचा उद्भव होणार आहे, हें अंतर्ज्ञानाने ओळखून, श्रीबुवांनी तो दगड फोडू नका, असें निक्षून सांगून तहकूब करविलें होतें. अजाणतेपणाने कितीतरी दिवस, येथील पुजारी भाविक भक्तांचा नारळ त्या दगडावर वाढवून प्रसाद देत असत. ही सांगोवांगी गोष्ट नसून, लेखकाने स्वतः पाहिलेली 'चक्षुर्वैसत्यम ' हकीकत आहे. एकदिवस जेंव्हा हें श्रीबुवांच्या दृष्टोत्पत्तीस आलें, तेंव्हा त्यांनी "लक्ष्मीदेवीच्या डोक्यावर नारळ फोडतां कीं रे ! किती धड्ड तुम्हीं ! यापुढें तसें करूं नका" असें सांगून टाकल्यापासून ती प्रथा बंद पडली. तेंव्हापासून श्रीवेंकटरमणाबरोबर दगडाची-श्रीलक्ष्मीदेवीचीहिपूजा त्यांनी सुरूं करविली. सर्वांस श्रीबुवांच्या उक्तीचे आश्चर्य वाटून जेंव्हा त्यांनी त्या दगडाचे सूक्ष्म निरीक्षण केले तेंव्हा, श्रीलक्ष्मीदेवीची रेखांकित रूपरेषा त्यांच्या नजरेस पडली. तो दगड आतां जमिनीतून बराच वर आला असून, त्यावर श्रीलक्ष्मीदेवीचे सर्व अवयव सुस्पष्ट दिसत आहेत. श्रीवेकटपतीच्या मूर्तीचे सर्व अवयव, त्याचे पाय जे पूर्वी जमिनीलगत होते, ते आतां चांगलें चार बोटें वर आले असल्याने, आतां पायांवर डोकें ठेवून उत्तम प्रकारे दर्शन घेतां येतें. कले-कलेने दररोज वाढणाऱ्या या श्रीवेंकटपतीच्या व लक्ष्मीदेवीच्या मूर्ति कुशल कारागिराने मेहनतपूर्वक तयार केलेल्या मूर्तीपेक्षा नयनमनोहर व सुबक दिसत आहेंत.

 श्रीवेंकटापूरचे बांधकाम भव्य असें आहें. भोवतालची पवळी व ब्रम्हानंद बुवांचे मंदीर अत्यंत प्रेक्षणीय आहें. देवालयाला लागून सभामंडप तयार झालेला आहे. तें सर्व कार्य भक्त मंडळींच्या उदार आश्रयावर पार पडले आहे. श्रीब्रह्मानंद महाराजांच्या हयातीत देवालयाचें व पोवळीचे काम संपूर्णपणे संपलेले होतें. शंकर व वराह या देवळांच्या लगतचा महाद्वाराजवळील सभामंडप, श्रीगुरूंच्या समाधीचे बांधकाम, श्रीमारुतीचे, श्रीदेवीचे व श्रीगोविंदराजाचे अशीं देवळें श्रीबुवांच्या हयातीतच झाली होती. दक्षिणेकडील बाजूस असलेला पांथस्थ लोकांना उतरण्यासाठी बांधलेला मंगलोरी कौलांचा बांगला, पत्र्याचे स्वयंपाकघर, जनावरें बांधण्याचा गोठा वगैरें इमारती जवळजवळ श्रीबुवांचे हयातीतच तयार झाल्या होत्या असें म्हटले तरी चालेल. देवळाचे शिखर मात्र त्यांनी बांधलेले नव्हते. ज्यांनी देऊळ बांधले, त्यांनी शिखर चढवू नये असें श्रीबुवां वरचेवर बोलून दाखवीत असत. मात्र त्यासाठी त्यांनी ६,०००/- रुपयांचा निधी जमवून व्यवस्था करून ठेवली होती. ती रक्कम त्यांनी आपले पुतणे श्री. भीमराव गाडगोळी वकील यांच्या हवाली केली होती. त्याप्रमाणें शिखराचे काम आतां पूर्ण झाले आहे.
              श्रीवेंकटापूर संस्थेच्या व्यवस्थेकरिता श्रीब्रह्मानंदगुरूंनी पंचांची नेमणूक केली होती. त्यांत १) श्रीपादभट्ट गुडगेरी २) शिरहट्टीचे श्री. आडवेप्पा मंगसुळी सावकार व ३) सोरटूरचे श्री. बंडेप्पा कुलकर्णी यांचा समावेश होता. श्रीपादभट्ट हे बालब्रह्मचारी होते. सुमारें ३० वर्षांहून अधिक काळ ते श्रीबुवांचे शिष्य होते. तेच वेंकटापूरचा सर्व कारभार जबाबदारीनें पहात असत. सध्यां ते हयात नाहींत. श्री आडवेप्पा हे ब्रह्मानंदगुरूंविषयी तसेंच श्रीवेंकटापूर क्षेत्रांविषयी अत्यंत श्रद्धा बाळगणारे व तन, मन, धनानें मदत करणारे सद्गृहस्थ होते. तेहि हयात नाहींत. या तिघांच्या संमतीने वेंकटापूर संस्थेचे नित्यनैमित्तिक कार्य व ने आण व्यवस्थित तऱ्हेने चालून हिशोबाचे कामही चोख ठेवले जात असे.
     श्रीवेंकटेश देवलयाकरिता डंबळच्या देसायांनी २०० रु. उत्पन्नाच्या जमिनी कुडलगी मठपतीच्या स्वाधीन केल्या असल्याचा वृत्तांत वाचकांच्या लक्षांत असेलच. श्रीबुवांच्या हयातीतच त्या त्यांचेकडून देवस्थानच्या नांवे परत करून घेण्यांत आल्या. या देवस्थानचे जुन्या मानाने, वार्षिक कायम उत्पन्न सरासरीने ५०० ते ६०० रुपयांपर्यंत होतें. आतां तें वाढलेलेच असेल. श्रीवेंकटपुरास येणाऱ्या भक्तांच्या निमित्ताने होणाऱ्या दैनंदिन अन्नसंतर्पण खर्चासाठी मुळगुंद, शिरहट्टी, सोरतटूर वगैरें गांवचे प्रमुख लोकांनीं तांदूळ, डाळ, वगैरें कच्ची शिधासामुग्री पुरविण्याचा तोंडीं करार केला होता. त्याचें पालन आजतागायत त्या ग्रामस्थांनी चालविले आहे, हें खरोखरच अभिनंदनीय व भूषणावह आहें. नित्य नैमित्तिक उत्सवाकरिता वर्षासनाचीपद्धत आखून दिल्यानें येथील सेवा कार्यास, ती फार अनुकूल आहे. हल्ली पंचमंडळी बदलली आहेत. ती पुढील प्रमाणें :-- १)विरुपाक्ष धोंडे मंगसुळी वकील, मॅनेजिंग ट्रस्टी शिरहट्टी २)रामचंद्र चिदंबर कुलकर्णी, चिकहंदिगोळ ३)तिरको लक्ष्मण वैद्य, सोरटूर.
     येथें दररोज पहाटे काकड आरती होते. दुपारी महाभिषेक, महापूजा, नैवेद्य, आरती असा कार्यक्रम असतो. नैवेद्याच्या वेळी केलेला सर्व स्वयंपाक, भांड्यासह श्रींपुढे मांडण्यात येतो. त्यानंतर भक्त, सेवेकरी, अतिथी अभ्यागतासह भोजनाप्रसादाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी भजन, आरती वगैरें नित्य उपासना चालते. प्रत्येक शुक्रवारी पालखी सेवेचा सोहळा असतो. येथील सोवळे कडक असतें. सायंकाळी भोजन नसतें. श्रीबुवांनी जीर्णोद्धाराचे निमित्ताने विशेष वास्तव्य वेंकटपुरातच ठेवल्याने बेलधडी भजनी पद्धतीप्रमाणे तेथेंही त्यांनी नित्यनेमास सुरुवात करून दिली आहे

पुण्यक्षेत्र वेंकटापूर येथील पूजा आदि सेवेकरिता श्रीबुवांनी कांही भाविक लोकांस तेथें कायम ठेवले. तेथील सेवेकऱ्यांनी विशिष्ट प्रकाराने वागावे म्हणून, त्यांनी त्यांस कांहीं नियम घालून दिले. एवढ्यावरच न थांबता स्वतः तेथें राहून, त्या नियमांबरहुकूम त्यांनी आचरण करून दाखविले. त्या नियमांचा तपशील पाहूंया.
     रोज अरुणोदयापूर्वी उठून प्रातः स्मरण व मुखमार्जनादि संपवून शय्यागृहाजवळ यावे. सुस्वर कंठाने 'उठि उठि' हें पद चौघडा आदि वाद्यांच्या गजरांत म्हणून देवाला जागें करून मग गाभाऱ्याचे दार उघडावे. त्यानंतर देऊळ स्वच्छ झाडून, सारवून, रंगावलीने सुशोभित करावे. नंतर देवाला काकडारती करावी. काकडारती संपताच सगळ्यांनी मिळून 'जयराम सीताराम' म्हणत देवळाभोवती ५ प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर क्रमानें श्रीमारुती, श्रीदेवी, श्रीगोविंदराज, श्रीवराह, श्रीशंकर, श्रीसद्गुरू, श्रीदत्तात्रेय, श्रीगणपती अशा सर्व देवांचे दर्शनास जावें. मुखाने अखंड श्रीराम नामस्मरण करीत जावे. या कार्यक्रमाचेवेळी एकाने पुढें जाऊन प्रत्येक ठिकाणी लोटून, सारवून रांगोळी घालावी व बाकीच्यांनी क्रमानें सर्व देवांची काकडारती करावी.
     इतका कार्यक्रम पार पडल्यानंतर 'राम राम' म्हणत मळ्यांत जाऊन फुलें, तुळशी काढून आणाव्यात. देवाचे सकल पूजासाहित्याची यथासांग सिद्धता करून, अंघोळ करावी. संध्यादि नित्यकर्म पुरें करून देवावरील निर्माल्य, वस्त्रालंकार वगैरें काढून पंचामृतानें व सुगंधी तेलाने स्नपन करून अभिषेक करावा. शुद्ध व स्वच्छ अशा वस्त्राने देव पुसून कोरडा करावा. गंधलेपन करून, वस्त्रालंकार घालून, पुष्पमालानी देवास सजवावे. हा कार्यक्रम माध्यान्ही १२ वाजणेचे आंत संपला पाहिजे. त्यानंतर धूपदीप ओवाळून, शिजविलेले सर्व अन्न हें, अगोदरच देवापुढे सारवून रांगोळी घातलेल्या जागीं ठेवावे आणि महानैवेद्य दाखवावा. त्यानंतर क्रमानें श्रीगणपती, श्रीमारुती, श्रीसद्गुरू यांची आरती करावी. दरम्यानच्या काळांत भोवताली असलेल्या श्रीमारुती, श्रीदेवी वगैरें सर्व देवळांत जाऊन पूजा उरकून यावे. सर्व देवांची पूजा झाल्यानंतर तीर्थप्राशन करावे व आलेल्या अतिथी, अभ्यागतांचे बरोबर भगवंताचे स्मरण करीत, भोजन करावे.
     भोजनोत्तर थोडी विश्रांति घेऊन संध्याकाळी ४ वाजता नित्यनेम आटोपून ५ ते ६ वाजेपर्यंत देवापुढे बसून "राम, राम"म्हणावें. संध्यासमय होतांच हातपाय धुवून भोवतालच्या देवळांत जाऊन आरती करून यावे. त्यानंतर सायंसंध्या करून सगळ्यांनी मिळून देवापुढे बसून भजनीपद्धतीने भजन करावें. भजन सुमारें दोनतासपर्यंत करावें. नंतर देवाला धूप, दीप, नैवेद्य करून मागें सांगितल्याप्रमाणे क्रमानें आरती करावी. पद्धतीप्रमाणे सर्व सेवा, स्तोत्रपाठ म्हणून देवाला शेजारती करून झोपवावे. हें झाल्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन सगळ्यांनी मिळून जेवण करावे. भोजनोत्तर परमार्थासंबंधी चर्चा करून १० वाजलेनंतर भगवंतांचे ध्यान करतां करतां विश्रांति घ्यावी.
ब्रम्हानंद बुवांच्या अखेरच्या वास्तव्यात तर, बहुशः दररोज १५, २० येणारे जाणारे लोक असत. शिवाय नामस्मरणाचे निमित्ताने,  ब्रम्हानंद बुवां लोकांना वरचेवर पाचारण करून जमवीत असत ते वेगळेच. धनुर्मासात तर श्रीबुवांच्या हौसेला पारच रहात नसें. एक महिनाभर दररोज, गिरीयेथील श्रीवेंकटपतीला अरुणोदयापूर्वी अभिषेक, महापूजा, महानैवेद्य होत असे. नैवेद्यास दररोज खिचडी, चिंचेचे सर, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत तसेंच ताजे लोणी असा नेम होता. त्याप्रमाणें तो आजवर चालत आला आहे.
   श्रीशृंगेरी कूडलीमठाचे जगद्गुरू श्रीशंकर भारती स्वामी यांनी या रम्य स्थळीं एका चातुर्मासात चार महिने मुक्काम ठेविला होता. श्रीबुवांनी त्यांची व्यवस्थाहि चोख ठेविली होती. संतोषित होऊन त्यांनी पूज्य बुवांची प्रशंसा केली व नित्यपूजा, नैवेद्य, नंदादीपासाठी कांहीं जमिनी व संस्थानकडून दरसाल कांहीं रोख रक्कम श्रीबुवांना दान दिली.
**
वेंकटापूर येथे घडलेली गमतीची गोष्ट:
श्रीब्रह्मचैतन्यमहाराज यांचा मुक्काम श्रीक्षेत्र वेंकटापूर येथें होता. पू. बुवाही त्यांचेबरोबर होते. एकेदिवशी सायंकाळी दिवेलागणीनंतर मद्रासकडील बाजूचे शंभर असामी वेंकटपुरास आले. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचे दर्शन घेतले, व थोडावेळ वाट पाहिली व श्रीब्रह्मानंदांस "आम्हांस जेवावयास वाढा" म्हणूं लागले. तो दिवस एकादशीचा असल्यानें श्रीबुवांच्या पद्धतीप्रमाणे जेवावायची कांहींच कांहींच व्यवस्था नव्हती. ब्रम्हानंद बुवांनी त्यांस तेथील नियम सांगितला व 'पहाटे ५ वाजता पाहिजे तर पानें मांडतो', म्हणून सांगितले. पण ते लोक कांही ऐकेनात. अखेर त्यांनी ती तक्रार श्रीब्रह्मचैतन्यांकडे नेली. श्रीब्रह्मचैतन्यमहाराजांस, कांही झालें तरीं, ब्रह्मानंदबुवा त्यावेळीं जेऊं घालणें शक्य नाही, याची खात्री असूनदेखील श्रीमहाराजांनी त्या लोकांस, "तुम्हीं जेऊं न घातल्यास आम्हांस तुमचेपुढे बोंबलण्यास सांगितले आहे", असा निरोप ब्रह्मानंदबुवास सांगा म्हणून परत पाठविलें. त्याप्रमाणें त्या लोकांनी बुवांना सांगितले. पूज्य बुवांनी निरोप ऐकला. त्यांतील आशय समजून घेतला व त्या लोकांस, "बरें आहें. अन्नाची सिद्धता होइपर्यंत आपण जरा भजन करूं या", असें म्हणून त्यांना मारूतीचे देवळासमोरील पटांगणांत नेऊन वर्तुळाकर बसविलें. आपण स्वतः मध्यभागीं बसून भजन सांगूं लागले. भजन इतकें रंगले कीं, ती मंडळी देहभान विसरून गेली. रात्रींचे २-२।। वाजून गेले असतील. श्री ब्रम्हानंद बुवांनी भजन थांबविले व "तुम्हांस भूक लागली आहे ना ? चला तर मग, हणमप्पाचे पाठीमागे काय सांपडते तें पहा", असें म्हणाले. मारुतीरायच्या पाठीमागे जाऊन पाहतां, एक लहानसे भाताचे तपेले व एक लहानसे झुणक्याचे पातेले झाकून ठेवलेले आढळले. भजन चालूं असतांना कोणी आलें गेलें नव्हतें. मग हीं दोन भांडी येथें आली कशी ?, याचे त्या मंडळींस आश्चर्य वाटलें. त्याचबरोबर एवढेंसे अन्न इतक्या मंडळीस पोटभर कसें होणार याची धास्तीहि त्या मंडळींस वाटली. पण तसें कोणी बोलून मात्र,  दाखविलें नाहीं. श्रीबुवांनी पत्रावळी मांडावयास लावल्या व सर्वांस भोजन घातलें.
     सर्वांची आकंठतृप्ती होऊन, शिवाय अन्न शिल्लक राहिलेले जेंव्हा त्या मंडळींनी पाहिले तेंव्हा तर ते सर्वजण अवाक् झाले. ब्रम्हानंद बुवांनी त्यांस विश्रांति घेण्यास सांगितले आणि वर "द्वादशीचा प्रसाद सकाळीं बरोबर ७ वाजता आहे.
तत्पूर्वी स्नान करून हजर रहा", असें बुवांनी बजावण्यास कमी केलें नाहीं.
***
पू. बाबा बेलसरे म्हणतात वेंकटापुर येथील वेंकटेशाची मूर्ती म्हणजे ही मूर्ती म्हणजे श्रीब्रह्मानंद महाराजांच्या तपश्चर्येचे फळ आहे. तेथे परमात्मा जागृत आहे. तो मागितलेले लवकर देतो. श्रीमहाराजांनी वेंकटापूरबद्दल असे सांगितले आहे की एकवेळ काशीला जायचे राहिले तरी चालेल पण एकदा तरी वेंकटापूरला जाऊन यावे.

जय श्रीराम!
फोटो स्रोत - गुगल

बुधवार, २६ मार्च, २०२५

 जय श्रीराम! 

आजपासून आपण अभ्यासुया 

#श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे

१. विठ्ठलमंदिर, नरगुंद १९०९

दंडापूर मेन रोड, नरगुंद, जि. गदग - ५८२२०७, कर्नाटक


जय श्रीराम! 

श्रीब्रम्हानंद बुवांनी अद्भूत प्रमाणावर एकंदर तीन नामजपयज्ञ केले.त्यांतील नरगुंदचा जपयज्ञ पहिला. 

श्रीब्रम्हानंद बुवां नेहमी खेडोपाडीं देखील संचार करीत असतं.असेच हिंडत हिंडत ते एकदां नरगुंद गावी गेले.या गावी श्रीब्रम्हानंद बुवांचा भक्तपरिवार मोठा होता.त्यामुळे नरगुंद गांवी त्यांची फेरी वरचेवर होत असे.नरगुंद हे तालुक्यांतील पेट्याचे गांव.संस्थानी अमदानींत हे राजधानीचे गांव होते.तेथील राजे ब्राम्हण होते.त्यांची धर्मावर श्रध्दा होती.जेथील राजा ब्राह्मणा तेथिल राजधानीचे गांवी बहुसंख्य ब्राह्मणवस्ति असावयाचीच.त्या नियमाने येथेही ब्राह्मणवस्ति भरपूर होती.आणि या सर्वाची श्रीब्रम्हानंद बुवांवर फार भक्ति होती.

आपले गांवी श्रीब्रम्हानंद बुवां आल्याची बातमी पसरतांच तेथील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनास जमले.एके दिवशी दुपारचे जेवण चालले असतां श्रीब्रम्हानंद बुवांनी सहज बोलता बोलता,  "तेरा कोटी जप सुरु करावा म्हणतो.त्यासाठी तुम्ही सर्वजण बेलधडीला येणार ना ?"असे म्हटले. तें ऐकून सर्वांनी एकजुटीने " घरदार सोडून ४/६ महिने बेलधडीस येण्यास आम्हाला कसे शक्य आहे,यासाठी जप येथेच केल्यास ठीक होईल. आम्ही सर्वजण आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांत भाग घेण्यास व इतर कामे करण्यास तयार आहो." असे विनयपूर्वक सुचविले.

ते ऐकून,श्रीब्रम्हानंद बुवां हसले व "पाहू या.श्रीसद्गुरु नाथांना विचारु या.त्यांची परवानगी मिळाल्यास तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे येथेंच करु या " असे म्हटले.

त्यावेळी तात्काळ श्रींच्या अनुज्ञैसाठी येथून पत्र लिहावे असा आग्रह धरला. श्रीरामाविषयींच्या त्या ग्रामस्थांच्या मनांतील आस्तिकभाव पाहून पु. बुवा संतुष्ट झाले व त्याच दिवशी तेरा कोटी जपयज्ञास श्रीमहाराजांची अनुज्ञा मिळविण्याविषयी आपल्या नेहमीच्या शिरस्त्यास अनुसरुन श्रीब्रम्हानंद बुवांनी पंढरपुरचे श्रींचे परमभक्त अप्पासाहेब भडगांवकर यांस पत्र लिहिले.

श्रीमहाराजांकडून ब्रह्मानंद बुवांना आलेले आज्ञापत्र अत्यंत मार्मिक,हृदयंगम व बोधप्रद आहे.

ते पु. बुवांच्या कानडी चरित्रकारांना उपलब्ध झाले असल्यानें व त्यांनी ते छापले असल्याने त्यांच्या अनुज्ञेने ते जसेंच्या तसेंच वाचकवृंदांस सादर करीत आहे.

"श्रीरामचंद्रपरायण ब्रह्मानंद योगी यांस.

ब्रह्मचैतन्यबुवा मु.!! इंदूर यांचा अनेक आशीर्वाद.पत्र लिहिणेचे कारण आपला तेरा कोटी जपाबद्दलचा मजकूर अप्पासाहेब यांचे मार्फत कळला.तरी लिहिल्याप्रमाणे हरीपूर येथे करण्यास सुरवात करावी.जरुर जरुर मी काशीहून परत हर्दे मुक्कामी येऊन येथे रामनवमीला श्रीरामाची स्थापना केली व आतां नैमीष्यारण्यांत जाण्याचा विचार आहे. आपल्यास कळवावे.आणि ज्या ठिकाणी तेरा कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावां. कृष्णातीर बरे आहे.परंतु आतांचे दिवस घोर कलीचे असल्यामुळे चांगले सत्कर्म कोणतेही शेवटास जाऊं न देण्याबद्दल कलीचा दुराग्रह आहे.तरी त्याचा प्रयत्न न चालण्याचा उपाय तपोबल पाहिजे. शब्दज्ञान,व जगाचे महत्व व निंदा ही दोन्ही उपयोगाची नाहीत.तर तशाचा सहवास करु नये.नास्तिक कुतर्काशीं वाद न करता अहंभाव रहित व्यवहाराचा संबंध न ठेवता,अक्रोध,निर्लोभ,चित्तांत वृत्ति लीन करुन, उपासनारुप जग पहावे.अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्य आहे.मी आपणास सांगावे असे नाही.पण सुचनार्थ लिहिले आहे.दुसरे असे.मन चित्तवृत्ति बाह्य नामस्मरण झाल्यावाचून साधनात आळस करुं नये तसेच स्त्रियांचे मुखावलोकन,त्यांचे शब्द,स्पर्श, भाषण,ममत्व,अगत्य,इ.कधी सत्य मानू नये व त्याचे वारे कधी लागूं देऊ नये.असे १३ कोटी होईतोपर्यंत करावे.माझी विनंति आहे.कारण काळ फार भयंकर आहे.तर माझ्या चालीने चालू नका.माझे वेळ काळ कारण वेगळे आहे.तथापि मी अन्य अवस्थीच राहणार अथवा देह सोडणार.कारण आता पुढे धर्म,दया,शांति,भक्ति,नीति कोठे आढळत नाही.सबब सांगून वागा.राम राम अखंड जागा.हा आशिर्वाद."

या प्रमाणे आलेले सद्गुरुनाथाचे आज्ञापत्र पाहून ब्रह्मानंद गुरुंचा आनंद ओसडू लागला.सद्गुरुनाथांच्या आज्ञापत्राप्रमाणे नदी तटाकीं जपयज्ञ करावयाचे श्रीगुरुंच्या मनांत येऊ लागले.नरगुंदला नदी तटाक नसल्याने दुसरे कार्यस्थळ पाहण्याची त्यांस पाळी आली.परंतु नरगुंद येथील भक्त जनांचा नामयज्ञाबाबतचा परम भाव उत्साह पाहून व श्रीमहाराजांच्या "ज्या ठिकाणी १३ कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा " या आदेशाचा आधार घेऊन श्रीगुरुंनी नरगुंदांतच जपयज्ञ करणेचा निश्चय केला.

नरगुंदगावी एक भव्य असे श्री विठ्ठल मंदिर आहे. या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार ब्रम्हानंद बुवांनी केला. तेथेच सगळ्या भाविकांच्या मनांतून जपयज्ञ व्हावा असे असल्याने श्रीशालिवाहन शके १९२३ प्लवनाम संवत्सराच्या आषाढ शुध्द अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीरामनाम सप्ताहाचा आरंभ करण्यांत आला.आसपासच्या चहूंकडील भाविकांना आमंत्रणे गेली. भाविकांच्या मेळ्यांत सप्ताह थाटाने चालूं राहिला.श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पादुकांना पंचामृताभिषेक करुन पूजा थाटाने करुन आरती करण्यांत आली.त्या नंतर तेरा कोटी जपाचा संकल्प करण्यांत येऊन सद्गुरु नाथांपुढे श्रीफल ठेवण्यांत आले व त्याच शुभमुहूर्तावर श्रींच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मानंद गुरुंनी स्वतः प्रथम जपास प्रारंभ केला.

जपास बसणाऱ्या अनुग्रहित लोकांना जपाचा नियम समजावून सांगण्यासाठी व परगांवहून जपासाठी येऊन राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून सुरवातीस एकदोन महिने श्रीगुरुंनी आपला मुक्काम तेथेंच ठेवला. त्यामुळे श्रीक्षेत्र बेलधडी येथील राममंदिरात दररोज काकड आरती,माध्यान्ह नैवेद्य, आरती,सायंभजन आरति अष्टावधान वगैरे प्रकारांनी भगवंताची उपासना ज्या क्रमाने चालते त्याच प्रमाणे चांगल्या रीतीने सुरवात झाली.

या विठ्ठलमंदिरांत रोज शेकड्याने स्त्री,पुरुष,मुले जपाला बसत असत.त्या सगळ्या ंच्या जेवणाची व्यवस्था श्रीगुरुच करीत होते.उत्तरोत्तर जपासाठी येणाऱ्यां लोकांची संख्या वाढू लागली.त्यामुळे अवघ्या ६/७ महिन्यांतच तेरा कोटीची जपसंख्या पुरी होत आली. जपसंख्या आटोक्यांत येताच ब्रह्मानंद गुरुंनीजपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी श्रींना विनंतीपूर्वक बोलावून आणण्यासाठी नरगुंदच्या दोघा भाविकांची रवानगी केली व आपण महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ केला.


श्रीमहाराजांस आमंत्रण देण्यास गेलेले भाविक ज्यावेळी गोंदवल्यास गेले त्यावेळी श्रीमहाराज भाविकांच्या मेळाव्यांत विराजमान झालेले त्यांस दिसले. श्रीमहाराजांच्या चरणकमलाला भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार करुन त्यांनी श्रीगुरुंची विज्ञापना त्यांस कळविली . ते ऐकून श्रीमहाराजांनी आपल्यास झालेला संतोष व्यक्त केला व निघण्यासंबधीची आपली संमती दर्शविली. आज निघूं या,उद्या निघूं अशी चाल ढकल करीत पुढे सुमारे दोन महिन्यांनी श्रींनी शेकडो शिष्य परिवारा समवेत तेथून प्रयाण केले.

जपयज्ञाच्या सांगतामहोत्सवास श्रीं येणार असल्याची वार्ता यावेळपावेंतों कर्नाटका च्या कानाकोपऱ्यात पसरली होती.त्यामुळे महिनाभर आधीपासून सुमारे हजार एक लोक जमून राहिले होते.श्री आल्यावर तर जनसमूह ८/१० हजारपर्यंत फुगला असावा.

श्रीमहाराज गोंदवल्याहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर,विजापूर यामार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तेथे आगाऊ तयार ठेवण्यात बैलगाडींतुन यावगलला गेले

नंतर बैलगाडीतूनच प्रवास करीत नरगुंदला जाऊन पोचलें.भाविक भक्तांनी उत्साहपूर्वक सर्व गांव तोरणांनी आधींच सजविले होते.रस्त्यावरील धुरळा उडूं नये म्हणून गावांतील रस्त्यावर पाणी शिंपडून ठेवले होते.व त्यावर रांगोळी घालून रस्ते सुशोभित केले होते, श्रींना समारंभांने वाजत गाजत आणण्यासाठी भाविक भक्त भजनीमेळ्यासह गांवाबाहेर एक मैलावर सामोर जाऊन मार्गप्रतिक्षा करत थांबले होते.व इतर लोक गांवापासून तेथपर्यंत दुतर्फा पसरले होते.

 श्रींचे लांबून दर्शन होतांच सर्वांनी एककंठाने जयघोष करण्यास सुरवात केली व त्यांस मिरवीत गावांत उभारलेल्या भाव्य मंडपात आणले.मंडपात मध्यभागी उंच सिंहासन तयार करण्यांत आले होते.त्यावर श्री विराजमान झाले. दर्शनोत्सुक जनसमुहाने अहमहमिकेने श्रींचे दर्शन घेतले.त्या दिवसापिसून श्रीरामरायाच्या घोषाला ना अंत ना पार अशी स्थिती झाली.भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठूं लागल्या.सर्व ज्ञातीच्या लोकांना देखील मुक्तद्वार अन्नसंतर्पण चालू होते.श्रींच्या कडून अनुग्रह घेण्यासाठी तसेच प्रापंचिक दुःखे सांगून त्यावर इलाज विचारण्याची नुसती रीघ लागून राहिली.

 अशा प्रकारे त्या महोत्सवानंदात दोन दिवस गेले नाही तोच गावातील पाण्याच्या तलावांतील पिण्याच्या पाण्याचा सांठा कोठेच नव्हता.अशा स्थितीत ८/१० हजार लोकांना पाणी पुरवठा कसा करावयाचा. अखेर श्रीगुरुंपुढे त्यांनी आपली चिंता व्यक्त करताच ,"  मूर्तिमंत श्री हजर असतांना व श्रीरामनाम अहर्निश चालू असतांना, खुळ्यांनो कसली चिंता करता.पाण्याची कमतरता कशी भासेल". या शब्दांत त्यांचे समाधान श्रीगुरुंनी केले.आकाशाकडे कृपाकटाक्षाने पाहिले.व रोजच्या प्रमाणे अतिउत्साहाने श्रींची पूजा आरती करुन भोजनाची पंगत बसवली.संपूर्ण जेवणावळ आटोपली.आणि चमत्कार असा झाला की,आकाशांत इतके काळे ढग जमले की आकाशच दिसेना.अकस्मात भयंकर पावसास सुरवात झाली.क्षणार्घात पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले.तळे विहरी भरुन वाहू लागल्या.

 वास्तविक तो माघ महिना होता.पावसाचा यत्किंचित् संभव नव्हता आणि पावसाचे चिन्ह दिसत नसतांना श्रीगुरुंच्या महिम्याने पाण्याची समृद्धि झाली.हे केवळ श्रींचे ठायी असलेल्या ब्रह्मानंद गुरुंच्या दृढ विश्वासाचे फळ.या अद्भूत घटनेने तेथील लोकांचा उत्साह शतगुणित झाला असल्यास नवल ते काय ?

श्रींचा तेथे ८ दिवस मुक्काम होता.सर्वांची जेवणाची व्यवस्था होती.तेथे न जेवणाऱ्यांसाठी तांदूळ,डाळ वगैरे सामान देणाऱ्याचीही व्यवस्था असल्याने सर्वजण संतृप्त झाले होते.समारंभाच्या समाप्तीचे दिवशी ब्रह्मानंद गुरुंनी श्रींचे हस्ते जमलेल्या शेकडो विद्वानांना एकेक महावस्त्र व एकेक मोहोर दक्षिणा देववून त्यांची संभावना केली.व हजारो गोरगरीबांना अन्न,वस्त्र व द्रव्य देववून त्यांना आनंदित केले.अनेक लोकांना बीजमंत्राचा उपदेश श्रींचेकडून देवविला.


जय श्रीराम! 

फोटो स्रोत: गुगल

 जय श्रीराम! 

#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य

गोंदवल्याचे भूतपूर्व पंच मंडळी!

श्री गोपाळराव कर्वे 

श्री कर्वे १९५६ साली पंच झाले. हे कर्तृत्ववान आणि हुशार होते. शेतीची , बांधकामाची पूर्ण माहिती ते वाचन करून मिळवित आणि त्याचा उपयोग करून घेत. संस्थानाचे हिताविरुद्ध एखादी गोष्ट असल्यास ते तसे स्पष्ट सांगत. 

श्री रामकृष्ण दामले यांच्या अंत्यसमयी श्री गोपाळराव कर्वे हजर होते.

त्यांचेविषयी खालील दोन गोष्टी वाचनात आल्या. 

         सन १९६१ साली जुलै मध्ये पुण्याला पानशेतचा पूर आला. त्यामध्ये पुष्कळ कुटूंबे निराधार झाली. त्यात काही श्रीमहाराजांची अनुग्रहीत मंडळी होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी श्रीमहाराज मुद्दाम पुण्यास आले होते. [वाणी अवतारात] त्यावेळी श्रीगोंदवले देवस्थानचे ट्रस्टी श्री कर्वे श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराज त्यांना म्हणालेः

         गोपाळराव, ही जी पुण्यावर आपत्ती आली आहे ती दैवी आपत्ती आहे. त्यात कोठल्याही मानवाचा दोष अगर अपराध नाही. अशा दैवी आपत्तीने जी कुटूंबे निराधार व निराश्रित झाली असतील त्यांना टाहो फोडून सांगा की त्या सर्वांनी गोंदवल्यास येऊन राहावे. त्या सर्वांची आश्रयाची वा अन्नवस्त्रांची सोय जरुर करण्यात येईल. श्रीगोंदवल्यास जाण्यास द्रव्य सहाय्यही देण्यात येईल. त्यांनी फक्त श्रीगोंदवल्यास काय जाडेभरडे अन्न मिळेल त्यावर उपजिवीका करुन घ्यावी. व गोंदवल्यास राहिलेल्या काळात त्यांनी होईल तितके नामस्मरण करावे. हे सर्व तूम्ही अगदी माझा निरोप म्हणून टाहो फोडून सांगा. अशा आपत्ती मध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय?*

         जेवढे लोक जातील ती माहिती मला कळवावी म्हणजे त्यांची व्यवस्था नीट लागते की नाही याची जिम्मेदारी माझ्यावर राहील. 

               *********

संदर्भः श्री बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

       १९६३ हें श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या सुवर्णमहोत्सवाचे वर्ष. त्यानिमित्तानें श्रीमहाराजांच्या समाधीमंदिरावरील शिखरावर सुवर्णकलशाची स्थापना करावी व त्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती करावी अशा विचारानें श्री. तात्यासाहेबांनीं व देवस्थानच्या पंचमंडळींनीं श्री. हुच्चराव व श्री. अंतरकर यांचेवर तें काम सोपविलें. त्यांनी तें श्री. अण्णासाहेब गाडगीळ यांचे सल्ल्यानें व मदतीनें कारागीर आणून प्रथम नादुरुस्त असलेलें शिखर दुरुस्त करून घेतलें. 

       ता. ४-११-१९६३ रोंजीं शिखरावर [मूळ तांब्याच्या कलशाला सोन्याचें पाणी दिलेल्या] सुवर्णकलशाची स्थापना केली. आदले रात्रीं तो प्रथम थोरले श्रीरामासमोर सभामंडपांत ठेवून मग तो समारंभपूर्वक समाधिमंदिरात आणला गेला. तेथें त्यावर दुधाचा रुद्राभिषेक केला गेला व दुसरे दिवशीं संस्थानाचे दुसरे ट्रस्टी  श्री. रा. गोपाळराव कर्वे यांचे हस्तें [ते शेवटपर्यंत पहाडावर चढून गेले होते.] त्याची प्रत्यक्ष स्थापना झाली. आदले दिवसापासून स्थापनेचें वृत्त गांवांत पसरलें असल्यामुळें हा स्थापनेचा सोहळा पाहण्यास जवळ जवळ सबंध गाव लोटलें होतें. *श्री. रा. तात्यासाहेबांना कार्यक्रमाकरता मुद्दाम बोलाविले होतें. प्रथम ते नाही म्हणत होते. पण नंतर कबुल झाले व आले.*

          मंदिराभोवती ब्रह्मवृंदांचा आणि भाविकांचा मेळा मोठ्या प्रमाणात होता. मंत्र घोष, वाद्ये, तुतारी वगैरेंच्या नादाने असमंत दुमदुमून गेले होते. त्याचवेळी श्रीमहाराजांचा सुखसंवाद [वाणीरुप अवतारात] सुरु होता. येथे असलेले स्त्री पुरुष तल्लीनतेने ती अमृतवाणी ऐकत होते. *बाहेरील आवाज वाढल्यामुळे महाराज थोडे थांबले. त्यांनी विचारले, 'बाहेर काय चालू आहे?' कोणीतरी सांगितले 'सुवर्ण कलश स्थापनेचा सोहळा सुरू आहे'. ते ऐकल्यावर महाराज शांतपणे म्हणाले, 'मंदिराला सोन्याच्या कळसापेक्षा उपासनेचा कळस असावा.'*

               *******

संदर्भः १] *मालाडचे थोर सत्पुरुष श्री रामचंद्र चिंतामणि तथा तात्यासाहेब केतकर यांचे जीवनचरित्र* हे डा वा रा अंतरकर यांनी लिहिलेले पुस्तक. २] धन्य ही गोंदवले नगरी ! हे वासुदेव पुंडलीक कुळकर्णी यांचे पुस्तक.

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

 जय श्रीराम! 

#बहुमंदिरेस्थापियेली 

आपण पाहत आहोत श्रीमहाराजस्थपित मंदिरे. 

३४.  कुक्कुडवाड राममंदिर १९१२-१३

मु.पो. कुक्कुडवाड, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र

कुक्कुडवाड हे गोंदवल्यापासून २४ किमी वर असलेले श्रीमहाराजांच्या आज्जी राधाबाई यांचे गाव. तिथे श्रीमहाराज स्थापित राम मंदिर आहे.या मंदिराचा बहुधा १०० वर्षांनी जीर्णोद्धार झाला असावा.. या संदर्भात इथे फेसबुकवरच एक वेगळी कथा/ पोस्ट वाचनात आली. 

https://www.facebook.com/share/p/163m9CuBv8/

फोटो सोर्स - गुगल


 





 

 

 

 

 

 

 

 ३५.  शनिमंदिर, गोंदवले १९१३

गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांनी १९११ साली धाकटे राम मंदिराजवळ श्रीदत्तात्रेयाची स्थापना केली. त्यानंतर श्री शनिदेवाची स्थापना झाली..

एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून श्रींनी अतिशय सुबक, दरारा दाखवणारी, डोळ्यात तेज असणारी, काळयाकभिन्न रंगाची, वज्रासनात बसलेली श्री शनिदेवाची मूर्ती स्थापन केली.

श्रींच्या हृदयात सतत रामरायाचे चिंतन चालू असल्याने सर्व काळ व वेळ शुभच होता. त्यांच्या जीवनात ग्रहांना स्थान नव्हते. श्रीमहाराज नेहमी म्हणायचे की ग्रहांचा अधिकार फक्त शरीरापुरताच असतो. 

एकदा पंढरपूरचा एक ज्योतिषी श्रींच्या दर्शनाला गोंदवल्यास आला. श्रींची कुंडली पाहून त्यांनी श्रींना सांगितले, " महाराज आपल्याला साडेसाती आहे, काहीतरी करायला पाहिजे." त्यावर श्री म्हणाले," असेना का ती बिचारी, ती आपल्या मार्गाने जाईल!" त्यावर ज्योतिषी म्हणाला," महाराज, या भागात शनिदेवाचे कुठेही मंदिर नाही, आपण जर बांधले तर इतर अनेक लोकांची सोय होईल." 

तेव्हा श्री म्हणाले," तुम्ही म्हणता ते खरे आहे, मंदिर बांधायला माझी काहीच हरकत नाही, शनी हा देवांचा फौजदार आहे. शनीच्या दर्शनास इतर कोठे जाण्यापेक्षा आपण इथेच शनीचे मंदिर बांधावे." ग्रामस्थांना खूप आनंद झाला. दत्तमंदिराला लागून असलेली जागा श्रींनी शनिच्या मंदिराकरता ठरवली. अशा रीतीने श्रींची साडेसाती चालू असताना १९१३ साली शनीचे मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर जवळजवळ ९० वर्षांनी म्हणजे २००२ मध्ये शनी मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.

संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २००२


जय श्रीराम!

रविवार, ९ मार्च, २०२५

 जय श्रीराम!
#बहुमंदिरेस्थापियेली

आपण बघत आहोत श्री महाराज स्थापित मंदिरे 


३१. अंबामातामंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र


श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. १९५९ च्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 ३२. कुरवली (सिद्धेश्वर) राममंदिर १९१२  कुरोली
मु.पो. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५२७, महाराष्ट्र

प. पू. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यनामावलीतील महत्वाचे पण तसे अपरीचित नाव म्हणजे श्री संत दामोदर महाराज.आज त्यांची पुण्यतिथी. श्री दामोदर महाराजांनी  २४ वर्ष गोंदवल्यात प. पू. श्री. महाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. श्रीमहाराज म्हणायचें कीं जो  नियमित नामस्मरण करील त्यांची अंगलट गुरुसारखी होईल. श्री दामोदरबुवा कुरवलीकर हे सुद्धा अगदी श्रीमहाराजांसारखेच दिसायचें. बेळगांव निवासी पू काणेमहाराज यांना अनुग्रह दामोदरबुआंनीच दिला होता.  श्री महाराजांच्याच आज्ञेवरून त्यांनी गोमेवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली येथे प्रभू श्री रामरायांची स्थापना केली.  पू. श्री गोंदावलेकर महाराजांसोबत काशी अयोध्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात काकडआरती नंतरच्या भजनाचे प्रमुख कुरवलीकर बुवाच असायचे.
















३३. दहिवडी राममंदिर १९१२
मु.पो. दहिवडी, ता. माण, जि. सातारा, ४१५५०३, महाराष्ट्र









 

 

 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम

 जय श्रीराम!
#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य

गोंदवले संस्थानाचे पंच!

श्री दत्तात्रय विनायक खाडिलकर
यांचा पंच पदाचा कार्यकाळ ३०/६/१९३७ ते २८/१२/१९५४)

दत्तात्रय उर्फ दादासाहेब खाडिलकर हे उत्साही पंच होते. ते हसतमुख, उंच व गौरवर्ण होते. व्यक्तिमत्व प्रसन्न होते. ते उत्सवाची पंगतीची व्यवस्था बघत. वाढण्याकरता मंडळी कमी वाटल्यास खोल्यांतून बोलावून आणायचे. त्यांचे काळात रेशनमुळे धान्य मिळण्यास अडचणी, प्लेगमुळे उत्सवास बंदी, कलेक्टरच्या परवानग्या अश्या अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले.
**
 

 

 

 

 

 

*****

काशिनाथ नरहर (सरदार) कुलकर्णी, गिरवीकर
हे सुद्धा गोंदवल्याचे पंच होते. त्यांचा कार्यकाळ २१/१२/१९३९ ते १/४/१९६०


श्री. यशवंत नरहर कुलकर्णी उर्फ येसुकाका यांनी आपल्या बारा वर्षाच्या नातवाला पंढरपूरला शिक्षणासाठी ठेवले होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मनावर झाला आणि तो परागंदा झाला. येसूकाका श्रीमहाराजांचेकडे गेले व त्यांनी सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीमहाराज म्हणाले, 'काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचा नातू लवकरच सापडेल.' नातू माहुली येथे सापडला. येसुकाकांनी नातवाला लगेच श्रीमहाराजांकडे आणले. मुलाला पाहताच श्रीमहाराज म्हणाले, 'माझा नातू आला; पुरण पोळी करा.'

श्रीमहाराजांना नमस्कार करताच त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून त्याला उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या व अनुग्रह दिला, आणि येसुकाकांकडे वळून ते म्हणाले, 'त्याचेकडे तुमचे घरातील कारभाराची किल्ली द्या; आता तो कोठे जाणार नाही.'
हा पळून जाणारा नातू म्हणजे कै. काशीनाथ नरहर कुलकर्णी उर्फ सरदार गिरवीकर. हे पुढे गोंदवले संस्थानचे पंच होते.
🌿 ~ चैतन्य - स्मरण १९८८ मधील  पंढरीनाथ काशिनाथ कुलकर्णी यांच्या लेखातून.
**

  जय श्रीराम!

 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

' बहू मंदिरे स्थापियेली ' या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत.

२८. कऱ्हाड राममंदिर १९११
सोमवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा, ४१५११०, महाराष्ट्र
पुजारी : वासुनाना देव

श्रीमहाराज कर्‍हाडला वासुनाना देव व बापुराव चिवटे यांच्या विनंतीवरुन राममंदिराच्या स्थापनेसाठी गेले. त्यावेळी संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांचा मुक्काम तेथे होता. रामाच्या स्थापनेचा मुहूर्त चागला नव्हता असे शंकराचार्यांच्या ज्योतिषांनी श्रींना सांगितले, त्यावर श्री म्हणाले, " असे कसे होईल, मी अज्ञ, पण राम असे होऊ देणार नाही, तरी आपण पुन्हा पंचांग बघावे" त्यावर जोतिषाने पंचांग पाहून गणित मांडले, तेव्हा तो स्वत:च चकित  झाले. शुभ मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त निघाला. श्रींनी स्वामींच्या सर्व परिवारास राममंदिरात भोजनास बोलावले. स्वामींच्या विनंतीवरुन श्रींनी स्वामीणी हत्तीचे दान देण्याचा संकल्प सोडला व म्हणाले, " कोणालाही सांगून हत्ती आणावा, माझ्याकडे किंमत तयार आहे,; तोपर्यंत मठाला एक कालवड देतो, तिचा स्वीकार करावा."

कऱ्हाड येथील श्रींच्या चरित्रात अजून एक आलेला उल्लेख म्हणजे,
कऱ्हाडला आबाजीपंत नावाचे एक गृहस्थ होते.रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली,.त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीचं होत्या,सर्व मुलींची लग्न झाली,फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्यामुळे तीचे लग्न होऊ शकले नाही.पण आबांनी लवकर पेंशन घेतले, उरलेला काळ भगवंताच्या उपासनेत घालवण्याचा निश्चय केला,त्यांनी हा निश्चय केला खरा पण उपासना म्हणजे काय,ती  कशी करायची असते,भगवंताचा व आपला संबन्ध कशा प्रकारचा आहे,आत्मनिवेदन कसे करावे,इ प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत,व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाई,म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय या विवंचनेमध्ये  आबा होते.

मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत,असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले,त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि" परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय?" असा प्रश्न विचारला,रामदासी बुवांनी लगेच उत्तर दिले,"ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो,गोंदवल्यास श्री महाराजांकडे तुम्ही जा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचे खरे समाधान  होईल " असे सांगून ते लगेच निघून गेले.आबांनी श्री महाराजांचे नाव ऐकलेलं होतच,एक दोन दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले,ते आले तेव्हा महाराज शेतातून काम करून येऊन,हात पाय मातीने भरलेले असे, स्नानाची वाट पहात उभे होते.
श्री महाराजाना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम अतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दुसऱ्या दिवसा पासून श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले.मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत,त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत,पहिल्या दिवशी*भगवंत म्हणजे कायआपला आणि त्याचा संबंध काय आहे,या विषयावर निरूपण झाले,आबांना वाटले आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल,श्री महाराजांनी निरुपणात जे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या,परंतु गोंदवल्यास ते अगदी नवीन असल्यामुळे त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईनात.श्री महाराजांना सांगणे तर दुरच राहीले,दुसरे दिवशी निरुपणाला प्रारंभ करतानाच श्री महाराज बोलले" काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्या मनामध्ये नंतर काही शंका आल्या त्यांचीच आज उत्तरे देऊ." असे बोलून त्यांनी आबांची एकेक शंका मांडली.आणि त्याची उत्तरे दिली. लागोपाठ चार दिवस हा प्रकार चालला,आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या,त्या सर्व समाधानकारक
रीतीने सुटल्या.पाचवे दिवशी ,भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो,आणि ती भक्ती नामाने कशी साधते,याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले.सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती,इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले,आणि सद्गगतीत होऊन त्यांनी श्री महाराजाना साष्टांग नमस्कार घातला.श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले,आणि शांत केले,तेव्हा आबा म्हणाले"महाराज!मी आज धन्य झालो.माझ्या सर्व शंका फिटल्या.पण माझी एक इच्छा आहे.माझ्या अंतकाळी असेच आपले दर्शन होईल काय? "श्री महाराजांनी तात्काळ उत्तर दिले"आबा,तुम्हाला दर्शन होईल इतकेच न्हवे ,तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल!"
 काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी श्री महाराजांनी
त्यांना विचारले,"आबा,भगवंताच्या नामात आहात ना? "आबा बोलले," होय महाराज पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते ती अजून लहान आहे,.ती अजून लहान आहे,तिचे लग्न कसे होईल असे वाटते"यावर श्री महाराज म्हणाले" मी तिला दत्तक घेतो आजपासून ती माझी मुलगी आहे असं समजा,आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या."त्या प्रमाणे  विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले.इतपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणा मध्ये जाऊ लागला.आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कऱ्हाड ला परत जाण्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज म्हणाले," आताच काय घाई आहे?पुढे बघू."त्यावर त्यांनी "जाऊ का?" म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कऱ्हाडला गेले.
श्री महाराजांचे लक्षात ठेवण्या सारखे एक मोठे वैशिष्ट्य असे होते की कोणी त्याना प्रश्न विचारल्यानंतर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडून येई तेच त्यांचे खरे सांगणे,किंवा खरे मत किंवा खरी आज्ञा असे.त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखउन पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगत.आबांनी त्यावेळी कऱ्हाड ला परत जाणे श्री महाराजांच्या
मनात नव्हते .परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला.आबा कऱ्हाडला परत गेले,आणि सहा दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला.औषध पाणी व्यवस्थित चालू होते तरी पंधरा दिवसाच्या अवधीत ते इतके थकले कि त्यांना अंथरुणावरुन उठवेना,पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते,'श्री महाराजाना पत्र लिहून कळवावे का? 'असे विचारता ते नको म्हणाले,म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता न्हवती, एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली, आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे हे सर्वांना समजले,स्वतः त्यांनाही तसे वाटले. श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यास होते,सकाळी नऊ साडे नऊ ची वेळ,काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले .सर्व मंडळी" जय जय श्रीराम जय जय श्रीराम"असा घोष करून नाचत होती,इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पहात होते,इतक्यात ते ज्या खोलीमधे निजले होते,तिच्या पाठी मागच्या बाजूस*"जय जय श्रीराम"*असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वाना ऐकू येऊ लागला,तेव्हा श्री महाराज
खरोखरच आले असे वाटून खोलीमधली इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली,आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती ,परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले,खाडदिशी उठून उभे राहिले,आणि"अरे,बघा! श्री महाराज स्वतः आले आहेत , सर्वानी त्यांचे दर्शन घ्या,! " असे बोलून व नमस्कार करून पुन्हा निजले,पाच मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले"महाराज!आपण मला दर्शन दिले, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या,मी आनंदाने निरोप घेतो" हे शब्द बोलून त्रयोदक्षाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला
श्री महाराजांच्या कानावर हा सगळा प्रकार गेला तेव्हा ते अत्यन्त कौतुकाने म्हणाले,"आबा चांगले अधिकारी! रामाने त्यांना उत्तम गती दिली,भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते,असे लोक फार थोडे, त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही, सर्वानी त्याचे अनुकरण करावे"
आबांच्याकडुन दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई तिचे लग्न श्री महाराजांनी वासुदेव मार्डीकर नावाच्या गृहस्थाशी सालंकृत कन्यादान करून स्वतः करून दिले
**
२९. दत्तमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

धाकट्या राममंदिराजवळच श्री दत्त मंदिर आहे.या एकमुखी दत्तमंदिराची स्थापना वैशाख शुद्ध पंचमी शके १८३३ (१७ मे १९११) रोजी झाली. दत्तात्रेयाची मूर्ती लहान असली तरी रेखीव आहे.श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. #१९५९च्या_पुण्यतिथी_उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. १९९३ मध्ये या देवळाचा जीर्णोद्धार करताना समोर मोठा सभामंडप बांधण्यात आला.

**
 

 

 

 


 


 

 

 

 

 

 

 


 

 

 

३०. नृसिंहमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांचे कुलदैवत नृसिंह. त्यामुळे नृसिंह दैवताची स्थापना ही साधारण त्याच वर्षी म्हणजे १९११ मध्ये झाली.
**
 

 

 

 

 

 

जय श्रीराम

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...