बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

जय श्रीराम! .

आपण पाहत आहोत,
या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे.
१३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२
हनुमान गढ, नर्मदा घाट, मंडलेश्वर, जि. खरगोन - ४५१२२१, मध्य प्रदेश
 
श्री भीमराव मोडक हे लहानपणापासून श्रींच्या सानिध्यात होते. आज्जी व ते गोंदवल्यास जात असत. त्यांचे मूळ घर उज्जैनकडे आहे.
श्री मोडक यांची एक इच्छा होती की नर्मदाकीनारी राम मंदिर बांधून पुढील आयुष्य कारणी लावावे. यासाठी ते वारंवार श्रींना विनवित असत. पण काळाप्रमाणे तेव्हा योग नव्हता. पुढे वाणीरूप अवतारात ही ते श्रींची वरचेवर भेट घेत. परंतु श्रींनी त्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन मंदिर बांधण्यापासून परावृत्त होण्यास सुचविले. परंतु श्री मोडक यांनी पूर्वीप्रमाणे आग्रह धरल्याने मग होकार दिला पण हे सुचविले की " मंदिर लहान असावे व उपासना त्याहीपेक्षा मोठी असावी. याप्रमाणे आशीर्वाद घेऊन अन् श्रींच्या हस्ते रुपया व नारळ घेऊन श्री मोडक मंदिर उभारणीच्या कार्यास लागले.
 
इंदूरहून ते सहपरिवार म्हणजे मातोश्री रमाबाई आणि पत्नी जानकीबाई यासह खेडीघाटला आले. त्यावेळी इंग्रजी राज्य होते. हा भाग होळकर स्टेट यांच्याकडे होता. खेडीघाटला एका ठिकाणी लहान जागा घेऊन तेथे राहू लागले. तेथे बरोबर असलेली श्रींची तस्वीर ( जी एका लाकडी पेटीत बसवली होती) ठेवून नित्यनैमित्तिक उपासना, जप, आरती, भजन करण्यास सुरुवात केली. निर्वाह ते गावातून भिक्षा मागून करत असत. त्यावेळी श्री मोडक यांचे वय ३८/३९ होते.
याच दरम्यान त्यांची भेट एका पारशी गृहस्थ श्री फिरोज भरुचा यांच्याशी झाली. तो एक नाविन्यपूर्ण किस्सा आहे.
खेडीघाटला योग्य ती जागा पसंत न पडल्याने श्री मोडक बडवाह वरून मंडलेश्वरी आले. हल्ली जिथे राममंदिर आहे ती जागा त्यांना योग्य वाटली. तेथे एक झोपडी व कुंपण घातले. जवळ वड, पिंपळ असे वृक्ष, पुढे मारुतीचे छोटे पत्रे घातलेले एक देऊळ होते. इतर सर्व जागा सरकारी होती. त्या जागेचा वापर गावकरी उकिरडा म्हणून करत. त्या झोपडीच्या जागेचे मालक श्री गोखले होते. ते संन्यास घेऊन उज्जैनीस राहिले होते. मोडक यांनी तिथे जाऊन ती जागा मंदिर बांधण्यासाठी हवी म्हणून मागणी केली. शुभकार्य म्हणून श्री गोखले यांनी ती जागा स्वखुषीने विनामूल्य दिली. शेजारची सरकारी जागा ही होळकर स्टेट सरकारने ९९ वर्षासाठी अल्प १ रु सालिना लिजवर दिली. पुढे भरूचा यांनी निर्माण कार्य सेवाभाव ठेऊन १९२५ साली सुरू केले आणि १९३२ साली पूर्ण केले.
१९३२ साली श्री राम नवमीच्या दिवशी श्रीराम स्थापना वाणीरूप महाराज श्री तात्यासाहेब केतकर यांच्या हस्ते झाली. अमाप गर्दी झाली होती. १० दिवस भजन पूजन, अन्नसत्र, वैदिकवृंदांच्या निर्देशानुसार झाले होते. 
श्री भीमराव मोडक यांच्या नंतर त्यांच्या पत्नी श्रीमती जानकीबाई यांनी मंदिरसेवा नेटाने पार पाडली. त्यानंतर त्यांची मुले मोडक बंधू या नावाखाली व्यवस्था बघतात.
भीमराव मोडक यांनी 'आनंदीआनंद रामदासी ' हे नाव घेतले होते.
***
श्री फिरोज भरुचा यांचे चिरंजीव डॉ. एच. पी. भरूचा यांनी त्या संबंधित आपल्या वडिलांची हकीकत या लेखात दिली आहे.
माझे वडील आणि आई हे दोघेही श्री गोंदवलेकर महाराजांचे निस्सीम भक्त होते हे मी लहानपणापासून पाहत होतो. वडील रोज पहाटे चार वाजता उठायचे स्नान उरकून सोवळेवजा धोतर नेसून महाराजांच्या तसबिरीपुढे माळेवर नियमाने जप करत. हा जप पूजा वगैरे साडे आठ पर्यन्त चाले. नंतर ते उद्योगासाठी बाहेर पडत. आजारी असले तरी त्यात कधी खंड पडला नाही. रात्री आम्हाला घेऊन तसबिरीपुढे रामाचे भजन चाले.
वास्तविक आमचे घराणे पारशी असे असूनही माझे वडील व आई महाराजांचे भक्त कसे झाले हे मी त्यांच्या तोंडून खूप वेळ ऐकले आहे, ती हकीकत अशी.....
 
वडील इंदूरजवळ महू येथे राहत. ते कंत्राटदार म्हणून व्यवसाय करत. एकदा खांडवा जवळ रस्ताचे काम करत असताना त्यांचा एक तंत्रिकाशी परिचय झाला, त्याचे नाव आता मला स्मरत नाही. ते त्याला वारंवार भेटत.असे एक दिवशी भेटयास गेले असता त्याने सांगितले
"आज संध्याकाळी तू महूला परत न जाता आजची रात्र इथेच रहा, कारण आज रात्री मी हा देह सोडणार आहे." त्यावर वडील म्हणाले,
"आपण ब्राम्हण मी पडलो पारशी, तर आपल्याला देहत्यागाच्या वेळी मी जवळ असलेला चालेल का?" तंत्रिकाने उत्तर दिले,
"त्याला काही हरकत नाही, आता तू जमिनीवर मांडी घालून बस आणि माझे डोके मांडीवर घे" वडिलांनी तसे केले व त्यास मधून मधून घोट घोट पाणी देत राहिले. तिकडे त्याच्या आश्रमाबाहेर 
 
काही ब्राम्हण मृत्युंजयाचा जप करीत बसले होते. मध्यरात्री नंतर वडिलांनी म्हणले,"मी आतापर्यंत आपल्यापाशी काही मागितले नाही" त्यावर तांत्रिक म्हणाला,"ते असू दे! मी एवढेच सांगतो,की आजपासून चाळीस दिवसात तुला एक फार मोठा लाभ होणार आहे ! या नंतर माझा देह गतप्राण झाल्यावर तू तो नर्मदामैय्या ला अर्पण कर." असे त्यानी सांगितले, काही वेळाने त्याचे प्राण गेल्यावर त्याच्या सांगण्यानुसार देह नर्मदेत सोडण्यात आला व वडील घरी आले.
नित्यक्रम म्हणून वडील पारशी रिवाजाप्रमाणे रोज सकाळी प्रार्थना व उपासना करीत, ती चालू होती. तंत्रिकाने सांगितल्या नुसार आपल्याला काय महान लाभ होणार आहे याची काही अटकळ बांधता येईना. अखेर चाळिसाव्या दिवशी ते नित्योपासना करत असताना,
"तू ओंकारेशवर स्टेशनला जा" असे शब्द कानी पडले, हा प्रकार त्यांनी माझ्या आईला सांगितला. काय करावे अश्या बुचकळ्यात पडलेले ते पाहून आई म्हणाली,
"कुणास ठाऊक कदाचित तिथे द्रव्य किंवा सुवर्ण मिळण्याचा योग् असेल! तेव्हा जावे बरे."
अखेर ते ओंकारेशवर स्टेशनात गेले, पुढे कुठे जावयाचे काय करायचे असा विचार करीत आहेत, तेवढयात एक माणूस त्यांच्याकडे येऊन त्यांच्या नावाची चौकशी करून त्यांना "मज बरोबर चलावे" असे म्हणाला आणि त्यांना घेऊन एका घरात शिरला. शेजारचया खोलीमध्ये एक गृहस्थ एका तसबिरी समोर बसून जप वगैरे करत होते. थोडया वेळाने ते गृहस्थ बाहेर आले, ( त्यांचे नाव भीमराव मोडक, व ती तसबीर श्री. गोंदवलेकर महाराजांची होती ) त्यांनी महाराजांबद्दल माहिती सांगितली, तेव्हा तंत्रिकाने सांगितल्या प्रमाणे त्यांना चाळिसाव्या दिवशी गुरुप्राप्तीचा लाभ झाला, आणि तेव्हापासून अखेर पर्यन्त त्यांनी श्री महाराजांचीच उपासना केली.
महूस आम्ही रहात होतो त्या घरात भुताटकी होती असे आई सांगे. आम्ही तेथे राहण्यास जाण्याच्या पूर्वी केव्हातरी तेथे खून झाला होता आणि तेव्हा पासून त्रास असे. आई सांगे, रात्री आमचे बेड गदागदा हलत, झोपताना खाली ठेवलेल्या सपाता नाहीश्या होत किंवा दुसऱ्या खोलीत सापडत. भीमराव यांनी माझ्या वडिलांना सुचवले, की महाराजांवर अढळ श्रद्धा ठेवावी आणि ब्राम्हणा करवी विशिष्ट होमहवन करून घ्यावे. तसे केल्यावर तो त्रास कायमचा बंद झाला.
 
पुढे वडिलांना प्रेरणा झाली, की एक राम मंदिर उभारावे. ते नर्मदातीरी मंडलेशवर येथे बांधण्याचे ठरवले. जवळ पैसे नाही पण मंदिर बांधण्याच्या प्रेरणेचा जोर एवढा होता की कामाला प्रारंभ तर केला. आई सांगे की अनेकदा असे होई की, सिमेंट वगैरे काही मोठे देणे असले आणि जवळ पैसे नसले तर पोस्टमनने पत्र म्हणून दिलेल्या एखाद्या साध्या पाकिटात हजार रुपये निघावेत. पाकिटात एक चिठ्ठी असे व त्यावर रामजी कडून एवढेच लिहलेले असायचे. साध्या पाकिटातून असले तरी हे पैसे पोस्टमन किंवा अन्य कुणाच्या लक्षात कसे येत नसत हे एक आश्चर्य होते. हा प्रकार अनेकवेळा घडला एवढे खरे. वडिलांचे खाते स्टेट बँक (त्या वेळची इम्पीरियल) बँकेच्या इंदूर शाखेत होते. एकदा मंदिराच्या खर्चसाठी पैसे उभे करणे जरूर झाले तेव्हा बँकेकडून कर्ज मिळाले तर पाहावे, म्हणून ते मॅनेजरला भेटायला गेले. यांच्या खात्यावर किती शिल्लक आहे ते बघून सांगा असे मॅनेजरने म्हणल्यावर कारकूनाने खाते वही दाखवली व म्हणले,
"कालच रामजी नावाच्या इसमाने एक हजार रुपये या खात्यात भरले आहेत"
कर्जाची गरज आता टळली, पुढे मंदिर पुरे झाले त्यावेळी काही रकमेची गरज उदभवली आमच्या आईने कशासाठी तरी कपाट उघडले तो त्यातून टपकन एक पाकीट पडले, त्यात पाहता जेवढी रक्कम हवी होती, तेवढीच नेमकी निघाली,आणि आत एक चिठ्ठी निघाली, की हे पैसे शेटजींना ( माझ्या वडिलांना सगळे शेटजी म्हणून ओळखत ) द्यावी.  
अश्या रीतीने मंदिराचे काम पूर्ण झाले. प्राणप्रतिष्ठा समारंभ ठरला. मंदिरालगत एका खोलीत धान्य तूप वगैरे साठी एक कोठी बांधली. सात दिवस मुक्तरित्या अन्नदान करायचे ठरले. वडील स्वतः कोठीचे कुलूप काढून शिधा काढून देत, पण नवलाची गोष्ट अशी की दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघडून पाहावे तर कोठी पूर्ववत भरलेली. असे हे तीन दिवस पाहिल्यावर वडिलांनी आईला हे आश्चर्यकारक प्रकार सांगितला व कोणास बोलू नको हे पण बजावले. पण तिला न राहवून तिने महाराजांचा चमत्कार कुणाला तरी सांगितला आणि चवथ्या दिवस पासून चमत्कार बंद झाला व कोठी थोडी थोडी रिकामी होऊ लागली,अखेरच्या दिवशी भांडार पूर्ण रिकामे झाले.
वडिलांना गालावर एक गळू झाले होते, त्याच्या दुखणे खुपणे असा काही त्रास नव्हता पण ते काढायचा प्रयत्न करू नये अशी अंतप्रेरणा महाराजांनी दिली होती. तरी ती वडिलांनी पाळली नाही व ऑपरेशन केले. पण त्यानंतर परत ते सर्व उदभवले तो कर्क रोग होता. महाराजांची आज्ञा पाळली नाही, म्हणून वडिलांना फार पश्चाताप झाला, व आजार वाढून त्यांचे डिसेंम्बर १९५३ रोजी निधन झाले. गुरुआज्ञा भंग केली नसती तर ही वेळ आली नसती हे ते वारंवार बोलून दाखवत.
 
 





 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
****
जय श्रीराम!
संकलित

Photo

  जय श्रीराम!
आपण पाहत आहोत श्रीमहाराजांच्या निर्याणानंतर स्थापिलेली काही मंदिरे

 १२. इंदूर राममंदिर १९३१
१४, शनी गल्ली, इंदूर - ४५२००४, मध्य प्रदेश

श्रीमहाराजांनी आयुष्यातला बराच काळ इंदोरमध्ये घालवला.  त्यावेळी त्यांचे वय तिशीच्या आसपास होते. यातला काही काळ ते दिवाण पळशीकर , नंतर जीजीबाई इनामदार, आणि नंतर त्यांचे ज्येष्ठ शिष्य भैय्यासाहेब मोडक यांच्याकड़े ते राहत असत. त्यांच्याकडे राहत असताना एक मूर्तिकार आला होता. तेव्हा त्याच्याकडून श्रींनी श्रीरामाच्या मूर्ती स्वतः विकत घेऊन भैयासाहेबांना एक रुपया देऊन मंदिर बांधण्यास सांगितले होते. पण ते हे काम करू शकले नाहीत. भय्यासाहेबांनी १९२० मधे देह ठेवला. तत्पूर्वी त्यांनी श्री विष्णुबुवा कुंभोजकर यांना तो रुपया देऊन राम मूर्ती स्थापन करण्यास सांगितले.
 

 

 

Photo

 मूर्ती कापडात गुंडाळून इंदूरमध्ये श्री जोशी यांच्याकडे देण्यात आल्या. विष्णुबुवांनी भिक्षा वर्गणी स्वरूपात पैसे जमवायला सुरुवात केली . दरम्यान त्यांची भेट इंदूरचे जुने इनामदार राजा छत्रकर्ण यांच्याशी होऊन इनामदारांनी त्यांच्या मातोश्रींच्या  स्मरणार्थ १०,००० रु देऊन मंदिर बांधण्याचे कबूल केले. आणि रावजी बाजार भागात एक घर होते तिथे रामाच्या मूर्तीची स्थापन केली. पुजारी म्हणून भय्यासाहेब मोडक यांचे चिरंजीव बाळू भैया यांना नेमण्यात आले.
विष्णुबुवा परत सांगलीस गेले. पण काही कारणाने राजे छत्रकर्ण यांना जागा परत देऊन मूर्ती परत घेण्यात आल्या.
या घटनेनंतर पुन्हा वर्गणी काढून शनी गल्ली , इंदोर येथे जागा घेण्यात आली. आणि १९३५ मधे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
 Photo

 असे येथील पुजारी श्री प्रकाश जोशींनी सांगितले. बाकी माहिती तेथील फलकाच्या फोटोवर आली आहे.
इथल्या राम सीतेच्या मूर्ती अतिशय देखण्या आहेत.

Photo

Photo

Photo

Photo

जय श्रीराम!
संकलन - महाराज कन्या

 जय श्रीराम!
आपण पाहत आहोत श्रीमहाराजांच्या निर्याणानंतर स्थापिलेली काही मंदिरे

११.    विदूर अश्वत्थ राममंदिर, १९३०
दत्तात्रेय आश्रम, दोड्डाबेल्लापूर, जि. कोलार - ५१५३३१, कर्नाटक

कर्नाटकात कोलार जिल्हा , गौरी तालुक्यात असलेले हे मंदिर. याची फारशी माहिती कळू शकली नाही. श्री व्यंकटरमण दास यांना महाराजांनी इ.स. १८८५ मध्ये  महाराजांनी त्यांना अनुग्रह आणि पादुका दिल्या होत्या. नंतर १९१२ मध्ये महाराज त्यांना पिनाकीनी नदीकाठी भेटले तेव्हा एक चांदीचे नाणे  देऊन मंदिर स्थापन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आश्रम बांधला. हे नाणे अजूनही बघायला मिळते. सुरवातीला झाडाच्या पारावरच लहानसे राम मंदिर होते असे डॉ. सौ आशाताई परांजपे यांच्या 'आनंदघनराम" या पुस्तकात दिलेल्या माहितीवरून समजते. वाणीरुप महाराज पु तात्यासाहेब केतकर यांनी तिथे भेट दिली होती, तेव्हा त्यांना सिंहासनावर बसवण्यात आले होते. त्या खुर्चीचाही फोटो आहे. मंदिरात काळ्या पाषाणाची राम सीता मूर्ती असून, श्रींची हि मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. त्यामागे श्रीमहाराजांचे हाताने काढलेले मोठे चित्र आहे. मंदिराच्या आवारात असंख्य नागाच्या मूर्ती आहेत. 











आवारातील नाग देवता मंदिर

पु. तात्यासाहेब केतकर यांनी या मंदिराला भेट दिल्यावर त्यांना ज्या सिंहासनावर बसवण्यात आले होते ते हे सिंहासन

श्रीमहाराजांनी १८८५ मध्ये दिलेल्या पादुका

श्रीमहाराजांनी व्यंकटरमणदास यांना दिलेले चांदीचे नाणे


  जय श्रीराम
आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे!या शृंखलेतील पुढची मंदिरे आहेत.

१०.  शिवराममंदिर, कुरुंदवाड १९२९
लक्ष्मीविष्णुमंदिराशेजारी, मु.पो. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर - ४१६१०६, महाराष्ट्र

या मंदिराच्या उभारणीमागची कथा श्रीमहाराज चरित्रात 'नायट्यावर तोडगा' या शीर्षकाअंतर्गत आली आहे. ती अशी की,
  बागलकोटला सुखवस्तू कुटुंब होते. त्यात मुलगी एकच पण सुरेख व सुस्वभावी असल्याने सर्वांची लाडकी होती. तिला बारावे वर्ष लागल्यावर तिच्या सर्व अंगावर नायटे येऊ लागले. त्यांना भारी खाज असायची. पोर्णिमेला ते चिघळायचे. हा त्रास नाहीसा करण्यासाठी पुष्कळ डॉक्टर, वैद्य झाले. तसेच आईने व मुलीने व्रते करून देहाला पुष्कळ कष्टही दिले. पण कशाचाही उपयोग झाला नाही. आईबाप कंटाळून स्वस्थ बसले असता कोणीतरी श्रीमहाराजांचे नाव त्यांना सुचवले. बापाला रजा नसल्यामुळे मुलीला घेऊन आई गोंदवल्यास आली. नायट्यांचा इतिहास सांगून आई श्रीमहाराजांना म्हणाली, "महाराज, मुलीला पंधरावे वर्ष लागले आहे.  हिचे लग्न कसे होईल याची फार काळजी वाटते." यावर श्री महाराज म्हणाले, "माय,  काळजी करू नका. रामराय तुमचे संकट निवारील.  ही मुलगी जर एखाद्या गरिबाला दिली तर ताबडतोब बरी होईल. यजमानांना विचारून मला सांगा." बाईने नवऱ्याला पत्र लिहिले. चार-आठ दिवसात त्यांचे होकारार्थी उत्तर आले. तिने ते पत्र श्रीमहाराजांना दाखवले. श्रीमहाराजांनी  पुन्हा पुन्हा तिला विचारले. प्रत्येक वेळी तिने होकार दिला. तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन "रामाला साक्ष ठेवून मी असे कबूल करते की माझी मुलगी मी गरिबाला देईल" हे शब्द तिला बोलायला लावून सर्वासमक्ष पाणी सोडवले. लगेच मुलगी कोणास द्यायची असे तिने विचारले.  
हा सर्व प्रकार चालू असता कुरुंदवाडचा तरुण भटजी निळकंठ जोशी येऊन श्री महाराजांच्या पाया पडला. ते म्हणाले, "बाई, याला तुमची मुलगी द्या."  नंतर एकमेकांनी एकमेकांची नावे, गावे व पत्ते विचारून घेतले. बाई मुलीला घेऊन बागलकोटला गेली.  निळकंठ कुरुंदवाडला गेला.  मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचे बंद झाले व ती चांगली सुधारली. काही दिवस गेल्यावर आईबापांच्या मनात विकल्प आला. श्रीमहाराजांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले. परंतु लगेच मुलीच्या अंगावर पुन्हा नायटे येण्यास आरंभ झाला. मग मात्र आईबाप घाबरले.  निलकंठास पत्र लिहून लग्न ठरवले आणि पंधरा दिवसात उरकून टाकले. पुढ निळकंठाची परिस्थिती सुधारली आणि त्यांचा संसार चांगला झाला.

बागलकोटचे ते सुखवस्तू कुटुंब म्हणजे श्री मोडक यांचे. त्यांच्या मुलीचे नाव कृष्णाबाई.
निळकंठ जोशी यांची गोष्ट अशी की गोवा प्रांताकडील मूळचे रहिवासी असेलेले नीलकंठ जोशी यांची श्रीमहाराजांशी प्रथम भेट कागवाड येथे झाली होती. पोर्तुगीज सरकारच्या काळात नीलकंठ यांची जमीन, मालमत्ता, त्या सरकारने काही कारणाने सरकारजमा केल्याने जोशीं यांना गोव्यातून परागंदा व्हावे लागले. ते गोंदवले येथे एकदा आले असतांना श्रीमहाराजांनी त्यांची विचारपूस केली त्यावर जोशी यांनी मी झोळी फिरवतो असे उत्तर दिले.
या विवाहाच्या संमतीची वेळ आली तेव्हा श्रीमहाराज हर्दा येथे होते. मोडक यांनी नीलकंठ व कृष्णाबाईचा विवाह करावा असे पत्राने त्यांना कळवले. श्रीमहाराजांनी संमती दिली आणि हा विवाह १९१२ साली झाला.
श्रीमहाराजांची आणि नीलकंठ यांची नंतर भेट झाली. तेव्हा त्यास त्यांनी राममंदिर बांधून श्रीरामनामाचा प्रचार करण्यास सांगितले. तसेच काशी ते रामेश्वर यात्रा करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे नीलकंठ मातोश्रीस घेऊन सपत्नीक काशीस गेला. तेथील मुक्कामात १९१४-१५च्या सुमारास जयपूर येथे जाऊन श्रीराम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती पाहिल्या .


Photo
विवाहानंतर हे दाम्पत्य कुरुंदवाड येथे राहत होते. तेथून त्याने मूर्ती खरेदीसाठी ६०० रुपये मागवले. आणि मूर्ती खरेदी करून कुरुंदवाडला घरी आणून ठेवल्या.
पुढे मंदिर बांधविले व याच मंदिरात १९२९ मध्ये श्रीरामाची स्थापना झाली.या मंदिरात पती-पत्नी दोन वेळा तेरा कोटी रामनाम जप पूर्ण केला. १९४८ साली पु. तात्यासाहेब केतकर या मंदिरात दर्शनासाठी आले होते.

या कृष्णाबाईचा गोंदवल्यातील एक अनुभव असा कि कृष्णाबाई आईसह श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी गोंदवले येथे गेली होती. कृष्णाबाई स्वयंपाक घरात होती.
तेथे भांडी-कुंडी, इतर सामान पडले होते. श्रीमहाराज अचानक स्वयंपाक घरात आले. कृष्णाबाईस त्यांनी त्या भांड्यामधील एक वस्तू उचलण्यास सांगितले. या मुलीने छोटे उलथणे उचलले.
ते पाहून श्रीमहाराज म्हणाले," तुझ्या मनासारखे होईल. "
पुढे त्यांच्या हातून भरपूर अन्नदान झाले.
सध्या नीलकंठ जोशी यांचे धाकटे चिरंजीव मंदिरात पूजा अर्चा करतात.
**
जय श्रीराम!
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र, आणि चैतन्य स्मरण विशेषांक
फोटो संदर्भ : गुगल


 जय श्रीराम
आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे!या शृंखलेतील पुढची मंदिरे आहेत.

९.  शेंदुरजणेघाट राममंदिर १९२३
मु.पो. शेंदुरजणेघाट, ता. वरूड, जि. अमरावती, महाराष्ट्र

जय श्रीराम!

 विष्णुबुवा कुंभारे हे मूळचे राहणारे वऱ्हाडातले. यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड येथे त्यांची व आनंदसागर यांची गाठ पडली. आनंदसागर यांनी त्यांना श्रीमहाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले. श्रीमहाराजांना पाहून विष्णुबुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झाले. श्रीमहाराजांनी त्यांना ठेवून घेतले. चार-आठ दिवस राहिल्यावर नित्याच्या व्यवहारांमध्ये देखील सहज प्रकट होणारे श्रीमहाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले. एकदा श्रीमहाराज एकटे आहेत अशी संधी साधून, आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना विनंती केली. तेव्हा श्रीमहाराज हसले आणि त्यांना म्हणाले, "बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ! ना वारे वा ! मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल !  अहो, गुरू म्हणजे थट्टा का आहे ?  एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूशी वागावे लागते.  आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये." श्रीमहाराजांचे शब्द ऐकून विष्णुबुवांना लहानपणची आठवण झाली. ते सहा-सात वर्षांची असताना एका सत्पुरूषाने त्यांना शिवमंत्र दिला होता. परंतु त्याचवेळी त्याने हे सांगून ठेवले की, "तुला माझे आणि ह्या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल, नंतर पुष्कळ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल.  तू त्यांचेपाशी अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील, पण तू त्यांनाच गुरु मान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज. त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल."  विष्णूबुवांनी ही सर्व कथा श्रीमहाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले.  श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला. राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्रीमहाराजांची त्यांना आज्ञा झाली. हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. तसेच ते द्वादश ज्योतिर्लिंगे आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आले.
 त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला होता. नंतर वऱ्हाड प्रांतात शेंदूरजन घाट येथे मठ बांधून ते राहिले.


श्री विष्णुबुवांनी स्वतःचा सांगली विभागातील सर्वसंग परित्याग करून रामनामाचा वर्हाडांत प्रसार करण्यासाठी शेंदूरजनघाट येथे आले व १९१० मध्ये मठ स्थापन केला आणि रामनामाची उपासना वाढविली. पुढे गावकऱयांच्या मदतीने १९२३ मध्ये राम मंदिर स्थापन केले.
पुढे विष्णुबुवांनी रामभाऊ नावाचे बहिणीचे पुत्रास दत्तक घेतले व त्या नंतर श्री तरार  यांचेकडे ते कार्य आले. श्री तरार यांचे नंतर त्यांची सून गं भा. शोभाताई तरार अध्यक्षा म्हणून कार्य पाहत आहे. मुख्य ट्रस्टी श्री उल्हास आष्टीकर मो. न. ९०९६८३४८७० हे आणि श्री अरुण मोघे मंदिराचे बांधकाम, रंगरंगोटी देखभाल इद्यादी पहातात. रामजन्म आणि श्रीकृष्ण जन्म हे उत्सव या मंदिरात होतात.
श्रीमहाराजांच्या त्या काळातील पादुका येथे आपल्याला नतमस्तक होण्यासाठी ठेवलेल्या आहेत.





 

 जय श्रीराम!

#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.

 ८.  कांची समुद्रम् राममंदिर १९२३
पो. कांची समुद्रम, ता. हिंदूपूर, जि. अनंतपूर - ५१५३३१, आंध्र प्रदेश

Photo

कांचिसमुद्रम येथे श्री सीताराम राव या नावाचे गृहस्थ होते. त्यांचे मामा हणमंतराव बल्लारी तेथे सन १९०८ साली शाळामास्तराचे काम करत होते. एकदां गदगला आले असतां श्रीमहाराजांचें त्यांना दर्शन झालें. त्या दर्शनाने ते इतके प्रभावित झाले की कांचीसमुद्रमला परतल्यावर त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना श्रींच्या दर्शनासाठी गोंदवलेस जा असा आग्रह केला. त्याप्रमाणे कांचीसमुद्रम् येथील दासा लक्ष्मय्या शेट्टी, श्री कृष्णराव, आप्पाजी शास्त्री, चीनप्पा रेड्डी यांनी गोंदवल्याला जाऊन सहकुटुंब श्रीमहाराजांचा अनुग्रह घेतला.
त्यातील दासा लछमय्या - हे श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त झाले. 


 Photo

महाराजांशी ते इतके एकरूप झाले की महाराजांनीही त्यांना ' आपला ' म्हणाले असाव. कारण १९१३ मधे श्रीमहाराजांनी गोंदवले येथे जेव्हा देह ठेवला नेमक्या त्या वेळी इकडे कांचीसमुद्रमला लछमय्या अर्ध्य देत असता त्यांना श्रीमहाराजांचे साक्षात दर्शन झाले.
 Photo

लछमय्या यांना संतती नव्हती. श्रींचे दर्शन झाल्यापासून ते उपासनेत मग्न असायचे. दर गुरुवारी मंडळी कुठेतरी भजन उपासना करीत असत. उपासकांना एक ठिकाण असावे म्हणून लछमय्या यांनी स्वतःची जमीन श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी १९२३ साली दान केली. श्रींनी त्यांना पादुका दिलेल्या होत्या. त्या पादुका त्यांनी प्रारंभी छोटसे मंदिर बांधून तेथे पूजेसाठी ठेवल्या, राम मंदिरही बांधले.
 त्याला 'ब्रह्मचैतन्य मंदिर' असें नांव दिलें.या मंदिराच्या व्यवस्थेसाठी ट्रस्ट निर्माण करण्यात आला. जी. होनप्पा यांनी ट्रस्टिपद स्वीकारल्यावर मंदिरालगतची आणखी काही जागा खरेदी करून ट्रस्ट ला दिली आहे.
हणमंतराव फार नामनिष्ठ होते. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतरहि त्यांचें सदेह सगुण दर्शन लछमय्यांना आणि हणमंतरावांना होत असे. पेन्शन घेतल्यावर हणमंतरावांनीं आपला सर्व काळ नामस्मरणांत घालविला.
श्रीमहाराजांच्या  चरित्रात आलेली त्यांची एक गोष्ट अशी की , हणमंत मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत. एकेवर्षी त्यांचा शेजारी लछमय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला.,तो श्री महाराजांना म्हणाला,'मला मारुतीचे दर्शन घडवा.मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे.'श्री महाराज म्हणाले,'असे वेड्यासारखे काय मागतोस?मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का?त्यांचे दर्शन तुला सहन होणार नाही".काही केल्या लछमय्या ऐकेना.पाच सहा दिवस रोज तो सारखे हेच मागे,एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायावर डोके ठेऊन म्हणाला,'हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही.हे ऐकून श्रीमहाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसण्यास सांगितले,आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला.एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्ध गेली.जवळ जवळ एक तासाने तो शुद्धीवर आला तेव्हा 'काय पाहिले'?असे त्याला श्री महाराजांनी विचारले. तेव्हा तो म्हणाला'महाराज काय सांगावे!आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले.त्याच्यात मी बुडून गेलो,आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही .श्री महाराज म्हणाले,'भगवंताचे खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे,आपल्या देहबुद्धीला ते सहन होत नाही.आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते.म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते.'परंतु त्या दिवसापासून लछमय्या च्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला.त्याचे लक्ष धंद्यावरून उडून  नामाकडे गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला.

Photo
जय श्रीराम
फोटो स्रोत - गुगल

 जय श्रीराम!

#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.

७.  गजेन्द्रगड राममंदिर, १९१६
पत्तार गल्ली, पो. गजेंद्रगड, ता. रोण, जि. गदग ५८२११४, कर्नाटक

 या मंदिरासंदर्भात श्री ब्रम्हानंद बुवांच्या चरित्रात उल्लेख आलेला तो असा कि,
गजेंद्रगड येथे गोविंद दीक्षित या नांवाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण रहात असत. श्रीब्रम्हानंद महाराजांवर त्यांची अत्यंत भक्ति व विश्वास असल्याने ते त्यांच्या दर्शनाकरिता वरचेवर बेलधडीस व वेंकटपुरास जात असत. ब्रम्हानंद बुवांचही त्यांच्यावर तसेंच प्रेम असल्याने, त्यांनी त्यांस गोंदवलेस नेऊन श्रीमहाराजांच्याकडून अनुग्रह देवविला होता.
     शके १८३५ मध्यें ब्रम्हानंदांच्या आज्ञेप्रमाणें श्री दीक्षित अग्निहोत्री श्रीमहाराजांच्या दर्शनास गोंदवलेस गेले असतां त्यांस श्रीमहाराजांनीं आदरपूर्वक चार दिवस ठेऊन घेतले होते. एकेदिवशी श्रीमहाराजांनीं "इतक्या लांबवर कां येणें केलें होते ?" असा त्यांस प्रश्न विचारला. त्यांनी अत्यंत नम्रतेने "केवळ आपल्या दर्शनासाठी" असें उत्तर दिले. तेंव्हा श्रीमहाराजांनीं मंदहास्य करीत "ब्रह्मानंद हा माझा केवळ प्राण आहे. तुम्हां लोकांकरिताच मी त्यांस तिकडे पाठविले आहे" असें सांगितले व "तुमच्या घरांत अग्निहोत्र आहें. आपल्या वयस्कर मातापित्यांची शुश्रूषा पण तुम्ही चालविता. यावरून तुम्हीं कृतार्थ आहांतच. तरीपण घरीं श्रीरामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा" असें म्हटले. त्यावर आपल्या आज्ञेप्रमाणें सिद्धता करतो. आपल्या अमृतहस्तानेच प्रतिष्ठापना करणेची कृपा व्हावी" अशी त्यांनी प्रार्थना केली.
     श्रीमहाराजांनीं आपल्या हातानें एक पत्र लिहून तें ब्रह्मानंदबुवांसाठी दिलें व त्यांना "समक्षांत मी येण्याचा योग दिसत नाहीं. थोड्याच दिवसांत मी नैमिषारण्याला जाणार आहे. ब्रह्मानंदबुवांकडून तुमच्या मनासारखे काम होईल" म्हणून सांगून आशीर्वाद देऊन पाठविलें. पुढें थोड्याच काळांत श्रीमहाराज समाधिस्थ झाले.
 गोविंद दीक्षितांनी गांवी जाऊन श्रीब्रह्मनंदबुवांची भेट घेऊन, पत्र देऊन निरोप कळविला. आणि श्रींच्या आज्ञेप्रमाणें घरांतच मंदीर बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. मंदीर तयार होतांच त्यांनी मूर्तीहि आणविल्या. शके १८३८ च्या रामनवमी उत्सवास जाऊन, दीक्षितांनी मंदिराची सर्व हकीगत निवेदन करून "माझा उद्धार करावा" अशी पु. बुवांना प्रार्थना केली.
     ब्रम्हानंद बुवांनी "वैशाख वद्य सप्तमी हा मुहूर्त बरा आहे. श्रीराम सिंहासनावर बसण्यास शुभ दिन आहे. त्याच दिवशी प्रतिष्ठापना करा" असें त्यांस सांगून पाठविलें.
     गोविंद दीक्षित नाराज झाले. वेंकटपुरास जाऊन, त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून "तेथवर येऊन मला कृतार्थ करा" असें त्यांनी मागून घेतलें. त्यावेळीं ब्रम्हानंदबुवांना थंडीताप आला होता. घोंगडे पांघरून थडथडत ते अंथरुणावर झोपले होते. दीक्षितांची विनंति ऐकून, "थंडीने मी मरायला लागलो आहें, तापाने फणफत आहे. असल्यात मला ये म्हणतोस. दररोज येणाऱ्या थंडीने मी अशक्त झालों आहें. मला येतां येणार नाहीं. एखादेवेळी वाटेतच आटोपेन. माझ्यावर विसंबून राहूं नकोस. तूंच उरकून घे." असें सांगताच," तुमच्याशिवाय तें होणार नाहीं, तसेंच राहून जाईल." असें दीक्षितांनी सांगितले. त्यावर "हट्ट धरूं नकोस. थंडी कमी झाल्यास मी येतोच. नच आल्यास, अशा प्रकारे उरक" असें म्हणून त्यांनी त्यांस सर्व विधि समजावून सांगितला.
     गोविंद दीक्षित ब्रम्हानंदांची आज्ञा प्रमाण मानून, पण खिन्न अंतःकरणाने गांवी गेले. दयानिधी ब्रम्हानंदांनी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी वेंकटापूर सोडले व ते गदगला आले व दोन शिष्यांना बरोबर घेऊन भाड्याचा झटका करून गजेंद्रगडला जाण्यास रात्रीं निघाले. श्री बुवांची जाण्यासारखी परिस्थिति नसतांना देखील, श्रीमहाराजांचें आज्ञापत्र असल्याने, ते देहाची पर्वा न करता निघाले.  ब्रम्हानंद बुवांना श्रीसद्गुरू आज्ञेपेक्षा या जगांत जास्त श्रेष्ठ कांहीं दिसत नव्हते हें जसें खरें, तसेंच श्रीमहाराजांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीहि गोष्ट करीत नसत हेंहि तितकेच खरें !( याचे प्रत्यंतर म्हणजे, तोपीनकट्टीच्या भक्ताने श्रीरामरायाच्या मूर्ति आणवून त्यानें श्रीगुरूंस प्रतिष्ठापनेसाठी असंख्य वेळां पाचारण करूनही श्रीमहाराजांची आज्ञा नसल्याने, श्रीगुरू प्रतिष्ठापनेस बिलकूल गेले नाहींत हें होय. श्रीब्रह्मानंदगुरूंच्या समाधि कालानंतर मग ती प्रतिष्ठापना उरकली गेली.)
     गदगहून निघून ब्रम्हानंद बुवांनी नरेगलला मुक्काम केला व तेथून पहाटे निघून अरुणोदयापूर्वी दीक्षितांच्या दरवाज्यांत येऊन उभे राहिले. आदले रात्रीं १० वाजेपर्यंत दीक्षितांनी बुवांची वाट पाहिली. ते न आल्यानें खिन्न होऊन, दीक्षित अंथरुणावर पडले. पण त्यांस झोप आली नाहीं. अकस्मात बुवांचे आगमन झालेलें पाहून दीक्षित आश्चर्यचकित झाले. तसेंच त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाहीं. फक्त वाद्यघोषांत श्रीब्रम्हानंदाना गांवात मिरवत आणण्याची इच्छा फलद्रूप झाली नाहीं म्हणून त्यांस विषाद मात्र वाटल्याखेरीज राहिला नाहीं.
     प्रिय सज्जन हो ! श्रीगुरूंनी दीक्षितांस चाळविण्या कां दाखविल्या ? खरोखर त्यांच्या मनांतून जावयाचे नव्हतें कां?  तें कसें शक्य आहें ? मग अकस्मात दत्त म्हणून उभें राहण्यातील हेतू काय असावा, असें तुम्हांस वाटतें ? असें करण्यांत श्रीगुरूंचा एकमेव हेतू जर कोणता असेल तर तो हाच कीं, त्यांना स्वतःचे अवडंबर माजविलेले खपत नव्हतें व कोणत्याहि गोष्टीचा अवास्तव गाजावाजा करण्याच्या ते विरुद्ध होते.
     प्रतिष्ठापनेबाबतचे होमहवन संपवून श्रीब्रम्हानंदांनी स्वतः श्रीरामरायाला अलंकारांनी सजविले. राजोपचारांनी पूजा करून, महानैवेद्य, मंगलारती केली. त्यादिवशीं त्यांच्या आज्ञेप्रमाणें मुक्तद्वार अन्नसंतर्पण झालें.
     दुसरे दिवशी सकाळीं स्नानसंध्या उरकून, श्रीरामरायाच्या पायावर तुळशी चढवून, अग्निहोत्र्यांच्या होमशालेतील अग्निनारायणासमोर श्रीबुवांनी १०० रुपये दक्षिणा ठेवली, तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. दीक्षितांच्या मुलांना "दरवर्षी रामनवमी उत्सव भिक्षा मागून कां होईना, पण न चुकतां करा. वर्षातून एकदा तुलसीदलानी व बिल्वदलानी पूजा झालीच पाहिजे. कसल्याही प्रसंगीं धर्म, नीति, श्रीराम यांवरील विश्वास ढळू देऊं नका. यथाशक्ति अन्नदान करा. सदा नामस्मरण करीत जा. म्हणजे श्रीरामराय तुमचें कल्याण करील", असा उपदेश करून ते जाण्यास सिद्ध झाले. तेंव्हा गांवातील अनेकांनी श्रीबुवांना आपापल्या घरीं बोलावून नेवून, पूजा करून त्यांचा अनुग्रह घेतला. यांतच दिवस गेल्यामुळे बुवांचा त्यादिवशी तेथें मुक्काम झाल्यानें लोकांना फार आनंद झाला. दुसरें दिवशीं सर्व भाविकांना आशीर्वाद देऊन, श्रीरामरायाचा उत्सव तुम्हीं सर्वांनी मिळून न चुकतां केला पाहिजे, असें सर्वांस बजावून श्रीब्रम्हानंद बुवा वेंकटपुरास आले. 


फोटो स्रोत: फेसबुक
**

जय श्रीराम!

आपण पाहत आहोत,
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे

५.  जोगळेकर राममंदिर, धारवाड १९१५
माळमड्डी, एम्मीकेरी, स्टेशनरोड, धारवाड, जि. हुबळी - ५८०००१, कर्नाटक

वनवासी राम मंदिर ( जोगळेकर राम मंदिर)
कृष्णशास्त्री उप्पिनबेटिगिरी नावाचे कर्नाटकातील अतिशय विद्वान संस्कृत पंडित, श्रीमहाराजांचे शिष्य होते . मैसूर दरबारनें त्यांना 'विद्वानन्मुकुटमणि' ही पदवी दिली होती. 'वेदान्तावर संस्कृत भाषेत लिहिलेला कोणतहि ग्रंथ मी अभ्यासलेला नाही असे नाही.'असे ते सांगत.
वनवासी राम

श्रीब्रम्हानंद महाराज दक्षिणेंत गेल्या नंतर त्यांनी शक्य तितके श्रीमहाराजांचे नांव सांगून लोकांना त्यांचे अनुयायी केले. त्याच्यामुळेंच श्री.कृष्णशास्त्री श्रीमहाराजांकडे गेले व त्यांनी त्यांचेकडून उपदेश ग्रहण केला श्रीमहाराजांची व त्यांची पहिली भेट बेलधडी येथे झाली तेव्हां त्या दोघांचा सुमारे ३ तास संवाद झाला संवादाचे शेवटी शास्त्रीबोवांनी श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला व पुनः त्यांचेबरोबर कधीही वाद घातला नाहीं. त्यानंतर 'श्रीमहाराज बोलूं लागले म्हणजे साक्षात वेद बोलत आहेत असे वाटतें' असे ते म्हणत असत. श्रीमहाराजांचे त्यांचेवर अतिशय प्रेम होते व ते त्यांना फार सन्मानपूर्वक वागवीत.
 श्रींनी दोन रुपये प्रसाद म्हणून देऊन धारवाडमध्ये दोन राम मंदिरे बांधायला सांगितली होती. त्यानुसार त्यांच्या हस्ते  दोन राममंदिराची स्थापना झाली. एक लाईनबझारमध्ये, त्यांच्या नात्यातल्या गंगाबाई यांनी बांधलेले; आणि दुसरे माळमड्डीवर, त्यांचे स्नेही निवृत्त न्यायाधीश श्री वासुदेवराव जोगळेकर यांच्या जागेवर बांधलेले. या मंदिरात वनवासी रामाच्या मूर्ती आहेत.

या कृष्णशास्त्रींची गोष्ट अशी की हे श्रींनी दिलेले दोन रुपये त्यांच्या पूजेत असत. एकदा त्यांनी दारावर नेहमी येणाऱ्या एका बाईकडून दोन रुपयांचे धान्य घेतले, व त्यावेळी जवळ पैसे नसल्याने दुसऱ्या दिवशीचा वायदा केला. दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत रकमेची व्यवस्था होऊ शकली नाही. वायदा पुरा न केला तर आपली अब्रू जाणार अशी वेळ येऊन ठेपली, तेव्हा निरुपाय होऊन पूजेतले रुपये देण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शास्त्रीबुवांनी ते उचलले. एवढ्यात पोस्टमन येऊन त्याने पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेतर्फे परीक्षक म्हणून केलेल्या कामाचे मानधनाची मनीऑर्डर दिली ती नेमकी दोन रुपयांची! श्रीगुरुमाउलीची ही कृपा पाहून शास्त्रीबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले! आजही ते दोन रुपये त्यांचे चिरंजीव भालचंद्रशास्त्री यांच्या पूजेत आहेत.

                गोंदवल्यास असतांना श्रीमहाराज एका शेतकर्याला परमात्मा सर्व कर्ता कसा आहे हे समजावून सांगत होते. जवळच कृष्णशास्त्री होते. ते विवेचन चालू असतां शास्त्रीबुवांच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्रीमहाराज तीच शंका काढून तिचे उत्तर देत. असे बराच वेळ चालले. शेवटी श्रीमहाराज म्हणाले, ' हे बघ ! शंकांना अंत नाही. तेंव्हा विद्वानासारख्या शंका न घेतां तू नाम घेत जा .' हे शब्द ऐकून शास्त्रीबुवा उमजले आणि , ' त्वमेव शरणं मम् ' असे म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला.

                 श्रीमहाराज काशीमध्यें असतांना शास्त्रीबुवा बरोबर होते. त्यांचा व पं. मदनमोहन मालवीय यांचा फार स्नेह होता. पं मालवीय एक मोठे संस्कृत कौलेज काढण्याच्या खटपटीत होते. कृष्णशास्त्रींनी तेथे प्रधानाध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती., परंतु श्रीमहाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही.

                काशीमध्यें संस्कृत पंडितांची सभा होती. शास्त्रीबुवा अध्यक्ष होते. चार वाजतां उघडे , खांद्यावर पंचा टाकलेले व लांडे धोतर नेसलेले शास्त्रीबुवा सभेला पायीं निघाले. श्रीमहाराज म्हणाले, ' छे , आपण अध्यक्ष शोभलों पाहिजे ना ! ' श्रीमहाराजांनी भरजरी शाल शास्त्रीबुवांना  पांघरली, दोन चतुर माणसें बरोबर दिली , आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठविले. स्वतः पं मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले.
केडगांवच्या साधूंनी एकदा शास्त्रीबुवांना एक भारी शाल दिली. ती त्यांनी तेथेच एका गरीबाला देवून टाकली , व ही गोष्ट श्रीमहाराजांच्या कानावर घातली. तेंव्हा श्रीमहाराज म्हणाले , ' आपले चुकले शास्त्रीबुवा ! प्रारब्धाने आलेले नको म्हणणे हे सुद्धा वैराग्याला बाधक असते ! ' शास्त्रीबुवा म्हणाले , ' हे सत्पुरुष कुठे आणि कसे बरोबर पकडतील याचा नेम नाही. '
काशीहून धारवाडला आल्यावर एकदोन वर्षांतच कृष्णशास्त्रींना अर्धांगाचा झटका आला. पुढे ते गोंदवल्यास आले. श्रीमहाराज रोज त्यांच्या समाचारास जात. शास्त्रीबुवा श्रीमहाराजांच्या दर्शनास आले म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत. पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री श्रीमहाराजांशी बोलतांना मात्र , ' जी महाराज, होय महाराज ' , असे लीनतेने बोलत. या महापुरुषाचा अंत १९२० साली झाला.
वरील ( आजाराचे ) प्रसंगी श्रीमहाराजांनी एकदां भागवतपुराण काढून बोलायला सुरवात केली.त्यांत धर्मस्थापनेचा प्रश्न आला.शास्त्रीबुवा फार धर्माभिमानी होते.त्यांनी त्या वेळच्या कांही धटनांचा उल्लेख करुन अधर्म फार वाढत असल्याचें म्हटले.त्यावर श्रीमहाराज एकदम उठून उभे राहिले व समोरच्या भिंतीवर पडलेले सुर्याचे किरण दाखवून म्हणाले ," आपण काळजी करुं नये पुनः धर्मस्थापना होऊन धर्माची घडी बसेलच बसेल." शास्त्रीबुवांनी ती केव्हा बसणार हे एक दोन वेळा खाजगी भेट घेऊन विचारुन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी दुसरा मुद्दा काढून व त्यांना त्यांत गुंतवून त्यांना त्यांचा मुद्दा काढण्यास वेळच दिला नाही.
     एकदा श्रीमहाराज त्यांची नेहमी हजामत करणाऱ्या चिलया नावाच्या नापिताच्या घरी गेले. शास्त्रीबुवा त्यांचे बरोबर होते. त्यांच्या घरांत एक चिमणी लावलेली होती. ती चिमणी दाखवून श्रीमहाराज शास्त्रीबुवांना म्हणाले, " हे काय आहे? " त्यावर ते म्हणाले ,"महाराज ती चिमणी जळते आहे." श्रीमहाराजांनी " ती कशी काय जळते हो ?" असे विचारले तेव्हा या विचारण्यांत कांहीतरी हेतु आहे असे वाटून शास्त्रीबुवा म्हणाले," महाराज ते मला कळत नाही.
तेव्हा महाराज म्हणाले," हे मला फार आवडते ". सदगुरु हा ज्ञानी पुरुष असतो. त्याचे जवळ कसे बोलावे व वागावे हे या वरुन शिकण्यासारखे आहे.
     एकदा गोंदावले येथे शास्त्रीबुवा, श्रीब्रम्हानंद व डाॕ.कूर्तकोटि असे हजर होते. तेव्हा कांहीतरी उद्योग पाहिजे म्हणून श्रीमहाराजांनी पोथी काढावयास सांगितली व सर्वांना थोडा थोडा वेळ कांहीतरी सांगावयास सांगितले. श्रीब्रम्हानंद तेथून निघून गेले. डाॕ.कूर्तकोटिंनी तास भर सांगितले. दरम्यान श्रीमहाराज बाहेर गेले होते ते परत आल्यावर काय सांगितले असे विचारले मग शास्त्रीबुवांना " तुम्ही कांहीतरी सांगा " असे श्रीमहाराज म्हणाले . तेव्हा शास्त्रीबुवा उगेच राहिले तोंडातूंन शब्द फूटे ना आणि रडूच लागले. तेव्हा " काय झाले शास्त्रीबुवा ?" असें श्रींनी विचारल्यावर म्हणाले ' आपल्या समोर मी काय सांगू ?'
     डाॕ.अॕनी बेझंट बाईंनी बनारसला सुरु केलेल्या संस्कृत पाठशाळेंत मुख्याध्यापक म्हणून मदनमोहन मालवीयांनी शास्त्रीबुवांना बोलाविलें होते. त्यांनी श्रीमहाराजांना विचारल्यावर "जाऊ नका " असे सांगितले . ते फार मोठे पंडित होते परंतु त्यांना व्यवस्थापनाचे काम (Administration ) जमले नसते.
एकदां शास्त्रीबुवा श्रीमहाराजांबरोबर अयोघ्येला गेले होते. तेथील जंगलांत 'हनुमानगढी' म्हणून एक स्थान आहे. तेथे गेलें असतां साक्षात मारुतिरायांचे दर्शन होतें असे त्यांनी ऐकले होते. म्हणून एक दिवस नित्याप्रमाणे संघ्यावंदनादि आन्हिक उरकून एकटेच ते त्या स्थानाच्या दिशेनें निघाले. कांहीं अंतर गेल्यावर एकाड भाग लागला. इतक्यांत समोरुन श्रीमहाराज येतांना त्यांना दिसले. नमस्कार वगैरे झाल्यावर श्रींनी 'फिरायला निघालां का ? 'असे विचारले. तेव्हा शास्त्रीबुवांनी आपला बाहेर पडण्याचा उद्देश सांगितला. त्यावर श्रीमहाराज म्हणाले," चांगलें आहे. जाऊन आल्यावर पुनः भेटूं, परंतु एक गोष्ट सांगतो कीं मनांत जरा सुध्दा शंका असेल तर मारुतिराय समोर येऊनही उमगणार नाहींत" त्यावर 'माझे मनांत कांहीहि शंका नाही" असे शास्त्रीबुवा म्हणाले. तेव्हां श्रीमहाराजांनीं पुनः तेंच सांगितले व 'जाऊन यावे मग भेटूं" असे म्हटले. मग शास्त्रीबोवा बरेच पुढे जंगलाजवळ गेले तेव्हा त्यांना समोरुन एक काळाकभिन्न,धिप्पाड असा एक कातकऱ्यासारखा मनुष्य येतांना दिसला. त्याच्या दृष्टीनें तो अर्थातच स्पर्शयोग्य नसल्यामुळें तो येत असलेल्या रस्त्याच्या विरुध्द बाजूनें ते जाऊं लागले. तरीहि तो मनुष्य आपली बाजू सोडून त्यांचेजवळ आला व त्यांना एक जरासा घक्का देऊन पुढे गेला. मारुतीरायाच्या दर्शनाऐवजीं हे वाट्याला आल्यामुळें त्यांना वाईट वाटले व स्पर्शदोषाचा परिहार करण्याकरतां जवळच असलेल्या शरयूनदीच्या तीरावर आले. तेथे हातपाय घुऊन मार्जन वगैरे करतात इतक्यांतच त्यांना श्रीमहाराज तेथे दिसले. "दर्शन झाले का ?" असें त्यांनी विचारले तेव्हा शास्त्रीबुवांनी झालेली हकिकत सांगितली . तेव्हां श्रीमहाराज म्हणाले ," मी आपणास अगोदरच सांगितले होते की कणभरही शंका असेल तर मारुतीराय समोर येऊनही उमगणार नाहींत.ते साक्षात मारुतीरायच होते." सामान्य मनुष्य आपल्या सारख्याला स्पर्श होऊं नये याबद्दल काळजी घेतो.हा मनुष्य वाट सोडून आपल्याला स्पर्श करतो यावरुनच आपल्याला लक्षांत यावयास पाहिजे होते " हे ऐकून शास्त्रीबुवांना फार वाईट वाटले.तेव्हा श्रीमहाराज स्वतः त्यांना घेऊन त्या स्थानांत गेले.शास्त्रीबुवांना उभे राहण्यास सांगितले व स्वतः क्षणभर डोळे मिटून उभे राहिले. तत्काळ शास्त्रीबुवांना आपल्या समोर मारुतिराय तेजोरुपांत उभे असलेले दिसले. पण ते तेज सहन न होऊन ते भोवळ येऊंन पडले.तरी पण त्या वेळी " आपले हें रुप त्यांना सहन होणार नाही तरी आपण सौम्य रुप घारण करावे." असे श्रींचे शब्द त्यांना ऐकू आले.मग श्रीमहाराजांनी त्यांना उठवले तेव्हां मारुतिराय त्यांना सौम्यरुपांत दिसले. मुक्कामी आल्यावर शास्त्रीबुवांनी ही हकिकत (कै) गं.भा.गंगूताई आठवले यांना सांगितली .
शास्त्रीबुवांचे चिरंजीव पंडित नागेश शास्त्री वडिलांनप्रमाणे प्रकांड पंडित होते.एकदां त्यांना प्लेग झाला काही केल्या उतार पडेना.डोळे मिटण्याची किंवा तोंडात कांही घातले तर गिळण्याची शक्ति राहिली नव्हती.श्री.कृष्णाशास्त्री त्यावेळी गोंदवल्यास होते तेथे त्यांना पत्र गेले.पत्र पाहून श्रीमहाराज म्हणाले , " आपण गेले पाहिजे ना ?" शास्त्रीबुवा त्यांना म्हणाले , ' मी सर्व आपले स्वाधीन केले आहे.आपणास योग्य वाटेल ते करावे.' श्रींम्हणाले "ठीक आहे रामकृपेने त्यांना बरे वाटेल." आणि त्याच वेळेपासुन नागेश शास्त्र्यांना धारवाड येथे बरें वाटू लागले.आणि ते पूर्ण बरे झाले.

पु. बाबा बेलसरेंनी एका प्रवचनात पंडित भालचंद्रशास्त्री उप्पीनबेटीगिरी  ( कृष्णशास्त्रीचें नातू ) यांच्याबद्दल उल्लेख केला होता.
(श्री भालचंद्रशास्त्री उप्पीनबेटगिरी पूज्य बाबा बेलसरे यांच्यासमवेत )

धारवाडला भालचंद्रशास्त्री म्हणून आहेत. कृष्णशास्त्रींचे हे नातू आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी मी वेंकटापूरला गेलो होतो. तेंव्हा ते बंगलोरहून आले तर कृश झालेले दिसले, म्हणून म्हटले, 'शास्त्री बुवा, आपण अशक्त दिसता!' तर ते म्हणाले 'मी कृश झालेलो आहे-अशक्त नाही'.  कारण काय? तर म्हणाले 'आठ दिवस बनारसला conference होती. त्यात राजेशशास्री प्रमूख होते. राजेशशास्री म्हणजे प्रचड विद्वता. तेंव्हा भालचंद्रशास्त्री म्हणाले 'आठ दिवस राजेशशास्त्री दूधाशिवाय कांही पीत नव्हते. मी ही तसाच राहिलो. कारण काय? तर म्हणाले, बूद्धि तीक्ष्ण रहाते'. बुद्धीला सूक्ष्मता यायला खाणे असे बेताचेच पाहिजे. एकादशीला पोट हलके ठेऊन जर नामस्मरण केले तर नामाची तार अशी लागते की बोलायची सोय नाही.
***
६.  लाईन बझार राममंदिर, धारवाड १९१५
उप्पीनबेटीगिरी, लाईनबझार, धारवाड - ५८०००१, कर्नाटक


श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेटगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड लाइन बाजार भागात दुसरे राम मंदिर स्थापन करण्यात आले आहे.
श्रीमती गंगाबाई उप्पिनबेटगिरी यांच्या जागेत हे मंदिर असून मंदिराचा बांधकामाचा खर्च गंगाबाईंनीच केला. मंदिराच्या स्थापनेसाठी श्री नारायण महाराज केडगावकर आले होते. पूर्वी रामभट्ट पुरोहित पूजा करीत असत. सध्या गंगाधरपंत कुलकर्णी पूजा करतात. दर मंगळवारी महिला भजन करतात. श्रींची स्वतंत्र उपासना येथे चालत नाही.

संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २०००
जय श्रीराम




गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

 जय श्रीराम!

आपण पाहत आहोत,
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे
४. अश्वत्थपूर राममंदिर १९१५
पो. अश्वत्थपूर, जि. मंगळूर, ५७४२६६, कर्नाटक

दक्षिण कन्नड प्रांतात कारकळ नांवाच जिल्हा आहे.त्यांत मंगळूर नावाचा तालूका आहे.तेथील देशस्थ ब्राम्हण पहिल्या पासूनच अत्यंत गरीब स्थितीत होते.साहजिकच त्यांस अत्यंत कष्टाळू जीवन जगावें लागत असे.त्यांचा तेथे चरितार्थ चालत नसल्याने गदग,हुबळी,धारवाढसारख्या शहरांत पोटासाठी स्वयंपाक पाण्यासारखे जीवनाचे साधन पत्करुन ते रहात असत.कर्नाटक प्रांतात श्रीब्रह्मानंदगुरुंचे नाव सर्वतोमुखी झाले असल्याने स्वयंपाकी,पाणके,या नात्याने त्यांना श्रीब्रह्मानंदांच्या दर्शनाचा लाभ झाला.श्री ब्रह्मानंदगुरुंचे अगाध ज्ञान,उच्च प्रतिचे वैराग्य,दया,शांति,वगैरे पाहून ते त्यांचेकडे आकर्षिले गेले व ते श्रीगुरुंच्या सेवेत निरत झाले.श्रीगुरुंना उत्सवप्रसंगी, यज्ञप्रसंगी, सप्ताह प्रसंगी,हरघडी भोजनाचे कामी या लोकांचे अपरंपार साह्य होत असल्याने श्रीगुरुंच्या ते विशेषतं नजरेंत भरले.पर्यायाने श्रीगुरु त्यांचेवर फार प्रेम करुं लागले.

बिदरहळ्ळी येथील तेरा कोटि नामजप यज्ञाचे प्रसंगी श्रीब्रह्मचैतन्य महाराज तेथे आल्यावेळी स्वयंपाक-पाण्यासाठी दोड्डारामय्या,सण्णरामय्या वगैरे प्रमुख मंडळी आपआपल्या शे-दोनशे हस्तकांसह तेथे उपस्थित झाली होती. त्यापैकी गुत्ती रामय्याने आपल्या समाजाचे उध्दारार्थ आपण श्रींच्या पुढे हट्ट धरला पाहिजे. श्रीब्रह्मानंद मनावर घेत नाहीत श्रींकडे बोट दाखवितात. ही संधि गमावतां कामा नये असा विचार सर्वांपुढे मांडला व तो सर्वांस पटला.
एके दिवशी श्रींना सुगंधी तेलाने अभ्यंगस्नान घालून श्रीब्रह्मानंद परत येत असता तुंगभद्रेच्या वाळवंटात ही मंडळी ब्रम्हानंद महाराजांच्या पायावर लोळूं लागली. *काय पाहिजे,काय झाले ?" असे विचारता आमचा उध्दार करा. आम्ही गरीब, मागासलेले, उध्दाराचा मार्ग आम्हास मुळीच माहित नाही. आमच्या गावी आपल्या हस्ते श्रीरामाची स्थापना करा.*अशी विनंती केली " बरे आहे करु या " असे श्रीबुवांकडून आश्वासन मिळवले.

सांगतामहोत्सव संपताच अश्वत्थपूरची मंडळी जरी आपआपल्या गांवी गेली तरी गुत्तीरामय्या श्रीब्रम्हानंद बुवांच्या सेवेस तेथेच राहिला, श्रीबुवांच्या आज्ञेप्रमाणे एक दोन वेळा गुत्ती रामय्याने गांवी गेल्यावेळी आपण प्रत्यक्षांत अनुभविलेल्या श्रीमहाराजांच्या व ब्रम्हानंद बुवांच्या अगाध महिम्याचे इतके रसाळ वर्णन केले की त्या मुळे त्या सर्व लोकांच्या मनांत भक्ति व प्रेम निर्माण होऊन ते श्रीरामनाम घेऊ लागले.
 त्यावेळी अश्वत्थपूर एक डोंगराळ वस्तीचा जवळजवळ निर्जन प्रदेश होता.त्यांत नुई महादेवभट्टाचे एकमेव दुकान होते. शेकडो गगनचुंबी अश्वत्थ वृक्ष पसरले होते,एक मोठा पिंपळकट्टाही होता.या गांवास पूर्वीचे नांव पिंपळ होते. वृक्षांनी गजबजलेले हे स्थानच देऊळ बांधण्यास योग्य असे ठरवून पी. नारायण अप्पांच्या आईचे वडील सुब्बरायभट्ट यांच्या अंगणातील कट्यावर गुत्तीरामय्यांनी श्रींचा फोटो व बिदरहळ्ळीस त्यांचे हस्ते मिळालेले आशीर्वाद फळ ठेवून व मंत्राक्षता ठेवून नामसप्ताह सुरु केला व त्याचे पाठोपाठ आपल्या स्वतःच्या खर्चांने हल्लीच्या देवळाचा गाभारा त्याने बांधला. त्यास सुमारे २०० रुपये खर्च आला. 

मग मात्र गावचे पुढारी लोकांस या कृत्याने चालना मिळून त्यांने देऊळ बांधण्याचा निर्धार केला. कार्यास प्रारंभही केला. देवस्थानाचे बांधकाम १९१० मध्ये संपले. गावच्या इतर विध्नसंतोषी लोकांनी नाना प्रकारे विध्ने उपस्थित करुन विरोध केला.ते रात्री लाकडे चोरण्यास गेल्यावेळी दोन वाघांनी त्यांस पळवून लावले. त्यांनी दिवसा प्रयत्न केले,ज्या लाकडाखाली हात घालावा तेथे नाग निघू लागला. अखेर त्यांना तो नाद सोडावा लागला. श्रीमहाराजच्या व बुवांच्या पाठबळानेच विध्नांचे  परस्पर निराकरण होत असे, पुढे १-२ वर्षांत गाभाऱ्यावरील व भोवतालच्या पवळीचे बांधकाम संपले. काळ्या शिलेच्या श्रीराम,लक्ष्मण,सीता व मारुति यांच्या प्रतिमा तयार करण्याबद्दल सुचनाही गेली. शिलेचे काम उत्तम सिंहासन तयार झाले. देवालयाच्या इमारतीसाठी कायमची जागाही दान म्हणून मिळविली.

या प्रमाणे सिध्दता करुन गुत्तीरामय्याने प्रतिष्ठापनेबाबत ब्रम्हानंद बुवांजवळ आग्रह धरिला, त्यांनी गडबड करु नकोस श्रींनाच बोलावू या असे त्यांस सांगून गप्प बसविले. शके १८३५ च्या वैशाख महिन्यांत श्रीमहाराज पंढरपूरास आल्यावर त्यांचा मुक्काम तेथे ३-४ महिने होणार होता.म्हणून त्यांनी ब्रम्हानंद बुवांस तिकडे बोलावून घेतले होते.

ब्रम्हानंद बुवांनी जातांना आपल्या बरोबर १०० लोक नेले होते. त्यात गुत्ती रामय्या वगैरे अश्वत्थपूरची मंडळीही होती. बुवांनी तेथे गेल्यावर गुत्तीरामय्यास श्रींना विनंती कर व मागून घे म्हणून भर दिला, "सगळ्या लोकांना घेऊन आलेच पाहिजे असा हट्ट धरुन पाय धर. तुझे काम होईल असे सांगितले. त्याप्रमाणे वेळ साधून गुत्ती रामय्याने श्रींनी ब्रह्मानंदबुवांस बोलावून घेऊन गुत्तीरामय्यास उद्देशून "मी तेथपर्यंत येण्याचा काही योग दिसत नाही. म्हणून हा ब्रह्मानंदबुवा तुमच्या येथे येऊन तुमचे कार्यकरुन देईल. तुम्ही काळजी करु नका.बुवा आला म्हणजे मीच आलो असे समजा." असे सांगितले.  पण हे कधी घडणार हे त्यांनी सांगितले नाही. या नंतर थोड्याच महिन्यानी श्रीमहाराज समाधीस्थ झाले. ब्रम्हानंद बुवांकडे बघुन त्यांच्या आधारावर वरील मंडळींनी आपले दुःख दडपले. श्रींच्या निर्वाणा नंतर एक वर्षाने आराधना व पादुका स्थापन करुन पु. बुवा वेंकटापूरला येवून राहीले. गुत्ती रामय्या त्यांच्या बरोबर कांही दिवस तेथेच होता.

गुत्ती रामय्या अजून आपल्या गांवी श्रीरामप्रतिष्ठा झाली नाही या दुःखाने मनांत झुरत होता,कारण मंदिर तयार होऊन दोन वर्षे होऊन गेली होती. मुर्तिही तयार होवून पडल्या होत्या. पु. बुवा तर " तेथील लोक दुष्ट आहेत.त्यांना भक्ती मार्ग नको, मलाही ती प्रतिष्ठा नको!  तूंच गावी न जाता येथेच राहून टाक,,"  असे सांगत.  त्यामुळे गुत्ती रामय्या मनांतून ब्रम्हानंद  बुवांवर थोडा रुष्ठ झाला होता. म्हणून की काय एकदा पु बुवा वेंकटापुराहून पायी बेलधडीस चालले असता त्यांनी गुत्ती रामय्यास आपल्या बरोबर चलण्यास आज्ञापिले असता देखील त्याने साफ येत नाही म्हणून सांगितले व तो तेथेच राहिला, श्रीगुरु आपली प्रार्थना मनावर घेत नाही. आतां गावांतील लोकांस तोंड तरी कसे दाखवू असा त्यास खेद होऊन डोंगरांतील गुहेंत उडी मारुन प्राणत्याग करण्याचा त्याने निश्चय केला. सर्वान्तर्यामी वास करणाऱ्या श्रीगुरुंना हा संकल्प ज्ञात झाला. लागलीच एक रोजगारी गड्याबरोबर त्यांनी रामय्यास उद्या सकाळपासून तीन दिवस नामस्मरणाला आरंभ करणार आहे. स्वयंपाक करावा लागेल. तरी आलेल्या गड्या बरोबर असशील तसा निघून ये."असा निरोप पाठवला.

निरुपायाने,रामय्या गड्याबरोबर बेलधडीस गेला. त्यांने श्रीगुरुंस नमस्कार करताच "वेड्या तुझ्यासाठी तीन दिवस नामस्मरण करावे लागत आहे". असे म्हटले. त्यांचे उद्गार ऐकून रामय्यास समाधान वाटले. तीन दिवसाचा नामस्मरणाचा कार्यक्रम थाटाने पार पडला, शेवटच्या दिवशी मंगलारतीनंतर रामय्याला घेऊन ते श्रीराम मंदिराकडे गेले. तेथे श्रीरामाच्या पायावर मंत्राक्षतांसह नारळ ठेवुन,तो पुन्हा हाती घेऊन प्रसाद घे असे म्हणून मंत्राक्षता,नारळ व ५ मोहरा श्रीगुरुंना त्याच्या पदरांत बांधल्या, रामय्याने आनंदाश्रू पूर्ण नयनांनी त्याचा स्विकार करुन श्रीगुरुंच्या पायावर मस्तक ठेवले. ही आनंदाची वार्ता त्याने आपल्या गांवी कळविल्याने तेथील भक्तांनी अपूर्व उत्साह वाटला.

 तेथून श्रीगुरुंनी वेंकटापूरी रामय्यासह प्रयाण केले व एके दिवशी "तुम्ही तयार केलेल्या मूर्तीना अलंकार पोषाख कांहीच घालता येत नाही तरी त्या रद्द करुन मुंबईहून दुसऱ्या आणवू या " असे श्रीगुरुंनी त्यांस सांगितले. मुंबईस दुसऱ्या मूर्ति तयार करुन घेऊन पाठविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत सीता,राम,लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती पिंपळास आल्याचे समजताच रामय्याने श्रीगुरुंशी प्रतिष्ठापनेविषयी बोलणे काढले, तेव्हा श्रीगुरुंनी "वैशाख शुध्द पंचमी अभिजित् मुहूर्त फार चांगला आहे. किंवा वैशाख शुध्द दशमी चांगला आहे. या दोन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर प्रतिष्ठा करु यां , गाजावाजा फार नको." असे त्यांस सांगितले.

रामय्याने तात्कालही वार्ता गांवी कळवली सगळ्या भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने सिध्दता सुरु केली. अभक्तांनी आपल्या कारवाया सुरुं केल्या.त्यांनी प्रथम वाजंत्री व दिवटी धरण्याऱ्या लोकांस नविन स्थापना होणाऱ्या देवालयांत वाजंत्री वाजविल्यास व दिवटी पाजळल्यास तुम्हास गांवातून हाकलून देऊ अशी तंबी दिली. ते सर्वजण भ्याले.
 
अश्वत्थपुरास (पिंपळास) वैशाख शुध्द तृतीयेस पोचण्याचे संकल्प करुन श्रीगुरु मुळगुंद व शिरहट्टी येथील वैदिकांस,गुत्ती रामय्या वगैरे अश्वत्थपुरचे लोकांस बरोबर घेऊन अधिक वैशाख वद्य त्रयोदशीचे दिवशी वेंकटापुराहून निघाले. शिरहट्टीस मुक्काम करुन दुसरे दिवशी लक्ष्मेश्वरावरुन निघाले. गुडगेरीस पोंचले व रेल्वे गाडीत चढले. दावणगिरीचे अलीकडे कनकराव अण्णेगिरी या भक्तांच्या आग्रहावरुन त्यांच्या घरी गेलें. व दुसऱ्या गाडीने निघून बिदरभद्रावतीला आले.तेथील स्टेशन मास्तर अत्यंत भाविक असल्याने त्याचे घरी श्रीगुरुंनी पूजा आरती,नैवेद्य संपवून भोजन केले.


 बिदरभद्रावतीहून निघुन श्रीगुरुं कारकळ पर्यंत बैलगाडीने गेले.दुसरे दिवशी सकाळी ते तीर्थहळ्ळी जवळील मंडगद्देला आले.पूजा नैवेद्य आटोपून भोजनोत्तर थोडी विश्रांती घेऊन तेथील नदी ओलांडून पलिकडच्या तीराला गेले.वेलीतून व काटेरी झुडपांमधून ३-४ फर्लांग अंतरापर्यत वाट काढीत गेले.तेथील सपाट प्रदेशांत एका वृक्षाखाली एक मोठी फरशी होती.त्यांस श्रीगुरुंनी नमस्कार केला व सर्वांकडून करविला,हा मांडव्यऋषींचा आश्रम. अति पवित्र स्थान आहे.अशी त्यांनी माहिती दिली. त्या फरशीची पूजा करून,नारळ फोडून, नैवेद्य दाखवून,घटकाभर "जयराम सिताराम " असे भजन करुन ते परत मुक्कामास आले.

रात्री मुळबागला जाऊन ते द्वारकापीठाच्या श्रीशंकरमठात उतरले.दुसऱ्या दिवशी रात्री वैशाख शुध्द द्वितीयेचे रात्री नालूरला आले.तेथून सोमेश्वरला येऊन पोंचले.रात्री फार पाऊस पडला. श्रीगुरु रामय्याला "विपरीत पाऊस पडत आहे.पंचमी साधते की नाही.दशमी केली तरी चालेल." म्हणाले व पाऊस थांबताच गाडीत चढले. तृतीयेस कारकळला आले. मिजारचे पाटलांनी तेथे गाडी पाठविली होती.  त्यांतुन दुपारी नाकूटला आले. तेथे शानबाग यांच्याकडे मध्यान्हस्नान,पूजा,नैवेद्य, आरती व भोजन झाले. सायंकाळी निधून संपिगे गांवाला त्यांनी मुक्काम केला.

 पिंपळहुन रामण्णामास्तर,शानभाग वगैरे शेकडो लोक वाजंत्र्यांच्या ताफ्यासह श्रीगुरुंना सामोरे जाण्यास निघाले होते.चार मैल गेल्यावर संपिगेहून येणाऱ्या एका व्यक्तीकडून "श्रीगुरुं निघाले आहेत.अद्याप तीन चार फर्लांग मागे आहेत." अशी बातमी त्यांना कळली. हर्षोत्फुल्ल अंतःकरणाने तेथेच सर्वानी श्रीगुरुंचा व श्रीरामाचा जयघोष केला. थोड्याच वेळांत श्रीगुरुंची मूर्ति दिसू लागतांच सर्वांनी त्यांस साष्टांग वंदन केले. व रघुपति राघव भजन करीत वाद्यघोषांत त्यांस पिंपळास आणले. श्रीगुरुंची राहण्याची व्यवस्था महादेवभट्टाचे दुकानांत करण्यांत आली होती.

 दुसरे दिवशी म्हणजे वैशाख शुध्द चतुर्थीस प्रतिष्ठाकार्याच्या होमहवनास प्रारंभ झाला.सकाळी सर्वांनी श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ घेतला.शृंगेरी संस्थानाहून वे.सिताराम शास्त्री यांस बोलावून घेण्यांत आले. वे.सितारामशास्त्र्यांनी येऊन श्रीगुरुंचे दर्शन घेतले. नमस्कार करीत असता श्रीगुरुंनी त्यांना "जगद्गुरु क्षेम आहेत ना ?" असे विचारले. मी चौकशी केली म्हणून त्यांस  सांगा. प्रतिष्ठापनेचे सर्व कार्य जगद्गुरु संस्थानाच्या गौरवासाठी वे.सितारामशास्त्र्यांस पुढारीपण देऊन करा ," असे बरोबरीच्या वैदिक ब्राह्मणास श्रीगुरुंनी बजावले व सर्वांनी आज्ञेप्रमाणे विधिपूर्वक सर्व कार्यक्रम पार पाडला.

 मुंबईहून आणविलेल्या मूर्ति बाहेर काढण्यांत आल्या धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास तसेच होमहवनादि सर्व कार्यक्रम विधिपूर्वक पण थाटाने उरकल्या नंतर राक्षसनाम संवत्सर निज वैशाख शुध्द पंचमी या दिवशी दुपारी बरोबर १२ वाजता,अभिजित् मुहूर्तावर अतिशय थाटाने श्रीगुरुंच्या अमृतहस्तांनी मूर्तिंचे चिरप्रतिष्ठापनेचें कार्य पार पडले. पिंपळच्या आसपास त्यावेळी सगळीकडे आनंदच आनंद भरला होता व सर्व आबालवृध्द,परमानंदभरित होऊन सारखा जयघोष करीत होते. दुपारचे कडक ऊन असून देखील हजारो लोक समारंभास उपस्थित झाले होते. ऊन्हाच्या तिरपेने सर्वांचाच घसा तहानेने कोरडा पडला होता. त्यांची असमर्थता पाहून श्रीगुरुंनी सर्वांस गूळ व पाणी देण्याची आज्ञा केली.लगेच आज्ञेची अमंलबजावणी झाली.त्याप्रसंगी तीन ढेपा गुळ लागला म्हणतात...

श्रीगुरुंनी अश्वत्थपूर व तेथील लोकांसंबधी ५० वर्षापूर्वी काढलेले उद्गार तंतोतःत फलद्रुप झाले असल्याचे पटत आहे.तेथीलसमाज उन्नतीच्या शिखरावरपोंचला आहे.देवालयाचा विस्तार झाला असुन ते बंदिस्त आहे.श्रीशृंगेरीजगद् गुरु,अनेक यति-मुनी, केडगांवचे श्रीनारायण महाराजां सारखे अनेकभगवद् भक्त थोर पंडितांनी अश्वत्थपुरास भेटी दिल्या आहेत.


जय श्रीराम




जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...