गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

' बहू मंदिरे स्थापियेली ' या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत.

२८. कऱ्हाड राममंदिर १९११
सोमवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा, ४१५११०, महाराष्ट्र
पुजारी : वासुनाना देव

श्रीमहाराज कर्‍हाडला वासुनाना देव व बापुराव चिवटे यांच्या विनंतीवरुन राममंदिराच्या स्थापनेसाठी गेले. त्यावेळी संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांचा मुक्काम तेथे होता. रामाच्या स्थापनेचा मुहूर्त चागला नव्हता असे शंकराचार्यांच्या ज्योतिषांनी श्रींना सांगितले, त्यावर श्री म्हणाले, " असे कसे होईल, मी अज्ञ, पण राम असे होऊ देणार नाही, तरी आपण पुन्हा पंचांग बघावे" त्यावर जोतिषाने पंचांग पाहून गणित मांडले, तेव्हा तो स्वत:च चकित  झाले. शुभ मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त निघाला. श्रींनी स्वामींच्या सर्व परिवारास राममंदिरात भोजनास बोलावले. स्वामींच्या विनंतीवरुन श्रींनी स्वामीणी हत्तीचे दान देण्याचा संकल्प सोडला व म्हणाले, " कोणालाही सांगून हत्ती आणावा, माझ्याकडे किंमत तयार आहे,; तोपर्यंत मठाला एक कालवड देतो, तिचा स्वीकार करावा."

कऱ्हाड येथील श्रींच्या चरित्रात अजून एक आलेला उल्लेख म्हणजे,
कऱ्हाडला आबाजीपंत नावाचे एक गृहस्थ होते.रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली,.त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीचं होत्या,सर्व मुलींची लग्न झाली,फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्यामुळे तीचे लग्न होऊ शकले नाही.पण आबांनी लवकर पेंशन घेतले, उरलेला काळ भगवंताच्या उपासनेत घालवण्याचा निश्चय केला,त्यांनी हा निश्चय केला खरा पण उपासना म्हणजे काय,ती  कशी करायची असते,भगवंताचा व आपला संबन्ध कशा प्रकारचा आहे,आत्मनिवेदन कसे करावे,इ प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत,व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाई,म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय या विवंचनेमध्ये  आबा होते.

मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत,असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले,त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि" परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय?" असा प्रश्न विचारला,रामदासी बुवांनी लगेच उत्तर दिले,"ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो,गोंदवल्यास श्री महाराजांकडे तुम्ही जा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचे खरे समाधान  होईल " असे सांगून ते लगेच निघून गेले.आबांनी श्री महाराजांचे नाव ऐकलेलं होतच,एक दोन दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले,ते आले तेव्हा महाराज शेतातून काम करून येऊन,हात पाय मातीने भरलेले असे, स्नानाची वाट पहात उभे होते.
श्री महाराजाना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम अतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दुसऱ्या दिवसा पासून श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले.मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत,त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत,पहिल्या दिवशी*भगवंत म्हणजे कायआपला आणि त्याचा संबंध काय आहे,या विषयावर निरूपण झाले,आबांना वाटले आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल,श्री महाराजांनी निरुपणात जे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या,परंतु गोंदवल्यास ते अगदी नवीन असल्यामुळे त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईनात.श्री महाराजांना सांगणे तर दुरच राहीले,दुसरे दिवशी निरुपणाला प्रारंभ करतानाच श्री महाराज बोलले" काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्या मनामध्ये नंतर काही शंका आल्या त्यांचीच आज उत्तरे देऊ." असे बोलून त्यांनी आबांची एकेक शंका मांडली.आणि त्याची उत्तरे दिली. लागोपाठ चार दिवस हा प्रकार चालला,आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या,त्या सर्व समाधानकारक
रीतीने सुटल्या.पाचवे दिवशी ,भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो,आणि ती भक्ती नामाने कशी साधते,याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले.सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती,इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले,आणि सद्गगतीत होऊन त्यांनी श्री महाराजाना साष्टांग नमस्कार घातला.श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले,आणि शांत केले,तेव्हा आबा म्हणाले"महाराज!मी आज धन्य झालो.माझ्या सर्व शंका फिटल्या.पण माझी एक इच्छा आहे.माझ्या अंतकाळी असेच आपले दर्शन होईल काय? "श्री महाराजांनी तात्काळ उत्तर दिले"आबा,तुम्हाला दर्शन होईल इतकेच न्हवे ,तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल!"
 काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी श्री महाराजांनी
त्यांना विचारले,"आबा,भगवंताच्या नामात आहात ना? "आबा बोलले," होय महाराज पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते ती अजून लहान आहे,.ती अजून लहान आहे,तिचे लग्न कसे होईल असे वाटते"यावर श्री महाराज म्हणाले" मी तिला दत्तक घेतो आजपासून ती माझी मुलगी आहे असं समजा,आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या."त्या प्रमाणे  विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले.इतपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणा मध्ये जाऊ लागला.आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कऱ्हाड ला परत जाण्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज म्हणाले," आताच काय घाई आहे?पुढे बघू."त्यावर त्यांनी "जाऊ का?" म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कऱ्हाडला गेले.
श्री महाराजांचे लक्षात ठेवण्या सारखे एक मोठे वैशिष्ट्य असे होते की कोणी त्याना प्रश्न विचारल्यानंतर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडून येई तेच त्यांचे खरे सांगणे,किंवा खरे मत किंवा खरी आज्ञा असे.त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखउन पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगत.आबांनी त्यावेळी कऱ्हाड ला परत जाणे श्री महाराजांच्या
मनात नव्हते .परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला.आबा कऱ्हाडला परत गेले,आणि सहा दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला.औषध पाणी व्यवस्थित चालू होते तरी पंधरा दिवसाच्या अवधीत ते इतके थकले कि त्यांना अंथरुणावरुन उठवेना,पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते,'श्री महाराजाना पत्र लिहून कळवावे का? 'असे विचारता ते नको म्हणाले,म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता न्हवती, एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली, आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे हे सर्वांना समजले,स्वतः त्यांनाही तसे वाटले. श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यास होते,सकाळी नऊ साडे नऊ ची वेळ,काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले .सर्व मंडळी" जय जय श्रीराम जय जय श्रीराम"असा घोष करून नाचत होती,इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पहात होते,इतक्यात ते ज्या खोलीमधे निजले होते,तिच्या पाठी मागच्या बाजूस*"जय जय श्रीराम"*असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वाना ऐकू येऊ लागला,तेव्हा श्री महाराज
खरोखरच आले असे वाटून खोलीमधली इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली,आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती ,परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले,खाडदिशी उठून उभे राहिले,आणि"अरे,बघा! श्री महाराज स्वतः आले आहेत , सर्वानी त्यांचे दर्शन घ्या,! " असे बोलून व नमस्कार करून पुन्हा निजले,पाच मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले"महाराज!आपण मला दर्शन दिले, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या,मी आनंदाने निरोप घेतो" हे शब्द बोलून त्रयोदक्षाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला
श्री महाराजांच्या कानावर हा सगळा प्रकार गेला तेव्हा ते अत्यन्त कौतुकाने म्हणाले,"आबा चांगले अधिकारी! रामाने त्यांना उत्तम गती दिली,भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते,असे लोक फार थोडे, त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही, सर्वानी त्याचे अनुकरण करावे"
आबांच्याकडुन दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई तिचे लग्न श्री महाराजांनी वासुदेव मार्डीकर नावाच्या गृहस्थाशी सालंकृत कन्यादान करून स्वतः करून दिले
**
२९. दत्तमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

धाकट्या राममंदिराजवळच श्री दत्त मंदिर आहे.या एकमुखी दत्तमंदिराची स्थापना वैशाख शुद्ध पंचमी शके १८३३ (१७ मे १९११) रोजी झाली. दत्तात्रेयाची मूर्ती लहान असली तरी रेखीव आहे.श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. #१९५९च्या_पुण्यतिथी_उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. १९९३ मध्ये या देवळाचा जीर्णोद्धार करताना समोर मोठा सभामंडप बांधण्यात आला.

**
 

 

 

 


 


 

 

 

 

 

 

 


 

 

 

३०. नृसिंहमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांचे कुलदैवत नृसिंह. त्यामुळे नृसिंह दैवताची स्थापना ही साधारण त्याच वर्षी म्हणजे १९११ मध्ये झाली.
**
 

 

 

 

 

 

जय श्रीराम

 श्रीमहाराजांचे काही ज्येष्ठ साधक

श्री अण्णासाहेब मनोहर

इ.स. १९२० मध्ये श्रीमहाराजांचे इंदोर येथील महान अधिकारी शिष्य श्री भैय्यासाहेब मोडक पुण्यात श्री वासुदेवराव फडके यांच्याकडे काही दिवस राहत होते. तिथे ते दररोज रात्री तुलसीदास रामायण सांगत असत. त्याचबरोबर श्रीमहाराज पूर्वी इंदोर येथे असतांना त्या गोष्टी हि अत्यंत प्रेमाने सांगत असत. हे ऐकण्यास पुण्यातील एक मॅकेनिकल इंजिनियर श्री अण्णासाहेब मनोहर जात असत. भैय्यासाहेबांच्या सांगण्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला कि श्रींना भेटावे असे त्यांना वाटू लागले. श्रींनी देह ठेवल्यास तोवर त्यांना माहित नव्हते. एक दिवस त्यांनी भैयासाहेबांना विचारले. आणि जेव्हा ते देहात नाहीत असे कळले तेव्हा त्यांना फार दुःख झाले आणि आता श्रीमहाराजांचे दर्शन मला कसे होईल याचा त्यांना रात्रंदिवस ध्यास लागला. तसे ते वरचेवर भैय्यासाहेबांना विचारत असत. एक दिवस भैय्यासाहेबांनी त्यांस जवळ घेऊन सांगितले की, श्रीमहाराजांस काय आवडत होते व ते कशात आहेत ते तुम्ही केले तर श्रीमहाराज तुम्हास भेटतील असा माझा भरवसा आहे. पुढे म्हणाले, कि श्रीमहाराजांस श्रीरामनामाचे अत्यंत प्रेम आहे. तरी तुम्ही त्याचा होईल तितका जप करीत जा. श्रीमहाराज तुम्हाला दर्शन देतील.असे सांगितल्यावर श्री अण्णासाहेबांनी निश्चय करून श्रींच्या भेटीची अपेक्षा ठेवून दररोज पहाटे ४ वाजता उठून अंघोळ वैगेरे आटोपून सकाळी सात वाजेपर्यंत जप करून ते कामावर जात असत.असा क्रम सुमारे पाच वर्षे चालला होता. ते अत्यंत भाविक, श्रद्धाळू, आणि चिकाटीने वागणारे होते.
पु. तात्यासाहेब केतकर म्हणतात, त्यांची खरी तळमळ श्रींचे आगमनास कारण झाली यात शंकाच नाही.

एकदा रा.अण्णासाहेब मनोहर यांस शंभर रुपयांची गरज पडली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांचेकडे शंभर रुपये नक्की होते, पण त्यांनी जेथे ते पैसे ठेवीत त्या पेट्या कपाटे सर्व शोधूनही कोठे सापडले नाहीत. ते फार अस्वस्थ झाले. दुसरे दिवशी सकाळला ते पाहिजे होते. सकाळी काही कामाकरिता ते कपाट उघडतात तो समोरच शंभर रुपयांची एक नोट पडलेली दिसली. ती दिसताच त्यांना श्रींची आठवण झाली. मन अस्वस्थ झाले हे बरे नाही असे त्यांना वाटले. श्रीमहाराज तेथे गेल्यावर त्यांनी ती नोट श्रींपुढे ठेवून सर्व हकीकत सांगितली. श्रींनी ती नोट त्यांना परत देऊन म्हटले,'असल्या हलक्यासलक्या कारणासाठी मन अस्वस्थ होणे बरे नाही. श्रीराम इच्छेने सर्व घडते ही भावना ठेवून वागावे'.

अण्णासाहेबांची मुलगी सुंद्राताई अकोल्यास रहात असे. ती फारच आजारी असल्याची तार आल्यामुळे श्री.अण्णासाहेब मंडळीसह अकोल्यास जाण्यासाठी निघून वाटेत श्री.गोंदवलेकर महाराजांकडे (वाणी अवतार) दर्शनासाठी आले. श्रींनी त्यांना अंगारा दिला व तिला आशीर्वाद सांगण्यास सांगून त्यांस निरोप दिला. ते तिथे पोहोचले तेव्हा सुंद्राताई श्वास लागलेल्या स्थितीत होती. त्यांनी तिला अंगारा लावून श्रींचे आशीर्वाद सांगितले. ती थोडावेळ शुद्धीत आली. आईवडिलांना पाहून तीला आनंद वाटला. ती म्हणली " यांतून मी वांचेन असे दिसत नाही." त्यावर अण्णासाहेब म्हणाले श्रीनी "बरे वाटेल" असे सांगितले आहे. थोड्याच वेळात ती बेशुद्ध झाली. अशा अवस्थेत ती सुमारे एक तास होती. सर्वांची आशा सुटलीच होती.   पण नंतर तिने डोळे उघडले व ती रडू लागली. तेव्हा श्री.अण्णासाहेब म्हणाले "असे काय करतेस ? रडू नये" ती म्हणाली "काय सांगू तुम्हाला मी " कितीतरी आनंदात होते.पण खाली येऊन दुःखात पडले" व पुढे सांगू लागली " माझी शुद्ध नाहीशी झाली तशी मी वर वर जाऊ लागले. सात डोंगर चढल्याचे वाटले. तेथे एक मोठा हॉल होता.त्यामध्ये मोठी तेजपुंज मंडळी बसली होती. मला कोणीतरी मध्ये उभे केले. त्या मंडळीतच श्रीमहाराज बसले होते, ते म्हणाले "हिला कोणी आणले ? हिची वेळ अजून झाली नाही. तिला खाली नेऊन पोहोचवा.मी नमस्कार केला. त्या लोकांनी मला खाली आणले आणि मी सावध झाले.मी फार आनंदी वातावरणात होते." थोडे दिवसांनी तिची प्रकृती सुधारली. श्री.अण्णासाहेबांनी ही हकीगत पुण्यात आल्यावर श्री.महाराजांना सांगितली.

शेवटी शेवटी अण्णासाहेब वाताच्या झटक्याने आजारी पडले. अंथरूणाला खिळून होते. औषधपाणी चालू होते.त्यांची व्रुत्ती अगदी शांत होती. त्याच वेऴी श्रीक्षेत्र काशीस जाण्यासंदर्भात बोलाचाली चालू होत्या.श्रीमहाराज प्रत्यक्ष या संदर्भांत त्यांच्याशी बोलले नाहीत. पण श्रींचे बोलणे त्यांस ऐकू येत होते. त्यावर्षी गोंदवल्याचा उत्सव दि.१२/१२/१९३३ रोजी होता. श्रींनी गोंदवल्यास जावे असा श्री अण्णासाहेबांचा आग्रह होता.ते श्रींना म्हणाले "आपण नाही गेलात तर पुष्कळांना बरे वाटणार नाही.लांबची मंडळी येतात.तरी आपण जावे." त्या प्रमाणे जाण्याचे ठरले. श्रींनी त्यांना भेटून सांगितले की " अण्णासाहेब धीर सोडू नका.प्रारब्धाने आलेला भोग श्रीरामक्रुपेने दुर होईल." काही काळ दोघांसही बोलवेना. श्री म्हणाले "तुमची प्रक्रुती बरी झाल्याशिवाय मी काशीयात्रेला जाणार नाही.तुम्ही आलात तर मी जाईन." गोंदवल्यास उत्सवास जाण्याचे ठरले. श्री.अण्णासाहेबांच्या मंडळींना गोंदवल्यास येता येईना त्यांचे वाईट वाटले.श्री.त्यांना म्हणाले आपण वाईट वाटू देऊं नका; तुम्ही त्या वेळी तेथे जाल (गोंदवले येथे). याचा अर्थ त्यांना काहीच कळेना. उत्सव आनंदात चालला होता. पण श्री अण्णासाहेबांच्या अनुपस्थतींतीचा सर्वांवर परिणाम झालेला दिसला. अगदी गुलाल उधळण्याचे वेळी पुण्यांत श्री.अण्णासाहेबांचे मंडळीस डोळा लागला होता. त्याच वेळी घंटेचा आवाज त्यांनी ऐकला.जांगे होऊन डोळे उघडून पाहतात तो त्यांस श्रींच्या समाधींचे दर्शन झाले.त्यांस आनंद झाला. लगेच श्रीऩीं सांगितलेल्याची आठवण झाली.

शेवटी यांना अर्धांग झाला असतां एकाने विचारलें, महाराजांनी हें असें कसें केलें असें तुमच्या मनांत येत असेल, नाहीं? त्यांच्या डोळ्यांत खळकन पाणी आलें.ते म्हणाले, छे, छे, ! हा विचार माझ्या मनाला  शिवलासुध्दां नाहीं माझ्या प्रारब्धानें हा आजार आला, पण त्यामध्येसुध्दां माझें नाम पूर्वव्रत चालू आहे, ही महाराजांची खरी कृपा होय.

जय श्रीराम !
संकलन - श्रीमहाराज कन्या

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!
' बहु मंदिरे स्थापिली...' या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत:

२६. हनुमान मंदिर, कागवाड इ. स. १९०९
कागवाड श्रीराममंदिर, पो. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव- ५९१२२३, कर्नाटक

कागवाड हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गाव.  तेथील श्री गणूबुवा शेडबाळकर उर्फ गणूबुवा रामदासी बालपणापासूनच राम भक्ती करीत. १८९५ च्या दरम्यान ते श्रींना प्रथम भेटले .पहिल्या भेटीत त्यांनी श्रींचा अनुग्रह घेतला. श्रींच्या आज्ञेवरून कागवाडला आपल्या घरात १९०२ मध्ये श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. ते गृहस्थाश्रमी होते .परंतु प्रपंचात त्यांचे फारसे लक्ष नसे. त्यांना रामाच्या सेवेची आवड होती. ते वारंवार गोंदवल्यास श्रींच्या दर्शनाला येत .

एकदा त्यांच्या मंदिरातील श्री हनुमान मूर्ती भंग पावली .गणबुवांना वाईट वाटले.म्हणून ते गोंदवल्यास गेले आणि श्री महाराजांना म्हणाले महाराज "श्रीरामा पुढे मारुती राय नाही. हे मला बरे वाटत नाही .आपण स्वतः कागवाडला येऊन हनुमंताची स्थापना करावी."यावर श्रींनी उत्तर दिले सत्य मी तुमच्या घरी येईन बरे. तुम्ही स्वस्थ असा." आज निघू उद्या निघू असे करता दोन महिने उलटून गेले तरी श्रींचे निघण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा गणुबुवानी उपवास करण्यास आरंभ केला .त्यांचे बरेच उपवास झाल्यानंतर श्री बोलले "बुवा अशा प्रकारे हट्टाने देहाला पीडा देऊ नये. आपले मन तपासून पहावे .पण मी पुढच्या दशमीला तुमच्याकडे येतो. तुम्ही आता घरी जा." श्री माझ्या घरी येणार आहेत हा सूक्ष्म अहंकार बुवांच्या मनात उत्पन्न झाल्याने, श्रींचे जाणे लांबत होते. त्यांची आज्ञा झाल्यावर बुवा कागवाडला परत गेले. समारंभाच्या तयारीला लागले .त्यांनी सर्व साहित्य आणले .मंदिर शृंगारले. सुंदर पदे रचून एक वेळा तयार केला आणि श्रींची सारखी वाट पाहू लागले. ठरल्या दिवशी श्री कागवाड ला गेले नाहीत. त्यामुळे बुवा निराश झाले आणि त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले.

श्रीमहाराज कागवाडला न जाता मिरजेस गेले आणि तेथेच त्यांचा मुक्काम बरेच दिवस लांबला. इकडे कागवाडला गणबुवांचे उपोषण सुरूच होते .मिरजेला असताना एके दिवशी रात्री बारा वाजता श्रींनी अंताजी पंत यांना हाक मारली व त्यांना सांगितले "पंत वेंकट भट्टांना बरोबर घेऊन उद्या सकाळच्या गाडीने कागवाडला जा, गणू बुवाच्या घरी.
तेथे पोहोचल्यावर बाहेरूनच मोठ्याने ओरडा की "महाराज आले". इकडे उपोषण करून सात दिवस झाले तरी श्री अजून येत नाहीत म्हणून गणूबुवानी विष प्राशन करण्याचा निश्चय केला. दुपारी तीन वाजता बुवांनी एका तांब्याच्या फुलपात्रात सोमल तयार करून पुढे ठेवले. त्यांनी एक माळ जप केला .श्रींची "ओवाळू आरती सद्गुरु चैतन्य ब्रह्मा " ही आरती म्हणून त्यांना नमस्कार केला आणि डोळे पाण्याने भरून येऊन विष पिण्यासाठी बुवांनी भांडे उचलले. इतक्यात "बुवा महाराज आले"असे शब्द त्यांनी ऐकले.भांडे तसेच खाली ठेवून त्यांनी खिडकीतून पाहिले. तर अंताजी पंत आणि व्यंकट भट्ट हे दोघे त्यांना दिसले तसेच ते धावत खाली आले आणि पंतांना त्यांनी मिठी मारली. थोड्यावेळाने भावनेचा भर ओसरला आणि आपण केवढे भयंकर कृत्य करीत होतो. पण शेवटी श्रींनीच आपल्याला त्यातून चातुर्याने वाचविले याची जाणीव बुवांना झाली व ते मोठ्याने रडू लागले. वेंकटभट्टानी विष ओतून दिले आणि सांगितले "बुवा तुम्ही काळजी करू नका .आम्हाला मुद्दाम पुढे पाठविले आहे महाराज उद्या येणार आहेत." नंतर महाराज मिरजेहून थेट कागवाड येथे आले. आणि त्यांच्या हस्ते मारुतीरायाची स्थापना झाली.

कागवाड मुक्कामी यावेळी श्रींच्या अनेक लीला घडल्या.

त्या गणुबुवांच्याकडे जी महारीण साफसफाईचं काम करायची तिने गणुबुवांच्या तोंडून अनेकदा श्रीमहाराजांचं नाव ऐकलं होत.तिला आस लागली होती श्रींच्या दर्शनाची. तिच्याकडे साधन नव्हतं.तिच्याकडे प्रयत्न होते प्रतीक्षा करण्याचे.तिला फक्त तो सद्गुरु एकदा डोळ्यांनी बघायचा होता, ती वारंवार गणुबुवांना म्हणायची की *"आपले महाराज कधी येणार आहेत,कधी येणार आहेत. आता ती एक घरातली हलक्या दर्जाची नोकराणी,म्हणून गणूबुवा एक दिवस तिला म्हणाले *"अगं तू सारखं सारखं विचारतेस की महाराज कधी येणार आहेत,काय पाहिजे तुला ?" ती म्हणाली ,'मला ना मरण पाहिजे त्याच्याकडून.मरण आणि मोक्ष हवाय मला त्याच्याकडून. बघा भगवंताची आस लागलेली ती महारीण आणि महाराजांचे ते अगदी उत्तरार्धातले शेवटचे दिवस होते.जीवाच्या करारावरती ते कागवाडला गेले.कोणासाठी गेले असतिल हो ते?
गणुबुवांच्या घरी हनूमंताच्या मुर्तीची स्थापना करणं हे एक निमित्य होतं.पण जी खरी त्यांची प्रतिक्षा करीत होती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. *त्या संतू महारिणीचे डोळे महाराजांना तिकडे बोलवत होते. ती महारीण असल्यामुळे तिला मंदिरांत प्रवेश नव्हता.घरात प्रवेश नव्हता,त्यामुळे ती बाहेर उभी होती.श्रीमहाराज म्हणाले *"बाहेर कुणीतरी उभं आहे,वाट बघतयं,त्यांना आत बोलवा."महाराजांना सांगण्यात आलं की,ती आत येऊ शकत नाही.त्यावर श्रीमहाराज म्हणाले की,ती आंत येऊ शकत नाही मी बाहेर जातो,असं म्हणून ते बाहेर जाऊ लागले.तीच्या साठी महाराज बाहेर गेलेले आहेत. बाहेर येणाऱ्या महाराजांना पाहून संतू महारणीला श्रीमहाराज म्हणजे प्रत्यक्ष मारुतीरायच आपल्या दिशेने चालत येत आहेत.असं अवर्णनीय रुप दिसु लागलं.तीने श्रीचें चरण चरण घट्ट धरले आणि म्हणाली,मायबाप आता या जीवाचे भोग सहन होत नाहीत हो.सोडवा मला यातून मला आपलंस करा.असं म्हणून रडू लागली.त्यावर महाराज तीला म्हणाले *राम तुझं कल्याण करील*असं म्हणून तीर्थाचा घोट तिच्या मुखांत घातला. *तू आता घरी जा आणि शांतातपणे राम नाम घेत पडून रहा.राम तुझं कल्याण करेल राम तुझ्या शेजारीच आहे.
त्या संतू महारणीची तयारी देखील तेवढीच होती.श्रीमहाराज येण्याच्या अगोदरच तीने प्रपंचाचे चंबूगबाळे विकुन टाकले होते.लोकांना आपला पैसा अडका देवून टाकला होता. कांही लोकांकडे पैसे देऊन माझं उत्तर कार्य तुम्ही करा बरं का पैशातून.श्रींच्याकडून.तीर्थ घेऊन ती आपल्या चंद्रमौळी झोपडीत आली,अंधोळ केली आणि फाटकं धोंगडं अंगावरती घेऊन *श्रीराम,श्रीराम,श्रीराम म्हणत झोपली.सकाळी ती कांही उठलीच नाही सकाळी महारलोक धावत जाऊन श्रींना ही बातमी सांगितली श्रीमहाज फक्त म्हणाले
"परमार्थाचा अधिकार हा बाह्यांगावरुन कधी कोणाच्या लक्षात येत नाही.पूर्व कर्मामुळे ती बाई महारीण झाली खरी पण तिचा अधिकार मोठा होता.रामाने तिचे खऱ्या अर्थाने कल्याण केलं"
**
तेथील राममंदिरापाशी एक पाण्याची विहीर असून तिचे पाणी भयंकर खारे असल्यामुळे उत्सवाच्या वेळी पाण्याचा फार तुटवडा पडे.गणुबुवांनी ही गोष्ट श्रींच्या कानावर घातली. तेव्हा ते म्हणाले" बुवा उत्सवाच्या वेळी स्वयंपाकासाठी हे पाणी घ्या. राम पाण्याला गोडी आणल." हे बोलणे सकाळी झाले. त्याच दिवशी दुपारी एक गोसावी कावड घेऊन श्रींची चौकशी करीत आला. दर्शन घेऊन त्याने आपली कावड त्यांच्या पायी अर्पण केली आणि तो म्हणाला "महाराज मै हूं श्री शंकर का भक्त! काशी की गंगा मै रामेश्वर को ले जा रहा था! पर श्री शंकरने मुझे दृष्टांत दिया और आज्ञा की कागवाड मे श्री ब्रह्मचैतन्य को गंगा दे दो! मुझे वह मिल जायेगी! इस वास्ते मै यहाॅ आया हूं! यह गंगा आपके चरणो मे रखता हुॅ! इसे कृपा करके ग्रहण कीजिए! श्रींनी त्या बैराग्याचा मोठा आदर केला. कावडी मधील गंगा सर्वांच्या अंगावर शिंपडली व सांगितले" बुवा रामाने अनायासे गंगा पाठवून दिले आहे .आपण ती विहिरीमध्ये टाकू. रामाच्या कृपेने पाणी गोड होईल." एका भांड्यात गंगा घेऊन सर्वजण "राम राम" म्हणत असता श्रींनी  ती त्या विहिरीत टाकली.  त्या विहिरीचे पाणी गोडे झाले. गोसाव्याला त्यांनी काशीला परत पाठवले.
*
मारुती स्थापने नंतर कागवाड येथे अप्पासाहेब कागवाडकर आणि मामासाहेब इनामदार यांनीही श्रींना भोजनप्रसादास बोलावले. श्रींनी त्यांना खिरीचा प्रसाद बनवण्यास सांगितले होते. येथील एक सज्जन मोरारजी भाते गिरणीवाले यांनी श्रींना घरी प्रसादास बोलावले. श्रींनी त्यांना अठरा पगड जातीच्या लोकांना जेवावयास बोलावण्याची अट घातली. त्याप्रमाणे त्यांनी उत्तमोत्तम आचारी बोलावून गावजेवण दिले. जैन आणि लिंगायतांसाठी वेगळा प्रसाद बनवला गेला. श्रीमहाराज इतके अन्नदान बघून खुश झाले आणि मोरारजीपंतांना पुत्र होईल असा आशीर्वाद दिला.
कागवाड चे एक सज्जन आप्पासाहेब पाटील यांनी श्रींना आटिव दूध पिण्यास आमंत्रण केले. बरोबर 300 मंडळी घेऊन श्री त्यांच्याकडे गेले. अप्पासाहेबांनी एक कळशी भरून अटीव दूध तयार केले होते. इतकी मंडळी आलेली पाहून काय करावे या चिंतेत ते असता श्रींनी त्यांना बोलाविले आणि सांगितले "आपण काळजी करू नये. रामाला नैवेद्य दाखवून कळशी माझ्याकडे आणून द्या." त्याप्रमाणे पाटलांनी कळशी त्यांच्यापुढे ठेवली. श्रींनी स्वतः आपल्या हाताने प्रत्येकाला  आग्रह करून आटीव दूध प्यायला दिले .सर्वांनी पोटभर दूध पिऊन दोन शेर दूध कळशीमध्ये शिल्लक उरले.
*
कागवाड येथे आप्पासाहेब पटवर्धन नांवाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्या घराण्यास एक संन्यासी पिशाचरुपाने पीडा देत असे. प्रत्येक पिढीमध्ये एकजण वेडा असायचा. आप्पासाहेबांना विसावे वर्ष लागल्यावर त्या पिशाचाचा अंमल त्यांच्यावर सुरु झाला. त्यावेळी त्यांची देहस्मृती नाहीशी झाली , झोप समूळ गेली , मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही. अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले. तेथे रात्रंदिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरुंना शरण जावे .सद्गुरु कोठे भेटतील असा विचार मनात सारखा घोळत असतां पुन्हा श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत झाला , त्यांत असे दिसले की , गोंदवल्यास मोठ्या राममंदिरामध्ये श्रीमहाराज सिंहासनावर बसलेले आहेत . इतक्यात मोठ्या दरवाजातून श्रीदत्तप्रभू स्वतः आप्पासाहेबांना हाताला धरुन घेऊन आले . श्रीमहाराजांनी उठून श्रीदत्तप्रभूंना प्रेमाने आलिंगन दिले व दोघेही सिंहासनावर बसले. तेंव्हा श्रीदत्तप्रभू म्हणाले , " याला मी घेऊन आलो आहे , हा तुमचा तुम्ही सांभाळा . " श्रीमहाराजांनी आप्पासाहेबांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि , " या , या बरं बाळ ! " असे उद्गार काढले. इतके होऊन ते दृश्य नाहीसे झाले.

              आप्पासाहेब तेथून घरी परत आले आणि गोंदवल्यास जाण्याचा विचार करु लागले . इतक्यात कागवाडांतील रामदासी यांच्याकडून त्यांना कळले की श्रीमहाराज सध्या अयोध्येला आहेत. म्हणून ते त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले . ते ज्या दिवशी तेथे पोंचणार त्या दिवशी स्वयंपाक होवून नैवेद्य झाला तरी श्रीमहाराज कांही केल्या जेवायला उठेनात . शेवटी मंडळींनी फार आग्रह केल्यावर ते पानावर जाऊन बसले , पण आपल्या उजव्या हाताला दोन पानें रिकामी ठेवायला सांगून त्यांनी सर्वांना बोलण्यात गुंतवले . अशी पंधरावीस मिनीटे गेल्यावर रामदासी व आप्पासाहेब तेथे येऊन पोंचले .

                 श्रीमहाराज जेवायला बसण्याचे कां थांबले होते हे मंडळींच्या ध्यानात आतां आले . नंतर थोड्या वेळांत त्या दोघांची स्नाने उरकून सर्वजण जेवायला बसले . जेवतांना श्रीमहाराज आप्पासाहेबांना हळूंच बोलले , " श्रीदत्तगुरुंचा निरोप मला पोंचला. " आप्पासाहेबांना अनुग्रह देवून श्रीमहाराजांनी अभय दिले. त्या दिवसापासून त्यांची मनःस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली.
**

२७.  विठ्ठल मंदिर, उकसाण -  इ. स. १९१०
पुणे-मुंबई रस्त्यापासून कामशेत जवळ, जि. पुणे, महाराष्ट्र

उकसाण गावात महाराजांच्या हस्ते विठ्ठलाची स्थापना झाली आहे. अतिशय रमणीय व निसर्गरम्य असे हे स्थान आहे . महाराजांच्या चरित्रात " महाराजांनी स्थापिलेली मंदिरे " मध्ये त्याचा उल्लेख आहे . उकसान गावी एका सद्गृहस्थांना  महारोगाची लक्षणे दिसू लागली होती. म्हणून ते निराश होते.  योगायोगाने त्याची श्रीमहाराजांशी गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याचेकडून साडेतीन कोटी जपाचे उदक सोडवले व रामाची सेवा करण्यास, गोंदवल्यास राहण्यास सांगितले.
त्यांनी इतका सपाटून जप केला कि सहा वर्षात जपसंख्या पूर्ण केली.जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली तसतशी त्यांची व्याधी झपाट्याने कमी होऊ लागली .आपण लवकरच रोगमुक्त होणार असे त्याला वाटू लागले.एके दिवशी ते श्री महाराजांना म्हणाले, 'महाराज ,आपल्या कृपेने मी आता पूर्ण बरा होणार असे मला वाटू लागले आहे.पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पूण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे.माझा देहभोग भोगून संपवायला मी तयार आहे.'

त्याचे हे बोलणे ऐकुन श्रीमहाराज प्रसन्न झाले व म्हणाले ,' नामस्मरणाने माणसाच्या वृत्तीमघ्ये अमुलाग्र बदल होतो व त्याला वैराग्य प्राप्त होते, त्याचे हे धडधडीत उदाहरण आहे. उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीला पगारवाढ तर होतेच, शिवाय मालक दिवाळीचे काही बक्षिसही देतो. तुमच्या उपासनेवर खुष होऊन दिवाळीच्या बक्षिसाच्या पोटी तुम्हाला रोग मुक्त करीत आहे, त्याचा स्विकार आनंदाने करावा. नामस्मरणाने तुम्ही जी पुण्याई संपादन केली ती अबाधित राहिली आहे.
ते गृहस्थ रोगमुक्त झाले खरे पण आता मुलीचे लग्न कसे होणार हि चिंता त्यांना भेडसावू लागली. तेव्हा श्रीमहाराज श्री भाऊसाहेब केतकर यांना म्हणाले की, "भाऊसाहेब यांची ही काळजी आपण दूर करू शकतो काय? एवढे पुण्यशील कुटुंब आहे. त्यांची मुलगी आपल्या बापूला दिली तर काय हरकत आहे"?  आणि भाऊसाहेबांची निष्ठा काय वर्णावी, ते लगेच म्हणाले," महाराज, मी आपल्या शब्दाबाहेर नाही."
लग्न ठरल्याची बातमी जेव्हा गावात कळली तेव्हा गावातील बायका भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणू लागल्या की, जाणून-बुजून विस्तवाला का जवळ करता?  विषाची परीक्षा का पाहता? त्यावर सौ. बाई  ठामपणे म्हणालया की, "त्याची काळजी श्रीमहाराजाना आहे. भाऊसाहेबांचे तृतीय चिरंजीव चि.बापूला देखील श्रीमहाराज आपले कल्याण करतील याची पूर्ण खात्री होती. पुढे काही वर्षांनी हे लग्न श्रीमहाराज हरदा येथे मुक्कामी असताना झाले.
त्या गृहस्थाच्या घराण्यात पूर्वापार एक विठ्ठल मंदिर होते. ते जीर्ण झाले होते. त्याचा जीर्णोद्धार करण्याची श्रींची आज्ञा झाली.  त्यानुसार त्यांनी नवीन मंदिर बांधले. उकसान येथील व्यापाऱ्यांनी त्यांना झालेल्या नफ्यातून नवीन विठ्ठल मूर्तीही आणल्या.
याच सुमारास मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी श्रींना आग्रहाचे पत्र पाठवून आमंत्रण केले होते. श्रीमहाराज मुंबईला जात असताना उकसान कामशेत येथे त्या व्यापाऱयांनी त्यांना थांबवून नवीन विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापनेचा आग्रह केला. त्यानुसार १९१० मध्ये श्रीमहाराजांनी स्वतः त्या मूर्तींची स्थापना केली.




 

 

 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम!

 जय श्रीराम!

बहू मंदिरे स्थापिली या शृंखलेअंतर्गत आपण श्रीमहाराज स्थापित मंदिरे बघत आहोत. तसेच त्या त्या गावी घडलेल्या घटना अभ्यासत आहोत.
या भागातली मंदिरे आहेत.

२३. आटपाडी राममंदिर १९०९
ब्राह्मणगल्ली, आटपाडी - ४१५३०१, जि. सांगली, महाराष्ट्र
यज्ञेश्वर विठ्ठल वांगीकर- पाठक बुवांनी बांधले.

श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेली गोष्ट:
आटपाडी हे श्रीमहाराजांचे दुसऱ्या सासुरवाडीचे गाव.
या दुसऱ्या विवाहाची कथा चरित्रात आली आहे.
" महाराजांच्या प्रथम पत्नी सरस्वती यांचा १८७९च्या आसपास मृत्यू झाला. पुढे वडील रावजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आई गीताबाई यांनी महाराजांना दुसरा विवाह करण्याचा आग्रह केला. महाराज तेव्हा तिशी पार केलेले होते. ते म्हणाले, ‘‘लग्नाबाबत मी तुझं ऐकेन पण एका अटीवर. मुलगी मी पसंत करीन!’’ आईनंही आनंदानं कबुली दिली. नंतर महाराज गोंदवल्यापासून बऱ्याच कोसांवर असलेल्या आटपाडी गावी, बापूसाहेबांच्या घरी आले. बापूसाहेबांचं घर तसं सुखवस्तू होतं, पण त्यांना पाच-सहा मुलीच होत्या. महाराज त्यांच्याकडे गेले व लग्नाच्या मुली दाखवा, असं म्हणाले.

 
महाराजांच्या घरी शेतीभाती भरपूर होती, कुळकर्णी म्हणूनही ते काम करीत होते. गोंदवले परिसरात अनेक जण त्यांचा सल्ला घेत. त्यामुळे महाराजांच्या परिचयाचं कुणीतरी लग्नाचं असावं, असं वाटून देशपांडे यांनी आनंदानं आपल्या मुलींना बाहेर बोलावलं. महाराज म्हणाले, ‘‘बापूसाहेब, तुमची अजून एक मुलगी आहे..’’ देशपांडे आश्चर्यानं म्हणाले, ‘‘हो पण ती जन्मापासून आंधळी आहे. तिच्याशी कोण लग्न करणार❓’’ महाराज म्हणाले, ‘‘मी करणार आहे! फक्त मी पडलो गोसावी. तुम्ही विचार करून निर्णय घ्या.’’ देशपांडे यांनी आनंदानं होकार दिला. महाराजही घरी परतले आणि आईला लग्न ठरल्याचं सांगितलं.

पुढे मुहूर्ताच्या दिवशी एकटेच आटपाडीला जाऊन यमुनाबाईंशी विवाह करून घरी आले. आई मोठय़ा उत्साहानं समोर आली तेव्हा महाराज म्हणाले, ‘‘आई, अशा मुलीशी मी लग्न केलं आहे की ही तुझी सून कधी डोळा वर करून तुझ्याकडे पाहणार नाही!’’ या यमुनाबाईंना आईसाहेब म्हणून ओळखतात. अखंड नामानं अध्यात्मातही त्यांनी फार मोठी प्रगती केली होती. त्यांच्या सात्त्विक मुखावर आगळं तेज असे.

दुसरी गोष्ट वाचनात आली ती अशी कि,
आटपाडीचें एक जोडपें श्री महाराजांच्याकडे येत असे. बाईपाशीं पंचधातूचा एक अतिशय सुंदर बाळकृष्ण होता. त्या त्याची पूजा करीत, पण आल्यागेल्यास कौतुकाने तो दाखवीत. तसें न करण्याबद्दल श्री महाराजांनीं तिला परोपरीने सांगितलें, पण बाईने तिकडे दुर्लक्ष केलें. परिणाम व्हायचा तो झाला. एका बाईने ती मूर्ती मोठ्या खुबीनें लांबवली. तिने एका जुन्या फडक्यांत ती गुंडाळली, आणि तिस-याच खोलीच्या आढ्यांत लपवून ठेवली. गोंदवल्याहून परत जातांना ती बरोबर घेऊन जावी असा तिचा हेतू होता. मूर्ती नाहींशी झाल्यावर आटपाडीच्या बाई अक्षरश: रडूं लागल्या. पुष्कळ शोध करून सुद्धां मूर्तीचा पत्ता लागेना. तेव्हां त्यांनी श्री महाराजांच्या कानावर घातलें. श्री महाराज म्हणाले,  ' याबाबत मी आगाऊ सूचना दिली होती. असो.  झाल्या गोष्टींचे वाईट वाटून घेऊं नये. श्री रामांतच बाळकृष्ण पाहावा व आपली उपासना चालू ठेवावी."

यावर बाई बोलल्या,  ' महाराज, आपण अंतरज्ञानी आहांत. माझा बाळकृष्ण कोणी नेला हें आपण जाणतां. तेव्हा तो माझा मला परत आणून द्या. ' आपल्याला अंतरज्ञान नाहीं असें श्री महाराज म्हणाले. तरी बाईचे समाधान न होऊन त्यांनी अन्न वर्ज्य केलेलं. श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण बाईंनी आपला हट्ट सोडला नाही. एक दोन दिवसांनी, मूर्ती चोरणा-या बाईला गांवी मुलगा आजारी असल्याचें पत्र आले. तें ऐकून श्री महाराज तिला म्हणाले, ' बाई, उद्या सकाळी बैलगाडी करून देतों. गांवी जाणे जरूर आहे. ' पहाटे श्री महाराजांनी वामनराव ज्ञानेश्वरींस बोलावून सांगितले कीं, ' दुपारीं दहिवडीचे मामलेदार येणार आहेत. बैठकीच्या खोलींत ते उतरतील. खोली स्वछ करून कुलूप लावून ठेवावें. ' बाईंची जाण्याची वेळ झाली तेव्हा तिनें त्या खोलीकडे दोन-तीन खेपा टाकल्या. कुलूप पाहून तिचा हिरमोड झाला. श्री महाराज बैलगाडीपर्यंत तिला पोंचवायला गेले व ती एकटी पाहून  म्हणाले,  ' बाई,  देवाची मूर्ती झाली तरी चोरी ती चोरीच. आतां झाले तें झालें. मी ही गोष्ट कोणांस सांगणार नाहीं. पण पुन्हां पुन्हां हातून असे घडूं नये अशी खबरदारी घ्यावी.'
बाईनें श्री महाराजांची मनापासून क्षमा मागितली, व ती रवाना झाली. श्री महाराज परत आले व वामनरावांना घेऊन खोलीवर गेले. ' खोली कशी साफ केली आहे पाहूं ' म्हणून उघडली व आढ्याकडे पाहून श्री महाराज म्हणाले, ' हें बोचकें कसलें आहे हो?' तें काढलें तर त्यांत बाळकृष्ण  निघाला ! आटपाडीच्या बाईंना  बोलावून श्री महाराजांनी तो परत दिला व ताबडतोब उपोषण सोडण्यासाठी सांगितलें. तो देतांना श्री महाराज एवढेच म्हणाले,  ' डाव्या उजव्या हातानें कोणी तरी ठेवला. अपहार करण्याचा कांही त्याचा उद्देश नसावा. '

२४. खातवळ विठ्ठलमंदिर, १९०९
खातवळ, पोस्ट एनकुळ, खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र
खातवळ हे श्रीमहाराजांच्या पहिल्या सासुरवाडीचे गाव.
श्रींच्या या विवाहाची गोष्ट चरित्रात आली ती अशी की
गोंदवल्याहून आठदहा कोसांवर खातवळ म्हणून एक गांव आहे. तेथें संभाजी मल्हार गोडसे या नांवाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत. त्यांच्या कुटुंबाचे नाव भागीरथी त्यांना एक सुंदर, सुशील व अति समजूतदार मुलगी होती. बरेच दिवसांपासून संभाजीपंतांचे लक्ष श्रीमहाराजांकडे होते. आपल्या आठनऊ वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास पंतांच्याकडे आले.

ते दोघे बोलत बसले असता श्रीमहाराज सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संभाजीपंतांना होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्रीमहाराजांचें लग्न झाले. या लग्नाचें वैशिष्ट्य असें की पंतांच्या हातचे शेवटचें आणि संभाजीपंतांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन, श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये आठ दिवस जणूं कांहीं मोठा उत्सव चालला होता. रोज सात-आठशे पान जेवून उठत असे. लग्नसमारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची ही शेवटचीच वारी होती, व याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून श्रीपांडुरंगाची प्रार्थना केली आणि श्रीमहाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरांत घातलें.

खातवळ येथील आणखी एक गोष्ट
येथील पाटीलबाबांची त्यांच्यावर फार निष्ठा होती. पाटीलबाबांनी दोन लग्ने केली परंतु दोन्ही बायका कालवश झाल्या आणि त्यांना मुलबाळ झाले नाही. म्हणून त्यांनी तिसरे लग्न केले. हे लग्न झाल्यावर देखील बरीच वर्षे गेली तरी त्यांना संतति झाली नाही. त्यांचे वय साठ पासष्ठ वर्षांचे झाले. यापुढे आपल्याला मुलबाळ होणे शक्य नाही असे वाटून भावाच्या मुलास दत्तक घ्यावे असे त्यांनी ठरवले. श्रीमहाराजांच्या संमतीशिवाय काहीही करायचे नाही असा पाटीलबाबांचा कडक नियम होता. म्हणून एके दिवशी आपली बायको व भावाचा आठ वर्षांचा लहान मुलगा यांना घेऊन ते श्रीमहाराजांची संमति घेण्यास गोंदवल्यास आले. दर्शन घेत असतांना श्रीमहाराजांनी विचारले, "पाटीलबाबा, हा मुलगा कुणाचा ?" ते म्हणाले, "महाराज,  हा माझा पुतण्या आहे. याला दत्तक घ्यावे असे माझ्या मनात आहे. म्हणून आपल्याला विचारायला आलो आहे." श्रीमहाराज बोलले, "का बरे ? दत्तक का घेता ?" ते म्हणाले, "महाराज, माझे वय झाले. तोंडात दात देखील राहिला नाही. आता मला संतति होईल की नाही याची शंका वाटते." त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "छे, छे, पाटीलबाबा, तुम्ही निराश होण्याचे कारण नाही. राम करील तर काय न होईल ?" असे बोलून त्यांनी एक नारळ आणण्यास सांगितले. नारळ आणल्यावर ते म्हणाले, "याला हळदकुंकू लावा आणि रामाच्या पायांना लावून आणा." तसा तो आणल्यावर श्रीमहाराजांनी नारळ आपल्या हाताने पाटीलबाबांच्या बायकोच्या ओटीत टाकला आणि बोलले, "तुम्हाला एक मुलगा होईल. काळजी करू नका. नामसमरण रोज करीत जा."

        
एक वर्षाने पाटीलबाबांना मुलगा झाला. त्याप्रीत्यर्थ त्यांनी सत्यनारायण करण्याचे ठरवून त्याप्रमाणे श्रीमहाराजांना आमंत्रण केले. पाटीलबाबांनी पंचवीस माणसांचा स्वयंपाक केला, पण दुपारी बारा वाजता श्रीमहाराज जवळ जवळ शंभर माणसे घेऊन खातवळला उतरले. इतकी मंडळी एकदम आलेली पाहून पाटीलबाबांची धांदल उडाली. इतर सर्व पदार्थ आणखी करणे अशक्य आहे असे पाहून, भात तेवढा सर्वांना पुरेल इतका करावा असे त्यांनी ठरविले. इतक्यात श्रीमहाराजांनी त्यांना बोलावले आणि विचारले, "पाटीलबाबा, काय धांदल आहे ?"  ते म्हणाले, "महाराज, स्वयंपाक कमी पडतो आहे, म्हणून आणखी भात शिजवायला सांगतो." तेव्हा श्रीमहाराज त्यांना बोलले, "असे कसे होईल ? अन्नावर रामाचे तीर्थ शिंपडा आणि आहे तोच स्वयंपाक सर्वांना वाढा. राम सर्वांना पूरवील."  दिडच्या सुमारास सर्व मंडळी जेवायला बसली.  सर्वजण पोटभर जेवली तरी पुन्हा पंचवीस पानांचे अन्न शिल्लक उरले. पाटीलबाबांनी मुलाला श्रीमहाराजांच्या पायावर घातला. त्यावेळी त्याच्या गालाला प्रेमाने हात लावून ते म्हणाले, "रामाने फार चांगला बाळ दिला आहे. हा देवभक्त होईल आणि आपल्या कुळाचे नाव राखील !"


संदर्भ: श्रीमहाराज चरित्र

 

 

२५. विखळे विठ्ठलमंदिर, १९०९
मु. विखळे, पो. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा, महाराष्ट्




 

 

 

 

 

 

 

 

 

 

या मंदिराबद्दल फारशी कोणाला माहिती नाही.
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र
सर्व फोटो गुगलवरून

जय श्रीराम!

संकलन: श्रीमहाराज कन्या

 जय श्रीराम!

श्रींचे ज्येष्ठ शिष्य

बापूसाहेब साठ्ये

श्री.बापूसाहेब साठये हे दहिवडीस सबजज्ज असताना त्यांची व श्रीमहाराजांची भेट होऊन लवकरच ते श्रीमहाराजांचे शिष्य झाले. चित्त आणि आचरण शुद्ध असल्याने लवकरच त्यांची साधनात उत्तम प्रगति होऊन ते श्रींच्या "कौन्सिल" पैकी एक गणले जाऊ लागले.

गोंदवल्यास राहायला आल्यापासून श्रींना भेटायला सतत कोणी ना कोणी येत असत. त्यावेळी बापूसाहेब साठये यांची मुनसफ म्हणून दहिवडीला बदली झाली. रोज संध्याकाळी ते लांब फिरायला. जात. त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता. शनिवारी कोर्ट सुटल्यावर ते फिरायला निघाले, त्यावेळी दहिवडीचे दोन वकील श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास निघाले होते. रस्यामध्ये गाठ पडल्यावर त्यांनी बापूसाहेबांना गोंदवल्यास चलण्याची विनंती केली व वाटेत श्रींची सर्व माहिती सांगितली. गंमत म्हणजे त्यावेळी श्री जवळ्च्या एका गावी जाण्याच्या तयारीत होते. गाडया जुंपून दाराशी उभ्या होत्या.

श्रींनी एकाला सांगितले, "अरे, दहिवडीहून कोणी येत आहे का बघा." संध्याकाळी ५॥ वाजता बापूसाहेब व दोघे वकिल गोंदवल्यास येऊन पोहोचले. वकिलांनी बापूसाहेबांची श्रींशी ओळख करून दिली. श्रींनी बापूसाहेबांचा रावसाहेब, रावसाहेब म्हणून इतका आदर केला की, ते संकोचाने अर्धे झाले. श्रींनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले. एकाने त्यांना द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली. श्रींचा प्रसाद म्हणून बापूसाहेबांनी एक घास खाल्ला. त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले. हे पाहून श्री मोठयाने म्हणाले, "अरे, रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या, काय करावे, शिंच्यांना मोठया माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही."

त्यानंतर सुमारे एक महिन्यानी दासनवमीला सर्वांना दहिवडीला जेवणाचे आमंत्रण होते. शेवटच्या पंक्तीला श्री जेवायला बसताना बापूसाहेबांची चौकशी केली, ते कोर्टाचे काम संपवून आपल्या खोलीत बसले होते. इतक्यात श्री त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले व प्रेमळपणाने म्हणाले, "रावसाहेब जेवायला चलायचे, शेवटची पंगत आहे." बापूसाहेब मनात म्हणाले, ’हा एवढ मोठा पुरुष, लोक यांना साधू मानतात, हे आपण होऊन आमंत्रण करायला आले, आता न जावे तर पंचाईत,’ म्हणून नाइलाजास्तव जेवायला गेले. त्यावेळी बापूसाहेब व्याधिच्या  भितीने बेताने जेवण जेवले. त्रास झाला नाही.

पुढे बापूसाहेबांनी श्रींना आपल्या घरी जेवावयास बोलावले. झुणका-भाकर श्रींना आवडते म्हणून तोच बेत केला होता. रामाला नैवेद्य दाखविल्यावर नैवेद्याच्या ताटातली चतकोर भाकरी व पिठल्याचा गोळा श्रींनी बापूसाहेबांना खायला सांगितला. त्यांनी तो भीतभीत खाल्ला. तेव्हापासून बापूसाहेबांची पोटदुखी कायमची थांबली. बापूसाहेबांनी श्रींचे मनापासून आभार मानले व पुढे त्यांचे खरे भक्त बनले.

बापूसाहेब साठ्ये यांना श्री महाराज एकदां म्हणाले, ' बापूसाहेब, तुमच्या आयुष्यांतील प्रमूख घटना कोणत्या तें सांगा.' यावर बापूसाहेबांनी म्हातारपणापर्यंतच्या सा-या ठळक घटना श्री महाराजांना ऐकवल्या. त्यांचे सांगणें संपल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, ' मी तुम्हाला भेटलों या घटनेला इतक्या सर्व लहान मोठ्या घटनांमध्ये कोठेंच स्थान नाहींच कां? तेव्हां कोठें स्वतःची चूक बापूसाहेबांच्या ध्यानांत आली. "

श्री.बापूसाहेब साठ्ये सोलापूरला जज्ज होते त्यावेळी त्यांना श्री महाराजानी पत्रे लिहिली आहेत. त्यांना ब्रह्मानंद महाराज व महाभागवत याना सांगितल्याप्रमाणे सत्याने वागण्याचा , व्यवहार दक्षतेचा , निर्भय , निष्काम,निरलोभ अक्रोध  वृत्तीने राहण्याचा व वागण्याचा उपदेश वारंवार केला. सरकारी कामात नेहमी सत्याने व सचोटीने वागावे व त्याप्रमाणे न्याय द्यावा असे ते बापूसाहेबांना सांगत व बापूसाहेब तसेच वागत असल्याचा श्रीमहाराजांना फार अभिमान वाटत असे. कोर्टाच्या सुट्टीत जास्तीतजास्त काळ ते श्री महाराजांना बरोबर व्यतीत करीत. श्रीबापूसाहेब साठ्ये यांना श्रीमहाराज यांनी  लिहिलेले पत्र.
        श्रीराम समर्थ
श्री रामभक्त परायण राजमान्य राजश्री बापूसो साठ्ये मुक्काम सोलापूर यास आसिरवाद विशेष लिहिण्याचे कारण की अष्टमी (गोकुळाष्टमी ) दिवशी आपलेयास रजा होती. आपण यावे असे फार मनात होते. परंतु रविवारी , सोमवारी सुट्टी परंतु मंगळवारी कामावर जायलाच पाहिजे. तर सोमवारी श्रावणी उपास सोडून गाडी मिळत नाही. अथवा तसे उपासी जात येत नाही आणि उगीच त्रास होईल सबब तस्ती दिली नाही.अस्तू  "स्मरण अंतरी ठेऊन प्रेमपूर्वक श्रीरामाजवळ विश्वास ठेऊन सरकारी काम खबरदारीने उलासयुक्त करावे कारण स्वआनंद आंतरभाय बिगडू नये. कोणास फार सलगी देऊ नये. माणूस ओळकून वागावे. भक्ती  शिवाय कोणी कोणते शहाणपण मिरविल तर त्याच वेळेस आयकू येत नाही. मी आपलेयास लेहावे असे नाही. परंतु तुमचे योग्य वागणुकीला सूचना करीत आहे." कळावे हा असिरवाद. राजारामास आसिरवाद , अभ्यास चांगला करावा. संध्या दोन वेळा, राममंत्राचा जप काहीतरी सवडी सारखा करीत जावे. सौ.माईसो यास आसिरवाद सांगावे. अखंड नामस्मरणात वेळ जावा. गोदूबाईस आसिरवाद तुम्ही मनाने जप करीत जावे.

त्यांचे चिरंजीव, यशवंत ऊर्फ राजाभाऊ, हे (लहानपणापासून अशक्त प्रकृतीचे असल्यामुळे बापूसाहेबांचा त्यांच्यावर फारच जीव होता. पुढे इ.स. १९३४ साली श्रीमहाराज (श्री.तात्यासाहेब केतकर यांच्या स्वरूपात) व बरीच भक्तमंडळी काशीयात्रेस गेली. त्यात बापूसाहेब होते. त्यांचे नातेवाईक असे बरोबर कोणी नव्हते. श्री. बाबूराव गद्रे यांच्या आईवडिलांना 'तुमची काशीयात्रा झाली, आता परत जावें,' असे सांगून परत धाडलें, पण बाबूरावांना श्रींनी म्हटले, 'तुम्ही बापूसाहेबांसाठी थांबावे.' त्याप्रमाणे सर्व मंडळी हरदा येथे पोचली. हरदा येथील मुक्कामात बापूसाहेबांना कॉलऱ्याची बाधा झाली. कॉलच्याने गाठले जुलाब वांत्या सुरु झाल्या. बाबूरावांनीं त्यांची सर्व सेवा केली. रोग तीव्रच झाला व सर्व आशा सुटली.

श्रीमहाराज बापूसाहेबांजवळ बसले व त्यांना म्हणाले, “बापूसाहेब,एकंदरीत जरा कठीणच दिसतें. राजाभाऊला तार करून बोलावून घ्यावें का?” या अखेरच्या क्षणी बापूसाहेबांची देहबुद्धि व ममत्व पूर्णपणे नष्ट झाले होते. राजाभाऊवर जीव टांगून रहाणारे बापूसाहेब ताबडतोब म्हणाले, “को महाराज तो येथे नाही तेच बरे आहे.तो समोरच असला तर न जाणो माझा जीव त्याच्यात अडकेल." काही वेळाने त्यांचे शांतपणे प्राणोत्करमण झाले.

पुढे राजाभाऊ हे आपल्या मृदु स्वभावानुसार शांत जीवन जगले. अखेरीस त्यांना लिव्हरचा कॅन्सर झाला, व हळूहळू ते अंथरुणाला खिळले. दुखण्याचा त्रास होत होता, पण बोलण्यात तक्रारीचा सूर नसे. त्यांचे कन्सल्टंट, डॉ. सरदेसाई यांनीही आश्चर्य व्यक्त केलें. शेवटच्या दिवशी सकाळी राजाभाऊ म्हणाले, 'मी मानसपूजा करतों'. कुशीवर वळले, आणि जवळजवळ नकळतच प्राणज्योत मालवली. दहनानंतर तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करताना, दोन गोष्टी आढळून आल्या. एक, जानव्याला असलेली लोखंडी किल्ली गुठळी होऊन गेलेली होती; आणि दुसरी, ती. तात्यासाहेब केतकर यांनी राजाभाऊंच्या षष्ट्यब्दिपूर्तीचे प्रसंगी दिलेली सोन्याची अंगठी बोटावर तशीच राहून गेली होती, ती पूर्णपणे शाबूत स्थितीत सापडली. ती आज त्यांचे पूजेतील देवात ठेवलेली आहे.

राजाभाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव राधाकृष्ण ऊर्फ किसनतात्या यांना ती. तात्यासाहेब केतकर यांची कनिष्ठ कन्या बाळूताई (पद्मावती) ही दिलेली होती. ही स्वभावाने अबोल असून खूप जप करी. तात्यासाहेबांच्या अखेरच्या दुखण्यात शेवटी ते बेशुद्ध झाल्याची वार्ता कळली तेव्हां बाळूताई, किसनतात्या, व अन्य एकदोन जण मुंबईस जाण्यास निघाले. चारपाच तासांच्या प्रवासात काही न बोलता बाळूताई केवळ जप करीत होती. मुंबईला पोचताच तात्यासाहेबांनी देहत्याग केल्याचे कळले.
पुढे तिला कॅन्सर झाला. संसार अर्धवटच झाला. ती शेवटी हॉस्पिटलमध्ये असताना, श्री. बापूसाहेब मराठे जे तिला अगदी लहानपणापासून ओळखत होते भेटावयास गेले असता, तिची ती अवस्था पाहून म्हणाले, "बाळूताई, तू इतका जप केला आहेस, इतके आज्ञापालन केले आहेस, तर महाराजांपाशी मागून घे ना, की मला यातून बरी करा म्हणून! तुझा शब्द खात्रीने वाया जाणार नाही.” त्यावर ती म्हणाली, "बापूसाहेब, बारीकसारीक गोष्टी तर सोडाच, पण माझ्या मुलाला त्यांनी जीवदान दिले आहे. आता आणखी काय आणि किती मागू? आता जे व्हायचे ते त्यांच्या इच्छेनुसार होऊ दे. ते मी आनंदाने पत्करीन." आणि ती आजारात गेलीच.

अशा रीतीने, नामस्मरणाने देहबुद्धि नष्ट होते याची प्रचीति पाठोपाठ तीन पिढ्यात आली. काय विलक्षण सामर्थ्य आहे श्रीमहाराजांचे! केवळ श्रींची कृपाच ही.

जय श्रीराम

संकलन- महाराज कन्या

 श्रीमहाराजांचे काही ज्येष्ठ शिष्य

श्री गणपतराव दामले

         

श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतर चाळीस - बेचाळीस वर्षे गोंदवल्याची व्यवस्था या एकट्या महापुरुषाने सांभाळली. यांचा जन्म सन १८७४ मध्ये झाला. १९०२ साली यांना श्रीमहाराजांचे प्रथम दर्शन झाले. तेव्हा त्यांचे वय २८ होते. गणपतराव दामले हे श्रीमहाराज हयात असताना त्यांचे सहवासात बराच काळ राहिले होते. श्री.दामले आरंभी पंच असले तरी श्री ब्रम्हानंद बुवांचे सरचिटणीस म्हणून काम बघत होते. भडगावकर विशेषतः गणपतराव दामले यांनी समाधीमंदिर  इ.स. १९१४, शके १८३६ मधील मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षात प्रतिपदेच्या दिवशी वेदोक्तपद्धतीने श्रीमहाराजांच्या पादुकांची स्थापना झाली.
             पहिल्या उत्सवामधे दिडदोनशे मंडळी जेवायला बसली होती. श्री. दामले मुख्य पंच होते. ब्रह्मानंद महाराज आले आणि म्हणाले, 'काय रे बरोबर चालले आहे की नाही ? त्या सर्वांना पोटभर, पोट फुटेस्तोवर खायला घाला' असं म्हणाले आणि पुढे काय म्हणाले, "त्यांना खाऊ दे म्हणाले, पण मी तुला अमृत खायला देतो. म्हणून गावातून स्वतः भिक्षा मागून आणलेल अन्न त्यांना त्यांनी खायला दिलं. हे अमृत आहे म्हणाले." - इति पु. बाबा बेलसरे (चैतन्यसुधा)

श्रीमहाराज समाधिस्त झाल्यावर पहिली दोन वर्षे श्रीब्रह्मानंदबुवांनी स्वतः येवून उत्सवाची पद्धत घालून दिली. १९१५ सालापासून  त्यांनी हे काम गणपतरावांच्यावर सोपविले , आणि अप्पासाहेब भडगांवकरांना त्यांच्या मदतीला दिले.
ही जबाबदारी स्वीकारताना, हे काम आपल्या हातून पार पडणे कठीण आहे ह्या भावनेने श्रीब्रह्मानंदांना तसे म्हटल्यावर त्यांनी सांगितले की, “ तूच काय, मी काडी उभी करीन आणि सर्व काही काडीकडून करवून घेईन. मी गोंदवल्यास कायम आहेच. जर कोणी हात उगारला तर वरचेवर धरून ठेवीन. तू पुढे होऊन कर, श्रीमहाराज कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाहीत. श्रींचे दर्शनास येतील त्यांना सारभाताला कमी करू नको. नामस्मरण, गोरक्षण आणि आलेल्यास प्रसाद (भोजन) हे श्रींचे आवडते कार्य गोंदवले येथे अखंड चालू राहिले पाहिजे.” असा त्यांनी आदेश दिला.  

श्रीमहाराजांनी वेंकटापूरबद्दल असे सांगितले आहे की एकवेळ काशीला जायचे राहिले तरी चालेल पण एकदा तरी वेंकटापूरला जाऊन यावे. १९१० साली देहात असताना श्रीमहाराज वेंकटापूरला गेले होते तेव्हां म्हणाले होते की मी आता येथेच राहतो. पुढे पू. तात्यासाहेब वेंकटापूरला गेले असतांना पेटीवर श्रीमहाराज पुन्हा मी आता येथेच राहतो म्हणाले. तिसरा प्रसंग रामेश्वरला असाच घडला. त्यावेळी श्री. गणपतराव दामले म्हणाले की आम्ही काय केले असता तुम्ही आमच्याबरोबर राहाल ? त्यावर श्रीमहाराज म्हणाले, पाणी आणा. पाणी आणल्यावर म्हणाले, संकल्प सोडा की मी माझा प्रपंच तुम्हाला दिला. त्याप्रमाणे केल्यावर ते परत आले.

श्री महाराज कागवाडला असताना उगार येथून दोन तरूण मुले त्यांना घेऊन जाण्यास आली. आपल्या बरोबरची सर्व मंडळी श्रीमहाराजांनी पुढे पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतराव दामले यांना बरोबर घेऊन धमणीमध्ये बसून श्रीमहाराज उगारला जाण्यास निघाले. कागवाड सोडून दोन मैल गेल्यावर मागून एक टांगा धावत आला. बेळगावचे मोरोपंत मराठे वकील आपल्या मित्राला घेऊन श्रीमहाराजांना भेटण्यास आले होते. श्रीमहाराज गोंदवल्यास भेटतील या अपेक्षेने मराठे प्रथम तिकडे गेले होते. तेथे कळले की श्रीमहाराज मिरजेत गेले आहेत; म्हणून ते मिरजेला गेले. तिथे कळले की श्रीमहाराज कागवडला गेले आहेत; म्हणून ते कागवाडला गेले. तेथे त्यांना कळले श्रीमहाराज उगारला गेले आहेत; म्हणून ते उगारला जाण्यास निघाले होते. मागून येत असलेला टांगा पाहून श्रीमहाराजांनी धमणी थांबवली व आपण बाहेर उतरले. मराठे व त्यांचा मित्र टांग्यातून खाली उतरले, श्रीमहाराजांच्या पाया पडले, आणि तिघेजण बाजूला जाऊन आपल्या कामाविषयी बोलले. 'तुम्ही बेळगावहून केव्हा निघालात ?' असा प्रश्न श्रीमहाराजांनी त्यांना विचारला तेव्हा मराठे बोलले,  'महाराज, आपल्या शोधात आम्ही दोन दिवस फिरत आहोत. आम्ही दोन दिवस उपाशी आहोत.' हे ऐकून श्रीमहाराज गणपतराव कडे बघून बोलले, 'यांना काही खायला द्यावे.' गणपतराव गप्प बसले तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, 'कशी रे तुम्ही माणसे ? प्रवासात नेहमी काहीतरी खायचे बरोबर ठेवावे एवढे देखील तुम्हाला कळत नाही ! हे दोघे जण दोन दिवस उपाशी, त्यांना खायला नको द्यायला ?' हे बोलणे चालू होते त्याचवेळी एक मनुष्य डोक्यावर हारा घेऊन तिकडेच येतांना आढळला. जवळ आल्यावर त्याने हारा खाली ठेवला आणि म्हणाला, 'महाराज, दिवाळीचे फराळाचे जिन्नस आपल्याला खायला घालावेत अशी माझी फार इच्छा होती. पण आपण उगारला गेलात असे कळले; म्हणून मी हे घेऊन इकडे आलो आहे.' श्रीमहाराज म्हणाले, 'वा, फार बरे झाले ! रामानेच तुला पाठवले यात शंका नाही. गणपतराव, झाडाची पाने तोडा आणि त्यावर या दोघांना खायला द्या. पण जंगलात पाणी कुठून आणायचे ? खाल्ल्यावर पाणी पाहिजे ना !'  श्रीमहाराज हे शब्द बोलून इकडेतिकडे पाहू लागले; आणि तेवढ्यात एक मनुष्य डोक्यावर घागर घेऊन येताना दिसला. जवळ आल्यावर त्याने घागर खाली ठेवली आणि तो म्हणाला, 'महाराज, ही गंगा आपल्या चरणांवर घालावी म्हणून मी आणली आहे तिचा स्वीकार आपण करावा.'  श्रीमहाराज म्हणाले,  'वा रे वा ! काय रामाची कृपा आहे ! आपण पाणी मागितले तर रामाने गंगा पाठविली !' त्यांचे बोलणे ऐकून गणपतरावांना हसू आले. खाणेपिणे झाल्यानंतर मराठे व त्यांचा मित्र निघून गेले. श्रीमहाराज धमणीत चढता चढता एक पाय पायट्यावर ठेवून गणपतरावांना म्हणाले, 'का रे, मघा का हसलास ?' गणपतराव गप्प बसले आणि श्रीमहाराज पुढे बोलले, 'अरे यात काय आहे ? ही विद्या अगदी सोपी आहे ! काल काय झाले याची आठवण करू नये, उद्या काय होईल याची काळजी करू नये, पण आज आपल्याजवळ जे असेल ते गरजवंताला देऊन टाकावे, म्हणजे राम अशा रीतीने आपल्याला पुरवितो.
               एकदा श्रीमहाराजांनी त्यांना सहकुटुंब काशीयात्रा करण्यास.सांगितले ,  तेंव्हा ते म्हणाले , '' पत्नीला मूळव्याधीची व्यथा आहे ;  ते जमणार नाही. तुमची भेट हीच माझी काशीयात्रा. '' परंतु श्रीमहाराजांच्या आग्रहावरून ते काशीयात्रेस निघाले. निघतांना एक महत्वाचा प्रसंग आहे. श्रीमहाराजांनी त्यांना फक्त ५० रु. उसने दिले होते. ते निघाले त्यावेळी श्रीमहाराज छकड्यापर्यंत निरोप द्यावयास आले होते. गणपतरावांच्या मनात विचार सुरु झाले . पन्नास रुपयांत कसे काय होणार ! तेथे दहा ब्राह्मण जेवायचे ! दक्षिणा ! हातातले सोन्याचे सल्लेच उपयोगी पडतील . हा विचार त्यांच्या मनात येताच श्रीमहाराज म्हणाले,''  गणपतराव , प्रवासात भामट्यांचा फार त्रास होतो . ते सल्ले भाऊसाहेबांजवळ काढून ठेवा. '' गणपतरावांचे विचार सुरु झाले , ' निदान हिची नथ तरी आहे ! ' तोंच श्रीमहाराज म्हणाले , '' आणि बायकांच्याही अंगावर काही असू नये ;  ती नथही काढून ठेवा. आणि ते मी दिलेले पत्र बघू  '' , असे म्हणून श्रीमहाराजांनी पत्र घेतले आणि त्यावर ताजा कलम घातला , '' यांना उसने पैसे देवू नयेत. ''  हे झाल्यावर मात्र गणपतरावांना खरा प्रकार कळला आणि साष्टांग दंडवत घालून ते म्हणाले , ''  महाराज !   अपराधी आहे. क्षमा करा.''  एका गोष्टीचा असा निकाल लागल्यावर श्रीमहाराजांनी एक पाला गणपतरावांच्या पत्नीला दिला आणि म्हणाले , '' नुसता हा पदराच्या टोकाला बांधून ठेवा. ' ' बाईंना सबंध प्रवास होईपर्यंत मूळव्याधीचा त्रास झाला नाही ;  परंतु काशीयात्रेहून  गोंदवल्यास परत आल्यावर पुन्हा मूळव्याध सुरु झाली. श्रीमहाराज म्हणाले , ''  भोग हा भोगलाच पाहिजे  ; फार तर तो लांबणीवर टाकता येतो इतकेच ! "  श्रीमहाराजांनी जी पत्रें दिली होती त्यामुळे गणपतरावांची काशीयात्रा चांगली पार पडली.

  १९१२ साली श्रीमहाराज पुण्यास आले होते ;  त्यांना निरोप देतांना  गणपतराव गाडीवर गेले होते. गाडीने शिट्टी दिली तरी गणपतराव हलेनात . श्रीमहाराजांनी त्यांचे मन जाणून म्हटले , ''  बाळ , मी तुझ्या घरी एकदा मीठभाकरी खायला येईन बरे ! '' पुढे श्रीमहाराजांनी देह ठेवला  ,त्यामुळे ते तसेच राहिले. परंतु आश्चर्य असे की , चार वर्षांनी एक दिवस श्रीब्रह्मानंदबुवा गणपतरावांकडे आले आणि म्हणाले , ''  अरे, तुझ्या घरची मीठभाकर खायची राहीली आहे ना ! '' असे म्हणून त्यांनी खरोखर चतकोरच भाकरी मिठाशी खाल्ली. श्रीमहाराजांनी ते कबूल केले त्यावेळी बुवांना काही माहीत नव्हते. ही गुरु - शिष्यांची एकात्मता आणि अनन्यता !

              लो. टिळकांचीही गणपतरावांवर मर्जी होती. गणपतराव पुढे म्युनिसिपल कौन्सिलर झाले. त्यांची गांवातील प्रतिष्ठा वाढली. पण दुष्काळ पडला असतां गोंदवले संस्थानच्या गाईंसाठी गळ्यांत पिशवी अडकवून भिक्षा मागण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांची पाचही मुलें श्रीमहाराजांच्या कृपेने अगदी परमार्थपरायण आहेत.
**
एकदां गोंदवले येथे श्रीब्रह्मानंद महाराज, श्री. भाऊसाहेब केतकर व श्री. गणपतराव दामले बसले असतां श्रीमहाराज लंगोटी लावून व कुबडी कमंडलु घेऊन स्नानाहून येतांना दिसले. तेव्हां श्रीब्रह्मानंद म्हणाले, 'ते कोण आहेत पाहिलेत का ? प्रत्यक्ष श्रीराम आहेत,' तेव्हां श्री. भाऊसाहेब म्हणाले, 'तुम्हांला ते राम असतील. आम्हांला ते साधे मनुष्यच दिसतात.'
         'मी खरा कोण आहें हें कोणीहि ओळखलेलें नाहीं. जर कोणी रतिभरच ओळखलें असेल तर एक फक्त ब्रह्मानन्दानें असें श्रीमहाराज म्हणत.'
               ---------कै. श्री. गणपतराव दामले
**
श्रीब्रह्मानंद महाराजांनी गणपतराव दामले यांना तिसऱ्या पुण्यतिथीचे वेळी एक 'अक्षय पिशवी' त्यात रुपया घालून दीली, व 'उत्सवाचे अगोदर कोठीपूजनाचे वेळी ह्या पिशवीची पूजा कर म्हणजे काही कमी पडणार नाही' असे संगितले. तेंव्हापासून दरवर्षी ह्या पिशवीची  कोठीपूजनाचे वेळी पूजा होते.
रीब्रहानंदांनीं सांगितल्याप्रमाणें जोंवर उपासना चालू आहे तोंवर काहीं कमी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीं. ते त्यांच्या पत्रात रा. तात्यासाहेंब दामले यांस लिहीतात की,
  'अनुग्रहीत मंडळींच्याकडून येणाऱ्या गुरुदक्षिणेंतून सर्व खर्च करावा. जास्त मिळाल्यास लाडूपोळ्या कराव्या. कर्ज करू नये.'    

श्रीब्रह्मानंदांनी गणपतराव दामले यांना सांगितले की गुरुदक्षिणेतून उत्सव करीत जा, व गोंदवल्यास दरमहा जेवढी रक्कम लागेल तेवढी अनुग्रहीतांकडून जमा करुन गोंदवल्यास पाठवित जा.
*
गोंदवले संस्थानचे (श्रीमहाराजांच्या समाधीमंदिराचे) भूतपूर्व पंच (ट्रस्टी) कै. गणपतराव दामले यांची एक गोष्ट इथे फेसबुकवरच वाचनात  आली,  ती ही की ते त्यांच्या घराच्या (नारायण पेठ, पुणे) तळमजल्यावरील समोरच्या ओटीवर बसले असता पाठीमागचे बाजूस असलेल्या जिन्यावरून काहीतरी जमिनीवर जोराने पडल्याचा धपकन् असा आवाज आला. आवाज कसला म्हणून मागे पाहिले तेव्हा एक १२-१४ वर्षांचा मुलगा पुढे आला. त्यांनी त्याला आवाज कसला म्हणून विचारले, तेव्हा 'जिन्यावरून सदरा खाली पडला' असे तो म्हणाला, पण नुसत्या सदऱ्याचा आवाज एवढा मोठा कसा असे विचारल्यावर तो म्हणाला, 'सदऱ्यांत मी होतो'. याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातील सर्व कर्मे आवाज करीत नाहीत म्हणजे (सुख किंवा) दुःख देत नाहीत; परंतु त्यांत असलेला माणसाचा 'मी' म्हणजे मीपणा (म्हणजेच कर्तेपणा) दुःख देतो. सर्व दुःखाचा आवाज त्या मीपणामुळे - कर्तेपणा आपल्याकडे घेतल्यामुळे आहे.

**
श्रीमहाराज देहात असताना ७५ चे वर गाई गोशाळेत होत्या. ते वारंवार गोशाळेत जाऊन गाईंची व्यवस्था नीट होते आहे ना याची खात्री करून घेत. अभ्यंकर, भवानराव, ह्यांना तीच सेवा दिली होती. त्यानंतर गाईंची सेवा विश्वनाथबुवा, बसाप्पा ही मंडळी करत. पाठकमास्तर, गणपतराव जोशी, इत्यादी मंडळीही गाईंचेकडे लक्ष देत.
         श्रींचे निर्याणानंतर एकदा मोठा दुष्काळ पडला व गोशाळेतील गाईंना कडबा नाही अशी अवस्था झाली. वाहतुकीची साधने नसल्यामुळे दुसरीकडून कडबा आणणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी हे गायींचे मोठे खिल्लार पुण्यास आणले. तळेगावजवळ तळवडे येथे गणपतराव दांमले यांची जमिन होती. त्यातुन कडबा-गवत पुण्यास आणत. शिवाय इतरत्र हिंडून कडबा गोळा करीत. शनीच्या पाराचे मागील बाजूस एक बखळ होती. तेथे या गायी ठेवल्या होत्या. त्यावेळी वासुदेवराव फडके व गणपतराव दामले यांनीही इतरांचे बरोबर गळ्यात पेटी अडकवून गोरक्षण मदत जमा करुन गाईंचे रक्षण केले.

  ही साधारण १९३० सालातील गोष्ट आहे. श्रीमहाराज  [वाणीरुप  अवतारात] काही मंडळीच्या बरोबर कर्नाटकात गेले होते.त्यात रा.गणपतराव दामले पण होते.  
         श्रीगोंदवल्याचा वार्षिक (पुण्यतिथी) उत्सव जवळ आला होता. तेंव्हा गणपतराव दामले श्रींस म्हणाले कीं, "उत्सव अगदी जवळ आला आहे, उत्सवाची सर्व तयारी करावयाची असते, धान्य वगैरे सर्व घेऊन ठेवावें लागते." वगैरे सांगून जाण्याची परवानगी मागत होते. त्यावर श्रीमहाराज [ पेटीवर] म्हणाले कीं  'आतांपर्यंत तुम्हींच उत्सव केला असें तुम्हांस वाटतें काय? आपण निमित्ताला कारण आहोंत. श्रीरामकृपेनें सर्व काहीं होईल. तुम्हीं काळजी करुं नये व यापुढें श्रीराम कर्ता हें जाणून तेथें सेवा करावी'. थोडे  दिवसांनी सगळी मंडळी पुण्यास परत आली.

श्री. गणपतराव दामले चाळीस वर्षे इथे गोंदवल्याला पंच होते. पुढे त्यांचे गुडघे दुखायला लागले. गोंदवल्यास येता येत नसे. तेव्हां म्हणायचे, "मेल्यानंतर मी पहिल्यांदा गोंदवल्याला जाणार. आपलेही तसेच होणार हे निश्चित ! तिकडे आपला बारावा, तेरावा दिवस चालू असला तरी आपण गोंदवल्यात असणार ! "
काय तयारी होती या साधकांची. श्री महाराजांनी कसे लोक तयार केले हे यातून जाणवते.

जय श्रीराम,

संकलन - श्रीमहाराज कन्या

 जय श्रीराम!

गेल्या १०० वर्षांत गोंदवले संस्थानचे प्रथम पासून खालील पंच आजपावेतो होऊन गेले.
श्रीब्रह्मानंद महाराज, श्री आप्पासाहेब भडगावकर, श्री बापूसाहेब साठ्ये, श्री तात्यासाहेब चपळगावकर, श्री पागा फडणीस, श्री गणपतराव दामले, श्री. मनोहर, श्री. दत्तोपंत तबीब, श्री. दत्तोपंत खाडीलकर, सरदार गिरवीकर, श्री. टेंबे, श्री. जगन्नाथपंत आठवले, श्री. गोपाळराव कर्वे, श्री. गोपाळस्वामी, डॉ. रघुनाथराव घाणेकर, श्री. अण्णासाहेब गाडगीळ, श्री. बापूसाहेब दामले, श्री. बाळासाहेब पाठक, श्री. सुरेशराव बोन्द्रे, श्री. वसंतराव मिजार.

(संदर्भ: श्रीगोंदवलेकर महाराज ऑफिशियल वेबसाईट.)

हे श्रीमहाराजांचे शिष्योत्तम. यांच्याबद्दल जी माहिती श्रीमहाराज चरित्रातून किंवा चैतन्य स्मरण विशेषांकातून ती बघूया.
पूज्य ब्रम्हानंद बुवांबद्दल सर्वांना माहित आहेच. तरीही पुढच्या भागात अजून काही माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

१) अप्पासाहेब भडगावकर

श्रीमहाजांच्या चरित्रात अनेकदा श्री अप्पासाहेब भडगावकरांचा उल्लेख येतो.
 श्रीमहाराजांनी १९१२ साली आपल्या मिळकतीचे एक व्यवस्थापत्र करून श्रीब्रह्मानंद, आप्पासाहेब भडगावकर, बापूसाहेब साठ्ये व तात्यासाहेब चपळगावकर यांना ट्रस्टी नेमले व सर्व मिळकतीचा श्रीरामदेव संस्थान हा ट्रस्ट केला. त्यांचेनंतर वरील ट्रस्टींनी सर्व इस्टेट ताब्यात घेतली. समाधीचे बांधकाम चालू असताना आप्पासाहेब भडगावकर यांनी स्वतः गोंदवल्यास राहून आपल्या देखरेखीखाली काम करून घेतले.
 
          लिंगोपंतांपासून श्रीमहाराजांच्या कुटुंबीयांचे पंढरपूरला वळण होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्रीमहाराजांचे जाणे-येणे विशेष असे. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्रीमहाराजांची भारी थट्टा करी. तो नेहमी त्यांना म्हणे,"तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास यामध्ये काय साधलेस ? आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही." यावर श्रीमहाराज उत्तर देत, "दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष मात्र गटारात लोळत असतो; तशी तुझी अवस्था आहे."
       श्रीमहाराजांनी आईला मरायची विद्या दाखवल्यानंतर थोड्या दिवसांनी कार्तिकी एकादशी आली. त्यासाठी पंढरपूरला जावे म्हणून एकादशीला दहा-बारा दिवस अवकाश असतानाच श्रीमहाराज गोंदवल्याहुन निघाले. ते भडगावकर यांच्या घरी आले तो त्यांचा एकुलता एक मुलगा विषमाने आजारी असल्याचे त्यांनी पाहिले. श्रीमहाराज अहोरात्र त्या मुलाजवळ बसून असत व त्याच्या आईबापांना धीर देऊन औषध-पाणी उत्तम रीतीने करायला लावीत. त्या मुलाचे श्रीमहाराजांवरती प्रेम होते आणि इतक्यात तापामध्ये देखील तो नामस्मरण करीत असे. तापाच्या विसाव्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला तेव्हा श्रीमहाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतला आणि अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्रीमहाराजांनी बैरागी होऊन काय साधले याची खरी कल्पना त्या रात्री मुलाच्या आईबापांना आली. त्या दुखी आईबापांचे खरे सांत्वन करण्याचे काम श्रीमहाराजच करू जाणे. परंतु तेव्हापासून भडगावकर मंडळी त्यांना फार मानू लागली आणि त्यांच्यापैकी आप्पासाहेब यांनी तर श्रीमहाराजांना सर्वस्व अर्पण केले.

श्रीमहाराज व पंढरपूरच्या भडगांवकर कुटुंबाचा जुना ऋणानुबंध असून श्रीमहाराज पंढरपूरी अप्पासाहेबांच्या घरीच उतरत असत. अप्पासाहेब स्वभावाने कडक असले तरी कोठेही गोंधळातून व्यवस्था निर्माण करण्याचे चातुर्य आणि वाह्यात माणसांना वळणावर आणण्याचे सामर्थ्य , हे गुण त्यांच्यापाशी होते. श्रीमहाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत आणि महत्वाची कामें त्यांच्या अंगावर निर्धास्तपणे टाकीत. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यावर अप्पासाहेब लगेच पंढरपूरहून गोंदवल्यास आले आणि पुढील सर्व गोष्टी स्वतःच्या नजरेखाली त्यांनी करवून घेतल्या.
श्रीमहाराजांच्या वेळेला अशी माणसे होती की बाहेरून कडक दिसली तरी आतमधे प्रेम होते. श्री. आप्पासाहेब भडगावकर बोलतांना शिव्या देत पण आतून किती प्रेम होते ! आपण जाणार असे ज्यांना श्रीमहाराजांनी सांगितले होते त्यामधे ते एक होते. श्रीमहाराज गेले त्याच संध्याकाळी आप्पासाहेब पंढरपुराहून आले आणि त्यांनी सगळीकडे कुलुपे लावली; नाहीतर गोंदवल्याची वाताहत झाली असती.
           दासबोधाचे मर्म ते मोठ्या खुबीने स्पष्ट करुन सांगत. त्यांचे भजन देखील फार गोड व रसाळ असे. एका एकादशीला थोरल्या रामासमोर अप्पासाहेबांचे भजन फारच रंगले . त्यावेळी श्रीमहाराज इतके प्रसन्न झाले की स्वतःच्या अंगावरचा फरगोल काढून त्यांनी अप्पासाहेबांच्या अंगावर घातला. असा बहुगुणी साधकवृत्तीचा माणूस परमार्थात काहीसा मागे पडला. आपल्यानंतर श्रीमहाराजांपाशी येऊनही श्रीब्रह्मानंदबुवा पुढे गेले याबद्दल अप्पासाहेबांच्या मनात थोडे वैषम्य होते. त्यांनी एकदा श्रीमहाराजांना स्पष्टच विचारले , ' महाराज, मला आपण तीन अवस्थांच्या पलीकडे कां नेत नाही ? ' त्यावर झट्दिशी श्रीमहाराज म्हणाले , ' तुमचा पैशाचा, वस्तूंचा , लोभ अजून सुटत नाही म्हणून ! '
              श्रीमहाराज हुबळीला गेले त्यावेळी बरोबर अप्पासाहेब होते. रोज रेशमी कफन्या , शालजोड्या , फरगोल, माळा , मिठाई , वगैरे पुष्कळ वस्तु श्रीमहाराजांच्या पुढे येत. गरीबांना बोलावून श्रीमहाराज त्या सगळ्या वाटून टाकीत. हे काम अप्पासाहेब करीत. पण एक फारच सुंदर जरीची रेशमी कफनी कोणीतरी श्रीमहाराजांना अर्पण केली , ती त्यांनी घालावी म्हणून अप्पासाहेबांनी ती घडी एका उशीत दडवून ठेवली. हुबळीहून निघतांना श्रीमहाराज म्हणाले, ' अप्पासाहेब, इथे आलेले सगळे वाटून टाकले ना ? ' त्यावर ते नुसते ' होय ' म्हणाले. पंढरपूरला येईपर्यंत आणखी अशाच वस्तु जमल्या. श्रीमहाराजांनी त्यादेखील गरीबांना वाटून टाकल्या. शेवटी अग्निहोत्री नांवाचा माणूस आला , त्याला देण्यास काही उरले नाही . तेंव्हा अप्पासाहेब म्हणाले , ' शेजारच्या दुकानातून शालजोडी घेऊन येतो. ' त्यावर श्रीमहाराज स्मित करुन म्हणाले , ' आणण्याची जरुर नाही .उशीत काही आहे का ? ते द्यावे . ' अप्पासाहेबांनी मुकाट्याने ती सुंदर कफनी काढून आणली व श्रीमहाराजांच्या पायावर डोके टेकवून त्यांच्या हातात दिली. अग्निहोत्र्यांच्या अंगावर ती घालून श्रीमहाराज म्हणाले , ' ही कफनी यांना कशी शोभून दिसते नाही ! '
श्रीब्रह्मानंदबुवा व अप्पासाहेब या दोघांनी गोंदवल्याच्या पुढील व्यवस्थेला प्रत्यक्ष रुप दिले.

श्रीब्रह्मानंदबुवा आणि श्री अप्पासाहेबांचा अपार स्नेह होता. त्यामुळे त्यांच्यात प्रेमाने शिव्या देणे वगैरे होत असे. या संदर्भात वाचनात आलेली गोष्ट अशी कि श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथी वेळेस श्री ब्रह्मानंदबुवा गोंदवल्यास आले होते. राम मंदिरात उत्सवाची तयारी सुरु होती. थोरल्या रामाच्या बाजूला श्रीमहाराजांचा कोच ठेवला आहे.[जो अजुनही तसाच ठेवला आहे.] तेथे अप्पासाहेब भडगावकर कुणाशी तरी बोलत उभे होते. बोलता बोलता ते त्या कोच्यावर किंचितसे बसले व टेकणार तेवढ्यात ब्रह्मानंदबुवांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी एक शिवी देऊन 'उठ तेथून उठ' म्हटले.अप्पासाहेब गडबडून उभे झाले.  पण आता ब्रह्मानंदांनी चांगलेच खडसावल्याने ते गडबडून गेले. ब्रह्मानंदबुवा अप्पासाहेबांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले 'अरे कुठे बसतो आहेस? जळून गेला असता त्यांच्या तेजाने.' सत्पुरुषाचे स्थान त्याच्या अस्तित्वाने एवढे भारलेले असते की तेथे सामान्य व्यक्ती अनवधनाने जरी बसला तरी त्यास ते तेज सहन होणार नाही.
श्री ब्रम्हानंद बुवांनी श्रींच्या आज्ञेने बिदरहळ्ळी येथे तेरा कोटी जपानुष्ठानास प्रारंभ करण्यास श्रीमहाराजांना आमंत्रण केले होते. श्रींना इतर कार्यामुळे तिकडे जातां येणे शक्य नव्हते.म्हणून त्यांनी जपानुष्ठानास प्रारंभ करण्याचें आज्ञापत्र आपले विश्वासू शिष्य अप्पासाहेब भडगांवकर,भाऊसाहेब केतकर  आप्पासाहेब घाणेकर यांच्या हाती देऊन त्यांस तिकडे रवाना केले.ते पत्र पुढील प्रमाणे.
!! श्रीरामसमर्थ !!
"सर्व उपमायोग्य रा.रा.रामभक्त परायण ब्रह्मानंदबुवा यांस आशीर्वाद"
वि.लिहिणेचे कारण तेरा कोटी श्रीराममंत्राचा जप करणारे भक्तराज व ब्रह्मानंद महाराज तुम्ही; महाभागवत,जप करणारे मंडळी यांनी या कलियुगांत थोर केले अनुष्ठान त्याने प्रसन्न माझे अंतकरण. "मी सदा सर्वदा तुमचे आधीन ! तुम्ही सर्वत्रांनी एक करावे काम ! लौकिकी वासनेचा करुनि त्याग ! माझे सांगणे मानावे प्रमाण ! संतोषानें सुप्रसन्न चित्त करुन,तुम्ही ब्राम्हण भोजन,उत्सव,पुरश्चरण,जे कांही तुम्हास दिसेल,जे योग्य असेल ते सत्कर्म करावे.इकडून अप्पासाहेब,घाणेकर, भाऊ साहेब पाठविले आहेत.तर अप्पासाहेब भडगांवकर यांस मी समजून करावे.मीच समजून करावे आरंभ ! त्यांचे म्हणण्याप्रमाणे करावे वर्तन ! मी तुम्हांस सर्वांस येऊन दर्शन देईन यांत शंका नाही.आता हे ऐकावे वचन ! प्रारंभास विलंब न करावा क्षणभर ! जप करणारे मंडळीस, भागवतास,ब्रह्मानंदास हेच मागणे आहे एक. मी आल्यापूर्वी अप्पासाहेब,घाणेकर पोंचल्याबरोबर करावा प्रारंभ. सामान वाया जाऊं देऊं नये.यांत फार अर्थ आहे.समक्ष समजल्यानंतर वाटेल खरे ! लौकिकी भावार्थ सोडूनि द्यावा ! आरामाचा राम जोडावा ! सत्कर्मास हजारो विध्ने असतात.परंतु सर्व एका बाजूला ठेऊन शेवटाला नेण्याचा यत्न करावा.प्रारंभ करण्यात उशिर न लावावा.हा आशिर्वाद. बाकी मजकूर भाऊसाहेब,घाणेकर,सांगताना कळेल.आशीर्वाद .
ता.क. तुम्हास सांगितल्याप्रमाणे मी येऊन घटकाभर तुम्हास भेटेन यांत संशय नाही.पत्राप्रमाणे सर्वत्र मंडळींनी वागावे यांत फार खरे आहे.उगीच हाट करु नका.माझे आज्ञामोडू नका.हा आशीर्वाद .
             ब्रह्मचैतन्य गोंदावले.
या श्रींच्या पत्रावरून श्री अप्पासाहेब भडगावकर यांचा अधिकार लक्षात येईल.

श्रीमहाराज गेले तेव्हां श्री. गणपतराव दामले त्यांच्या एका मित्राबरोबर पुण्याहून सायकलवरून गोंदवल्याला गेले. ते तेथे पोहोचले तेव्हां श्रीमहाराजांचा देह चितेवर ठेवला होता. ते आले आहेत असे कळताच अग्निसंस्काराच्या ठिकाणी ते पोहोचण्यापूर्वीच श्री. आप्पासाहेब भडगावकरांनी त्या दोघांना श्रीमहाराजांचे दर्शन घेऊ न देता परत पाठवले! पुढे एकदा यासंबंधी बोलतांना श्री. आप्पासाहेब म्हणाले, गुरूंना जळतांना पाहू नये; ते आता नाहीत अशी भावना होते.
        --------- प्रा.के.वि. (पू.बाबा) बेलसरे              *
संबंध: अध्यात्म संवाद, (भाग-२) पान११०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

जय श्रीराम!
संकलन - श्रीमहाराज कन्या

 श्रीराम समर्थ

श्री दादाजी नारायण मोकाशी हे श्री महाराजांचे सख्खे मामेभाऊ. तर गोपाळराव मोकाशी हे श्रीमहाराजांचे चुलत मामेभाऊ.
श्रीमहाराजांच्या आई गीतामाईंनी श्री गोपाळराव व श्री दादाजी मोकाशी यांना गोंदवलेस बोलावून घेतले व श्रींना गोंदवलेस परत आणणेसाठी त्यांना इंदूरला पाठवले.  त्याप्रमाणे ते श्रींना घेऊन गोंदवलेस आले.

श्री दादाजी यांनी श्रींना पत्र लिहून दिनक्रम कसा असावा असे विचारले होते. त्यास श्रींनी उत्तर दिलेः

[१] दोन गायी सांभाळाव्यात,
[2] जी शेती आहे ती नीट करावी,
[३] रोज भगवद्-गीतेचा एक   
     अध्याय वाचावा, व
[४] रोज रात्री श्रीराममंदिरात
     आरतीस जावे.

 यात चूक झाल्यास त्या दिवशी चार आणे श्री गोपाळराव पुजारी यांजकडे दंड म्हणून द्यावेत.

  श्री गोपाळ लक्ष्मण मोकाशी हे मूळ कलेढोणचे!  पुढे पुण्यात राहून ते मॕट्रिक झाल्यावर मामलेदार म्हणून नोकरीस लागले. .* नंतर श्रींनी गोपाळराव यांस नोकरी सोडण्यास सांगितले व आपले मिळकतीचे रा गोपाळराव यास कुलमुखत्यार नेमले. परिणामी श्रींचे जमिनीबाबत सर्व व्यवहार गोपाळराव पाहू लागले. त्यामुळे समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली. १८९० साली श्रीराममंदिर बांधण्याचे श्रींंनी ठरविले व सर्व जबाबदारी गोपाळराव यांचेवर पडली. गोपाळराव हे थोरले रामाचे पुजारी होते. ते उत्तम पोषाख करित व यथासांग पूजा करत. ती पूजा श्रींना फार आवडे.  रामरायाचे डोळ्यातून ३वेळा अश्रू आले त्यावेळी गोपाळराव हजर होते.
          गोपाळरावांकडे श्रींचा एक पडलेला दात होता. तो त्यांनी नंतर रामरायाचे पायाचे अंगठ्याजवळ खोदून बसविला व त्यावर चुना सिमेंट लावले. त्यामुळे श्रींचे वास्तव्य आजही दाताचे रूपाने थोरले राममंदिरात आहे.
               *****
संदर्भः चैतन्य स्मरण २००५ मधील ना बा अत्रे यांचा लेख, पान ९१/९२
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

श्री गोपाळराव मोकाशी यांच्याबद्दल अजून एक गोष्ट श्रींच्या चरित्रात आली आहे, ती अशी की
"जो श्रीमहाराजांचे मुकाट्याने ऐकत असे त्याचे कल्याण श्रीमहाराज करीत यात नवल नाही, पण जो हट्टाने त्यांचे ऐकत नसे, त्याच्या बाबतीत सुद्धा पुष्कळ प्रसंगी ऐन वेळेला आपल्याला पाहिजे तसे घडवून आणीत. गोपाळराव मोकाशी यांचे लग्न करण्याचे चालले होते. त्याला पसंतीसाठी दोन मुली समोर होत्या. एक गोरी व दुसरी काळी होती. तो म्हणे, 'मला गोरी मुलगी पाहिजे.' श्रीमहाराज त्याला काळी मुलगी पत्करण्यास सांगत होते. होय, नाही करून एकदाची दोन्ही मुलींची लग्ने ठरली. दोन्ही नवरे व नवऱ्या बोहल्यावर आले. मंगलाष्टके सुरु झाली. आता अक्षता पडणार इतक्यात श्रीमहाराज लगबगीने आले आणि त्यांनी झटकन मुलींची अदलाबदल केली !  काय झाले हे लोकांच्या लक्षात येण्याच्या आधीच अक्षता पडून माळा घातल्या गेल्या. गोपाळरावांना फार वाईट वाटले. पण बाकीच्यांना आपल्या मनासारखे झाले असे वाटले. चार महिन्यांनी त्या गोऱ्या मुलीचा नवरा एकाएकी वारला. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, 'गोपाळराव, पुढे काय प्रसंग होता कळले ना ! मी सांगतो ते ऐकत जावे. उगीच भरीला पडू नये.'
      

।। श्रीराम।।

जय श्रीराम

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

'बहु मंदिरे स्थापीयेली', या श्रृंखलेअंतर्गत आपण ओळीने वर्षानुसार श्रीमहाराज स्थापित विविध मंदिरे तसेच त्यांच्या आज्ञेने त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेली मंदिरे अभ्यासत आहोत, तसेच त्या त्या ठिकाणी घडलेल्या आणि श्रीमहाराज चरित्रात उल्लेख आलेल्या घटना प्रसंग, बघत आहोत.
यात पुढची मंदिरे खालीलप्रमाणे:
*****
२०.  दत्तमंदिर, सातारा १९०८
१८६, रामाचा गोट, सातारा - ४१५००२, महाराष्ट्र


गोविंदशास्त्री पुराणिक यांनी श्रींच्या आज्ञेने हे मंदिर बांधले आणि चालवले.
*****
 

 

 

 

 





 

 

 

 

 

 

 

 

 

 ****

२१.  हुबळी राममंदिर, १९०९
सी.बी.टी. समोर, हुबळी - ५८००२०, कर्नाटक

श्रीमहाराजांकडून अनुग्रह प्राप्त झालेले श्री दत्तोपंत तबीब आणि चिदंबर नाईक करी यांनी हुबळी किल्ला येथे उमामहेश्वर मंदिरात श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती श्रीं पावन हस्ते स्थापन केल्या. हे उमामहेश्वर मंदिर चिदंबर स्वामी यांनी स्थापन केले होते. हे मंदिर आकर्षक असून येथे पुराण, प्रवचन, भजन निरंतर सुरु असते. 

हुबळी येथील रामस्थापनेच्या वेळी झालेली गोष्ट मागच्या लेखात येऊन गेलीच आहे.
 याच वर्षी मुंबईहून परत गोंदवल्यास आल्यावर बर्‍याच मंडळींनी घेऊन श्रीमहाराज हुबळीला गेले. दर्शनाला खूप गर्दी झाली म्हणून तबीबांनी श्रींना दिवाणखान्यातून वरच्या मजल्यावर खोलीत बसवले व सेवेला मनुष्य दिला. खोलीतील कोनाड्यात लावलेली मेणबत्ती श्रींनी पंख्याने विझवली व पुन्हा खाली दिवाणखान्यात येऊन बसले. श्री आलेले पाहून मंडळींना खूप आनंद झाला. रात्री ११ पर्यंत सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले. 

रामाच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी श्री मंदिरात जाण्यासाठी निघाले व कोणाला नकळत जानकीबाईंच्या घरी गेले. (जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदगला असताना त्यांच्याकडे  स्वयंपाकाला होती. भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही ७५ वर्षांची बाई हुबळीला येऊन राहिलो.) श्री तिच्याकडे गेल्यावर म्हणाले. "जानकीबाई, कालपासून मला ताप आहे, बुरकुल्यात थोडा मऊ भात शिजवा व आमसुलाचे सार करुन खायला घाला." तिने लगेचच सार भात केला व आपल्या हाताने भरवला. श्री तेथून निघताना जानकी त्यांच्या पाया पडली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले. श्री म्हणाले, " माय, तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली. होईल तेवढे नाम घ्या. राम आपले प्रेम तुम्हाला दिल्यावाचून राहणार नाही. शांत आनंदात रहा." श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यावर खूप अन्नदान झाले. श्री सिद्धारुढ स्वामी यांचे श्रींना आमंत्रण आले. मठात गेल्यावर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. श्रींनी काही सांगावे अशी स्वामींनी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, " भगवंताचे अखंड स्मरण राखावे" हीच स्वामींची आज्ञा आहे अशी माझी खात्री आहे हे स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा; हे जो करील त्याच्या हाताला धरुन स्वामी तुम्हाला भगवंतापर्यंत पोचवतील. ही मी हमी देतो. हे ऐकल्यावर स्वामी एकदम उद्धारले, "साधु साधु !! वा वा फार छान" त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामींनी आपला मठ व बांधून ठेवलेली समाधी श्रींना दाखवली. पुढे हुबळीला एक दिवस राहून श्री गोंदवल्यास आले





 

 

 

 

 

 

 

 

***
२२.  कुर्तकोटी राममंदिर, १९०९
कुर्तकोटी, जि. गदग, कर्नाटक

या मंदिराबद्दल मागे उल्लेख येउन गेला आहे.
कुर्तकोटी येथे महाभागवत यांच्या भाऊबंदांच्या मालकीचे गौरीशंकर मंदिर होते. १९०८ मधे श्रीमहाभागवत यांच्या आमंत्रणनुसार श्री महाराज कुर्तकोटी येथे आले होते तेव्हा काशीबाईंच्या याच गौरीशंकर मंदिरात चातुर्मासाचे चार महिने राहिले होते. त्यावेळी या मंदिरात श्रींनी स्वहस्ते राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची स्थापना केली होती.तेव्हापासून हे राम मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
***



 

 

 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम!
संकलन - श्रीमहाराज कन्या

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...